स्वातंत्र्योत्तर काळात, १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीआधी क्रांतीचे नारे सुरूच असताना एका प्रवचनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : देशात आज जिकडेतिकडे क्रांतीच्या गर्जना सुरू आहेत. सर्वाना याची जाणीव झाली आहे की, देशात आज क्रांती होणे आवश्यक आहे, मग ते कोणत्याही पंथ- पक्षाचे लोक असोत! पण ही ‘क्रांती’ म्हणजे तरी काय? धामधूम, गुंडगिरी, अराजकता म्हणजे क्रांती असे म्हणता येईल का? नाही.. क्रांती ही विध्वंसासाठी नव्हे तर शांती प्राप्त व्हावी म्हणून करावयाची असते. सर्वाना क्रांतीची भूक लागली आहे. याचाच अर्थ हा की देशाचे जीवनमान फारच खाली आले आहे. याची जाणीव सर्वाना झाली आहे. अर्थात या स्थितीत बदल होणे, परिवर्तन होणे आवश्यक आहे हे परिवर्तन म्हणजेच क्रांती! परंतु अलीकडे लोक क्रांतीचा अर्थ रक्तपात, हाणामारी करू लागले आहेत, तो चुकीचा आहे. क्रांतीच्या अपरिहार्यतेविषयी महाराज तरुणांना उद्देशून म्हणतात : जग हे नेहमीचेच क्रांतिशील आहे; क्रांती हा त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे. जग सदैव क्रांतीचे गीत गात चाललेले असते. जगातील अशी कोणतीच वस्तू नाही की ज्यामध्ये क्रांती होत नाही. जग या शब्दाच्या मुळातच क्रांतीचा ध्वनी साठवलेला आहे. धान्य पेरून त्यांना त्यांची विशिष्ट फळे आल्यावर कापणी करावी लागते आणि तेच धान्य पुन्हा मिळावे म्हणून हाती आलेली धान्यबीजे फिरून भूमीत पेरावी लागतात. याप्रमाणे नेहमीच होत राहणाऱ्या क्रांतिचक्रातून जगाचे जीवन समृद्ध होत असते. जगाच्या आंदोलनात मध्यिबदू कायमचा टिकत नसतो, कोणत्या तरी बाजूला अधिक-उणेपणा येतोच, आणि तो घालवून फिरून घडी बसविण्याकरिता क्रांती करावीच लागते. महाराज उदाहरण देताना म्हणतात, जेव्हा लोक भोगनारायण असतात तेव्हा त्याग प्रवृत्ती करणारी क्रांती निर्माण करावी लागते; तर जेव्हा लोक त्यागाने व श्रेयसाच्या विकृत अतिरेकाने- निष्क्रिय होतात तेव्हा अभ्युदयोन्मुख क्रांती घडवून आणावी लागते. मनुष्याचा स्वभाव नेहमीच प्रयत्नशील असत नाही; त्यासाठी प्रयत्नहीनतेची थंडी घालवून त्यांना तयार करणारी क्रांती करावी लागते. आणि प्रयत्नवादाच्या एकांगी अतिरेकाने लोक मदांध बनले व प्रयत्नमार्ग चुकून जाऊ लागले म्हणजे त्यांना मार्गावर आणून जगातील दु:खाचा उन्हाळा संपवणारी क्रांती करणे भाग पडते. अर्थात जगाचा तोल क्रांतीद्वारे एका सुवर्णमध्यावर आणून ठेवावयाचा असतो व यातच जगाला शांती लाभते. ज्यांना हा मध्यिबदू ओळखून कार्य करण्याची दृष्टी आलेली असते तेच समाजाचे खरे पुढारी समजले पाहिजेत, मग ते संत, नेते वा राज्यकर्ते- कोणीही असोत. जीवनाचा मध्यिबदू चुकला की तो सावरणारी क्रांतीही व्हायलाच पाहिजे असते. परंतु एकदा क्रांती झाल्यावरही तिला जसजसा काळ लोटत जातो तसतशी समाजात विकृती होत जाते व ही विकृती झाली की एक मोठा कर्मठ पक्ष तयार होतो. त्या पक्षाचा इतिहास बनू लागला म्हणजे क्रांतीचा विजय कठीणतेने करावा लागतो.राजेश बोबडे