दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मितेवर स्वार होत प्रादेशिक पक्षांना सत्ता मिळत गेली. पण या प्रादेशिक नेत्यांच्या लहरी स्वभावाचा राज्यांना तेवढाच फटकाही बसला. तमिळनाडूत एम. जी. रामचंद्रन किंवा जयललिता, आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव यांच्या कार्यकाळात हे अनुभवास आले आणि सध्या तेलंगणात के. चंद्रशेखर राव आणि आंध्रमध्ये जगनमोहन रेड्डी या दोन मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत फार काही वेगळे अनुभवास येत नाही. आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम असेल ही मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची घोषणा हा त्यांच्या लहरी स्वभावाचा आणखी एक नमुनाच मानावा लागेल. केंद्रात यूपीएची सत्ता असताना काँग्रेस नेत्यांनी घातलेल्या घोळामुळे आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन झाले. तेव्हापासून आंध्र प्रदेशच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याची चिन्हे नाहीत. २०१४ मध्ये आंध्रचे विभाजन झाले आणि गेल्या नऊ वर्षांत या राज्याला अद्यापही राजधानीचे शहर वसविता आलेले नाही. या नऊ वर्षांत अमरावती, विशाखापट्टणम (प्रशासनिक), अमरावती (विधिमंडळ) तर कर्नुल (न्यायालयीन) अशा चार राजधान्यांची घोषणा झाली. पण दुर्दैवाने अद्यापही या राज्याची अधिकृत राजधानी विकसित होऊ शकली नाही. राज्याच्या विभाजनानंतर सत्तेत आलेल्या तेलुगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी अमरावती ही राजधानी म्हणून विकसित करण्याची घोषणा केली होती. चंदीगड किंवा नवीन रायपूरनंतर अमरावतीमध्ये नियोजनबद्ध राजधानी उभारण्याची योजना होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधांनी उपयुक्त असे राजधानीचे शहर वसविण्याकरिता सिंगापूरमधील एका कंपनीशी आंध्र सरकारने करार केला. भूसंपादन ही मोठी डोकेदुखी होती. कारण शेतकऱ्यांनी नदी काठावरील सुपीक जमीन देण्यास विरोध दर्शविला होता. यावर चंद्राबाबू नायडू सरकारने तोडगा काढला होता. यानुसार शेतकऱ्यांनी त्यांच्या मालकीची जमीन सरकारकडे सुपूर्द करायची. त्यावर सरकारने रस्ते, पायाभूत सुविधांची कामे करायची, रहिवाशांना सरकारने वीज आणि अन्य सुविधा पुरवायच्या आणि विकसित झालेला जमिनीचा काही तुकडा मूळ मालकाला परत द्यायचा. यातून शेतकऱ्यांचा फायदा झाला. कारण सरकारकडून सर्व सुविधांनी युक्त अशा परत मिळणाऱ्या जमिनीचा भाव गगनाला भिडणारा होता. यातूनच भूसंपादनाचे ‘अमरावती मॉडेल’  देशाच्या अन्य भागातही राबविण्याची मागणी होऊ लागली. सर्व अडथळे दूर करून आंध्र प्रदेश सरकारने अमरावती राजधानी म्हणून विकसित करण्यावर भर दिला असतानाच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाला. जगनमोहन रेड्डी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यापासून अमरावती शहराच्या विकासाची कामे थंडावली. त्यातच जगन सरकारने सिंगापूरमधील कंपनीबरोबरचा करारच रद्द केला. त्याचे आंतरराष्ट्रीय वित्तीय क्षेत्रात पडसाद उमटले, ते वेगळे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm jagan mohan reddy announced visakhapatnam new capital of andhra pradesh zws
First published on: 03-02-2023 at 04:13 IST