भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना झाल्यानंतर काही दिवसच झाले होते. संस्थेचे पहिले प्रमुख आणि भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे प्रणेते विक्रम साराभाई गुणवान युवा शास्त्रज्ञांच्या शोधात होते. एका तरुण संशोधकाकडे त्यांनी विचारणा केली. त्या संशोधकाकडे विख्यात कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कले) संशोधन करण्याची संधी चालून आली होती. भारतात तोपर्यंत तरी अवकाश संशोधन हे क्षेत्रच जेमतेम अस्तित्वात आले होते. निर्णय सोपा नव्हता. पण साराभाईंबरोबर काम करण्याची संधी मिळेल, या एकाच कारणाने त्या संशोधकाने भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्या संशोधकाचे नाव कृष्णस्वामी कस्तुरीरंगन. विक्रम साराभाईंनी रचलेल्या पायावर आज ‘चंद्रयान’, ‘मंगलयाना’चे कळस चढवले जात आहेत. ही वाटचाल अजूनही खूप पुढे, खूप उंच जाईल. या वाटचालीत आणि बांधणीत ज्यांचे अमूल्य योगदान आणि मार्गदर्शन लाभले, ते कस्तुरीरंगन नुकतेच निराकार अनंताच्या प्रवासाला निघून गेले. पण जाताना अंतराळ संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याच्या रूपात त्यांच्या स्मृती चिरकाल राहतील.

चंद्रयान मोहिमेच्या यशाच्या वेळी त्यांची मुलाखत घेतली गेली, त्या वेळी चंद्रयानाच्या साफल्यापेक्षाही ‘साराभाईंबरोबर काम केलेल्या मोजक्या हयात संशोधकांपैकी एक’ असल्याचा अभिमान त्यांनी आपुलकीने जागवला. असे कृतार्थभावदर्शन ही भारतीय संशोधन संस्कृतीची खरी ओळख. कारण अंतराळ संशोधन किंवा आण्विक संशोधन अशा व्यामिश्र क्षेत्रांमध्ये खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागले हे त्या पिढीलाच ठाऊक. मूलभूत संशोधनासाठी फार विद्यापीठे उपलब्ध नाहीत; जी आहेत त्यांमध्ये निधीची कायम चणचण; नेमके कशासाठी संशोधन करायचे याविषयी धोरण पुरेसे स्पष्ट नाही; शिवाय त्यात प्रगत जगताकडून सल्लेवजा अवेहलना… या काळात प्रगत विज्ञान संशोधन ज्या देशांत सुरू ते सगळे समृद्ध, सामर्थ्यवान होते. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमातून विश्वाचा धांडोळा घेण्यापेक्षा भारताच्या गरीब जनतेला फायदा काय होईल हे पाहावे, अशी साराभाईंची भूमिका होती. कस्तुरीरंगन यांनी ती आचरणात आणली. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन मूळचे केरळमधील एर्नाकुलमचे. पण वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे पदवीचे शिक्षण मुंबईत रुईया महाविद्यालयात झाले.

भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवीही त्यांनी मुंबई विद्यापीठातूनच प्राप्त केली. अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये (पीआरएल) त्यांनी साराभाईंच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संशोधन केले. गॅमा किरण, वैश्विक किरण आदींचा समावेश असलेले उच्चऊर्जा खगोलशास्त्र हे त्यांच्या आवडीचे आणि संशोधनाचे क्षेत्र. साराभाईंनी त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला होता, त्या क्षेत्रासाठी अभियांत्रिकी प्रशिक्षणाची पार्श्वभूमी आवश्यक होती. पण ‘बलून पे-लोड’ या क्षेत्रातील तुझ्या संशोधनाचा अनुभव भविष्यातील मोहिमांसाठी उपयोगी ठरेल, अशी समजूत साराभाईंनी काढल्यानंतर कस्तुरीरंगन ‘इस्रो’मध्ये दाखल झाले. साराभाई १९७१मध्ये निवर्तले. त्यांच्यानंतर एम. जी. के. मेनन, सतीश धवन, यू. आर. राव या अभ्यासू संचालकांनी विक्रम साराभाई यांच्या स्वप्नातील ‘इस्रो’ला आकार दिला.

भारतासारख्या कृषीकेंद्री अर्थव्यवस्थेस हवामानवेध मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरते. या क्षेत्राशी संबंधित दूरसंपर्क, प्रसारण, हवामानशास्त्र, भू-निरीक्षण यांसाठी आवश्यक उपग्रह विकसित करणे आणि ते अंतराळात सोडणे यांस प्राधान्य दिले गेले. १९९४मध्ये ज्या वेळी कस्तुरीरंगन ‘इस्रो’चे संचालक बनले, तोपर्यंत या क्षेत्रात भारताने बऱ्यापैकी मजल मारली होती. आता गरज होती, खऱ्या अर्थाने ‘दूरच्या’ अंतराळात झेप घेण्याची. चंद्रावर, मंगळावर मानवरहित मोहिमा, अंतराळात मानव पाठवण्याची मोहीम, पहिले भारतीय अंतराळस्थानक उभारण्याची मोहीम यांविषयी विचार, मार्गदर्शन, तयारी करणे कस्तुरीरंगन यांच्या आधिपत्याखाली सुरू झाले. त्यांनी सूत्रे स्वीकारली, त्यानंतर लगेच ‘इस्रो’ हेरगिरी प्रकरण बाहेर आले. अशा वेळी कस्तुरीरंगन यांनी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याशी संपर्क साधून विविध मोहिमांच्या प्रगतीवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली.

१९९८ मधील अणुचाचण्यांनंतर अमेरिकेसह प्रगत देशांनी भारतास उच्च तंत्रज्ञान पुरवण्यास नकार दिला अस खऱ्या अर्थाने कस्तुरीरंगन यांनीच ‘आत्मनिर्भरते’च्या सूत्रास खऱ्या अर्थाने आकार दिला. १९९४-२००३ असे जवळपास दशकभर ‘इस्राो’चे नेतृत्व केल्यानंतरही राज्यसभा सदस्य, नियोजन आयोगाचे सदस्य, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ठरवणाऱ्या समितीचे अध्यक्ष अशा भूमिकांतून त्यांचे मार्गदर्शन लाभत राहिले. भारतीय अंतराळ संशोधनातील या ‘मंगलपर्वा’च्या प्रणेत्यास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली!