अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र आणि त्यातील उज्ज्वल संधींबाबत आज जगभरात सर्वत्रच बोलबाला आहे. देशातील सर्वच बडी उद्योग घराणी मोठमोठय़ा गुंतवणूक नियोजनासह या क्षेत्रावर सध्या बाजी लावून आहेत. मात्र अडीच-तीन दशकांपूर्वी स्वच्छ-हरित ऊर्जेचे स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्ष साकारण्याची धमक दाखविली ती तुलसी आर. तांती यांनी. काळाच्या किती तरी पुढे पाहण्याच्या त्या झपाटलेपणाची पुरेपूर ‘किंमत’ही त्यांना मोजावी लागली. पवन ऊर्जेच्या क्षेत्रात सुझलॉन एनर्जी ही भारतात पुण्यात मुख्यालय असलेली जागतिक कंपनी त्यांनी साकारली आणि ध्येयासक्तीने कोणता चमत्कार घडू शकतो याचा प्रत्ययही दिला. पुण्याच्या सीमेवरील ‘वन अर्थ’ या मुख्यालयाच्या चित्ताकर्षक संकुलात पत्रकारांशी बोलताना, ‘वर्ष दोन-वर्षांत सुझलॉन ही जगातील पवन ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी व नफाक्षम कंपनी बनेल, पाहा..’ असे तांती तडफेने सांगायचे. हे सांगण्याचा प्रसंग एकदा नव्हे तर, २०११, २०१४, २०१९ असा प्रत्येक तीन-चार वर्षांच्या अंतराळात वारंवार त्यांच्यावर आला. पण प्रत्येक वेळी ते तितक्याच प्रांजळतेने व निर्धारपूर्वक बोलताना अनेकांनी पाहिले असतील. आता मागे वळून पाहायचे नाही.. वाईट काळासह सर्व समस्याही आता इतिहासजमा होतील, अशा जोमानेच त्यांचे वादळी दौरे आणि बैठका अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होत्या.

सुरुवात वस्त्रोद्योगापासून करणाऱ्या तांती यांनी उत्पादनासाठी येणारा विजेचा खर्च खूपच जास्त असल्याचे लक्षात आल्यावर, स्वस्त, पर्यायी विजेच्या शोधातून १९९५ मध्ये सुझलॉन या कंपनीला जन्म दिला. अल्पावधीत भारतातील पवन ऊर्जा उद्योगातील अग्रगण्य कंपनी आणि दशकभरानंतर, जगातील अव्वल पाच पवनचक्क्या उत्पादकांमध्ये तिने स्थान मिळविले. वेगाने पावले टाकत जग पादाक्रांत करण्याची धडाडी जोखीमयुक्त पण जगाला हेवा वाटावी अशी होती. जागतिक विंड टर्बाइन उत्पादक जर्मन कंपनी ‘आरई पॉवर’चे २००७ मधील त्यांनी केलेले संपादन तर संपूर्ण जगाला धडकी भरवणारे होते. पण काळाची पावले उलटी पडू लागली, २००८ सालच्या जागतिक अरिष्टाने संपूर्ण व्यापारचक्रच उलटेपालटे केले. भारताअंतर्गत मात्र वेगळीच आव्हाने होती. आधीच दिवाळे वाजलेल्या राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांनी देणी थकवली;  तर अनेक राज्यांतील सरकारेच सुझलॉनविरोधात नकारात्मक भूमिका घेऊन उभी ठाकली. व्यवसाय विस्तारासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड उत्तरोत्तर जिकिरीची बनत गेली. याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे दिवाळखोरीच्या कार्यवाहीला कंपनीला २०१९ मध्ये सामोरे जावे लागले. कर्जबाजारी सुझलॉनचे अपयश हे खरे तर देशाच्या शाश्वत ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी नियोजनाचे अपयश ठरले असते. धनको व कर्जदात्या बँकांच्याही हे ध्यानात आले. संपलेच सारे काही.. असे वाटत असतानाच पुन्हा उसळी मारून झेप घेतल्याचे प्रसंग एका व्यक्तीच्या आयुष्यात इतक्यांदा येतात हेच खरे तर अतीव नवलाचे. कंपनीला तोटय़ातून नफ्यात आणण्याचा कायापालट त्यांनीच चालू वर्षांत घडवून दाखविला. कर्ज ओझे कमालीचे कमी करीत जून २०२२ अखेर ३,२७२ कोटींवर आणले गेले. ते आज नसले तरी, कंपनीने योजलेली हक्कभाग विक्रीची आणि त्यायोगे १,२०० कोटी रुपये उभारण्याची योजना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार असल्याचेही दिसत आहे. वाऱ्याच्या वेगाचाच शक्ती म्हणून वापर करणाऱ्या तुलसी तांती यांनीही मग कायम वादळाची स्वारी करणे हे केवळ क्रमप्राप्तच आणि ओघाने होतही राहिले. पण अशा स्वारीसाठी काळ जेव्हा अनुकूल बनला तेव्हा ते आपल्यात नाहीत, हे दु:खदच!

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…