रवींद्र महाजन

जग कम्युनिझम आणि भांडवलशाहीव्यतिरिक्तच्या तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे. एकात्म मानव दर्शनाच्या रूपाने आपल्याला तो उपलब्ध आहे. पण त्याच्याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेलेले नाही.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

पूर्वीच्या लेखांमधून एकात्म मानव दर्शनाची तात्त्विक, धोरणात्मक, क्षेत्रश: संक्षेपाने मांडणी झाली आहे. कोणी म्हणेल तत्त्वज्ञान चांगले आहे पण ते व्यवहारात आणले जाऊ शकत नसेल वा आणण्याची योजना नसेल वा त्यासाठीची सक्षम यंत्रणा नसेल तर त्याचा समाजाला काय उपयोग? सुदैवाने एकात्म मानव दर्शन हे एकदम नवे नाही, व्यवहारक्षम आहे. काही प्रमाणात राष्ट्रव्यवहारात होतेच व हळूहळू त्याचा वापर वाढतो आहे. हा कुठलाही वाद किंवा ठाशीव कल्पनाप्रणाली नाही की ज्यात सर्व काही आधीच आखले गेले आहे. म्हणून यात नव्या प्रयोगाला व परिस्थितीजन्य वेगळेपणाला वाव आहे.

हाच तिसरा सक्षम पर्याय

कम्युनिझम कोसळल्यानंतर व भांडवलशाहीची अडखळती स्थिती, तसेच एका संकटाकडून दुसऱ्या संकटाकडे वाटचाल पाहून पश्चिमेतील मान्यवरदेखील तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन (१९९२-२०००) तसेच इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर व जर्मनीचे माजी चान्सेलर गे-हार्ड श्रोडर हे या पर्यायशोधाला ‘थर्ड वे’ असे संबोधत असत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी संचालक अँथनी गिडन्स  तसेच नॉर्मन करूलड, इ. नामवंत व्यक्तीदेखील ‘थर्ड वे‘चा सिद्धांत मांडतात.  एकात्म मानव दर्शनाच्या रूपाने आपल्याला हा सशक्त पर्याय उपलब्ध आहे. परंतु आजवरील सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ते पश्चिमी विकासप्रतिमानातच गुंतून राहिले.

एकात्म मानव दर्शन – मांडणी उपलब्ध

एकात्म मानव दर्शन राष्ट्रीय व्यवहारात अमलात आणण्यासाठी चार पायऱ्यांचा विचार आवश्यक आहे. तत्त्वज्ञानावर आधारित धोरणे, अंमलबजावणी योजना, नेमके कार्यक्रम व तळागाळापर्यंतच्या यंत्रणेतून प्रत्यक्ष अंमलबजावणी. तसेच कामाचे वेळोवेळी मूल्यांकन व आवश्यक बदल हेही महत्त्वाचे आहे. हे काही प्रमाणात झाले आहे. ती मांडणी उपलब्ध आहे.

लोकमतपरिष्कार, राष्ट्रीय सहमती व स्वीकार

एकात्म मानव दर्शन राष्ट्रव्यवहारात आणावयाचे असेल तर लोकमतपरिष्कारातून (समाजमानस परिवर्तन) राष्ट्रीय सहमती बनवावी लागेल.

 काही उपक्रम :

– सध्याच्या अयोग्य विकासप्रक्रियेला एकात्म मानव दर्शन हा सशक्त पर्याय यावर सर्वत्र विचारमंथन. भिन्न विचारसरणीच्या लोकांशी चर्चेद्वारा शंका दूर करून सहमती वाढवणे.

– शिक्षणक्षेत्रात या विचारांचा समावेश करणे.

– सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांचा समाजमानस बनवण्यात सक्रिय विधायक सहभाग मिळवणे.

– या विचारांवर आधारित विकासाचे प्रयोग करीत असलेल्यांना बळ देणे.

या लोकमतपरिष्कार प्रयत्नाने राष्ट्रीय सहमतीतून सिद्धांत स्वीकारला गेल्यानंतर योजनेची रूपरेषा व स्वरूप निश्चित होऊ शकते. रूपरेषेशी साधारणपणे सहमत असणाऱ्यांतर्फे एका राष्ट्रीय निर्धार परिषदेचे आयोजन कामास गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल. संसदेमध्ये यासंबंधी चर्चेतून ठराव केल्यास ते एक चांगले निर्णायक वळण ठरेल.

एकात्म मानव दर्शन आज समाजव्यवहारात भारताच्या पाच हजार वर्षांच्या ज्ञात इतिहासात साडेचार हजार वर्षे भारत हा आर्थिकदृष्टया सन १७५० पर्यंत पहिल्या क्रमांकाचा देश होता असे पाश्चात्त्य अर्थशास्त्रींनीच लिहून ठेवले आहे. हे एकात्म मानव दर्शनाच्या आधारावर. आजही हे चिंतन आपल्या व्यवहारात दिसते. समाजात दिसणारी समग्र दृष्टी, सहकारी भाव, सुदृढ कुटुंबपद्धती, शेजारधर्मपालन, अर्थव्यवहारातील नैतिकता, सरकारवर अवलंबून नसणारी सामाजिक सुरक्षा, बचतीची सवय, जनावरांप्रतीही आपुलकी, निसर्गाविषयी पूज्य भाव व जपणूक, इ.

एकात्म मानव दर्शनावर आधारित विकासाचे नवे यशस्वी प्रयोग होत आहेत. उदा. चित्रकूट (दीनदयाळ शोध संस्थान), नार्डेप प्रकल्प (विवेकानंद केंद्र कन्याकुमारी), संघग्रामविकास,  जमीन-जंगल विकास (चेतराम पवार), राळेगणसिद्धी (अण्णा हजारे), लवाद्याचे संपूर्ण बांबू केंद्र, दीनदयाळ ग्रामसंकुल (शिवालिक), पाणी व नैसर्गिक शेती (लोकभारती लखनौ), ग्रामविकास (दीनदयाळ धाम, फरहा, मथुरा) इ.

 कार्यान्वयन व प्राथमिकता

एकात्म मानव दर्शन राष्ट्रव्यवहारात कार्यान्वयित करताना खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत :

 एक व्यक्ती व संस्था यांत सुयोग्य परिवर्तन, दोन राष्ट्रीय आंदोलन, सुयोग्य परिवर्तन.

१- स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, आधुनिक भारताने हातात आपले अध्यात्म ज्ञान घट्ट धरून ठेवावे व दुसऱ्या हातात अभ्युदयाचा उदंड साक्षेप करावा. जगातून जे घेण्यासारखे वाटेल ते घ्यावे व आपल्या जुन्या लौकिक व्यवस्थांपैकी जे टाकावेसे वाटेल ते खुशाल टाकून द्यावे.

२- व्यक्ती व समूहातील गुणविकासास प्राधान्य देऊन किमान व्यवस्थापरिवर्तन करत पुढे जाणे.

३- जुने पुसणे शक्यही वा आवश्यकही नाही. जेथे, जसे आहोत तेथून परिवर्तनास सुरुवात करणे.

४- आपल्याला केवळ काही प्रयोगांत यश नको, तर हे तत्त्वज्ञान मुख्य धारेत उतरले पाहिजे.

५- संस्था परिवर्तनाची सुरुवात सध्या कार्यरत महत्त्वाच्या सार्वजनिक संस्थांच्या तत्त्वज्ञान-आधारावर परीक्षणापासून करणे योग्य राहील. त्यात इच्छित बदलासाठी नवी व्यवहारसूत्रे तसेच त्या चालविणाऱ्या मुख्य पदाधिकाऱ्यांसाठी आचारसंहिता बनवाव्यात. त्यांच्या सुयोग्य अंमलबजावणीतून इच्छित बदल होतील. त्यातून संबंधित व्यक्तींचे दृष्टीपरिवर्तनही व्हावयास हवे. यासाठी चर्चा, संवाद, प्रशिक्षण, इ. आवश्यक असतील.

६- अंमलबजावणी वेगवेगळय़ा स्तरांवर यथाशक्य तशी, पण मार्गदर्शक सूत्रात्मक बृहत् आराखडा आवश्यक.

७- वेगवेगळय़ा स्तरांवर मार्गदर्शक, तज्ज्ञ, आढावा मंडळे असली पाहिजेत. हे काम सुरुवातीस स्वयंसेवी पद्धतीने करावे.

राष्ट्रीय आंदोलन

या कामाला गती देण्यासाठी व वातावरणनिर्मितीसाठी राष्ट्रीय आंदोलनाचा विचार करावा. यासाठी ‘भारत – एक वैश्विक शुभशक्ती’ हे नाव योग्य राहील. इतर नावांचा विचार होऊ शकतो. या आंदोलनात राष्ट्रीय पुनर्निर्माण, विश्वमित्र भारत, समर्थ भारत, विकसित भारत, पूर्णत्व, गुणवत्ता आंदोलन, आत्मनिर्भरता अशा सर्व भावांचा समावेश होऊ शकतो. कार्यरत अशा सर्वासाठीच हे आंदोलन प्रेरक ठरू शकते.

अडचणीवर मात

राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे हे कार्य सोपे नाही, अडचणींवर मात करावी लागेल. उदा.

– काही गट भारतीय संस्कृतीला विरोध करीत आहेत, त्यांचे संवादातून प्रबोधन करावे लागेल.

– जगातील इतर समाजांशीही आपला संबंध आला व येत राहील. ते त्यांच्या मित्रत्वाच्या, आक्रमकतेच्या, वा लुटण्याच्या भूमिका घेऊन येतात. त्यांच्याशी राष्ट्रहित व शेवटी मानवहित लक्षात घेऊन यथायोग्य व्यवहार करून सुजनतेचे संवर्धन व दुर्जनतेचे निर्दालन करून धर्मस्थापना (सुख, शांती, नैतिकता, न्याय) करण्याची क्षमता नसेल तर आपणच आक्रमकांचे भक्ष्य होतो. यासाठी शुभ शक्तिसंपादन करत राहावे लागेल. दुराचरणाला अनाठायी दया दाखविण्याच्या सद्गुण विकृतीत न पडण्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे.

आम्ही सर्वानी काय करावे?

परदेशी विकासपद्धतीच्या मोहातून व अनुकरणप्रेमातून बाहेर पडावयाचे की त्यातच रुतून आणखी परदेशी कह्यात जायचे व त्यांचे रोग आपल्यातही घ्यायचे हा निर्णय कठोरपणे घ्यावा लागेल. आपली जीवनदृष्टी, आपले तत्त्वज्ञान व संस्कृती आपल्याला स्वत्त्वाच्या आधारावर राष्ट्रपुनर्निर्माणासाठी साद देताहेत, तिला सुयोग्य प्रतिसाद देणे हे आपले कर्तव्य आहे. विशेषत: आध्यात्मिक मार्गदर्शक, सर्व क्षेत्रातील सामाजिक नेतृत्व, शिक्षणसंस्था, सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमे, उद्योग व कामगार संघ अशा सर्वानीच आपणहून योग्य जबाबदारी उचलली पाहिजे. आजच्या भ्रष्टाचाराच्या, ग्राहकांना येनकेनप्रकारेण ओरबाडणाऱ्या व सामान्य माणसाला विकासाची फळे न मिळू शकणाऱ्या सामाजिक परिस्थितीत आपण केवळ चांगले गृहस्थ-गृहिणी वा ग्राहक न राहता ‘जागरूक नागरिक’ बनलो नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

   पुनश्च

हिंदू चिंतन ‘सर्वभूतहिते रत:’ हा भाव समोर ठेवून ‘सर्वाचे सर्व प्रकारचे सुख’ हेच आपले केंद्रीय उद्दिष्ट घोषित करते. त्याने समग्र-समन्वित-एकात्म सुख याचाच स्वीकार केला आहे. अशाच दृष्टिकोनातून प्रा. गुन्नार मिर्डल यांनी ‘समग्र सामाजिक सुख’ (ग्रॉस सोशल हॅपीनेस) ही मोजपट्टी ग्राह्य मानली आहे.

थोडक्यात आपल्याला नव्या संरचनेत ‘पोषणक्षम अर्थतंत्र’, ‘धारणक्षम तंत्रज्ञान’ व ‘संस्कारक्षम समाज-तंत्र’ याकडे जावयाचे आहे. पण समाज संस्कारित झाल्याशिवाय पोषणक्षम अर्थतंत्र किंवा धारणक्षम तंत्रज्ञान येणार नाही.

दीनदयाळजींचे राष्ट्रीय स्वप्न ‘‘विश्वाचे ज्ञान व आजपर्यंतची आपली परंपरा यांच्या आधारावर आपण असा भारत निर्माण करू, की जो आमच्या पूर्वजांच्या भारताहून अधिक गौरवशाली असेल; व तसेच तेथे जन्मलेला प्रत्येक मनुष्य स्वत:चे व्यक्तित्व विकासशील बनवितानाच केवळ सबंध मानवजातच नव्हे, तर संपूर्ण सृष्टीबरोबर एकात्मतेचा साक्षात्कार घडवून नरापासून नारायण बनविण्यास समर्थ होईल.’’

आपण सर्वजण हे कार्य एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून निष्ठेने करू तर नजीकच्या भविष्यकाळात जागतिक पटावर भारत एक सर्वजनहितकारी विकसित देश व शुभ महाशक्ती म्हणून नक्कीच दिसेल.

लेखक अभियांत्रिकी अधिस्नातक, व्यवस्थापन सल्लागार, तसेच स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. सहसंयोजक आहेत.