रवींद्र महाजन

जनतेच्या मनोवृत्तीमध्ये योग्य परिवर्तन करून जनचेतनेच्या आधारावर संतुलित चिंतन व व्यवहार यातून आर्थिक प्रगती साधणे हेच सर्वाच्या हिताचे आहे.अर्थशास्त्राला आज आलेले कळीचे महत्त्व लक्षात घेऊन काही संकल्पनांचा एकात्म मानव दर्शनाच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

अर्थायाम

भारतीय अर्थशास्त्राने धनाचा प्रभाव व अभाव दोन्हीही नष्ट करणाऱ्या संतुलित अर्थव्यवस्थेच्या ‘अर्थायाम’ कल्पनेचा पुरस्कार केला आहे. अर्थअभावामुळे व्यक्तीला कर्तव्यरूप धर्माचे पालन करणे अवघड होते. ती वाममार्गाकडे वळते. संपत्तीच्या अभावामुळेच नव्हे, तर अत्यधिक प्रभावामुळेही धर्माचा ऱ्हास होतो. या दुष्प्रभावाचा विचार पाश्चात्त्यांनी टाळलेला दिसतो. संपत्तीचा प्रभाव म्हणजे प्रत्यक्ष संपत्तीसंबंधी किंवा त्यायोगे प्राप्त होणाऱ्या वस्तूसंबंधी, भोगविलासासंबंधी आसक्ती जडणे. अशी व्यक्ती विवेकहीन होऊन देश, धर्म, समाज इत्यादी विसरून स्वत:च्या व समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरते. मानवी श्रमांच्या आधारे अधिकाधिक उत्पादन, सुयोग्य वितरण, संयमित उपभोग आणि बचतीतून पुनर्निर्माण हे ‘अर्थायामा’चे महत्त्वाचे घटक आहेत, असे दीनदयाळजी म्हणत. यासाठी शिक्षण, संस्कार, कौशल्यांनी युक्त असलेल्या व्यक्तींची निर्मिती व अर्थव्यवस्थेचे आवश्यक तेवढे नियोजन हा मार्ग हवा.

अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

योगी अरिवदांनी सांगितलेले अर्थशास्त्राचे उद्दिष्ट ‘स्पर्धात्मक अथवा सहकारी तत्त्वावरील निर्मिती करणारे एक विराट यंत्र विकसित करणे हे नाही. एकटय़ा दुकटय़ा नव्हे, सर्वच मानवांना जास्तीत जास्त प्रमाणात स्वत:च्या स्वभावाप्रमाणे कार्य करण्याचा आनंद देणे, आंतरिक प्रगतीसाठी आवश्यक ती उसंत देणे आणि साधे, समृद्ध व सुंदर जीवनमान प्राप्त करून देणे..’ दीनदयाळजींच्या मते लोकांचे पालनपोषण, जीवनविकास तसेच राष्ट्राची धारणा व विकास यांसाठी जी मूलभूत साधने त्यांचे उत्पादन हेच अर्थव्यवस्थेचे लक्ष्य असावे. किमान मर्यादा गाठल्यानंतर अधिक समृद्धी व सुख यांसाठी अर्थोत्पादन करावे किंवा नाही या प्रश्नाला हात घालावा.

विकेंद्रीकरण

केंद्रीकरण साधारणत: घातक असल्याने टाळावे. म्हणून सर्व क्षेत्रांत सर्व स्तरांवर अधिकार व जबाबदारी यांचे शक्य तितके विकेंद्रीकरण करावे. निसर्गातल्या सर्व गोष्टी विकेंद्रित आहेत. त्यांच्याशी समांतर अशी मानवी रचनाही विकेंद्रितच असावी. मानसिक, आध्यात्मिक विकासासह मानवाला सौख्य लाभावे हे ध्येय विकेंद्रित व्यवस्थेमध्येच साधेल. विकेंद्रीकरणाचे मूलभूत एकक व्यक्ती वा कुटुंब हे आहे. व्यक्तीबरोबर कुटुंबसहभाग यातून विषमता व शोषण टळेल. संरक्षणासारख्या क्षेत्रात केंद्रीकरण आवश्यक असेल. आवश्यक तेथेच त्याचा विकेंद्रीकरण धोरणाशी मेळ घालावा.

स्वदेशी

स्वावलंबन धोरणाकडे दुर्लक्ष म्हणजे दुर्बलतेला, पिळवणुकीला, दुय्यमतेला आमंत्रण. आवश्यकतेनुसार व्यापक राष्ट्रहितासाठी कमी महत्त्वाच्या गोष्टी बाहेरून घ्याव्यात. कच्चा माल, तंत्रज्ञान, रोजगार, उत्पादनयंत्रणा, बुद्धिमत्ता, उत्पादित वस्तू, भांडवल, उद्योजक याबाबतीत स्थानिकांना प्राधान्य हा स्वदेशीचा विचार आहे. त्यातून स्वावलंबन, समृद्धी, शक्तिसंपादन, अनुग्रहक्षमता येतील. भौतिक पातळीवर ‘देश’ या संकल्पनेचा इष्टतम क्षेत्रापर्यंत संकोच आणि वैचारिक वा जाणिवेच्या पातळीवर तिचा वैश्विक स्तरापर्यंत विस्तार ही ‘स्वदेशी’ची सम्यक संकल्पना आहे.

तंत्रज्ञान

तंत्रज्ञान निसर्गव्यवस्थांना घातक ठरू नये. माणसाला गुलाम नव्हे, तर सक्षम करणारे तंत्रज्ञान असावे. ते शक्यतो सोपे, विकेंद्रित असावे. समुचित तंत्रज्ञानाचे विख्यात अभ्यासक शूमाखर म्हणतात तसे ते ‘मानवी चेहऱ्याचे’ व ‘समुचित’ असावे. यासाठी सुयोग्य तंत्रज्ञान धोरण हवे. तंत्रज्ञान आयोगाद्वारे संशोधन, नवता, पायाभूत सुविधा, अंतर्शाखीय शोध, श्रमप्रधान तंत्रज्ञानास प्राथमिकता इत्यादींची १० ते २० वर्षांची योजना तयार करून, ती अमलात आणून देशाला तंत्रज्ञानक्षेत्रात अग्रणी करणे आवश्यक आहे.

कृषी

जमीन हे मानवाच्या दिमतीला असलेले सर्वात मोठे व महत्त्वाचे भौतिक संसाधने आहे. शेतीला औद्योगिक तत्त्वे लागू केल्यामुळे आपल्या जमिनी आणि त्यामुळे आधुनिक सभ्यताच संकटात सापडत आहे ती. शेती जिवंत वस्तूंशी संबंधित क्रिया आहे. तिचे साधन जिवंत जमीन हे आहे, आणि तीमधील उत्पादने ही जिवंत प्रक्रियांचे फळ आहे. याउलट, औद्योगिक प्रक्रिया या माणूस सोडून असेंद्रिय, मृत द्रव्यांशी संबंधित असतात. मानवी आयुष्यात शेती आणि उद्योग या दोहोंना स्थान आहे, मात्र शेती ही प्राथमिक, तर उद्योग हे दुय्यम आहेत.

उद्योग क्षेत्र

* राष्ट्राचे औद्योगीकरण हवे पण पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता आपल्या आवश्यकतेनुसार.

* उद्योगांचे घरेलु उद्योगांत जास्तीतजास्त विकेंद्रीकरण करावे, त्यातून लाखो नवे उद्योजक पुढे येतील, कुटुंबातील महिलांचा सहभाग वाढेल, प्रदूषण घटेल, शहरीकरणास आळा बसू शकेल.

* उद्योगांच्या मालकीसंबंधी व्यावहारिक भूमिका असावी. विशेष राष्ट्रीय आवश्यकतेसाठीच सरकारी उद्योग असावा. राष्ट्रहित व उद्योगक्षेत्राच्या आवश्यकतेनुसार उद्योग सरकारी, सहकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे, खासगी, संयुक्त मालकीचे असू शकतात.

* श्रमिकांना उद्योगाच्या व्यवस्थापनात व मालकीत वाटा द्यावा.

उत्पादन, वितरण, उपभोग

आपल्याला मूलभूत गरजा भागविणाऱ्या उत्पादनाला अग्रक्रम द्यावा. गरिबांच्या गरजांना प्राधान्य द्यावे. प्रा. गॅलब्रेथ आपल्या ‘एफ्लुअंट सोसायटी’ पुस्तकात लिहितात ‘यापेक्षाही वाईट गोष्ट अशी की, अधिकाधिक श्रीमंती जीवनाच्या वस्तूंची आपण जसजशी रास रचत जातो तसतशा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा मागे पडत जातात.’ अधिकाधिक उपभोगाला एका बाजूने व्यक्तीच्या शारिरीक- मानसिक मर्यादांचे बंधन आहे, तर दुसऱ्या बाजूला निसर्गातील सीमित संसाधनांचे बंधन आहे. धर्माचा आधार आणि मोक्ष हे जीवनाचे लक्ष्य ठेवण्याने गरजा मर्यादित राहतात.

रोजगार

‘रोजगारा’च्या संकल्पनेत अभिप्रेत आहे चरितार्थाचे साधन. ते स्वत:च्या मालकीचे असेल, किंवा कोणासाठी आपली श्रमशक्ती, बुद्धी, कौशल्यम् वापरून त्याचा मोबदला असेल. अर्थव्यवस्थेचा मूलभूत उद्देश ‘प्रत्येकास काम’ हा असावा. म्हणून सर्वाना रोजगार हा विकासाचा केंद्रीय घटक असावा, केवळ आनुषंगिक निष्पत्ती नको.

पर्यावरण

अर्थव्यवस्थेत सृष्टीचे शोषण नव्हे दोहन, निसर्गाच्या धारणक्षमतेच्या मर्यादेत उत्पादन, समतापूर्ण वितरण, संयमित उपभोग अशी दिशा हवी. संसाधनांचा कमीतकमी उपयोग करणारी उत्पादन-प्रक्रिया अवलंबिली पाहिजे. नवीकरणीय ऊर्जास्रोत तसेच पर्यावरणपोषक तंत्र यांचाच शक्यतो वापर करावा. निसर्गातून आम्ही तेवढेच घेतले पाहिजे ज्याची निसर्गचक्रातून सहज भरपाई होईल. समाजाची पर्यावरणानुकूल मानसिकता तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या पारंपरिक तत्त्वज्ञानाकडेच वळावे लागेल. भूमाता, हवा, पाणी, वनस्पती व प्राणिसृष्टी ही सर्व नैसर्गिक संपत्ती ही पवित्र आहे असाच संस्कार समाजाला द्यावा लागेल. आज अशाप्रकारचे तत्त्वज्ञान ही संपूर्ण जगाचीच गरज आहे.

भारतीय चिंतनावर आधारित व्यावहारिक मार्ग

समृद्ध देशांतही मानसिक तणाव, एक प्रकारची विफलता यांनी जीवन त्रस्त आहे. भांडवलशाही वा कम्युनिझम आधुनिक जीवनातील हे तणाव, वा विकृती दूर करण्यास असमर्थ आहेत. समाजाची नैतिक उद्दिष्टे आर्थिक उद्दिष्टांच्या प्राप्तीतून आपोआप साध्य होतात ही भांडवलशाही व कम्युनिझम या दोघांचीही समजूत भ्रामक असल्याचे दिसते.

प्रचलित अर्थशास्त्राची सांकल्पन चौकट बदलून, त्याचा विस्तार करून, उपयुक्तता वाढविण्याचे कार्य पारंपरिक भारतीय अर्थचिंतनाच्या आधारावर करावे लागेल. अशा अर्थव्यवस्थेचे केंद्र माणूस असेल, आधार आत्मीयता असेल, उत्पादन श्रमाची व मानवाची प्रतिष्ठा वाढविणारे असेल, आर्थिक विकास साध्य-साधन विवेक सांभाळणारा असेल आणि तंत्र मनुष्यत्व विकसित करणारे असेल!

आर्थिक प्रश्न हे नुसते आर्थिक प्रश्न नसतात. समग्र व एकात्म विचार करावा लागेल. जागतिकीकरण हे साध्य नव्हे तर समर्थ, समृद्ध, सुखी भारत आपले साध्य आहे. जागतिकीकरण, शिथिलीकरण, खासगीकरण ही केवळ साधने आहेत व उद्दिष्टपूर्तीसाठी ही साधने ज्याप्रकारे, ज्याप्रमाणात उपयुक्त तेवढीच ती वापरावीत.

आपल्या देशाच्या प्रकृतीचा व एकूण परिस्थितीचा विचार करता दीनदयाळजींच्या मते शेती, उद्योगधंदे, वाहतूक व व्यापार आणि समाज- सुरक्षा- सेवा हा क्रम सर्व दृष्टींनी उपयुक्त आहे. सर्वच क्षेत्रे परस्परांशी निगडित आहेत म्हणून कोणत्याही एका क्षेत्राचा विचार अन्य क्षेत्रांना वगळून करता येणार नाही. आर्थिक प्रगतीचे साधारणपणे तीन मार्ग असू शकतात. एक सत्तेच्या जोरावर राष्ट्रीय साधनसंपत्तीचे उत्पादन व विभाजन करणे, दुसरा जनतेच्या बंधनरहित अभिक्रमावर व बाजारसंतुलनावर सर्व अवलंबून ठेवणे व तिसरा जनतेच्या मनोवृत्तीमध्ये योग्य परिवर्तन करून जनचेतनेच्या आधारावर संतुलित चिंतन व व्यवहार यातून त्याच ध्येयाला प्राप्त करणे. जनतेच्या हृदयपरिवर्तनाचा तिसरा मार्गच स्वीकारला पाहिजे कारण तोच सर्वजनहितकारी आहे.