‘पहलगामचा पंचनामा’ हा अग्रलेख (२५ एप्रिल) वाचला. या हल्ल्याची जबाबदारी नक्की कोणाची? अजित डोवल यांच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही, हे अनाकलनीय आहे. नोकरीची प्रदीर्घ कारकीर्द काँग्रेसकाळात घालवलेले अजित डोवल हे उत्तमोत्तम कामगिरीसाठी ओळखले जात, पण अचानक गेल्या दहा वर्षांत असं काय झालं की एनएसए (नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायझर) ही जबाबदारी दिल्यावरदेखील ते सातत्याने अयशस्वी आहेत आणि तरीदेखील त्यांचा राजीनामा ना सरकार मागते, ना विरोधक आणि माध्यमे. अजित डोवल यांना तातडीने पदावरून हाकलवून सरकारने कर्तव्याचे पालन करणे अपेक्षित आहे… सर्जिकल स्ट्राइक खरे तर पहिले आपल्या पोखरलेल्या व्यवस्थेवर व्हायला हवाय आणि मग इतरांवर- सुजय रानडे, गिरगांव (मुंबई)
गुन्हेगारीची धर्मांत वाटणी नको…
मूलभूत मुत्सद्देगिरी’ या अग्रलेखातील (२३ एप्रिल) ‘या प्रश्नाकडे ‘हिंदू-मुसलमान’ या चष्म्यातून पाहणे किती अयोग्य आहे हेही यातून दिसते. या संदर्भात पहलगामच्या दहशतवाद्यांनी हिंदू-मुसलमान असा भेदभाव करणे आणि समाजातील एका घटकाने या प्रश्नाकडे याच हिंदू-मुसलमान नजरेने पाहणे काय दर्शवते, याचा विचार सुज्ञांनी तरी करायला हवा.’ हे आवाहन अनुकरणीय आहे. पण असे करताना याच अग्रलेखात चार वेळा इस्लामी दहशतवाद आणि इतर ठिकाणीही ‘इस्लामी’ हा शब्द नकारात्मक विशेषण म्हणून वापरण्यात आलं आहे, याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
मागे काही बहुजनवादी लेखकांनीही ‘ब्राह्मणी दहशतवाद’ वगैरे जातीय विशेषणं लावायला सुरुवात केली होती. सगळेच ब्राह्मण दहशतवादी नसतात, ब्राह्मण धर्म दहशतवाद शिकवत नाही. तसेच इस्लामही दहशतवाद शिकवत नाही, तर समस्त मानवांना एकाच मातेची लेकरं मानतो (संदर्भ: ़कुरआन, ४:१). एका निरपराध माणसाच्या हत्येला समस्त मानवांची हत्या संबोधतो (संदर्भ: ़कुरआन ५:३२). तसेच आदरणीय प्रेषित मुहम्मद सलअम यांनी सांगितले आहे -‘ज्यांचं अल्लाह व ़कयामत (महाप्रलय) वर इमान आहे, त्यांनी आपले पाहुणे (घरचे आणि गावात आलेले पर्यटकही) यांचा आदर व देखभाल करावी.’ (संदर्भ: बुखारी शरीफ, हदिस क्र. ६,०१८)
पण हेदेखील कटू सत्य आहे की, गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार देशातील ४४ अतिरेकी टोळ्यांपैकी १६ टोळ्या मुसलमानांच्या आहेत (संदर्भ: https:// www. mha. gov. in/ sites/ default/ files/2023-03/ TERRORIST_ ORGANIZATIONS_10032023. pdf). पण म्हणजे इतर २८ अतिरेकी टोळ्या मुस्लिमेतर आहेत. मुळात गुन्हेगारीची अशी ‘इस्लामी’, ‘ब्राम्हणी’, हिंदू, मुस्लीम’ वाटणी करणेच चुकीचे आहे.- नौशाद उस्मान, छत्रपती संभाजीनगर
राजकीय मंडळींची दिशा भरकटली?
‘जे कधीही विमानात बसले नाहीत, त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले’ असे वक्तव्य शिवसेनेचे शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार मा.नरेश म्हस्के यांनी काल केले, असे पहिल्या पानावरील बातमीत वाचले. पण त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला दिसतो की, आज ते ज्या पदावर आहेत ते फक्त आणि फक्त या गोरगरीब जनतेमुळेच. पहिली गोष्ट जे ४५ पर्यटक पहलगामला ट्रेनने गेले, त्यांना मुळात गरीब म्हणणे आणि विमानानेच पहलगामला जाणे म्हणजेच फक्त श्रीमंत असणे हेच मुळात चुकीचे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून ६ पर्यटक हे महाराष्ट्रातील आहेत या गोष्टीचे त्यांना भान राहिले नाहीये. उपमुख्यमंत्री शिंदे संकटकाळात, कोल्हापूर, केरळ, ईरशाळवाडी येथे सर्वात आधी मदतीला पोहचले होते हेही म्हस्के विसरले असे दिसते. खासदारसाहेबांना कुठल्या परिस्थितीत कुठले वक्तव्य करावे, हेच लक्षात राहत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.- सत्यजितकुमार केंद्रे, उदगीर, लातूर</p>
काश्मीर हल्ल्याचे राजकारण नको
काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न चालू असताना, एका खासदाराने ‘जे कधी विमानात बसले नाहीत, त्यांना आम्ही विमानात बसवून परत आणले’ असे वक्तव्य केल्याचे वाचनात आले. ते सरकारचे कर्तव्यच असताना संकटकाळातही हे लोक राजकारण करतात, याचा खेद वाटतो. थोडे वेगळे उदाहरण आहे, पण पळून गेलेल्या एखाद्या आरोपीला पोलीस पकडून विमानाने घेऊन येतात तेव्हा ‘बघ तुला विमानातून फुकट आणले’ असे सांगतात का ? या हल्ल्याचे राजकीय भांडवल न करता, सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.-अनंत आंगचेकर, भाईंदर