‘नामवंत शिकवणी वर्गात वित्त कंपन्यांचा शिरकाव’ ही बातमी (लोकसत्ता- ११ ऑक्टोबर) वाचली. आपल्या पाल्याला शिकवणी वर्गात घातले की आपली जबाबदारी संपली या पालकांच्या मानसिकतेतूनच खासगी शिकवणी वर्गाचे पेव फुटले आणि त्याला अक्षरश: बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशाने सर्व विकत घेता येते, असा समज झाला आहे. पण पाल्याची नैसर्गिक क्षमता, आवड आणि आपली आर्थिक परिस्थिती याचा पालक विचारच करत नाहीत. या वित्तीय कंपन्यांमुळे पालकांना शिकवणी बदलण्याचेसुद्धा स्वातंत्र्य राहाणार नाही, कारण पैसे शिकवणी वर्गाकडे जमा होणार आहेत. म्हणजे शिकवणी आवडली नाही तरी केवळ पैसे दिले म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल.  हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांला यामुळे केवळ अभ्यासाचेच नाही, तर पालकांनी भरलेल्या पैशांचेही दडपण येऊ शकते. शिकवणी वर्गाला अतिरेकी महत्त्व आणि शाळा, महाविद्यालय म्हणजे दुय्यम ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. नाहीतर तेलही गेले आणि तूपही गेले अशी पालकांची परिस्थिती होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– बागेश्री झांबरे, मनमाड (नाशिक)

लाल झालेली शरयू विसरता येणार नाही!

‘सरंजामी समाजवादी!’ हे संपादकीय (११ ऑक्टोबर) वाचले. मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री असताना देशभर रामजन्मभूमी आंदोलन जोरात होते. कारसेवक अयोध्येकडे निघाले असताना त्यांना अडविण्यासाठी मुलायमसिंहांनी केलेली कोंडी आणि त्यात जीव गमावलेले कारसेवक, लाल झालेली शरयू कधीही विसरता येणार नाही. तरीही परत भाजपच्या जवळ जाण्याचा लाळघोटेपणा हे राजकीय जाड कातडीचे रूप म्हणावे लागेल. त्यांना बाजूला करून पुत्र अखिलेश यादव याने पक्षाचा घेतलेला ताबाही त्यांना मुकाट सहन करावा लागला. 

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

भारतातून समाजवाद लयाला गेला कारण.. 

‘सरंजामी समाजवादी!’ हा अग्रलेख (११ ऑक्टोबर) भारतातून समाजवाद का लयाला गेला हेही दर्शवितो. आत्यंतिक द्वेष हा समाजवादी नेत्यांचा मोठा दोष! याचे एक उदाहरण म्हणजे राम मनोहर लोहिया. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे १९६४ साली निधन झाले. त्या वेळी लोहिया अमेरिकेत होते. नेहरूंच्या निधनाची बातमी त्यांना अमेरिकन वार्ताहराने सांगितली. त्यांची अपमानास्पद टीका करणारी प्रतिक्रिया ऐकून तो वार्ताहरही अचंबित झाला. जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत त्यांच्यावर प्रचंड टीका केली. ‘लष्कराने सत्ता हातात घ्यावी,’ असे टोकाचे मतही त्यांनी व्यक्त केले होते. अशा द्वेषामुळेच भारतात समाजवाद लयाला गेला. त्याचा फायदा आज धर्माध घेत आहेत.

– मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

मोधेरा इतर गावांसाठी पथदर्शी ठरावे!

गुजरातमधील मोधेरा हे देशातील पहिले १०० टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे. सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता ‘सौरऊर्जा ग्राम’ म्हणून ओळखले जाणार आहे. विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना अशा प्रकारे सौरऊर्जेचा वापर भारताला लाभदायकच ठरणार आहे. त्यामुळे मोधेरा गाव पथदर्शी ठरेल. भारतातील इतर भागांतही ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने सर्वच स्तरांवर प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. नाहीतर पंतप्रधानांकडूनच १०० टक्के डिजिटल गाव म्हणून उल्लेख झालेल्या हरिसाल गावासारखी गत व्हायची. सुरुवातीला नावाजले गेलेले हे गाव नंतर काही काळ इंटरनेट वापराविना होते.  मोधेरा गावाची अशी गत होऊ नये, एवढीच अपेक्षा.

– दीपक काशिराम गुंडये, वरळी

हिंदू सहिष्णुतेने बदलत राहिले..

‘पूर्वग्रह संघाचे की विरोधकांचे?’ हा लेख (११ ऑक्टोबर) वाचला.  हिंदू हा विचार प्रवाह आहे.जीवन जगण्याची रीत आहे. दहा हजार वर्षांपासून एका संस्कृतीच्या धाग्याने हिंदू मन जोडले गेले आहे. हिंदू स्थापत्य व देवादिकांचा अनेक देशांत प्रसार झाला. काळानुरूप हिंदूंनी बदल केला व बाहेरून आलेल्या शक्ती हिंदू विचारात सामील झाल्या. गंगेला जसे अनेक नद्या—नाले येऊन मिळतात, तशीच भीन्न मतप्रवाहांचा अंगीकार करून हिंदू संस्कृती बदलत राहिली. ‘हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथात जे लिहिले तेच बरोबर, त्याच्या पलीकडे किंवा विरोधात जाणे म्हणजे ईश्वराने सांगितलेल्या मार्गाशी प्रतारणा,’ असा काहीही अट्टहास हिंदूंनी न धरल्यामुळे, उलट अध्यात्म आणि विज्ञान यांचा समतोल साधल्यामुळे परविचार सहिष्णुता हिंदूंनी बाळगली. सनातन धर्म वेदोक्त वीचार प्रणाली माननारा आहे.  यापुढला अपेक्षित बदल असा की, सर्वाच्या गुणांना व क्षमतेला विकासात सहभागी करता आले पाहिजे. शासनात—प्रशासनात गुणवत्तेला आधार मानून जातीप्रमाणे कामाची विभागणी करणारी विषमता नाहीशी करण्यासाठी एकता समानता व्यक्तीमत्वाच्या विकासाला संपूर्ण संधी मिळण्यासाठी परिवर्तनाचे पर्व चालू केले पाहिजे.

– सुधाकर घोडके, नाशिक

भाषेगणिक पक्षाचे नाव बदलणार का?

‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव पक्षाच्या एका गटाला देण्याचा निर्णय विस्मयकारक आणि गमतीदार आहे. आजवर निवडणूक आयोगाने अशा प्रकारे केवळ एकाच भाषेत वापरता येतील असे विभक्ती प्रत्यय लावून कोणत्याही पक्षाला नाव दिल्याचे दिसत नाही. द्रमुक, रिपब्लिकन, जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस या पक्षांत अनेक वेळा फूट पडून वेगवेगळे गट तयार झाले, त्यांना त्या त्या व्यक्तीच्या नावाने अधिकृत नावही मिळाले, पण ‘अमक्याचा पक्ष’ अथवा ‘तमक्याची संघटना’ असे अधिकृत नाव ऐकिवात नाही. आता मराठीव्यतिरिक्त इतर भाषांत या पक्षाचे नाव काय असेल? म्हणजे हिंदीत या पक्षाला ‘बालासाहेब की शिवसेना’; इंग्रजीत ‘बालासाहेब्ज शिवसेना’ किंवा गुजरातीत ‘बाळासाहेबनी शिवसेना’ असे अधिकृत नाव असेल का? अशा प्रकारे भाषेगणिक नाव बदलणारा पक्ष सद्य राजकारणाचे वास्तव चित्र दाखवणारा असेल हे मात्र निश्चित.

– चेतन मोरे, ठाणे</p>

मराठी पाटय़ांसंदर्भात कर्नाटककडून धडा घ्या!

महाराष्ट्रात मराठी पाटय़ांची सक्ती करूनही आजपर्यंत पाच लाख दुकानदारांपैकी केवळ ५० टक्के दुकानदारांनीच नियमाची अंमलबजावणी केली आहे. तीनदा मुदतवाढ देऊनसुद्धा, म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. यासाठी एक उदाहरण देणे गरजेचे आहे. कर्नाटक राज्यातील बेळगावात मराठी भाषकांची संख्या लक्षणीय असूनदेखील सर्व सार्वजनिक ठिकाणी, शाळा, बस, दुकानांवर कानडी भाषेतील फलक दिसतात. काही अपवाद वगळता अन्यत्र मराठीचे नामोनिशाण दिसत नाही. महाराष्ट्रात तीन- तीन वेळा संधी आणि सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसेल, तर कठोर कारवाईशिवाय गत्यंतर नाही.

– अजित परमानंद शेटये, डोंबिवलीं

भूमिका प्रत्येकाने बदलल्या, त्यावर टीका नसावी

‘सावरकरांवरील सप्रमाण टिकेचे काय?’ (लोकमान्रस ११ ऑक्टोबर) हे माझ्या ‘हीच का मराठी पक्षाची सेक्युलर महाआघाडी?’ पत्रावर (लोकमानस- १०  ऑक्टो.) पत्रावरील प्रतिक्रिया वाचली. सावरकरांच्या १९३७ नंतरच्या राजकीय भूमिका ब्रिटिश धार्जिण्या होत्या यावर टीका जरूर व्हावी,  परंतु त्यात एका राजकीय कुटुंबाच्या लांगूलचालनासाठी  द्वेष नसावा हे मला सांगायचे होते. भारतात महात्मा गांधींसारख्या उत्तुंग नेतृत्वापासून आजच्या शरद पवारांपर्यंत प्रत्येक पक्ष नेतृत्वाने आपल्या राजकीय भूमिका १८० अंशात बदलल्या आहेत, त्यावर टीका करणे याव्यतिरिक्त त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाचा कायमच तिटकारा हेटाळणीच्या स्वरात नसावा! राजकीय मतभेद वगळता सावरकरांनी जे देशासाठी व मराठी भाषेसाठी काम करून ठेवले त्याचा उल्लेख महाराष्ट्रात रूजलेले व मोठे झालेले राजकीय नेतृत्व कधी तरी करेल काय?

– प्रवीण आंबेसकर, ठाणे

या यंत्रणांचीच सखोल चौकशी करा!

यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला शनिवारी पहाटे नाशिकजवळ भीषण अपघात होऊन बसला आग लागली. यात निष्पाप १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या बसमधून क्षमतेपेक्षा दुप्पट ५३ प्रवासी प्रवास करत असल्याचे बातमीत (लोकसत्ता— ९ ऑक्टो.) म्हटले आहे. राज्यात टप्पा वाहतुकीची परवानगी फक्त एस.टी. महामंडळाला आहे. असे असताना खासगी ट्रॅव्हल्स संपूर्ण राज्यात टप्पा वाहतूक कशा काय करतात? पुण्यात तर शहरातून सुद्धा सर्रास टप्पा वाहतूक करतात, मनमानी पद्धतीने प्रवास भाडे आकारतात, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतात. अशा वेळी आपले आर.टी.ओ., वाहतूक पोलीस काय करत असतात, असा प्रश्न पडतो. मोठा अपघात झाल्यानंतर अनेकांचा जीव गेल्यानंतरच सरकार जागे होते— खासगी ट्रॅव्हल्सची, रस्त्याच्या दर्जाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देते. एरवी परिवहन खाते, आरटीओ यांसारख्या यंत्रणा काय करत असतात? या सर्व यंत्रणांचीच सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

— संतुक पाटील, वारजे (पुणे)

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanas loksatta readers reaction loksatta readers opinion ysh 95
First published on: 12-10-2022 at 00:02 IST