तंत्रज्ञानातील वेगवान बदलांतून साधल्या जाणाऱ्या आर्थिक विकासाचे वर्णन करणारी चौथी औद्याोगिक क्रांती हा शब्दप्रयोग असो अथवा स्टेकहोल्डर कॅपिटलिझम, मल्टिस्टेकहोल्डर अप्रोच अथवा आपणा सर्वांना परिचित पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) म्हणजेच सार्वजनिक-खासगी भागीदारी वगैरे आजच्या भांडवली व्यवस्थेत रुळलेल्या अनेक परिभाषिक संज्ञांचे जनक एकच आहेत. जर्मन अर्थतज्ज्ञ आणि उद्याोगपती क्लॉस श्वाब हे त्यांचे नाव. स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध दावोस वार्षिक मेळ्याचे यजमान आणि जागतिक आर्थिक मंच अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) या स्वयंघोषित गैर-सरकारी संस्थेचे संस्थापक ही त्यांची ओळख खरे तर अधिक परिचयाची ठरावी. अचाट कुशलतेने नियोजन आणि कमालीच्या व्यावसायिकतेने हा वार्षिक उपक्रम त्यांनी तब्बल साडेपाच दशके सुफल-संपूर्ण करत आणला. दावोस हे आल्प्स पर्वतराजीच्या कुशीतील छोटेसे खेडच. पण दरवर्षी जानेवारीत तेथे जगातील लब्धप्रतिष्ठित आणि शक्तिशाली निमंत्रितांचा मेळ्याचा दिमाखदार सोहळा रंगतोे. दावोसला एक जागतिक ब्रॅण्ड म्हणून स्थापित करणारे श्वाब यांनी तीन दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा केली. यापुढे ते डब्ल्यूईएफचे विश्वस्त म्हणून काम करतील असे सुरुवातीला सांगितले गेले. पण आता तर त्यांना जागल्याकडून प्राप्त पत्रातील अनैतिक वर्तनाच्या आरोपांपायी पदत्याग करावा लागल्याचे पुढे आले आहे. त्यांनीच स्थापित केलेल्या संस्थेकडून चौकशीचा सामनाही आता त्यांना करावा लागेल.

श्वाब यांनी १९७१ साली धोरणकर्ते, राजकारणी, उद्याोग-व्यवसाय क्षेत्र आणि नागरी समाजातील नेत्यांना एका व्यासपीठावर आणणाऱ्या युरोपीय व्यवस्थापन मंचाची स्थापना केली. पुढे त्यानेच जागतिक आर्थिक मंचाचे व्यापक रूप धारण केले. वेगवेगळ्या विद्यापीठांच्या बहुविध पदव्या धारण करणाऱ्या श्वाब यांचा शिक्षणपटही प्रचंड. जिनिव्हा विद्यापीठात ३० वर्षे त्यांची अध्यापनाची कारकीर्दही राहिली आहे. अनेक मानसन्मान त्यांच्याकडे चालत गेले आहेत. पत्नी हिल्डे यांच्यासह स्थापित केलेल्या श्वाब फाउंडेशनकडून भारतातही ग्रामीण जनजीवनाला फुलविणाऱ्या सामाजिक नवोपक्रमांना उदार मदत दिली जात आहे. २००४ साली मिळालेल्या प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्काराचा निधीही श्वाब यांनी स्व-संकल्पित मल्टिस्टेकहोल्डर समुदाय निर्मितीच्या ध्यासातून स्थापित यंग ग्लोबल लीडर या मंचासाठी दान केला.

तथापि या कारकीर्दीचा आरोपांच्या शितोंड्यापासून बचाव होऊ शकलेला नाही. ऐषाराम, मौजमजा आणि महागड्या सहलींसाठी डब्ल्यूईएफच्या पैशांचा गैरवापर, लैंगिक अत्याचाराच्या घटना, तक्रारींकडे डोळेझाक वगैरे आरोप निनावी पत्राद्वारे केले गेले आहेत. पर्यावरणीय निगा, सामाजिकता आणि सुशासन अर्थात ईएसजी ही वर्तमान युगात उद्याोग-व्यवसायांना आदर्श कार्यसूत्र प्रदान करणाऱ्या डब्ल्यूईएफच्या प्रमुखाचे वर्तन प्रत्यक्षात या विपरीत राहिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. श्वाब दाम्पत्याने ते फेटाळून लावले आहेत. तरी त्यांची छाननी आणि चौकशी करण्यास डब्ल्यूईएफने मान्यता दिली आहे. विशेषत: जगभरात जागतिक स्तरावर व्यापार सहकार्य आणि आर्थिक आघाडीवर ऐक्यासाठी कार्यरत संस्थेचा प्रमुखच हा एकोपा धोक्यात आला असताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असणे, हे कारस्थानांकडेही निर्देश करणारे आहे. तरी या वणव्यातून त्यांना जावेच लागेल आणि त्यांचे पाय मातीचे नाहीत हे सिद्ध करून थोरपण जपावेच लागेल.