– हरीश एस. वानखेडे
आपण जेव्हा सिनेमा पाहायला जातो, तेव्हा तो केवळ दोन-तीन तास वेळ घालवण्याचे साधन म्हणून पाहतो. पण सिनेमा हे त्यापेक्षा खूप मोठे माध्यम आहे. सिनेमा ही एक ‘सांस्कृतिक शक्ती’ आहे. याचा अर्थ असा की, आपण कोण आहोत, आपला समाज कसा आहे आणि आपल्या इतिहासातील घटनांकडे आपण कसे पाहावे, हे ठरवण्यात सिनेमाचा मोठा वाटा असतो. एक चांगला चित्रपट समाजाचा ‘आरसा’ असतो. तो केवळ मनोरंजन करत नाही, तर मानवी जीवनातील सुख-दु:खांना अर्थ देतो आणि आपल्या विचारांना प्रगल्भ करतो. आजच्या काळात, सामाजिक नियमांना अधिक धारदार करण्याचे किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम चित्रपटकार करत असतात. आपण पडद्यावर जे पाहतो, त्यातून नकळतपणे आपली स्वत:ची ओळख शोधत असतो. जरी सिनेमातील कथा काल्पनिक असल्या, तरी त्या आपल्या आजूबाजूच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे जिवंत चित्रण करत असतात. मात्र, आजच्या चकचकीत ‘बॉलीवूड’च्या युगात हा आरसा धूसर झाला आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.
प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान
भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेणारे महान दिग्दर्शक सत्यजित रे यांनी १९४० च्या काळातच व्यावसायिक हिंदी सिनेमाबद्दल एक गंभीर इशारा दिला होता. त्यांनी अशा चित्रपटांना ‘आत्मा नसलेले उत्पादन’ (सोललेस प्रॉडक्ट) म्हटले होते. रे यांच्या मते, केवळ पैशांसाठी बनवलेले चित्रपट प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करतात. असे चित्रपट सामाजिक वास्तव, आपल्या लोककथा आणि कलेप्रति असलेला प्रामाणिकपणा यापासून दूर पळतात. सिनेमाची एक सामाजिक जबाबदारी असते; त्याने प्रेक्षकांना केवळ हसवणे किंवा रडवणे एवढ्यापुरतेच सीमित न राहता त्यांना विचारांस प्रवृत्त करणारे एक ‘बौद्धिक माध्यम’ म्हणून स्वत:ला सिद्ध केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
काही दशकांपूर्वी, राज कपूर (जागते रहो), बिमल रॉय (दो बिघा जमीन), महबूब खान (मदर इंडिया) आणि गुरुदत्त (प्यासा) यांनी सिनेमाचा एक ‘सुवर्णमध्य’ शोधला होता. त्यांनी असे चित्रपट तयार केले जे सर्वसामान्यांचे मनोरंजन तर करायचेच, पण त्याचबरोबर त्यामध्ये सामाजिक प्रश्नांची खोलवर जाण असायची. त्या चित्रपटांमध्ये कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा सुंदर संगम होता. दुर्दैवाने, आजच्या काळात असा मधला मार्ग शोधणारे दिग्दर्शक खूप कमी झाले आहेत. आज चित्रपट एकतर पूर्णपणे गल्लाभरू असतो किंवा तो इतका क्लिष्ट असतो की तो लोकांपर्यंत पोहोचत नाही.
विषयावर व्यावसायिकतेचे आक्रमण
आजच्या ‘बॉलीवूड’वर होत असलेली सर्वात मोठी टीका म्हणजे, हे क्षेत्र वैचारिक प्रगल्भता वाढवणार्या विषयांपासून दूर जात आहे. त्याऐवजी, ‘मसाला फिल्म्स’ आणि ‘पलायनवादी’ (एस्केपिस्ट) सिनेमांच्या नावाखाली प्रेक्षकांच्या मनात केवळ स्वस्त लोकप्रियतेचे बी पेरले जात आहे. सिनेमाकडे केवळ नफा मिळवण्याचे साधन म्हणून पाहिल्यामुळे, या उद्योगातून सामाजिक जबाबदारी आणि नैतिकता हळूहळू संपत चालली आहे.
अलीकडच्या काळातील चित्रपटांकडे पाहिले तर असे लक्षात येते की, हिंदी सिनेमा आता प्रचंड हिंसक आणि अक्रमक होत चालला आहे. ‘ॲनिमल’ किंवा ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमधील हिंसा हा चिंतेचा विषय आहे. इतकेच नाही, तर काही चित्रपट विशिष्ट राजकीय किंवा जातीय द्वेषाला खतपाणी घालताना दिसतात. समाजात फूट पाडणारे विषय मांडून गल्ला जमवण्याचा हा प्रकार धोकादायक आहे. तसेच, ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांतून दिसणारा ‘विषारी पुरुषार्थ’ आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करत आहे. आज चित्रपट चालवण्यासाठी चांगल्या कथेपेक्षा मोठा सुपरस्टार, भव्य जाहिरातबाजी आणि अवाढव्य बजेट यांची जास्त गरज भासते. यामुळे ‘१०० कोटी क्लब’ नावाचा एक नवा प्रकार जन्माला आला आहे, जो प्रेक्षकांना खर्या अर्थपूर्ण सिनेमापासून लांब नेत आहे.
चांगल्या सिनेमाचे ‘व्यावसायिक’ मरण
अशा कठीण काळातही काही प्रामाणिक चित्रपटकर्ते प्रवाहाविरुद्ध जाऊन चांगले चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन वर्षांत ‘जोराम’, ‘गुठली लडू’, ‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ यांसारख्या चित्रपटांनी दलित, गरिबी आणि महिलांच्या समस्यांवर, त्यांच्या शोषणावर अत्यंत संवेदनशीलपणे भाष्य केले. २०२५ मध्येसुद्धा ‘द मेहता बॉइज’, ‘सुपरबॉइज ऑफ मालेगाव’, ‘फुले’ आणि ‘धडक २’ यांसारखे उत्तम चित्रपट आले. जगभरातील समीक्षकांनी त्यांचे कौतुक केले, पण बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटांना प्रेक्षकांनी पाठ दाखवली.
असे का घडते? याची काही तांत्रिक कारणे आहेत. चित्रपट उद्योगाच्या रचनेमुळे अशा छोट्या पण चांगल्या चित्रपटांना थिएटरमध्ये पुरेसा वेळ मिळत नाही. मल्टिप्लेक्समधील तिकिटांचे भाव इतके जास्त असतात की सर्वसामान्य माणूस तिथे जाण्यास कचरतो. पण केवळ हीच कारणे नाहीत. खरे तर आपल्या समाजाची अभिरुची ढासळत चालली आहे. उत्तम कलाकृती पाहणारा आणि तिची कदर करणारा एक हक्काचा प्रेक्षकवर्ग आज आपल्याकडे उरलेला नाही. दिग्दर्शक चांगले चित्रपट देण्यास तयार आहेत, पण प्रेक्षकच त्यांना नाकारत आहेत. ही दरी सिनेमाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.
समाजमाध्यमांचा प्रभाव
आजच्या काळात चित्रपटांचे ‘परीक्षण’ किंवा ‘समीक्षा’सुद्धा तितकीशी गंभीर राहिलेली नाही. समाजमाध्यमे, रील्स आणि पॉडकास्टच्या जमान्यात अशा लोकांचा सुळसुळाट झाला आहे, ज्यांना सिनेमाच्या भाषेची किंवा तंत्राची अजिबात समज नाही. हे ‘इन्फ्लुएन्सर्स’ केवळ स्टार्सच्या मागे धावतात आणि भडक दृश्यांच्या आधारावर चित्रपटाला चांगले किंवा वाईट ठरवतात.
सर्वांत वाईट म्हणजे, समाजातील सुशिक्षित आणि बुद्धिवंत वर्गाने सिनेमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ‘पेड रिव्ह्यूअर्स’चे (पैसे घेऊन स्तुती करणारे) फावले आहे. यामुळे चांगल्या सिनेमावर चर्चा होणेच बंद झाले आहे. जो चित्रपट आरडाओरडा करतो, तोच आजच्या काळात श्रेष्ठ मानला जात आहे, ही शोकांतिका आहे.
केवळ मनोरंजन नव्हे, तर विचार हवा
आपल्याला ‘सिनेमा म्हणजे केवळ विरंगुळा’ या विचारातून बाहेर पडणे गरजेचे आहे. मनोरंजन हा सिनेमाचा भाग असला तरी, तो कलात्मक मूल्यांशी जोडलेला असावा. हिंदी सिनेमाची जबाबदारी आहे की, त्याने समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांचे प्रश्न मांडले पाहिजेत. पण आजचे बॉलीवूड केवळ श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाच्या आवडीनिवडी जपताना दिसतो.
अशा वेळी, जे चित्रपट समाजातील वास्तव मांडतात, त्यांना खर्या रसिक प्रेक्षकांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. आज चित्रपटप्रेमींचा एक मोठा वर्ग थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याऐवजी तो चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहतो. ही वृत्ती बदलली पाहिजे. जर आपण चित्रपटगृहात जाऊन चांगल्या सिनेमाला पाठिंबा दिला नाही, तर उद्या असे चित्रपट तयार होणेच बंद होईल.
आपल्याला एक असा ‘हक्काचा प्रेक्षकवर्ग’ तयार करायचा आहे, जो कोणत्याही दबावाशिवाय चांगल्या चित्रपटांचा आनंद घेईल आणि त्याचा प्रचार करेल. बॉलीवूडच्या त्या साचेबद्ध आणि कंटाळवाण्या चित्रपटांविरुद्ध आपल्याला एक नवीन प्रेक्षक उभा करावा लागेल. एक चांगला सिनेमा तोच असतो, जो पाहिल्यानंतर आपल्या मनात नवे विचार निर्माण होतात आणि आपली संवेदनशीलता जागी होते. हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.
(लेखक ‘जेएनयू’तील सहयोगी प्राध्यापक आहेत)
enarish@gmail.com
