पार्थ एम. एन.

मुस्लिमांच्या विरोधातील हिंसा वाढते आहे आणि त्या घटनांचं वार्ताकनही केलं जात नाही. अशा परिस्थितीत तरुण, निर्भय मुस्लीम पत्रकार या घटना समाजासमोर याव्यात यासाठी ‘पर्यायी माध्यमां’तून धडपडत आहेत..

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमीच्या सुमाराला उत्तर आणि मध्य भारतात, तसंच कर्नाटकामधल्या काही भागांत धार्मिक तणाव मोठय़ा प्रमाणावर वाढलेला दिसला. आणि गेल्या वर्षीप्रमाणेच, याही वर्षी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.‘बिहारच्या नालंदा जिल्ह्यत रामनवमीच्या आदल्या दिवशी हिंदूुत्ववादी जमावाने ११० वर्ष जुना मदरसा जाळून राख केला असा आरोप केला गेला आहे. ‘जय श्रीराम’चा घोष करत हजारेक पुरुषांची झुंड मदरशात घुसली आणि त्यांनी त्याला आग लावली. या पुरुषांकडे लाठय़ा होत्या, पेट्रोल बॉम्ब होते. आगीत मदरशाची लायब्ररी जळून खाक झाली. त्यात साधारण पाच हजार पुस्तकं होती. यात काही मौल्यवान आणि ऐतिहासिक कागदपत्रांचा समावेश होता. बीबी सोगरा यांनी आपले पती अब्दुल अझीझ यांच्या स्मरणार्थ हा मदरसा बांधला होता. बिहारच्या इतिहासात त्यांचं नाव धर्मादाय सेवा करणाऱ्या महिलांमध्ये अत्यंत आदराने घेतलं जातं.’ – ही बातमी २२ वर्षांच्या मीर फैजल या पत्रकाराने पहिल्यांदा दिली.

‘नालंदामधल्या बिहार शरीफ शहरात हा मदरसा जाळण्यात आला. त्यातून निर्माण झालेल्या तणावाचा तपास करून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर अटकसत्र राबवलं. मात्र यात मुख्यत्वे मुसलमान तरुण आणि काही १८ वर्षांखालची मुसलमान मुलं होती.’ – ही बातमी समोर आणली ती गझाला अहमदने.

त्यानंतर आठवडाभराने झारखंडमधल्या मुसलमान नेत्यांनी मीर फैजल आणि सना अकबर यांच्याशी बोलताना असा आरोप केला की, पोलिसांनी जमशेदपूरमधल्या मशिदीवर धाड टाकली, तिथल्या वास्तूचं नुकसान केलं आणि पवित्र कुराण उद्ध्वस्त केलं. शहरात निर्माण झालेला धार्मिक तणाव शांत करण्याचा तो तथाकथित प्रयत्न होता.

रामनवमीच्या दोन आठवडे आधी, उत्तराखंडमध्ये होळी साजरी करण्यात आली होती. त्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या राधा सेमवाल धोनी. त्यांची ओळख करून देताना, ‘त्यांनी ३७० मज्मार उद्ध्वस्त केले असून ५४० हे त्यांचं लक्ष्य आहे,’ असं अत्यंत अभिमानाने सांगण्यात आलं होतं. राधा सेमवाल धोनी यांचं ध्येय आहे ‘मज्मार मुक्त उत्तराखंड’ करण्याचं!

या महिलेचं व्यक्तिचित्र लोकांसमोर मांडलं ते फातिमा खान या तरुण पत्रकाराने.यातली कुठलीच बातमी मोठय़ा चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवर, प्राइम टाइमला ठळकपणे दाखवण्यात आली नाही. पण या घटना तरीही बाहेर आल्या, कारण पर्यायी अवकाशात काम करणाऱ्या मुसलमान पत्रकारांनी धैर्य दाखवलं, प्रत्यक्ष घटनास्थळांना भेट दिली आणि सत्य लोकांसमोर आणलं.

दिवसेंदिवस मुसलमानांच्या विरोधात हिंसा वाढत असताना, त्यांच्याविरोधी मांडणी केली जात असताना तरुण, निर्भय मुसलमान पत्रकार या घटना नोंदवल्या जातील, त्या जगासमोर येतील आणि विषारी प्रचार करणारे उघडे पडतील यासाठी प्रयत्न करताहेत.आणि त्यासाठी खूप मोठी किंमतही मोजताहेत.बिहारचं रिपोर्टिग केल्यानंतर मीर फैजलला असंख्य धमक्यांना तोंड द्यावं लागलं. सोशल मीडियावर त्याचं प्रचंड ट्रोलिंग झालं. त्याला अटक व्हावी अशी मागणी झाली आणि शारीरिकदृष्टय़ा त्याला इजा व्हावी असं मतही व्यक्त झालं. मीर फैजलला बहुधा या सगळय़ाची एव्हाना सवय झालेली असावी. केवळ २२ वर्षांच्या फैजलवर त्याच्या रिपोर्ताजसाठी याआधीच यूएपीए लावलेला आहे आणि हिंदूत्ववादी गुंडांनी केलेल्या एका जीवघेण्या हल्ल्यातून तो बचावलेला आहे.

२०२२ च्या जून महिन्यात ‘अल्ट न्यूज’ या खोटय़ा बातम्यांचा पर्दाफाश करणाऱ्या वेबसाइटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. ‘धर्माच्या आधारे विविध गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा आणि धार्मिक भावना भडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न’ केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.झुबेरच्या विरुद्ध तक्रार केली गेली होती ती एका बेनामी ट्विटर हँडलवरून. नाव नसलेल्या या व्यक्तीला ट्विटरवर केवळ ४०० माणसं फॉलो करत होती. आणि तक्रार करताना त्याने झुबेरने २०१८ साली केलेल्या एका ट्वीटचा आधार घेतला होता. या ट्वीटमध्ये भारताच्या सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या एका जुन्या हिंदी सिनेमातला स्क्रीनशॉट होता!

झुबेरला लक्ष्य करण्यासाठीच केवळ या ट्वीटचा उपयोग करण्यात आला होता असं मत अनेक विचारवंतांनी व्यक्त केलं. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी टीव्हीवरील चर्चेत केलेलं वादग्रस्त विधान झुबेरने जगासमोर आणल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. मध्य पूर्वेतल्या देशांनी त्यावर कडक भूमिका घेतली होती. आणि भाजपला नूपुर शर्माचं निलंबन करावं लागलं. झुबेरला याचीच ‘किंमत’ मोजावी लागली होती. त्याने आणि आलिशान जाफरी या आणखी एका तरुण पत्रकाराने मिळून उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषमूलक भाषणांच्या क्लिप्सही लोकांसमोर आणल्या. त्यामुळे अनेकांनी या घटनांची दखल घेतली.

तथाकथित धार्मिक नेते मुसलमानांची कत्तल करण्याची भाषणं करतात, तेव्हा त्या व्हिडीओंचं विश्लेषण करताना या मुसलमान पत्रकारांना काय वाटत असेल, असा प्रश्न मला नेहमी पडतो. मुसलमानांच्या विरोधात होत असलेली हिंसा कव्हर करताना त्यात असलेला शारीरिक धोका पत्रकार म्हणून त्यांना जाणवत असणारच.वार्ताहर म्हणून यातल्या काही बातम्या मीसुद्धा कव्हर केलेल्या आहेत. माझ्यासारखे अनेक हिंदूू पत्रकार प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अशा घटनांचं वार्ताकन करत असतात. देशाची बिघडत चाललेली परिस्थिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्नशील असतात.
पण हिंदू म्हणून आम्हाला मिळत असलेल्या फायद्यांकडे मी डोळेझाक नाही करू शकत. समाजमाध्यमांवर मला मिळणाऱ्या शिव्या या मुसलमान पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याच्या तुलनेत खूपच सौम्य असतात याची जाणीव मला आहे. मुसलमानांच्या विरोधात हिंसक भाषणं करणाऱ्या सभांना मी प्रत्यक्ष हजर असलो तरी त्यामुळे मला शारीरिक इजा होण्याची शक्यता कमी आहे याचं भान मला आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे माझं नाव. दंगल किंवा धार्मिक तेढ कव्हर करत असताना अनेक मुसलमान पत्रकार आपलं ओळखपत्र दाखवत नाहीत कारण आपली ओळखच आपल्याविरुद्ध वापरली जाईल अशी भीती त्यांच्या मनात असते.

आणि तरीही हे पत्रकार मोठय़ा धीराने आणि निग्रहाने अशा बातम्या लिहिल्या जातील, लोकांसमोर येतील यासाठी प्रयत्न करताहेत. साधारण एक वर्षभरापूर्वी जाफरीने ‘आर्टिकल १४’ या पोर्टलला मुलाखत दिली होती. अशा रिपोर्टिगचा मानसिक आरोग्यावर खूप विपरित परिणाम होत असतानाही हे करत राहणं महत्त्वाचं का आहे हे त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. मला वाटतं, जाफरीचा संदेश हा या विषयावरचा शेवटचा शब्द असायला हरकत नाही.

तो म्हणतो, ‘आपल्या घराबाहेर एका नरसंहाराची तयारी होत आहे, हे सर्वाना कळणं गरजेचं आहे. त्यासाठी या बातम्या लिहिणं आवश्यक आहे.’ पर्यायी माध्यमं वापरून हे अशा प्रकारचे व्हिडीओ जगासमोर आणत राहिलं तर कदाचित उर्वरित प्रसारमाध्यमांना त्यांची दखल घ्यावी लागेल असंही त्याने म्हटलं आहे. ‘आपल्या नावाने हे सगळं चालू आहे हे सर्वाना समजायला हवं. समाजाची मानसिकताच बदलण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. भारतात अलीकडच्या काळात झालेले हल्ले पाहून मन विषण्ण होतं. अधिकाधिक लोक याच्या विरोधात बोलू लागतील अशी आपण केवळ इच्छा व्यक्त करू शकतो.. तोवर, याला तोंड देत राहणं याखेरीज अल्पसंख्याकांसमोर दुसरा कोणता पर्याय उपलब्ध आहे?’