मुलींनी कसे वागावे हे तर नेहमीच सांगितले जाते. मुलांनी कसे वागावे हे योग्य वयात मनावर बिंबविले जाणे गरजेचे आहे. घरातील पुरुष महिलांशी कसे वागतात, हे पाहत मुले शिकत असतात. त्यांच्यावर योग्य संस्कार करणे महत्त्वाचे!

रवींद्र माधव साठे

prakash amedkar narendra modi
“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
secularism in india conception of secularism in indian constitution
संविधानभान : भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप

भारतात हिंदू बहुसंख्य आहेत. या हिंदू समाजात जसे दोष आहेत तशीच या समाजाची संपूर्ण मानवजातीचा विचार करणारी काही जीवनमूल्ये व वैशिष्टय़ेही आहेत. जगातील विद्वान मंडळींनी त्यांची दखल घेतली आहे. यातील एक वैशिष्टय़ असे आहे की ‘‘आपण सर्व माणसे ईश्वराची लेकरे आहोत’’ असे म्हणून आपण थांबत नाही तर आपण त्यापुढेही जाऊन म्हणतो की ‘‘प्रत्येकात देवत्वाचा अंश आहे.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, ‘वास्तविक समानतेचे साम्राज्य स्थापन करण्याकरिता यापेक्षा अधिक योग्य सिद्धांत सापडणार नाही’ पण असे असूनही येथे उच्च-नीचता व असमानता आली. दलित समाजाप्रमाणेच महिलाही या विषमतेच्या बळी ठरल्या. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने राजकारणापासून उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. परंतु वरवर दिसणारे हे चित्र आणि वास्तव यात अंतर आहे.

स्त्री-पुरुष समानता हा सामाजिक एकतेचा पाया आहे, असे आपण म्हणतो. परंतु व्यवहारात त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. पुरुषवर्गाकडून कमी-अधिक प्रमाणात महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच होते. घरातील महिलांना, मुलींना पुरुष मंडळी कसे वागवतात यावरून मुलांवर नकळत संस्कार होत असतात. पंतप्रधान मोदी यांनी एकदा भाषणात आवर्जून याचा उल्लेख केला होता की सर्वसामान्य घरात मुलीला घरी तिच्या जाण्या-येण्याच्या वेळेबद्दल, ती कुठे गेली होती याबद्दल विचारले जाते, परंतु मुलाची अशाप्रकारे चौकशी केली जात नाही. पालकांनी मुलाबद्दलही तेवढीच सजगता दाखविली पाहिजे.

आपल्या प्राचीन वाङ्मयात ‘पुत्रेण दुहिता समा’ हा श्लोक आढळतो, त्यानुसार प्रत्येक पित्याने पुत्र व कन्या यांना समान लेखणे अपेक्षित आहे. परंतु नित्य व्यवहारात महिलांना समानतेची वागणूक दिली जात नाही, असेच दृष्टीस पडते. वानगीदाखल- बऱ्याच घरांच्या दरवाजावर फक्त पुरुषाचे नाव असते. वस्तुत: घर दोघांचे असते. एखादा मुलगा किंवा पुरुष रडत असेल तर त्यास सहजपणे म्हटले जाते की ‘काय बायकांसारखा रडत बसला आहेस?’ म्हणजे जणू काही स्त्री रडण्यासाठीच जन्मास आली आहे, असे गृहीत धरण्यात येते. सर्व अर्वाच्य शिव्या आई-बहिणीवरून दिल्या जातात.

कायदेशीर बाबींचा विचार केला तर कौटुंबीक मालमत्तेचे उत्तराधिकारी स्त्री-पुरुष दोघेही असतात. तरीही बहुतांशी आर्थिक व्यवहार हा पुरुषांच्या ताब्यात असतो. अपवाद असतील पण त्यांचे प्रमाण कमी आहे. स्त्रियांचे घरातील योगदान महत्त्वाचे मानले जात नाही. तिने मिळविलेल्या उत्पन्नाला तितकेसे महत्त्व मिळत नाही, पण त्यावरही तिने हक्क सांगू नये व घरासाठीच सर्व पैसा वापरावा अशी अपेक्षा मात्र केली जाते. स्त्री-पुरुष किंवा मित्र-मैत्रीण हॉटेलमध्ये नाश्ता किंवा भोजनासाठी गेले तर वेटर पुरुषाकडे बिल आणून देतो. स्त्री-पुरुषाची निखळ मैत्री असू शकते यावर विश्वास ठेवण्यास बहुधा कोणीही तयार नसते. स्त्री-पुरुष भेटले म्हणजे एकाच चष्म्यातून त्याकडे बघितले जाते. या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. 

कौटुंबिक हिंसेच्या घटना मुंबईसारख्या भारताच्या आर्थिक राजधानीत सुशिक्षित समाजात आजही घडतात. ग्रामीण भागांतील चित्र अधिक भीषण आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्रात एक वृत्त छापून आले होते. पतीने मुलगा हवा म्हणून पत्नीस तब्बल आठ वेळा गर्भपात करण्यास भाग पडले. त्या महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली. ती महिला मुंबईतील वांद्रे येथील रहिवासी होती. वडील निवृत्त न्यायाधीश. पती वकील व सासरची सर्व माणसे एकतर वकील किंवा डॉक्टर. पती तिला परदेशात घेऊन गेला आणि तिथे गर्भ लिंग निदान चाचणी करून घेतली आणि गर्भपात करण्यास भाग पाडले. शेवटी सहन न होऊन त्या महिलेने पोलिसांत तक्रार केली. ग्रामीण, आदिवासी आणि मुस्लीम महिलांच्या समस्या आणखी वेगळय़ा आहेत.

मुख्य मुद्दा आहे, तो पुरुषी मानसिकतेचा आणि स्त्रीविषयक दृष्टिकोनाचा. पुण्यातील ‘बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्रा’ने ‘लिंगभाव संवेदनीकरण’ या नावाने पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात शेवटच्या प्रकरणात स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनाविषयी अत्यंत समर्पक माहिती दिली आहे. स्त्री-पुरुष दोघे अनेक बाबतींत समान आहेत आणि अनेक बाबतीत त्यांच्यात भेद आहेत. पण तरीही वैयक्तिक प्रगतीपासून कुटुंब टिकावे म्हणून, समाजधारणा व्हावी म्हणून ते देशाची प्रगती व्हावी म्हणून दोघांनीही आपापले विचार बदलून पूरकतेच्या दिशेने प्रवास करण्यासाठी खालील महत्त्वपूर्ण गोष्टी करणे आवश्यक आहे.

स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा आदर करावा, विश्वास ठेवावा, श्रेष्ठ-कनिष्ठ वादापलीकडे जाऊन परस्पर पूरकतेच्या दिशेने जावे, कोणतीही मानपानाचा अतिरिक्त विचार न करता परस्पर सहकार्य, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा एकजुटीने विरोध करणे, स्त्रियांचा उत्पादक घटक म्हणून विचार करणे, कौटुंबिक जबाबदाऱ्या स्त्री-पुरुष दोघांच्याही आहेत असा विचार करून मुलांवरही तसेच संस्कार करणे, निकोप संवाद व निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेणे, व्यक्ती म्हणून तिची भूमिका आणि स्वातंत्र्य याचा आदर करणे. तिला विकास करण्याची संधी देणे, तिला ‘स्पेस’ देणे इत्यादी.

हिंदू संस्कृतीवर आक्षेप घेतला जातो की या संस्कृतीने महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले आहे. १२०० वर्षांच्या गुलामीच्या कालखंडात महिला वर्गाचा सन्मान झाला नाही, हे खरे, परंतु इस्लामपूर्व कालखंडात आपल्या संस्कृतीने महिलांना सन्मानाचे स्थान दिले आहे. आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये तशी वचने सापडतात. पण काही जण त्यांची मोडतोड करून स्त्री वर्गावर अन्याय झाला आहे, असा निष्कर्ष काढतात. उदाहरणार्थ ‘न स्त्री स्वातंत्र्य मर्हति’ म्हणजे स्त्रीची स्वातंत्र्य मिळविण्याची योग्यता नाही, असे दाखवता येईल, परंतु मूळ श्लोक पुढीलप्रमाणे आहे.

पिता रक्षती कौमारे, भरता रक्षिते यवने,

 रक्षंती स्थविर पुत्रा:, न स्त्री स्वातंत्र्य मर्हति

या श्लोकाचा अर्थ असा की स्त्री जेव्हा कुमार वयात असते त्यावेळी पित्याने, लग्नानंतर पतीने, वार्धक्यात मुलाने स्त्रीला निराधार सोडू नये. यांत स्त्रीची उपेक्षा नाही तर तिची काळजी केली पाहिजे असा पुरुषांना उपदेश आहे.

परपुरुषाने स्त्रीकडे कसे पाहायचे याचा आदर्श तर लक्ष्मणाने ठेवला आहे. सीतामाईचा शोध सुरू असताना एका प्रसंगी तो प्रभू रामचंद्रांना सांगतो,

नाऽहं जानामि केयुरे, नाहं जानामि कुंडले,

नुपुरे त्वाभि अभिजानामि, नित्यं पादाभि वंदनात्

(मला केयुर किंवा कुंडले ओळखता येत नाहीत तर सीतामाईच्या पायाचे नेहमी वंदन केल्यामुळे मला केवळ नूपुर माहीत आहेत.)

परदेशातून चालविल्या जाणाऱ्या स्त्रीवादी चळवळींतून प्रेरणा घेण्याऐवजी आपल्या भूमीतच स्त्रीविषयी उत्तम मार्गदर्शन मिळते. अर्थात स्त्रीवर अन्याय झाला नाही व होत नाही असे कोणी म्हणणार नाही. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणत की, ‘‘आपल्या सर्व धार्मिक ग्रंथांतून, इतिहासातून परिवर्तनाला व समतेला अनुकूल अशा बाजू पुढे आणून सर्वाच्या समोर ठेवल्या पाहिजेत आणि तसा व्यवहार झाला पाहिजे.

श्रीमद्भगवद्गीतेच्या १० व्या अध्यायात ३४ वा श्लोक आहे.

मृत्यु: सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।

कीर्ति: श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृति: क्षमा ॥

(याचा भावार्थ-भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्वाचा लय करणारा मृत्यू मी आहे आणि पुढे होणाऱ्या सर्व पदार्थाच्या उत्पत्तीला कारणही मीच आहे, स्त्रियांमध्ये कीर्ति, श्री, वाक्, स्मृति मेधा, धृति आणि क्षमा मी आहे.) हे गुण स्त्रीमध्ये जन्मजात असतात. त्यामुळे पुरुषांनी स्त्रीच्या या गुणसंपदेला मान दिला पाहिजे. आज जगामध्ये उपभोगप्रियता, स्वच्छंदता आणि संस्कृतिहिनता वाढत चालली आहे, अशा वेळी श्रीमद्भगवद्गीतेने केलेले मार्गदर्शन व्यवहारात उतरविले पाहिजे.

राष्ट्रत्व टिकवायचे असेल तर या गुणसंपदेस महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद व लोकमान्य टिळक यांनी स्त्रीचा सन्मान कसा करावा, ती कशी पूज्य आहे याचे उत्तम दिग्दर्शन केले आहे. स्त्री-पुरुषांमध्ये जे नैसर्गिक भेद आहेत ते आहेतच, परंतु मुद्दा आहे तो पुरुषांच्या महिलांविषयक असणाऱ्या दृष्टिकोनाचा, व्यवहाराचा व स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीचा.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या यंदाच्या विजयादशमी उत्सवात स्त्री शक्तीचा आदर व सन्मान करण्याचे आवाहन केले, तसेच अलीकडे बाली येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकास प्रक्रियेत महिलांची शक्ती व त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. मुदलात काय तर, गृहस्थाश्रमाच्या रथाच्या या दोन्ही चाकांना समान न्याय मिळेल त्यासाठी महिलांना न्यायाची आणि माणुसकीची वर्तवणूक पुरुष वर्गाकडून मिळण्याची नितांत आवश्यकता आहे.