‘जाहल्या काही चुका…’ हा अग्रलेख (२८ एप्रिल) वाचला. धर्मावर आधारलेली राष्ट्रे लयाला गेल्याची उदाहरणे इतिहास देतो. घटनाकारांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित केले नाही. भारतातील मुस्लीम हे पाकिस्तानातील हिंदूंपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे.
पाकिस्तानात लोकशाही नावालाच असून लष्करशहा आणि मुल्लामौलवी सत्तेचे दोर आळीपाळीने ओढत असतात. भारतात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संतुलन असल्याने कोणतेही टोकाचे निर्णय होत नाहीत. बहुसंख्य भारतीय नागरिक मध्यममार्गी असून ते कडव्या डाव्या किंवा जहाल उजव्या विचारांच्या आहारी जात नाहीत. सामान्य नागरिकांच्या समंजसपणामुळे देशातील लोकशाही टिकून आहे. भारताने विसाव्या शतकात अमेरिका विरुद्ध सोव्हिएत युनियन शीतयुद्धात स्वीकारलेले अलिप्तवादाचे धोरण एकविसाव्या शतकात अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार संघर्षातही उपयोगी पडताना दिसते. पाकिस्तान विसाव्या शतकात अमेरिकेच्या कच्छपी लागला आणि आता पाकिस्तानवर चीनची सावली गडद होताना दिसते. विवेकशून्यता पाकिस्तानला विनाशाच्या वाटेकडे घेऊन चालली आहे.
● डॉ. वि. हे. इनामदार, भूगाव (पुणे)
मोदी केवळ ‘यशाचेच धनी’?
‘पहलगाममुळे प्रतिमासंवर्धनाचीही कोंडी?’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लाल किल्ला’ सदरातील लेख (२८ एप्रिल) वाचला. पहलगाम येथील नृशंस हल्ल्यानंतर विरोधी पक्ष विनाविलंब भक्कमपणे सरकारच्या पाठीशी उभा राहिला. अभेद्या एकी दर्शवण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले, पण मोदींनी बैठकीला हजर न राहता बिहारच्या दौऱ्यावर जाणे पसंत केले. परिणामी प्रतिमासंवर्धन तर दूरच राहिले पण सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीची अप्रत्यक्ष कबुलीच दिल्यासारखे झाले. बैठकीत सुरक्षेचा विषय येणारच होता आणि तसा तो आलाही. पण अमित शहांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. अशा वेळी सत्य स्वीकारून धीरोदात्तपणाची साक्ष देता आली असती, पण मोदींच्या स्वभावाला ते कसे मानवेल? ते पडले फक्त यशाचे धनी! एरवी मोदी विरोधी पक्षांना किती व कसे मोजतात, वेळोवेळी संसदेत अनुपस्थित राहून संसदीय चर्चेला नगण्य कसे लेखतात, असंवेदनशीलतेचे प्रदर्शन कसे करतात, हे आता जगजाहीर आहे, पण पहलगाम हल्ला ही बाब सामान्य नाही याचे त्यांनी भान राखणे गरजेचे होते.
● श्रीकृष्ण साठे, नाशिक
प्रतिमासंवर्धनासाठी प्रचार पुरेसा नाही
‘पहलगाममुळे प्रतिमासंवर्धनाचीही कोंडी?’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील लेख (२८ एप्रिल) वाचला. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका बळकट करणारे आहे, यात शंका नाही. मात्र, देशांतर्गत घटना, विशेषत: काश्मीर व मणिपूरसारख्या संवेदनशील भागांतील हिंसाचार भारताच्या प्रतिमेला धक्का लावू शकतो. प्रतिमासंवर्धन फक्त बाह्यप्रचाराने साधता येत नाही, ते देशांतर्गत शांतता आणि स्थिरतेनेच टिकते. माझ्या मते, देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ताकद दाखवतानाच अंतर्गत समस्याही गांभीर्याने हाताळल्या पाहिजेत. कारण प्रतिमा ही कृतीतूनच उभी राहते, जाहिरातीतून नाही. त्यामुळे देशातील सर्वसमावेशक विकास, शांतता आणि लोकशाही मूल्ये जोपासणे हेच भारताच्या दीर्घकालीन प्रतिमासंवर्धनाचे खरे शस्त्र ठरेल.
● सतीश घुले, खरवंडी, ता. पाथर्डी (जि. अहिल्यानगर)
ही भारतासाठी धोक्याची घंटा
जाहल्या काही चुका… हे लोकसत्ता संपादकीय (२८ एप्रिल) वाचले. देशाच्या पूर्वसुरींनी जागतिक राजकारणात तटस्थचे, अलिप्ततेचे धोरण यशस्वीपणे राबवले. परंतु विद्यामान राजकीय नेतृत्व- पंतप्रधानांपासून आमदारापर्यंत- मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, धार्मिक उत्सव, सणसमारंभात जाहीरपणे सहभागी होण्यातच धन्यता मानते. कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग हे त्याचेच उदाहरण. त्याच वेळी ते भारत हा बहुधार्मिक देश आहे हेदेखील सोयीस्करपणे विसरते. बहुसंख्यांच्या धर्माचे सातत्याने तुष्टीकरण करणे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
● विवेक चव्हाण, शहापूर (ठाणे)
बिहारमधील सभा एवढी अपरिहार्य?
‘पहलगाममुळे प्रतिमासंवर्धनाचीही कोंडी?’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. पंतप्रधान सौदी अरेबियाचा अर्धवट दौरा सोडून आल्यानंतर तात्काळ काश्मीरचा दौरा करतील. अशी अपेक्षा होती. ‘मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे.
काश्मीरमध्ये हत्याकांड झाल्यानंतर बिहारमध्ये सभा घेऊन आगामी निवडणुकीत यश मिळविण्याचे प्रयत्न झाले. या सभेत उच्चारलेले ‘पृथ्वीच्या अंतापर्यंत दहशतवादी शोधून काढू’ हे वाक्य आत्मविश्वास नसल्याचे दर्शविते. सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नसणे म्हणजे आपण सर्वांपेक्षा मोठे आहोत, असे दाखविणे होय. पठारावर एकही पोलीस किंवा सुरक्षारक्षक नव्हता ही गोष्ट सर्व भारतीयांच्या लक्षात आली. एवढे लोक तिथे जात असताना जागोजागी तपासणी होत होती. तर मग पठारावर सुरक्षारक्षक का नव्हते? बिहारमधील सभेची घाई का झाली होती? पुण्यात चिखल असल्यामुळे सभा रद्द करणारे पंतप्रधान काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर बिहारची सभा का रद्द करू शकले नाहीत? राष्ट्रीय दुखवटा का जाहीर केला नाही?
● युगानंद साळवे, पुणे
पंतप्रधान काश्मीरला का गेले नाहीत?
‘पहलगाममुळे प्रतिमासंवर्धनाचीही कोंडी?’ हा लेख वाचला. यापूर्वी दोन वेळा अमेरिकेच्या राजकारण्यांनी भारताला भेट दिली असताना काश्मिरात अतिरेकी हल्ले झाल्याचा इतिहास असूनही इतकी बेफिकिरी सरकार व संरक्षण यंत्रणा कशी दाखवू शकतात? दोन हजार पर्यटक हजर असलेल्या जागी सुरक्षा असू नये, हे संतापजनक आहे. १९ एप्रिलला पंतप्रधान काश्मीर दौऱ्यावर जाणार होते परंतु खराब हवामानामुळे तो दौरा रद्द झाल्याचे सांगितले जाते, हेही संशयास्पद वाटते. पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये जाऊन स्थानिकांना नैतिक बळ दिले असते तरी बरे झाले असते. ‘मन की बात’ करण्याऐवजी एक पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानला चार खडे बोल सुनवले असते, तर बरे झाले असते.
● अशोक आचरेकर, मुलुंड (मुंबई)
मुघलांना वगळल्यास गोंधळच वाढेल
‘एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघल हद्दपार’ ही बातमी (लोकसत्ता- २८ एप्रिल) वाचली. हा सरकारच्या अनाकलनीय निर्णयांपैकी एक निर्णय म्हणावा लागेल. भारतात मुघल कधी आलेच नव्हते, असे या पिढीच्या मनावर ठसवणे, हा यामागचा उद्देश आहे का? यातून गोंधळच वाढेल. केवळ धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र जागा आणि तीर्थक्षेत्रांची माहिती समाविष्ट करून सर्वांना इतिहास समजावता येईल, अशी सरकारी धारणा दिसते. उलट मुघल आले होते आणि त्यांना यशस्वी प्रतिकार करून थोपवणारे भारतीय राजेही त्या काळात होते हे सविस्तर दाखविल्याने पुढच्या पिढीला भारत कसा घडत गेला हे समजेल. या पिढीला प्राचीन, मध्ययुगीन भारताचे चित्र यथार्थपणे समजावता येईल. त्यामुळे मुघलांना पुस्तकातून हद्दपार करण्याचा निर्णय इतिहासाची मोडतोड करणारा आहे.
● अशोक साळवे, मालाड (मुंबई)
हे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार!’
‘कृषीपंपांच्या ७५ हजार कोटी रुपयांच्या थकबाकीवर पाणी!’ ही बातमी (लोकसत्ता- २८ एप्रिल) वाचली. सामान्यपणे कृषीपंप धनदांडग्यांच्या कुळांच्या शेतांवर बसविलेले असतात. त्याची इत्थंभूत चौकशी केली पाहिजे व त्यांच्याकडून पैसे वसूल करून महावितरणला देणे योग्य ठरेल. एवढी मोठी रक्कम माफ करणे हे सामान्य जनतेने दिलेले पैसे शासनाने धनदांडग्यांना देऊन चुचकारण्यासारखे आहे. हे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार!’ असे झाले. ● नरेंद्र दीक्षित