पी. चिदम्बरम

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपसह सगळ्या देशाला इतका का रस आहे, या निवडणुकीला विनाकारणच महत्त्व दिले जात नाहीये का, असे एखाद्याला वाटू शकते. पण इतरांकडून असा रस घेतला जाणे अगदीच स्वाभाविक आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पक्षासाठीच नाही तर देशासाठीही महत्त्वाची आहे, कारण..

who is st somashekar
राज्यसभा निवडणूक २०२४ : कर्नाटकमध्ये भाजपाच्या दोन आमदारांच्या मदतीमुळे काँग्रेसचा विजय? क्रॉस व्होटिंग करणारे आमदार आहेत तरी कोण?
Indira Gandhi
इंदिरा गांधींनी १९७१ साली ‘एक देश, एक निवडणूक’ कशी संपुष्टात आणली?
congress leaders, remembering Vilasrao deshmukh
‘साहेब’ तुम्ही हवे होतात…पडझडीच्या काळात काँग्रेस नेत्यांना विलासरावांची आठवण
kamal nath bjp entry
कमलनाथ यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा; पण भाजपाला नेमका फायदा काय?

काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये जरा जास्तच आणि जाणीवपूर्वक लुडबुड केली जात आहे आणि विनाकारणच खूप उत्सुकता दाखवली जात आहे. दोन वर्षांपूर्वी, जे. पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा काँग्रेसमध्येच नाही तर भाजपमध्येदेखील अगदी वरपासून खालपर्यंत कुणालाही कसलेही प्रश्न पडले नव्हते. कुणीही ‘मतदार यादी’बाबत विचारणा करण्याची तसदी घेतली नव्हती. निवडणूक अधिकारी कोण होते किंवा नड्डा यांनी ‘नामांकन’ दाखल केले होते की नाही, हे कोणालाच माहीत नव्हते. खरे तर तेव्हा भाजप हा देशातील सत्ताधारी पक्ष होता आणि जगातील कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा आपली सदस्यसंख्या सर्वात जास्त असल्याचा भाजपचा दावा होता. पण तरीही नड्डा यांची पक्षाध्यक्षपदासाठीची निवडणूक ही कुणाच्याच दृष्टीने फारशी महत्त्वाची घटना नव्हती, की ‘इव्हेंट’ नव्हती.

काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत भाजप आणि प्रसारमाध्यमांनी दाखवलेली विलक्षण उत्सुकता हा दोन गोष्टींचा पुरावा आहे. एक म्हणजे, काँग्रेसमुक्त भारत हे एक मिथक आणि मृगजळ आहे; तसे कधीही होणार नाही. दुसरे म्हणजे, ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपमधील आत्मसंतुष्ट हादरले आहेत. एरवी काँग्रेसला डावलणाऱ्या, काँग्रेसची दखलही न घेणाऱ्या प्रसारमाध्यमांना देखील या यात्रेने काँग्रेसची दखल घ्यायला भाग पाडले आहे.

पक्ष आणि गांधी कुटुंब

ऑक्टोबर महिन्यात काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. तो कोण असेल, ते मी आत्ता सांगू शकत नाही. राहुल गांधी यांनी जुलै २०१९ मध्ये पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण आताही काँग्रेसमध्ये वपर्यंत सगळय़ांना पुन्हा राहुल गांधी यांनीच ते पद स्वीकारावे असे वाटते आहे. त्यांना असे काही वाटणे स्वाभाविक असले तरी राहुल गांधी यांनी मात्र पुन्हा काँग्रेस अध्यक्ष होण्याची आपली इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांचे मन वळवण्यासाठी, त्यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास राजी करण्यासाठी पक्षातील इतर नेते एक शेवटचा धाडसी प्रयत्न करतीलही, परंतु राहुल गांधी या गोष्टीशी सहमत झाले नाहीत, तर त्यांना राहुल यांच्या मताचा आदर राखून पुढे जावे लागेल. मग काँग्रेसच्या सदस्यांना पक्षाध्यक्ष म्हणून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची निवड करावी लागेल. एवढे दिवस हंगामी अध्यक्षाच्या हाताखाली सुरू असलेल्या पक्षाला एक निवडून आलेला, काही निश्चित काळासाठीचा अध्यक्ष बहाल केला जाईल. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती निवडून येणे म्हणजे काँग्रेस पक्षाने गांधी कुटुंबाचा त्याग केला आहे किंवा गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे, असे समजण्याचे अजिबातच कारण नाही, असे माझे मत आहे.

इतिहासाचे धडे

काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाने पक्षाला अनेक मौल्यवान धडे दिले आहेत. भारताच्या राजकीय पटलावर आगमन झाल्यानंतर महात्मा गांधी हे काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्या काळातील इतरही अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये होते. पण त्यांच्यामध्ये गांधीजी हे सर्वात महत्त्वाचे नेते होते. १९२१-१९४८ या कालावधीत १४ वेगवेगळय़ा व्यक्तींनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद भूषवले. त्यामध्ये सी. आर. दास, सरोजिनी नायडू, एस. श्रीनिवास अय्यंगार, एम. ए. अन्सारी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, सुभाष चंद्र बोस, अब्दुल कलाम आझाद आणि आचार्य कृपलानी असे दिग्गज लोक होते. काँग्रेस पक्षातील वरपासून खालपर्यंतच्या सगळय़ांना एवढेच नाही तर काँग्रेसचे सदस्य नसलेल्या लोकांनाही त्यामधला एक सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक समजला होता. तो म्हणजे महात्मा गांधी हे ‘काँग्रेसचे नेते’ होते आणि बाकीचे सगळे हे ‘काँग्रेसचे अध्यक्ष’ होते. पण यातल्या कुणीच एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला नाही.

१९४८ ते १९६४ या दरम्यानच्या काळातही असेच काहीसे होते. जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे नेते होते, तर काँग्रेसचे अध्यक्षपद एकूण सात जणांनी भूषवले होते. १९६५ ते ८४ पर्यंतचा काळही काही फार वेगळा नव्हता. तेव्हा इंदिरा गांधी काँग्रेसच्या नेत्या होत्या आणि एकूण आठ व्यक्तींनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. एखाद्या मोठय़ा देशातील मोठय़ा राजकीय पक्षात प्रणालीला, रचनेला महत्त्व असते.  लोकांचे नेतृत्व करणे, त्यांना दृष्टी देणे आणि लोकांना आपल्या पक्षाला मत देण्यासाठी प्रेरित करणे हे त्या पक्षाच्या नेत्याचे काम असते. संस्था हे यंत्र मानले तर त्या यंत्राचे नट-बोल्ट दुरुस्त करणे, ते सुस्थितीत ठेवणे आणि निवडणुकीत उतरण्यासाठी हे यंत्र तयार अवस्थेत ठेवणे हे पक्षाच्या अध्यक्षांचे मुख्य काम असते. ही दोन्ही कामे एकमेकांना पूरक आहेत. एखाद्या पक्षाकडे ही दोन्ही कामे करण्यासाठी एकच व्यक्ती असेल तर तो पक्ष भाग्यवान ठरतो; पण ही कामे दोन व्यक्तींना वाटून दिली तर तेदेखील व्यावहारिक आणि शहाणपणाचे ठरते.

प्रेरणा आणि पुनर्निर्मिती

मी वर म्हटले आहे त्याप्रमाणे नेत्याने लोकांना प्रेरणा दिली पाहिजे. अिहसा, असहकार, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलन अशा आपल्या अभिनव राजकीय कार्यक्रमांमधून महात्मा गांधींनी लोकांना अशी प्रेरणा दिली होती.    अलिप्तता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद अशा संकल्पनांमधून जवाहरलाल नेहरूंनी लोकांच्या कल्पनाशक्तीला खाद्य दिले होते. इंदिरा गांधींनी देशाला मोठी स्वप्ने पाहायला प्रवृत्त केले आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण तसेच सर्वासाठी घरे अशी धाडसी पावले उचलली. अटलबिहारी वाजपेयींनी सुवर्ण चतुष्कोनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून देशाची दृष्टी विस्तारली. प्रेरणा देणारे एखादे वाक्य (उदा. नियतीशी करार) किंवा सळसळती घोषणा (उदा. गरिबी हटाओ) किंवा व्यापक दृष्टी (‘इन्सानियत, जमहूरियत आणि कश्मीरियत’) त्या त्या नेत्याची जनमानसातील उंची वाढवतात.

दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्षाने वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यायचे असतात. लोकांना वेळप्रसंगी खंबीरपणे आधार द्यायचा असतो. त्यांची वैचारिक वाढ होईल असे बघायचे असते. या सगळय़ा संदर्भात काँग्रेस पक्षाची स्थिती गंभीर असून तिच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. कार्यकर्त्यांबरोबर वावरावे लागेल. या सगळय़ासाठी भरपूर वेळ द्यावा लागेल. अध्यक्षाला बूथपासून ते ब्लॉकपर्यंत आणि राज्यापासून ते जिल्ह्यापर्यंत  पक्षाच्या प्रत्येक घटकाच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. अध्यक्षाने कार्यकर्त्यांना फटकारले पाहिजे आणि वेळप्रसंगी गोंजारले पाहिजे. नेत्यांच्या एखाद्या चांगल्या कृतीचे कौतुक केले पाहिजे आणि वेळप्रसंगी एखाद्या चुकीची शिक्षाही दिली पाहिजे. पक्षामधल्या त्रुटी कशा काढून टाकता येतील, नकोशा गोष्टी कशा बदलता येतील ते बघितले पाहिजे. हे वर्षांचे ३६४ दिवस, २४ तास आणि आठवडय़ाचे सातही दिवस करण्याचे काम आहे. (अपवाद त्याच्या स्वत:च्या वाढदिवसाचा!) बहु-पक्षीय लोकशाही आणि कार्यक्षम संसदेची गुरुकिल्ली म्हणजे काँग्रेस. काँग्रेस नसेल तर एकपक्षीय राजवट येईल आणि लोकशाही हा निव्वळ भ्रम ठरेल.

काँग्रेसला नेता असलेला अध्यक्ष मिळेल की नेता आणि अध्यक्ष वेगवेगळे असे नेतृत्व मिळेल, हे येत्या सहा दिवसांत कळेलच. त्या अर्थाने हा आठवडा फक्त काँग्रेस पक्षासाठीच नाही तर देशासाठीदेखील महत्त्वाचा आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये लोकांना असलेला रस अगदीच अनुचित म्हणता येणार नाही.