अतुल सुलाखे विनोबांच्या भूदान आंदोलनाकडे प्राय: आर्थिक अंगाने पाहिले जाते. जवळपास दोन दशके चाललेल्या या ‘यज्ञा’चा उल्लेख ‘आंदोलन’ असा झाला की त्यामागच्या तत्त्वज्ञानाचा विसर पडतो. जमिनीचा प्रश्न सुटला नाही सबब विनोबांचे आंदोलन फसले. आर्थिक प्रश्न सोडवण्याचा हा मार्गच नव्हे. विनोबांना जमीन मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नव्हता. अशा प्रकारची टीका जबाबदार म्हणवणाऱ्या नेत्यांनीही केली. विनोबांची भूमिका निव्वळ आध्यात्मिक असती आणि म्हणून तिची उपेक्षा झाली असती तरी समजण्यासारखे होते. तथापि हे नवभारताचे नवदर्शन होते. विनोबांच्या भूदान यज्ञामागील चिंतनाचा नेहमीप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता आणि भारतीय दर्शनांशी निकटचा संबंध आहे. गीतेतील ‘यज्ञ’ कल्पना त्यांनी कालोचित केली. तसेच ती व्यक्तिगत पातळीवर न ठेवता सामूहिकही केली. जमीन ‘निर्माण’ करता येत नाही म्हणून ती व्यक्तिगत मालकीची नाही अशी भूमिका घेत ‘सबहि भूमि गोपाल की’ हा घोष त्यांनी केला. ‘गोपाल’ ठाऊक नाही असा भारतीय नाही. या घोषणेमध्ये विनोबांची अर्थ-राजकीय भूमिकाही दिसते. त्यांनी व्यक्तिगत मालकी आणि संसाधनांवर मूठभरांचा ताबा या दोन्ही गोष्टी सहजपणे नाकारल्या. सामान्य माणसाला पूर्णपणे समजेल असे हे तत्त्वज्ञान आहे. विनोबांच्या शब्दांत सांगायचे तर ‘ही अहिंसक क्रांतीची रीत आहे. शब्द जुने पण आशय नवा.’ ‘दान’ शब्द वापरताना त्यांनी आद्य शंकराचार्याचा आधार घेतला. गीतेतील दान संकल्पना स्पष्ट करताना आचार्यानी ‘दानं संविभाग:’ असे म्हटले आहे. उदाहरण म्हणून अन्नदानाचा उल्लेख केला आहे. विनोबांनी यातील ‘संविभाग:’ वर जोर दिल्याचे दिसते. त्यामुळे दानाला यज्ञाप्रमाणेच समानतेचे परिमाणही लाभले. थोडक्यात जमीन आणि तिचे समान वाटप म्हणजे ‘दानं संविभाग:’ असा अर्थ झाला. सामूहिक पातळीवर दान संकल्पना रुजवताना विनोबांनी व्यक्तिगत पातळीवर ‘सर्वोदय पात्रा’ची संकल्पना प्रत्यक्षात आणून त्या पातळीवरही दानाची संकल्पना समृद्ध केली. जमिनीचे दान मागितल्यामुळे विषमतेच्या उतरंडीतील शेवटच्या व्यक्तीच्या उपजीविकेचा प्रश्न ठसठशीत बनला. त्यामुळे दलित आणि स्त्रिया यांचा अर्थव्यवस्थेतील समान अधिकार समोर आला. हे चिंतन, महाभारतातील ‘यक्ष प्रश्न’ या उपाख्यानावरील विनोबांच्या टिप्पणीला जुळणारे आहे. त्या कथेत धर्म, सहदेवाचे जीवन दान म्हणून मागतो. विनोबांनी यात सर्वोदयातील अंत्योदयाचे तत्त्वज्ञान पाहिले. गीता, रामायण, महाभारत, भागवत, भक्तिमार्ग यांचा मेळ विनोबांनी इथे जमीन, समाजातील वंचित जन, संसाधनांवरील त्यांचा अधिकार, ग्रामीण भारताचे अर्थशास्त्र, समता, सत्य आणि अहिंसा यांच्याशी घातला. भूदान यज्ञाच्या स्मृती ‘भूदान गंगा’ या शीर्षकाखाली संकलित झाल्या आहेत. हे शब्द म्हणजे तत्त्वत्रयी आहे. ‘भूमि दान आणि गंगा.’ भारतीय जनमानसाला या तिन्ही तत्त्वांची सादर आणि सखोल ओळख आहे. भूदान यज्ञाविषयी आजही आदर दिसतो तो भारतीय परंपरेच्या फेरमांडणीशी संलग्न आहे. भूदान यज्ञाची ही बाजू विस्मृतीत गेल्यामुळे आजच्या अनेक सामाजिक प्रश्नांनी डोके वर काढले, हा योगायोग नव्हे.