अतुल सुलाखे

‘गांधीजींच्या विचारांविषयी अनेक गैरसमज आढळतात. विनोबांनी स्थानिक संदर्भातून त्यांच्या सर्व कल्पना मांडल्या, त्यामुळे त्या भारतातील सामान्य माणसाला सहज समजल्या, मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना त्या समजण्यात अडथळे येतात.’             – प्रा. एल. एन. गोडबोले

प्रा. एल. एन. गोडबोले हे आधुनिक व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. त्यांचा विनोबांच्या विचारांचा सखोल अभ्यास होता.

गोडबोले यांनी प्रणव चंद्रशेखर या १२ वर्षांच्या मुलाला १९९० मध्ये विनोबांच्या चरित्राची आणि विचारांची ओळख करून देणारी ५२ पत्रे लिहिली. पुढे या पत्रांना ‘माय डिअर प्रणव’ हे पुस्तकरूप मिळाले. अत्यंत सोप्या आणि नेमक्या भाषेत, गोडबोले यांनी एका किशोरवयीन मुलाला विनोबांची ओळख करून दिली आहे.

आरंभी दिलेल्या अवतरणावरून त्यांच्या शैलीची कल्पना येते. तसेच विनोबा बुद्धिजीवी मंडळींपर्यंत का पोहोचले नव्हते आणि पोहोचत नाहीत, याचे नेमके कारणही ध्यानी येते.

या पुस्तकातील एका पत्राचे शीर्षक आहे ‘एज्युकेशन अँड स्पिरिच्युआलिटी : डेव्हलपमेंट विथ डायरेक्शन’

या पत्राच्या निमित्ताने गोडबोले लिहितात, विनोबा, सच्चे भूमिपुत्र होते. वेद, रामायण, महाभारत या अभिजात साहित्याशी त्यांची नाळ जोडलेली होती. देश पातळीवरील संतांच्या वाङ्मयाचे परिशीलन आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण करून त्यांनी आपल्या विचारांना समृद्ध केले होते.

ज्या भाषेत ते संवाद साधत ती लोकांची भाषा होती. लोकांना ती भावली. कारण त्यांचाही संत परंपरेशी जिव्हाळय़ाचा संबंध होता. आपल्यासारख्या आंग्लशिक्षित लोकांना त्यांची भाषा समजत नाही. कारण आपला या भूमीशी फार कमी संबंध आहे. ते पुढे लिहितात, लोकांना वाटते विनोबा आधुनिक विज्ञानाच्या विरोधात होते. प्रत्यक्षात मात्र विनोबा, हे युग, आधुनिक विज्ञानाचे आणि आत्मज्ञानाचे आहे, असे वारंवार म्हणत असत. आता धर्म आणि राजकारणाची सद्दी संपली आहे, हेही ते सतत सांगत.

विनोबांच्या मते, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एखाद्या इंजिनासारखे असतात. हे इंजिन ताकदवान आणि गतिमान असल्याने ते आपल्याला कुठेही घेऊन जाते. पण ते दिशा ठरवू शकत नाही. त्याला दिशा देण्याचे कार्य अध्यात्माचे आहे. अध्यात्म नसेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली येऊन मानवी समाज विनाश ओढवून घेईल.

विनोबांच्या भूमिकेशी जुळती भूमिका कोएत्स्लर, अच्युतराव पटवर्धन अशा नामांकित चिंतकांनी घेतली होती. कोएत्स्लर यांनी अणुस्फोट हा मानवी समाजाच्या उत्तरार्धाचा आरंभ असल्याचे घोषित केले तर अच्युतराव पटवर्धन यांनी अणुस्फोटापेक्षा वेगळी भीती वर्तवली होती. तंत्रज्ञानाची निरंकुश वाटचाल हा त्यांच्यासाठी अधिक चिंतेचा विषय होता.

विनोबादेखील सर्वनाशाची भीती व्यक्त करतात, पण ते तिथे थांबत नाहीत. विज्ञानाला आत्मज्ञानाची जोड हा त्यांचा विशेष आहे. यासाठी रूढ धर्मच नव्हे तर आत्मकेंद्री अध्यात्मही ते दूर सारतात. जे दर्शन समोर ठेवतात त्याचे नाव आहे ‘साम्ययोग!’ विज्ञान आणि आत्मज्ञानाचा मिलाफ!

jayjagat24 @gmail.com