जागतिकीकरणोत्तर जगातल्या २५ वर्षांची स्लोअर शहाणेची कथा पंचविशी ‘नैराश्य’ या विषयाशिवाय अधुरीच. किंबहुना, स्लोअरच्या आयुष्यात उमटणारे विविध तरंग अखेर लाटा होऊन कायम नैराश्याच्या किनाऱ्यावरच आदळत राहिले. त्यामुळे त्याविषयी सांगायलाच हवे. पण ते सांगताना आधी स्लोअर शहाणेच्या कथा पंचविशीतील नैराश्याच्या अन्वयार्थाचाही उलगडा व्हायला हवा. तो एका वाक्यात असा, की स्लोअरचे नैराश्य हे त्याचे दु:ख नसून, त्याच्या स्वत:च्या आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांतील विरोधाभासांतून निर्माण होणाऱ्या विसंगतींचा न झालेला निरास आहे. जागतिकीकरणोत्तर जगातील माणसांचे हे दुर्मीळ लक्षण स्लोअर शहाणेच्या आयुष्याला चिकटणे तेव्हाच अपरिहार्य झाले होते, जेव्हा त्याने वेगाचे अस्तित्व न नाकारता, संथ या शब्दालाही गतिशीलतेचे एकक मानले पाहिजे, हे त्याच्या लेखक असलेल्या पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापकांचे वाक्य त्यातील गर्भितार्थासह स्वीकारले.

पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक प्रात्यक्षिकाच्या तासाला मार्क मिळविण्याचे उपाय न सांगता, मोजपट्टीवरील इंच, सेंटिमीटर, मिलिमीटरसाठी आखलेल्या रेषांमधील अंतरांतील बारकाव्यांबाबत बोलत, तेव्हा इतर विद्यार्थ्यांना ते आवडत नसले, तरी स्लोअरला त्याचे किमान नवल तरी वाटत असे. प्रात्यक्षिकाच्या तासानंतर महाविद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर जाऊन तो ही अंतराची गोष्ट सामाजिकही होतेय का, असा तासनतास विचार करत बसे. मग आपल्या आयुष्यातील प्रत्येक वर्षाला मोजपट्टीच्या अंतराचे गणित लावून बघण्याचा खेळ तो खेळे. मैदानावरच्या धुळीत सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष अशा एककांमध्ये रेषा काढून तो आपल्या आजवरच्या आयुष्याचे गणित मांडू पाही. आकडेमोड म्हणून गणित बरोबर येत असले, तरी शाळेतील वर्षे निवांत आणि महाविद्यालयांतील झटकन गेल्याचे वाटण्याचा जो हिशेब आहे, तो नीट का लागत नाही, म्हणून तो अस्वस्थ होत असे. असेच चालू असताना पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापकांनी ‘संथ शब्दालाही गतिशीलतेचे एकक मानले पाहिजे’ हे त्यांच्या कादंबरीतले वाक्य प्रात्यक्षिकाच्या तासाला वाचून दाखविले आणि स्लोअर शहाणेच्या आयुष्यात निवांत आणि झटकन जाणारी वर्षे यांतील फरकाच्या हिशेबाचे आकलन देणारी ‘युरेका मोमेंट’ आली. अगदी त्याच रात्री त्याने आपल्या रोजदिनीत लिहिले, ‘पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक प्रात्यक्षिकाच्या तासाला सैद्धान्तिक बोलतात, तेव्हा मार्कांसाठी आवश्यक उत्तरे मिळविण्याच्या संधी कमी होत असल्या, तरी त्यामुळे परीक्षेत कधीच न येणारे प्रश्न मनात पडून मज्जा येते. आपण जे जगतो आहोत, तसेच आहे हे अगदी…’

स्लोअर शहाणेच्या या ‘युरेका मोमेंट’ने त्याच्या मैदानावरील आयुष्याचे गणित वगैरे मांडण्याच्या खेळात गंमत आणली, तरी इकडे महाविद्यालयाच्या परीक्षेत पास होणे त्याला जमेना. एकदा एका विषयाच्या सराव परीक्षेत त्याला चाळीसपैकी एक मार्क मिळाल्यानंतर आधी त्याच्या शिक्षकांनी आणि नंतर त्याच्या घरच्यांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. स्लोअरला त्याचे फार दु:ख झाले असे नाही, पण त्या खरडपट्टीमुळे आयुष्याच्या हिशेबाच्या मोजपट्टीचा मैदानावर रंगणारा त्याचा खेळ बंद झाल्याने त्याला कसनुसे वाटू लागले. याच कसनुसे वाटण्याला नैराश्य म्हणतात, हे त्याला तेव्हा कळले, जेव्हा त्याने मार्क पडतच नाहीत, म्हणून विज्ञान शाखा बदलून कला शाखेचा अभ्यास करताना मानसशास्त्र विषयाचे पाठ्यपुस्तक वाचायला सुरुवात केली. सराव चाचणीत पडलेले कमी मार्क ते नापास होण्याच्या भीतीने विज्ञान शाखेतून कला शाखेत झालेले स्थलांतर ज्या नैराश्याच्या किनाऱ्यावरून झाले, तो किनारा स्लोअरला नोकरी लागण्यापासून संसारापर्यंतच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत राहिला. पण त्यापूर्वीच, म्हणजे हे स्थित्यंतर झाले, त्याच वेळी त्याने आपल्या रोजदिनीत लिहून ठेवले होते, ‘शंकांचा निरास न होता, नुसतेच प्रश्नांचे भ्रम निर्माण होतात, तेव्हा नैराश्य येते.’

आता कसे आहे, की प्रत्येक माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात. आपल्या या स्लोअर शहाणेचेही तसेच. ज्या वेळी त्याला नैराश्य म्हणजे काय, याची मानसशास्त्रीय व्याख्या कळली, तेव्हा त्याला काही आनंद झाला असे नाही. पण पुढे जेव्हा जेव्हा त्याला नैराश्य आले किंबहुना त्याची झाक त्याच्या जगण्याच्या प्रत्येकच बिंदूपाशी रेंगाळली, तेव्हा तेव्हा त्याला आनंद नाही, तरी कायम बरे वाटत गेले, हेही तितकेच खरे. काही वेळा प्रश्न सुटण्यापेक्षाही, प्रश्न आहे, हे आकळणे हेच मुळात दिलासादायक असू शकते, अगदी तसेच. स्लोअर शहाणे तासनतास कसा विचार करत बसायचा, हे आपण याआधीच्या एका भागात पाहिलेच आहे. त्याच्या या विचार करायच्या सवयीनेही त्याची आणि नैराश्याची छान मैत्री घडवून आणली होती. याने बाकी काही नाही, तरी एक मात्र चांगले झाले, की ‘मजेत कसे जगावे?’, ‘आनंदी कसे राहावे?’ वगैरे प्रकारची वा तशी छाप असलेली पुस्तके, व्याख्याने स्लोअरच्या आयुष्यातून पार हद्दपार झाली. तो आपल्या, ‘अस्वस्थता ही सार्वकालिक आहे,’ या विधानावर ठाम राहिला.

आता कुणाला वाटेल, स्लोअरला आनंदी जगण्यात खरे तर काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम इतर कशात नाही, तर त्याला नव्वदोत्तरी जगाचे जे आकलन होत होते, त्यात न मिळणाऱ्या उसंतीचा होता. समृद्धीचे शिखर गाठून आनंदी जगण्याचे ध्येय ठेवलेल्यांचे आयुष्य नव्वदोत्तरी जगाने वेगवान करून टाकलेले असताना, असे करण्याविषयीच काही प्रश्न पडलेल्या स्लोअरसारख्यांचे आयुष्य त्या प्रश्नांपाशी उमटत राहणाऱ्या असंख्य विचारांच्या वेगाने संथ करून टाकले होते. का असे करायचे? असेच का करायचे? आणि असे केले नाही, तर काय? हे तीन प्रमुख प्रश्न स्लोअरला पडत असत. पहिला प्रश्न, ‘का असे करायचे’चे उत्तर होते, ‘संपन्न आयुष्य जगायला’. दुसरा प्रश्न, ‘असेच का करायचे’चेही उत्तर होते ‘संपन्न आयुष्य जगायला’ आणि तिसरा प्रश्न, ‘असे केले नाही, तर काय’चे उत्तर होते… ‘का नाही असे करायचे?’… थोडक्यात, तिसऱ्या प्रश्नाला प्रश्न हेच उत्तर म्हणून उभे ठाके. पण यात गंमत अशी, की या प्रश्नार्थक उत्तराचे उत्तर म्हणून परत पहिला प्रश्न उत्तरात येई, ‘पण, का असे करायचे?’ स्लोअरचा हा प्रश्नखेळ कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखा चालणारा असल्याने संपतच नसे. आवर्तनामागून आवर्तने चालत. म्हणजे इतकी, की अगदी महाविद्यालयीन जीवन संपवून २००० च्या दशकात नोकरी लागून त्याला ‘पैशाचे मोल’ वगैरेसारख्या लहानपणी ऐकलेल्या कथांचे तात्पर्य प्रत्यक्ष अनुभवाला आले, तरी त्याला हा खेळ संपवणे काही जमले नाही. आणि, त्यामुळेच त्याची नैराश्याशी चांगली गट्टीच जमली. पण त्यात मेख अशी, की समृद्धीच्या जोरावर दु:ख विसरून ‘आनंदी’ जगणे आणि जगण्यातील विसंगतीचा निरास होत नाही, म्हणून नैराश्य येणे, यातील सकसतेच्या भेदाची सीमारेषा स्लोअरला कधीच ठरवता आली नाही. त्याने त्याला आणखी आणखी नैराश्य तेवढे येत गेले…

एकदा मात्र असे झाले, की स्लोअरच्या आयुष्यातून काही काळासाठी नैराश्य गेले. शाळेत करायचा, तसे ऑफिसमधून दुपारच्या भोजनाच्या सुट्टीतच घरी पळून येऊन त्याने डुलकी काय काढली, त्याला एकदम हलके वाटून तो आकाशात उंच उडतो आहे, असे वाटू लागले. प्रश्न नाहीत, प्रश्नांची न संपणारी आवर्तने नाहीत, कापूसकोंड्याची गोष्ट नाही… काही काही नाही. मागे रेडिओ सुरू होता. एकामागोमाग एक छान आवडती गाणी लागत होती. त्यातले त्याचे दुपारी ऐकायला सर्वांत जास्त आवडणारे, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा…’ सुरू झाले. पहिले कडवे संपेपर्यंत सगळे ठीक होते. दुसऱ्या कडव्याच्या आधीचा सतार-व्हायोलिनचा जोड-तुकडा संपला आणि शब्द उमटले, ‘नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी…’ ही ओळ ऐकली मात्र; स्लोअर खाड्कन जागा झाला. स्वप्न तुटले, नशिबाने कळ्याही उमलल्या नाहीत आणि नैराश्य परत आले. स्लोअरला आलेली ही ‘जाग’ महत्त्वाची होती.