विश्वगुरूंनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला बळ मिळावे म्हणून केलेला ‘द हिंदू’चा प्रयोग सपशेल फसल्यामुळे पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या मुख्यालयात स्मशानशांतता पसरली होती. प्रमुखासह सारेच डोके गच्च धरून बसले होते. शिव्याशाप देणारे भक्तांचे संदेश वाचणे अशक्य झाल्याने सर्वांनी फोन बंद करून ठेवले होते. आता काय करायचे हे कुणालाच सुचेना! तंत्रज्ञानाच्या युगात बेमालूमपणे केलेली चोरीही पकडली जाऊ शकते याची जाणीव ‘पुन्हा एकदा’ सर्वांना झाली. तेवढ्यात एकाच्या संगणकावर मेल झळकला. यातही नक्कीच शिव्या असणार असे म्हणत त्याने वाचायला सुरुवात केली. जसजसा तो पुढे जाऊ लागला तसे त्याच्या चेहर्‍यावरचे रंग बदलू लागले.

बसल्याजागीच ओरडला, ‘या मेलमधला मजकूर सर्वांनी वाचायलाच हवा. थांबा, मी वाचतो तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐका’ असे म्हणत त्याने सुरुवात केली. ‘नमस्कार, मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता असून गेल्या ११ वर्षांपासून विविध समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या नावाने भक्त म्हणून सेवा देत आहे. इतरांपेक्षा माझे म्हणणे जरा वेगळे. काल ‘द हिंदू’च्या कथित पानावरून जे घडले त्यावर माझा काहीही आक्षेप नाही. गेल्या एक दशकात आपण अशा कितीतरी ‘फेकन्यूज’ पसरवल्या. अनेकदा त्यातून होणारा लाभही मिळवला तर कधी विरोधकांच्या शिव्याही खाल्ल्या. खोट्याला खरे करून सांगणे ही आपली पार्श्वभूमीच असल्याने या माध्यमी युद्धात त्याचा आपण खुबीने वापर केला यात शंका नाही. माझा आक्षेप आहे तो आपल्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाला वा घोषणेला बळ मिळावे म्हणून नेहरू, इंदिरा, मनमोहन सिंग यांच्या आधीच्या वक्तव्यांचा आधार घेण्यावर. या तिघांवर आपण आजवर सडकून टीका केली. प्रत्येक बाबतीत त्यांनाच दोषी ठरवले. त्यांचे जाणीवपूर्वक चारित्र्यहनन केले. उद्देश हाच की जनतेच्या मनातली त्यांची प्रतिमा मलीन व्हावी, किंबहुना पुसली जावी. मग आपल्या घोषणेसाठी त्यांचा आधार घ्यायचा तरी कशासाठी? यातून त्यांची प्रतिमा अप्रत्यक्षपणे उजळली जाते हे लक्षात येत नाही काय? ११ वर्षांत नेहरूंचे नाव आपण इतक्यांदा घेतले की ते हयात असतानाही एवढ्यांदा घेतले गेले नसेल असे विरोधक म्हणतात. त्याला अप्रत्यक्षपणे बळ देण्याचा हा प्रकार नाही का? सोने खरेदीच्या मुद्द्यावर आपण इंदिरांचे वक्तव्य समोर करताच त्यांनी चीन युद्धाच्यावेळी स्वत:चे सोने कसे दान केले याची छायाचित्रेच प्रसारित झाली. यातून त्यांची प्रतिमा पुन्हा उजळेल हे तुम्हाला कळत नाही का? एकीकडे त्यांच्या चुकांमुळे देश खड्ड्यात गेला असे सांगायचे व दुसरीकडे निर्णयाच्या बचावासाठी त्यांचाच आधार घ्यायचा हा विरोधाभास तुमच्या टीमच्या ध्यानात कधी येणार? सततच्या विजयामुळे आता आपले नेते म्हणतील तेच भरतवाक्य अशीच भूमिका असायला हवी. पूर्वसुरीच्या विरोधकांची गरज आपल्याला पडायलाच नको. तरीही आधार घ्यायचाच असेल तर चाणक्य, पुराणातले राज्यकर्ते यांचा घ्यावा. तसेही ते आपले आदर्श आहेतच शिवाय आधार घेताना काही चूक झाली तरी दंतकथा म्हणून ते खपवून नेता येते. यातून तोंडघशी पडण्याचा धोका टळतो. कृपया यावर तातडीने विचार करावा ही विनंती.’

ऐकल्यावर उपस्थित सार्‍यांच्याच मनाला थोडी उभारी आली, केवळ सेलप्रमुख सोडून. थोडा विचार केल्यावर त्यांनी आदेश दिला. ‘या पत्रलेखकाला भक्तांच्या यादीतून तातडीने काढून टाका. भक्ताने कधीही चिकित्सक वृत्ती जोपासता कामा नये या धोरणाच्या विरुद्ध याचे वर्तन आहे’ हे ऐकून सर्वांनी माना डोलावल्या.