अशोक राजवाडे

‘हर घर तिरंगा’ योजनेसाठी महापालिका पंचवीस कोटी रुपयांचा निधी उभारत असल्याची बातमी (लोकसत्ता: २८/०७/२२) वाचून मन उद्विग्न झालं. कशासाठी हा उपद्व्याप तर म्हणे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचा म्हणून! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपलं शासन किती वेगवेगळ्या तऱ्हांनी साजरा करत आहे पाहा! उदाहरणार्थ विरोधी पक्षीयांच्या घरांवर ईडीच्या धाडी टाकून किंवा आपल्या पक्षात आलेल्या धेंडांना अभय देऊन; विरोध करणाऱ्या पत्रकारांवर वक्रदृष्टी ठेवून; त्यातल्या काहींना तुरुंगात डांबून; स्वयंसेवी संघटनांच्या मागे लागून त्यांना हद्दपार तरी करून किंवा तुरुंगात डांबून; शासनाच्या विविध सांविधानिक स्वायत्त संघटनांना आपल्या दावणीला बांधून त्यांना आपल्या तालावर नाचत ठेवून! आपल्याला प्रतिकूल असे कोणतेच निर्णय येऊ द्यायचे नाहीत हे पाहणारं, आणीबाणीचा अपवाद वगळला तर जनतेपासून ‘स्वतंत्र’ होऊ पाहणारं शासन यापूर्वी ब्रिटिश निघून गेल्यानंतरच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

वास्तविक पाहता ‘हिंद स्वराज्या’साठी लढणारे स्वातंत्र्यसेनानी तिरंग्याच्या वापराबद्दल इतके अट्टहासी नव्हते. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला राष्ट्रध्वज उभारून त्याला मानवंदना दिली की भागायचं. विनोबा भावे तर ‘जय जगत’चा नारा देत. पण आजचे शासक ‘राष्ट्र’ नावाच्या -आणि त्याही ‘हिंदुत्व’ नावाच्या फॅसिस्ट-कल्पनेला जनमानसात रुजवण्यासाठी हट्टाला पेटले आहेत. आजच्या शासकांच्या मातृसंघटनेने म्हणजे रा. स्व. संघाने – भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत कधीच भाग घेतला नाही. उलट आंदोलनापासून दूर बसून मुख्यतः मुस्लीम आणि इतर धर्मीयांविरुद्ध जनमानसात वन्ही चेतवण्याची ‘हिंदुत्वा’ची तथाकथित ‘सांस्कृतिक कृती’ ती करत राहिली. हाच वसा आजच्या त्यांच्या वारसांनी पुढे नेण्याचा घाट घातला आहे. एकचालकानुवर्तित्वाच्या कल्पनेच्या जवळ जाणारी कल्पना या आजच्या शासकांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापूर्वीच प्रत्यक्षात आणली आहे. फक्त या देशाच्या गाड्याला एकाच्या ऐवजी दोन चालक आहेत एवढाच काय तो फरक. ज्या मातृसंघटनेच्या नागपूरच्या मुख्यालयावर २००२ साल उजाडेपर्यंत राष्ट्रध्वज फडकला नव्हता; तिचे शासनकर्ते आजचे पाईक इथल्या लोकांना दावणीला बांधून आपल्या ‘राष्ट्रभावने’चा जनतेत प्रसार करणार ही कल्पनाच मोठी विनोदी आहे.

एखादी कल्पना जेव्हा लोकांच्या अंत:प्रेरणेतून बाहेर येते तेव्हा ती प्रभावी होऊ शकते. आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईत अशी प्रेरणा होती आणि त्यामुळे ज्यांना असं वाटेल ते मनापासून ‘जयहिंद’ म्हणत. त्यात कोणाला काही वाटत नसे. आणि कुणाला ते नसेल म्हणायचं तर न म्हणण्याचंसुद्धा स्वातंत्र्य होतं.

आज मात्र जे काही होईल तो जुलमाचा रामराम असणार आहे. आपण असं केलं नाही तर शासनाची आपल्यावर खप्पामर्जी होईल असा धाक त्यामागे आहे.

केंद्र सरकारने तिरंग्याच्या योजनेसाठी कंपन्यांच्या सीएसआरमधला निधी वापरायला परवानगी दिली आहे. म्हणजे जो पैसा कदाचित कुठे गोरगरिबांच्यासाठी कारणी लागला असता त्यावरही ही योजना डल्ला मारणार आहे. आणि कंपन्यासुद्धा ‘नको ती कटकट’ म्हणून पैसे देऊन मोकळ्या होतील. यातून देशप्रेमाची (सॉरी, राष्ट्रभावनेची) कल्पनासुद्धा मलिन होईल असा धोका संभवतो.

एके काळी माणसं ‘रामराम’ सहजपणे आणि खुशाल म्हणत. त्यात धाक नव्हता. आज या ‘रामराम’ची जागा ‘जय श्रीराम’ने घेतली आहे. आज ‘जय श्रीराम’ म्हटलं की कुणाच्या छातीत धडकी भरावी असं वातावरण आहे. त्याप्रमाणे जर कोणी आपल्या घरात ‘राष्ट्रध्वज’ ठेवला नाही तर त्यांना (विशेषतः अहिंदूंना) झोडपून काढलं जाईल हीच शक्यता अधिक!

आज मुंबईतील रस्ते पावसाच्या एका सरीत खड्डेग्रस्त होतात; गटारं तुंबतात; मुंबईचं फुप्फुस असलेलं आरेचं ‘जंगल’ आता उजाड होण्याला सुरुवात झाली आहे. अनेक गिधाडं त्यासाठी टपून बसली आहेत. असे अनेक प्रश्न दूर ठेवून महापालिकेचा कर्मचारी वर्ग ‘घरोघरी राष्ट्रध्वज’सारख्या भाकड कल्पना राबवणार हे चक्रावून टाकणारं आहे.