प्रसाद मोकाशी

धर्मवादी वर्चस्वाच्या आग्रहामुळे निरपेक्ष नात्यांमध्ये उभ्या राहिलेल्या भिंतींवर बोट ठेवणाऱ्या कादंबरीविषयी..

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: ताठरही नाही की तडजोडवादी नाही.. वंचित बहुजन आघाडी तर संधीवादी!

सारे विश्व आदर्शवादी असावे, ही कल्पना आजच्या काळात केवळ दिवास्वप्न ठरली आहे. आपल्या मनाप्रमाणे, आपल्या विचारांप्रमाणे सगळय़ांनी वागलेच पाहिजे, आपण सांगू तोच धर्म सर्वानी मानला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. आपण सांगू तसे सर्व जण वागले तर आणि तरच या जगामध्ये आदर्शवाद नांदू शकतो असेही सर्वाना वाटत असते. त्यामुळेच सध्या जगात अनेक गटातटांमध्ये वर्चस्वासाठी सतत संघर्ष सुरू आहे. आपल्या देशातही सध्या हेच वातावरण आहे. सत्ताधारी सांगतील ते आणि तसेच वागले, राहिले पाहिजे असा मतप्रवाह देशभर पसरला आहे. त्यातूनच अन्य धर्माच्या तुलनेत एका धर्माचे प्राबल्य वाढू लागले आहे. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांचा हा लढा सुरू आहे.

आपल्या मनाप्रमाणे कोणी वागले नाही तर ते राष्ट्रद्रोही असतात, जगण्यास किंवा या जगात राहण्यास लायक नसतात अशी काहींची धारणा असते. त्यामुळे प्रत्येकावर केवळ संशय व्यक्त करायचा आणि त्याला भावनिक, मानसिक कोंडीत पकडून आपल्या म्हणण्याप्रमाणे वागण्याची जबरदस्ती करायची. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व मार्गाचा वापर करण्यासही मागेपुढे पाहायचे नाही. कारण ज्याच्या हाती सत्ता तो सर्वोत्तम, शक्तिशाली असे सर्वाना वाटते. आपल्या देशात यापेक्षा काही वेगळे चालले आहे, असे दिसत नाही.

आदर्शवादी जगाची कल्पना सर्वानीच मांडली आहे. महात्मा गांधींनी त्यासाठी आपले प्राण दिले तर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला बंधुत्वाची साद घातली. प्रत्येक देशात संघर्ष सुरू आहे तो वर्चस्वासाठी मात्र त्याला मुलामा दिला जातो तो वैश्विक एकतेचा. सर्वाच्या कल्याणाचा. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हा संघर्ष सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थीही या संघर्षांत सापडलेले दिसतात. अशीच एक कहाणी एका महाविद्यालयात घडते. दोन भिन्नधर्मी मित्रांमध्ये जेव्हा धर्माच्या भिंती उभ्या राहतात तेव्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली त्यांची मैत्री वेगळय़ाच स्तरावर जाते आणि उभे राहते एक भीषण नाटय़. हे नाटय़ केवळ त्या दोन मित्रांपुरतेच सीमित राहात नाही, तर त्यांचे संपूर्ण कुटुंबच त्यात भरडले जाते.

आज समाजमाध्यमांवर कोणीतरी एक पोस्ट करते आणि आपण त्यावर आंधळा विश्वास ठेवून ती गोष्ट खरीच आहे असे मानू लागतो. कुणाल बसू लिखित ‘इन अ‍ॅन आयडियल वल्र्ड’मधील अल्ताफबाबत हाच प्रकार घडतो. अल्ताफ हुसेन हा तरुण मुस्लीम विद्यार्थी असतो. त्याचे महाविद्यालयाच्या वसतिगृहातून अपहरण केले जाते. हे अपहरण कोणी केले याचा तपास करण्याऐवजी महाविद्यालयाचे प्रशासन हात झटकते आणि पोलीसही त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. अल्ताफ इराकमध्ये जिहाद (धर्मयुद्ध) पुकारण्यास गेला आहे, अशी अफवा सर्वत्र पसरते. भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कथित राष्ट्रवादी तरुणांची हत्या करण्यासाठी तो येणार असल्याची भयानक अफवा पसरते. अल्ताफ आणि त्याच्या सहकाऱ्यांबाबत सहानुभूती असणाऱ्या मानवतावादी मंडळींमध्ये चलबिचल सुरू होते. मात्र अल्ताफचे अपहरण नेमके कोणी केले हे समजण्यास मार्ग नसतो.

त्याच वेळी बॉबी सेनगुप्ताच्या कोलकात्याच्या घरात वादळ निर्माण होते. बॉबीचे वडील जॉय हे बँक मॅनेजर असतात, तर आई रोहिणी शाळेत शिक्षिका असते. दोघेही मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारे असतात. त्यांना धर्मसंघर्ष मान्य नसतो. पण बॉबी हा कथित राष्ट्रवादी विद्यार्थ्यांचा नेता आहे आणि अल्ताफच्या गायब होण्यामध्ये त्याचा हात आहे, हे कळताच त्यांना धक्का बसतो. बॉबीबरोबर त्यांचा वाद होतो. त्याच्या एकांगी विचारसरणीमुळे आणि अल्ताफच्या अपहरणामध्ये आपला हात नाही, असे तो सांगत नसल्यामुळे आई-वडील आणि मुलामध्ये संशयाचे धुके निर्माण होते.

अल्ताफच्या गूढ अपहरणाचे कोडे सुटण्याऐवजी जॉय आणि रोहिणी या दाम्पत्याला कट, द्वेष याचे वास्तव पहावे लागते. त्या विद्वेषाचा त्यांना सामना करावा लागतो. प्रेम आणि धैर्य हे कुठेही पाहण्यास मिळत नाही. समाज दुभंगण्यास कारण ठरणारे वास्तव आणि आदर्श याच्यातील संघर्ष पाहणे त्यांच्या नशिबी येते. पण नेमके काय झालेले असते? अल्ताफचा शोध लागतो का, बॉबीचा त्यात खरंच हात असतो का, ते त्याला या सर्व प्रकरणापासून दूर नेऊ शकतात का, दुभंगलेले राष्ट्र जोडण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या कादंबरीमध्ये अखेरीस वाचण्यास मिळतात.

या जगात कोणीही कोणाचा नसतो, हे वास्तव स्वीकारण्यास आता सर्वानीच सुरुवात केली आहे. धर्माधवादामुळे देश एका दुभंगावस्थेमध्ये सापडला आहे, हे वास्तवही आता सर्व जण स्वीकारू लागले आहेत. दोन पिढय़ांना एकमेकांविरोधात लढविण्यासाठी- भाऊ भावाच्या विरोधात, मित्र मित्राच्या विरोधात उभा ठाकावा यासाठी अनेक शक्ती आपल्या देशात कार्यरत आहेत. आपण आपल्यासाठीच आणि एकमेकांसाठीही अनोळखी झालो आहोत.

प्रत्येक संघर्ष हा केवळ वर्गलढा नसतो तर भावनिक लढाही असतो. अर्थात विश्व आदर्शवत असावे, सगळेच बंधुभावाने रहावेत, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपल्यम वैचारिक धारणेतून प्रत्येकाचाच प्रयत्न सुरू असतो. जितक्या व्यक्ती तितक्याच विचारधारा असल्याने एकाचा आदर्श हा दुसऱ्याचा आदर्श असेलच असे नसते. त्यातूनच उभा राहतो तो वर्चस्वाचा लढा. त्यांनी हल्ला केला तर आम्ही लढू, असे चे गवेरा यांचे म्हणणे आहे. धर्माध शक्ती या जिवंत बॉम्ब आहेत. ते फुटले तर विद्वेषाचे लष्कर उभे राहील आणि संपूर्ण जगाचा विध्वंस झाल्याखेरीज राहणार नाही. रागाची आणि विद्वेषाची परिसीमा गाठणारी धर्माधता वेळीच रोखली नाही, तर या देशाच्या विविधतेतील एकात्मता दुभंगल्याखेरीज राहणार नाही. सध्या देशातील वातावरण अतिरेकी धर्माधतेकडे झुकलेले आहे. मात्र आदर्शवादी विश्वाची संकल्पना हा आशेचा किरण या वातावरणावर नक्कीच मात करेल, असा विश्वास सर्वाना आहे.

कुणाल बसू हे अत्यंत संवेदनशील लेखक आहेत. ‘जॅपनीज वाईफ’ हा पुरस्कारविजेता चित्रपट त्यांच्या याच नावाच्या कथासंग्रहावर आधारित आहे.