प्रसाद माधव कुलकर्णी

सध्या अभूतपूर्व प्रतिसादात सुरू असलेल्या ‘भारत जोडो यात्रे’च्या कालावधीत २८ डिसेंबर २०२२ रोजी काँग्रेस पक्ष आपला १३७ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. एक शतक आणि तीन तपे पूर्ण केलेल्या काँग्रेसला व त्यांच्या कार्यकर्त्यांना या वर्धापनदिनी ‘भारत जोडो यात्रे’तून आणखी बळ मिळो ही मनःपूर्वक शुभेच्छा. काँग्रेस म्हणजे नेमके काय, हे सांगायचे तर असे म्हणता येईल की भारतातील सर्व राजकीय पक्षांमध्ये स्वातंत्र्य आंदोलनाचे मध्यवर्ती नेतृत्व केलेला व स्वातंत्र्यानंतरही सक्रिय असलेला, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक नेते – विचारवंत देणारा, सर्वात जुना – जाणता, सर्वाधिक काळ रुजलेला व जनाधार मिळवलेला, सर्वाधिक काळ सत्तास्थानी राहिलेला, भारताच्या सर्वांगीण विकासात मौलिक स्वरूपाची भागीदारी केलेला, भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावणारा आणि विरोधकांना काँग्रेसमुक्त भारताचे ‘दिवास्वप्न‘ पाहू देणारा पण त्यात तथ्यांश नाही, हे अल्पावधीतच त्यांनाच सिद्ध करायला लावणारा जर कोणता पक्ष असेल तर तो ‘काँग्रेस‘ आहे.

chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
Former Congress MLA Namdev Usendi resigned alleging that money was the criterion for ticket distribution in Congress
काँग्रेसमध्ये तिकीट वाटपासाठी पैशांचा निकष, गंभीर आरोप करून काँग्रेसचे माजी आमदार उसेंडी यांचा राजीनामा
various political leaders celebrate holi festival
लोकशाहीच्या उत्सवात राजकीय रंगांची उधळण

इतिहासात कधी नव्हे एवढ्या विकलांग अवस्थेत आज काँग्रेस आहे, हे खरे आहे. पण देशाला प्रगतीपथावर नेण्याचे, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उंचावण्याचे काम काँग्रेसने केले हे नाकबूल करता येत नाही. तसेच आणीबाणीपासून शहाबानो प्रकरणापर्यंत आणि राममंदिराचे दरवाजे खुले करण्यापासून ते एवढ्या प्रदीर्घ व व्यापक सत्ताकाळात पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पक्षीय विचारधारा व भारतीय संविधानातील तत्वज्ञानापर्यंत योग्यप्रकारे प्रबोधन न करण्याच्या काही गंभीर चुकाही केल्या आहेत हे कबूल करावे लागेल. भाजपने धर्मांधता व परधर्म द्वेष रुजविला, हे खरे आहेच. पण तो रुजू नये यासाठी धर्मनिरपेक्ष विचाराची कसदार भूमी तयार करण्यात काँग्रेस कमी पडला, हेही खरे आहे. त्यामुळे आज कार्यकर्त्यांचा होत असलेला वैचारिक गोंधळ दूर करणे आणि पक्षाची विचारांवर आधारित बांधणी करणे हे आज काँग्रेसचे अग्रक्रमाचे कर्तव्य आहे. त्यासाठीची जमीन राहुल गांधी तयार करून देत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तीला धर्म आहे, पण राष्ट्राला धर्म असणार नाही, हा धर्मनिरपेक्ष भूमिकेतील खरा संदेश राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’मधून देत आहेत. त्यांना त्यासाठी काँग्रेसचे सदस्य नसलेल्या, समाजाच्या सर्व क्षेत्रातील हजारो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, हे भारतीय राजकारणातील बदलते चित्र यावेळच्या वर्धापन दिनाचे वेगळेपण आहे.

वास्तविक गेली काही वर्षे भारतीय राजकारणात काँग्रेस पक्षाचा संख्यात्मक संकोच होतो आहे. २०१४ मध्ये तर अतिशय नीचांकी पद्धतीने काँग्रेसचा दारुण पराभव झाला. २०१९ मध्येही फारसा फरक पडला नाही. पण सत्ताधारी पक्षाची म्हणण्यापेक्षा नेतृत्व द्वयीची मनमानी धोरणे आणि त्यातून देशाला मोजावी लागत असलेली किंमत यामुळे सर्वसामान्य जनता अतिशय त्रस्त झाली आहे. म्हणूनच काँग्रेसने पक्ष म्हणून अधिक संघटित, आक्रमक होणे ही या १३७ व्या वर्धापनदिनाची मागणी आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ १०८ दिवसाच्या प्रवासानंतर दिल्लीत दाखल झाली, तेव्हा तेथील सभेत लालकिल्ल्यावरून बोलताना शनिवार २४ डिसेंबर रोजी राहुल गांधी जे म्हणाले ते अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. राहुल गांधी म्हणाले, लोकांचे खऱ्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धार्मिक विद्वेषाचा शस्त्रासारखा वापर करतो आहे. २४ तास हिंदू मुस्लिम विभागणी करून द्वेष पसरवला जातो आहे. याला काही वृत्तवाहिन्या देखील खतपाणी घालतात. या यात्रेचे उद्दिष्ट भारताला जोडण्याचे आहे. माध्यमे आमचे मित्र आहेत. पण आमचे म्हणणे पुरेसेपणे ती मांडत नाहीत. पण आपण त्यांच्यावर चिडायचे नाही. लाखो लोकांना भेटल्यावर मला हेच जाणवले की हा देश एक आहे. हिंदू, मुस्लिम, शीख ख्रिस्ती या सर्व लोकात परस्परांबद्दल प्रेमच आहे. सगळ्या देशात द्वेष पसरला आहे असे मला वाटत होते. पण प्रत्यक्षात मी चालायला लागलो तेव्हा वस्तुस्थिती समजली. प्रत्येक जण परस्परांवर प्रेम करत असल्याचे दिसून आले. देशातील विमानतळे, बंदरे, रस्ते उद्योगधंदे, शेती हे सारे सध्या सत्ताधीशांच्या मालकांच्या खिशात आहे. आज देशात नरेंद्र मोदींचे नव्हे तर अंबानी -अदानींचे सरकार आहे. हे दोघे मोदी यांचेही मालक आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

खरेतर राहुल गांधी गेले चार महिने ‘भारत जोडो यात्रे’त भारतात तीव्र झालेले महागाई, बेरोजगारी, लघु -मध्यम उद्योगांचे बंद होणे, रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, देशाला बुडवून फरार होणारे लुटारू, अडचणीत आलेली बँकिंग व्यवस्था, शेती क्षेत्रापुढील आव्हाने, नवे केलेले कायदे, स्वायत्त संस्थांचा मनमानी वापर, नोटाबंदी ते जीएसटीचे चुकीचे निर्णय, वाढती धर्मांधता, परधर्म द्वेष, आंतरराष्ट्रीय राजकारणातील चुकीच्या भूमिका अशा अनेक मुद्यांवर भाष्य करत आहेत. भाजप, त्याचे समर्थक आणि अंधभक्त यातील एकही मुद्याबाबत बोलणार नाहीत, हे उघड आहे. उलट ते विकृत टीका करण्यात धन्यता मानतात. पण स्वत:ला काँग्रेस कार्यकर्ता मानणाऱ्यांनी या मुद्यावरून वातावरण सतत तापवत ठेवले पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे, याचे भान या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठेवले पाहिजे. देश प्रेमाच्या, अहिंसेच्या, सत्याच्या विचारांनी जोडला जात असतो. चाटूगिरी आणि फोटुगिरींनी नाही हे दाखवून द्यावे लागेल.

एकेकाळचा देशव्यापी काँग्रेस पक्ष आणि आज त्याला पर्याय म्हणून देशव्यापी होत असलेला भाजप यांच्या राजकीय प्रेरणा आणि सिद्धांत अतिशय वेगवेगळे आहेत. तेही यानिमित्ताने समजून घ्यावे लागतील. १८८५ साली अॅलन व्ह्यूम या जन्माने इंग्रज पण भारताविषयी कळवळा असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीय नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ते ब्रिटिश शासनात विविध पदांवर काम करीत होते. तेव्हाच त्यांना भारतीयांना आपल्या व्यथा वेदना मांडता येतील, अशी एक संघटना असावी असे वाटू लागले. तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड डफरीनलाही त्यांनी ते पटवून दिले. अॅलन व्ह्यूम यांनी ‘अॅन ओल्ड मॅन्स होम ‘नावाची एक पुस्तिका लिहिली. त्यातून भारतीय समाज किती दारिद्र्यात जगत आहे याची मांडणी केली. भारतीयांची परिस्थिती सुधारणे हे आपले कर्तव्य आहे असं ते आपल्या इंग्रज सहकाऱ्यांना सांगत. तर ‘ही परिस्थिती बदलण्यासाठी तुमचे तुम्हालाच संघटित होऊन लढावे लागेल ‘असं भारतीयांना सांगत.

भारतीय युवकांनी सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे एकत्र यावे व संघटना बांधावी असे आवाहन अॅलन व्ह्यूम यांनी १ मार्च १८८३ रोजी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून ‘इंडियन नॅशनल युनियन ‘ही संघटना स्थापन झाली. तिच्या अनेक ठिकाणी शाखाही निघाल्या. याच दरम्यान इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे अधिवेशनही होते. त्याचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांनी भारतातील प्रमुख मंडळींची एक बैठक २२ डिसेंबर १८८५ रोजी पुण्यात बोलावली होती. पण तेव्हा पुण्यात कॉलऱ्याची साथ असल्याने ही बैठक सहा दिवस पुढे ढकलली आणि मुंबईत घेतली गेली. २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईत झालेल्या या बैठकीतच अधिकृतपणे ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ स्थापन झाली.

मुंबईच्या गोवालिया टॅंक जवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत ही बैठक व काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. बॅरिस्टर उमेशचंद्र बॅनर्जी (जन्म: २९ डिसेंबर १८४४ कालवश : २१ जुलै २९०६) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाला देशभरातील ७२ नामवंत उपस्थित होते. त्यात फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, दिनशा वाछा, न्यायमूर्ती रानडे, बदृद्दीन तय्यब्जी, रा. गो. भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, पं. मोतीलाल नेहरू, न्यायमूर्ती के. टी. तेलंग यासारखे अनेक दिग्गज होते. या अधिवेशनात काँग्रेसचे संघटना सूत्र ठरविण्यात आले. काँग्रेसच्या स्थापनेत अॅलन व्ह्यूम या ब्रिटीश व्यक्तीचा पुढाकार असला तरी ह्यूम यांना भारतातील सर्व धर्म, जाती, पंथ याबद्दल आत्मीयता होती व ‘भारतीय माणूस’ हा त्यांचा केंद्रबिंदू होता. ते हिटलर व मुसोलिनीप्रमाणे नव्हते आणि त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करणाऱ्यांप्रमाणे वंशवादी नव्हते, हा मूलभूत फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण काँग्रेसची स्थापना ब्रिटीश माणसाच्या पुढाकाराने झाली याचे चुकीच्या पद्धतीने भांडवल गेली अनेक वर्षे केले जाते. आणि हिटलर व मुसोलिनीशी आपल्या जुळलेली नाळ सोयीनुसार उघड केली जाते वा सोयीनुसार झाकून ठेवले जाते, हाही गेल्या शतकभरचा भारतीय इतिहास आहे.

२८ डिसेंबर १८८५ रोजी बॅ. उमेशचंद्र बॅनर्जी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून चार प्रमुख उद्दिष्टे जाहीर केली. ती म्हणजे (१) देशाच्या विविध भागातील राष्ट्रवादी विचारांच्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास उत्तेजन देणे. (२) जात, धर्म, प्रांतभेद विरहित राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा विकास करणे. (३) महत्वाच्या आणि निकडीच्या प्रश्नांवरील लोकांच्या मागण्या सरकारपुढे मांडणे. (४) देशात विविध प्रश्नांवर लोकमत तयार करणे व त्याचे संघटन करणे. त्याचबरोबर शासन यंत्रणेत लोकहिताला प्राधान्य मिळावे, यासाठी इंग्लंडमधील ब्रिटिश राज्यकर्त्यांशी वैचारिक आदान प्रदान करावे, विधिमंडळात सरकार नियुक्त सदस्यांऐवजी लोकनियुक्त सदस्य असावेत, लष्करी खर्चात कपात व्हावी, सरकारी व्यवस्थापनात उच्च अधिकार पदावर भारतीय व्यक्तींची निवड व्हावी अशाही काही मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या. वरील प्रमुख चार उद्दिष्टे लक्षात घेतली तर आज ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने राहुल गांधी तीच भूमिका घेऊन पुढे जात आहेत हे स्पष्ट दिसते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही हा वसा आणि वारसा पुढे नेण्याची नितांत गरज आहे.

काँग्रेसचे दुसरे अधिवेशन १८८६ साली पितामह दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तेव्हापासून काँग्रेसच्या अधिवेशनात देशभरातून हजारो प्रतिनिधी सहभागी होऊ लागले. हळूहळू ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची ताकद कळू लागली. तिच्या शक्तीची व स्वातंत्र्य प्रेरणेची भीतीही वाटू लागली. त्यामुळेच लॉर्ड कर्झनला ‘काँग्रेसला शांतपणे मृत्यू येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, हीच माझी प्रमुख महत्वाकांक्षा आहे,’ असे जाहीरपणे म्हणावे लागले. काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे दशकानुदशके नेतृत्व केले. एकता व बंधुतेला प्राधान्य दिले. ब्रिटिशांच्या अनीतीला बळी पडून आणि वंशवादी विचारधारा रुजविणाऱ्या द्विराष्ट्रवादी सिद्धांताची तळी उचलली नाही. कोणाही काँग्रेस कार्यकर्त्याने, नेत्याने शिक्षा भोगताना सक्रिय राजकारण सोडण्याची हमी देऊन कधी माफी मागितली नाही, अथवा सहकाऱ्यांची नावे सांगून स्वतःची सोडवणूकही करून घेतली नाही. हा दैदिप्यमान इतिहास काँग्रेसची मान सदैव ताठ ठेवणारा आहे यात शंका नाही. काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न कर्झनपासून आजपर्यंत अनेकांनी बघितले व बघत आहेतही, पण ते फळाला आले नाही वा येऊ शकणार नाही. कारण कोणीही, कितीही टीका केली तरी काँग्रेस पक्ष हा सर्वसामावेशक अशा अस्सल भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. ती हिटलर, मुसोलिनीचा आदर्श मानणारी संकुचित वंश – वर्णवादी, परधर्माला दुय्यम नागरिकत्व देऊ पाहणारी, संकुचित विचार मांडणारी संघटना नाही हे भारतीय जनतेने पिढ्यानपिढ्या अधोरेखित केले आहे. काँग्रेसला अनेक चढ – उतार अनुभवावे लागले हे जितके खरे, तितकेच काँग्रेस कधी लाटेवर स्वार झाली नाही, त्यामुळे तिला लौकर ओसरण्याचीही काळजी करावी लागली नाही, हेही तितकेच खरे आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना जागृत आणि संघटित करून ब्रिटिशांच्या राजकीय व आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठविण्याचे एक मिशन म्हणून काँग्रेसने भूमिका बजावली. म्हणूनच काँग्रेसची स्थापना व वाटचाल भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासातील एक महत्वाची घटना ठरते. सर्वसामान्य जनतेच्या ब्रिटिश विरोधी जाणीवजागृतीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापर्यंतचे नेतृत्व काँग्रेसने केले. मोठया प्रमाणात राजकीय जागृती करून लोकमत संघटित केले. भारतीय राष्ट्रवादाची राष्ट्रीय भावना तयार करण्याचे काम केले. जात, पात, पंथ निरपेक्ष असे संघटनशास्त्र अवलंबले. लोकाभिमुख दृष्टिकोन घेऊन राजकीय, आर्थिक मागण्या केल्या. त्यासाठी लोकचळवळी उभारल्या. स्वातंत्र्यलढा बहुआयामी करण्यात आणि मध्यवर्ती प्रवाह बनण्यात काँग्रेसने मोठे यश मिळवले.

स्वातंत्र्यापूर्वी ६२ वर्षे आणि स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे काँग्रेस कार्यरत आहे. देशाच्या विकासात या पक्षाचे योगदान मोठे आहे. काहीजण हे नाकारतात हा राजकीय कृतघ्नपणा आहे. काँग्रेसने अनेक चुका केल्या आणि त्याची अनेकदा किंमतही मोजली. काँग्रेसवर वारंवार जहाल टीका झाली, पण काँग्रेसने विरोधकांना देशद्रोही ठरवत तसे पदवी वाटप करणाऱ्या पक्षशाखा गावोगावी काढल्या नाहीत. मात्र अलीकडे ‘सरकारवर टीका केली म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे’ हे न्यायालयाला सांगावे लागावे अशा अवस्थेला देश पोहोचला आहे हे वास्तव आहे. काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या, अनेक राज्ये जिंकली पण एक दोन निवडणूका जिंकून आपण म्हणू तीच पूर्वदिशा, जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणे, सर्व स्वायत्त संस्थांचे व्यक्तीगतिकरण करणे, अनाकलनीय व लोकद्रोही तुघलकी निर्णय प्रक्रिया अवलंबणे, भांडवलदारांची उघड उघड तळी उचलून त्यांना राव व कामगार, शेतकरी, कष्टकरी जनतेला रंक करणारी धोरणे आखणे यासारख्या अनेक बाबतीत कमालीची सक्रियता काँग्रेसने दाखवली नाही.

पं. जवाहरलाल नेहरूंपासून ते डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या कोणाही पंतप्रधानांना आपले नाव कापडातच विणलेला दसलाखी सूट घालायची ओंगळ प्रसिध्दीलोलुप विकृत मानसिकता दाखविण्याची गरज वाटली नव्हती. अथवा सतत कॅमेरा पुढे ठेऊन प्रतिमा निर्माण लादण्याची गरज वाटली नाही. भावनिक आवाहने व सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भरमसाठ आश्वासने देऊन नंतर तो चुनावी जुमला होता असे म्हणण्याची गरज काँग्रेसला सत्तेच्या राजकारणासाठी वाटली नाही. भले अनेक पराभव झाले, काही निर्णय चुकले तरी काँग्रेसवर देशाचा विकासदर वेगाने खाली आणला, शून्याच्याही खाली नेला व उणे २५ केला असा आरोप करता आला नाही की वास्तव आकडेवारी दाखवून एवढ्या वर्षात कोणाला तसे सिद्ध करता आले नाही. आत्ता मात्र सकल राष्ट्रीय उत्पादन मोजण्याची पद्धत बदलूनही गेल्या ७५ वर्षातील सर्वात वाईट आर्थिक संकटात देश आहे. त्यात काँग्रेसचाच हात आहे असे म्हणता येणार नाही.

उलट काँग्रेसच्या काळात उभारली गेलेली सार्वजनिक क्षेत्रे विकून टाकली जात आहेत. भाषणात आम जनतेच्या कळवळ्याची भाषा आणि भांडवलदारांच्या कल्याणाची निर्णयपद्धती हा कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे. शेतकरी कायदे चर्चेविना केले गेले आणि चर्चेविना मागे घेतले गेले यावरून सारे दिसून आले आहे.आज काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर व्यापक प्रमाणात आवाज उठवून जनतेशी नाळ अधिक घट्टपणे जुळवणे गरजेचे आहे. तशा शक्यतांचे अवकाश परिस्थितीने तयारही केले आहेत. ‘भारत जोडो यात्रे’ने तशी जमीन तयार केली आहे. आता यापुढच्या काळात नेते व कार्यकर्ते यांच्यातील अंतर कमी करत आणण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात निवडणुकीच्या गणितात आलेले दारुण अपयश आणि सत्ताच्युत होण्याचे वाढते प्रमाण यामुळे सुस्तावलेल्या व धास्तावलेल्या पक्ष कार्यकर्त्यांत विश्वास निर्माण करण्यासाठी कार्यपद्धतीत मुलभूत बदल करण्याची नितांत गरज आहे. ब्रिटिशांकडून मिळवलेल्या स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी व कर्तव्य काँग्रेसचेच आहे याचे भान ठेवून काँग्रेसने वाटचाल अधिक सक्षम केली पाहिजे.

भारतातील विविध जाती – धर्म – पंथातील सर्वसामान्य माणसाचा विकास साधणारी व त्याचे स्वत्व जपणारी व त्यातून एकता मजबूत करणारी धोरणात्मक भूमिका काँग्रेसला पुन्हा एकदा जनमानसात रुजवावी लागतील. ती केवळ त्या पक्षाची नव्हे तर या वैविध्याने नटलेल्या व संकुचिततेला नाकारणाऱ्या देशाचीही गरज आहे. तसेच भाजपेतर अन्य जे राज्यघटना मानणारे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी सहमतीचे राजकारणही पुढे नेण्याची गरज आहे. एक सुव्यवस्थित राजकीय व्यवस्थापन करूनच काँग्रेसला वाटचाल करावी लागेल. ‘भारत जोडो यात्रे’चे पूर्ण झालेले १०८ दिवस, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि काँग्रेसच्या या १३७ व्या वर्धापनदिनी एक मध्यममार्गी पक्ष म्हणून भरभरून शुभेच्छा.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत. तसेच गेली ३३ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

prasad.kulkarni65@gmail.com