विजया जांगळे

ट्विटरची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे जाताच कंपनीतून सुमारे तीन हजार ७०० कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांची मालकी असलेल्या ‘मेटा’नेही आता आपल्या ८७ हजार कर्मचाऱ्यांपैकी ११ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. मायक्रोसॉफ्टने मागच्या महिन्यात हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं, ही मायक्रोसॉफ्टने या वर्षात केलेली तिसरी कर्मचारी कपात होती. नेटफ्लिक्सने वर्षभरात ५००, तर स्नॅपचॅटने हजारभर कर्मचारी सेवेतून कमी केले आहेत…

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
irdai retains existing insurance policy surrender value rule
विमा नियामकांकडून पारदर्शकतेचा आग्रह धरणारी १ एप्रिलपासून नवीन नियमावली
RBI Orders, Special Audit, Norm Violations IIFL Finance, JM Financial Products limited, finance,
आयआयएफल, जेएमएफपीएलचे रिझर्व्ह बँकेकडून विशेष लेखापरीक्षण

जागतिक मंदी येणार अशी चर्चा सुरू होते तेव्हा मंदी आलीच आहे समजून सज्ज व्हावं, असं सांगणारं आजचं वास्तव आहे. जग कोविडच्या आगीतून बाहेर पडतं न पडतं, तोच आलेल्या मंदीच्या फुफाट्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र होरपळू लागलं आहे. एवढ्या बलाढ्य कंपन्यांना कर्मचारी कपात का करावी लागते, ती कोणत्या निकषांवर केली जाते, त्याचा कर्मचाऱ्यांच्या राहणीमानावर आणि मानसिकतेवर काय परिणाम होतो, या संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणती पावलं उचलावी लागणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील काही जणांशी संवाद साधला. तेव्हा ‘काळ कठीण असला, तरी तो सरेल…’ असा सूर दिसून आला.

‘लोकसत्ता’च्या वाचकांना लेखक म्हणून परिचित असणारे गौरव सोमवंशी हे ‘एमर्टेक इनोव्हेशन्स प्रा. लि.’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांना हे मान्य आहे की, सध्या रुपयाच्या तुलनेत डॉलरचं मूल्य लक्षणीय प्रमाणात वाढलं आहे. जागतिक मंदी येणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. या संभाव्य मंदीला कोविडचीही किनार आहे. कोविडकाळात सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे मोडकळीस आली होती, तरीही आधीच्या नफ्यावर तो काळ निभावून नेता आला. मात्र त्यापाठोपाठ दिसू लागलेल्या मंदीच्या चिन्हांमुळे दुष्काळात तेराव्या महिन्यासारखी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घाऊक कर्मचारी कपात होणार हे निश्चित आहे.

मात्र, या क्षेत्रात अनेक बलाढ्य कंपन्या मोठी ‘बेन्च स्ट्रेन्ग्थ’ (भविष्यकालीन संभाव्य प्रोजेक्ट्ससाठी अतिरिक्त कर्मचारी) बाळगून असता, याचीही आठवण सोमवंशी यांनी दिली. टीसीएससारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये अनेकदा १०-१० महिने कर्मचारी केवळ बेन्चवर बसून असतात. या आर्थिक संकटाच्या काळात असे कर्मचारी बाळगणे कंपन्यांसाठी अशक्य होऊ लागते आणि कर्मचारी कपातीची कुऱ्हाड कोसळते.

अशा स्थितीत नवी संधी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. लिंक्ड इनचं प्रोफाइल उत्तम असणं गरजेचं असतं, स्वत: केलेले काही प्रोजेक्ट असल्यास त्याचा फायदा होतो. कुशल कर्मचाऱ्यांना अल्पावधीत नवी संधी मिळते. ज्यांना मिळत नाही ते कमी पगारावर तडजोड करून तगून राहतात. मात्र काहींसाठी हा बेरोजगारीचा काळ फार निराशाजनक ठरतो. नोकरी गेलेल्या व्यक्तीला प्रत्येक जण वेगवेगळे सल्ले देऊ लागतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जसे, ‘एवढी वर्षं अभ्यास करून काय उपयोग झाला,’ असे टोमणे ऐकावे लागतात, तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मुलांनाही ‘त्यापेक्षा यूपीएससी दिली असतीस तर कुठच्या कुठे पोहोचला असतास,’ हे टोमणे अशा काळात सहन करावे लागतात.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला सध्याचा ट्रेन्ड असा आहे की, सहा महिने ते दोन वर्षं एका कंपनीत काम केल्यानंतर कर्मचारी नोकरी सोडून अन्य कंपनीत रुजू होतात आणि त्यातून त्यांना ३० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पगारवाढ मिळते. एकनिष्ठता वगैरे मूल्यं नाहीशी झालेली दिसतात. सध्या आता कोविडनंतरच्या काळात एक नवीच समस्या उद्भवली आहे. अनेक कर्मचारी घरून काम करण्यासाठी आग्रही असतात. कितीही पगार द्या आम्ही ऑफिसला येणार नाही, घरूनच काम करणार म्हणून हटून बसतात. ज्यांच्याकडे पुरेशी कौशल्यं असतात, ते डेव्हलपर्स स्वतःच्या अटींवर काम करतात. मग ऑफिसला न येण्याची अट असो वा शुक्रवारी काम न करण्याची. पण त्यांच्या कौशल्यांची गरज असल्यामुळे कंपन्या या अटीही मान्य करण्यास तयार असतात, अशी निरीक्षणं एका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्यानं सोमवंशी यांनी नोंदवली. येता काळ कठीण असला, तरीही तो सरेल आणि नव्या संधी निर्माण होतील, हे मात्र त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा – Amazon And Flipkart Sale: Sony पासून OnePlus पर्यंत ‘या’ ऑडिओ डिव्हाइसवर मिळतेय भरघोस सूट

म्हणजे घाबरण्याचं काहीच कारण नाही?

कर्मचारी कपात का करावी लागते, या प्रश्नावर या क्षेत्रातले अन्य जाणकारही ‘बेन्च स्ट्रेन्ग्थ’ कडे बोट दाखवतात. ते सांगतात की, कर्मचारी कपातीच्या कारणांची मीमांसा भरतीच्या टप्प्यापासूनच सुरू करावी लागेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडे वेळोवेळी विविध प्रकल्प येत असतात. असे प्रकल्प हाती आल्यानंतर त्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याएवढा वेळ हाती नसतो. त्यामुळे भविष्याची तयारी म्हणून मोठ्या प्रमाणात कर्मचारी आधीच नेमून ठेवले जातात. बहुतेक सर्वच मोठ्या आयटी कंपन्यांकडे अशी भविष्याच्या तयारीतील कर्मचाऱ्यांची फौज असते. या फौजेची क्षमता ‘बेन्च स्ट्रेन्ग्थ’ म्हणून ओळखली जाते. कंपन्या अशा बसून असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या क्लायंटसमोर अतिशय अभिमानाने मांडतात. मात्र हाती प्रकल्प आला नाही, तर अशा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा भार पेलणं कंपन्यांना शक्य होत नाही आणि त्यांना कामावरून कमी करावं लागतं. आर्थिक मंदीच्या काळात अशी स्थिती हमखास उद्भवते. अनेकदा कर्मचाऱ्यांनी रेझ्युमेमध्ये नमूद केलेली कौशल्यं प्रत्यक्षात अवगत केलेलीच नसतात. त्यामुळे ते दिलेलं काम करण्यासाठी पुरेसे सक्षम नसतात. जोपर्यंत सर्वकाही सुव्यवस्थित सुरू असतं, तोपर्यंत अशा अतिरिक्त किंवा अकुशल कर्मचाऱ्यांचा आर्थिक बोजा कंपनी सहज सहन करते. मात्र आर्थिक संकट ओढवलं की कंपनीच्या महसुलाला आणि पर्यायाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांना त्याची झळ बसू लागते. ट्विटरनं सुमारे तीन हजार ७०० कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केलं. तरीही ट्विटरचं दैनंदिन काम सुरळीत सुरू असल्याचं दिसतं, त्यामागे वर नमूद केलेली कारणं आहेत. त्यानंतर लगेचच ट्विटरने काही कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करून घेतलं पण त्यांची संख्या नगण्य आहे. यावरून ट्विटरची ‘बेन्च स्ट्रेन्ग्थ’ किती असेल, याचा अंदाज येतो.

आणखी वाचा – Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

महसुलावर नव्हे तर गुंतवणुकदारांवर अवलंबित्व

माहिती तंत्रज्ञान हे सेवा क्षेत्र आहे. ते शिक्षण, बँकिंग, औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना सेवा देतं. या पैकी ज्या क्षेत्रात संधींची शक्यता दिसू लागते, त्यात ‘व्हेन्चर कॅपिटालिस्ट’ गुंतवणूक करू लागतात आणि त्या क्षेत्राची भरभराट होऊ लागते. उदाहरणार्थ २०११ ते १७ या कालावधीत त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरपूर गुंतवणूक केली. अशा प्रकारे एखाद्या क्षेत्रात अवाढव्य गुंतवणूक होते तेव्हा त्या क्षेत्रातल्या डेव्हलपरचे पगार तब्बल ३०० ते ४०० टक्क्यांनीही वाढल्याची उदाहरणं आहेत. आयटी क्षेत्रातल्या नवख्या तरुणांना सामान्य स्थितीत साधारण पाच-सहा लाखांचं पॅकेज मिळतं. पण ‘व्हेन्चर कॅपिटालिस्ट’च्या गुंतवणुकीमुळे जेव्हा एखाद्या क्षेत्राची भरभराट होऊ लागते, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार प्रचंड वाढतात. आणि नवख्या कर्मचाऱ्यांनाही तब्बल ३० लाखांपर्यंतची पॅकेजेस मिळतात.

हा अमाप पैसा, महसुलातून आलेला नसतो. तो या गुंतवणुकदारांकडून येतो. गुंतवणुकदारांना अपेक्षा असते की यातून आपल्याला मोठा नफा कमवता येईल. मात्र ते शक्य नसल्याचं दिसतं, तेव्हा गुंतवणूकदार पाठ फिरवतात. मग सगळी आर्थिक गणितं कोलमडून पडतात आणि कर्मचारी कपातीची कुऱ्हाड कोसळते. संभाव्य मंदीच्या काळात अशी वेळ अनेक क्षेत्रांवर ओढवू शकते.

आणखी वाचा – Amazon Layoffs : अ‍ॅमेझॉनमध्ये नोकरकपातीस सुरुवात, भारतात १००० जणांची नोकरी जाण्याची भीती

मंदीची शक्यता आहेच…

आयटी क्षेत्रातील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीनं नाव प्रसिद्ध न करण्याच्या आटीवर सांगितलं- ‘२०२३मध्ये जागतिक मंदी येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यावेळी मोठा फटका बसू नये म्हणून कंपन्या आतापासूनच खर्चात कपात करू पाहत आहेत. सामान्यपणे कंपन्या क्लाएंटला आपल्याकडे असलेलं मनुष्यबळ दाखवून प्रोजेक्ट मिळवतात. एखाद्या प्रोजेक्टसाठी आपल्याकडे मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ डेव्हलपर्स, कनिष्ठ डेव्हलपर्स अशी पूर्ण फळी तयार असल्याचं दाखवावं लागतं. आयटी क्षेत्राच्या भरभराटीच्या काळात असा एखादा अपेक्षित असलेला प्रोजेक्ट मिळाला नाही तरी त्या कर्मचाऱ्यांना अन्य प्रोजेक्टमध्ये सामावून घेणं शक्य असतं, मात्र मंदीच्या काळात ते शक्य होत नाही आणि त्यांना सेवेतून कमी केलं जातं. अशावेळी शक्यतो वरिष्ठ पदावरील व्यक्तींना किंवा खूप वर्षांपासून नोकरीत असलेल्या व्यक्तींना कमी केलं जातं. अलीकडच्या काळात मूनलायटिंगमुळेही अनेकांना नोकरी गमावावी लागली आहे. नोकरी गेल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्यांची अनेक उदाहरणं आहेत. काही वेळा नैराश्य आत्महत्येपर्यंतही पोहोचतं. या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी काही जण फ्रीलान्सींगचा पर्याय स्वीकारतात. आता त्या क्षेत्रातही स्पर्धा वाढू लागली आहे. नवी पिढी अतिशय व्यवहारी आहे आणि ती या स्थितीतून सहज बाहेर पडते.’ जागतिक मंदीच्या ढगांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं आकाश झाकोळलं आहे. येत्या काळात अन्यही क्षेत्रांत अशी स्थिती उद्भवू शकते, याचीच ही नांदी आहे.

आणखी वाचा – शेअरचॅटमध्ये होणार नोकरकपात; ४०० कर्मचाऱ्यांना गमवावी लागणार नोकरी

अद्ययावत राहणं अपरिहार्य

आयटी क्षेत्रातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथे दर दोन वर्षांनी कम्प्युटर लँग्वेज बदलते. दोन वर्षांपूर्वी पायथॉन स्क्रीप्ट जास्त प्रमाणात वापरली जात होती आता जावा वापरली जाते. त्यामुळे जावा न येणाऱ्यांना फारशी संधी उरत नाही. फ्रेशर्सना याचा लाभ होतो. अलीकडच्या काळात नोकरी देताना तुमचं शिक्षण किती आहे, कुठून घेतलं आहे यापेक्षा तुमच्याकडे किती कौशल्यं आहेत हे महत्त्वाचं ठरतं. अनेकदा कोणतीही पदवी प्राप्त न केलेल्या मात्र यूट्युबसारख्या माध्यमांतून अभ्यास केलेल्या मुलांनाही उत्तम कोडिंग करता येतं आणि त्यांनाच नोकरीत प्राधान्य दिलं जातं. आता कोणतीच कंपनी केवळ परीक्षेतले गुण पाहून नोकरी देत नाही. नेमणूक झाल्या झाल्या काम सुरू होतं. त्यामुळे प्रशिक्षण वगैरे देण्याएवढा वेळ नसतोच.
नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्याला नवी नोकरी मिळण्यास साधारण तीन ते सहा महिने जातात. सध्या मंदीमुळे संधींची कमतरता आहे. त्यामुळे नोकरी मिळण्यास आणखी वेळ लागू शकतो, यावर मात्र अनेकांचं एकमत दिसलं.

vijaya.jangle@expressindia.com