वर्षांतील सवरेत्कृष्ट आणि लोकप्रिय कादंबरीसाठी दिली जाणारी बुकर पारितोषिके हा ब्रिटनमध्ये तीनेक महिने चालणारा सोहळा असतो. आधी सुमारे २५ कादंबऱ्यांची प्राथमिक यादी, त्यांतून पाचच पुस्तकांची अंतिम फेरी आणि मग, यंदा पारितोषिक कुणाला मिळणार यावर सट्टाबाजारसुद्धा तेजीत आल्यावर पारितोषिकाची घोषणा! यंदाच्या अंतिम पाच कादंबऱ्यांच्या यादीत नील मुखर्जी यांच्या ‘द लाइव्हज ऑफ अदर्स’ची निवडच झाली आहे असे नव्हे, तर पहिल्या काही दिवसांत सर्वाधिक चर्चाही त्यांचीच आहे.
हे साहजिकच. कारण पुरस्कार काही नील मुखर्जी यांना नवे नाहीत. ‘लाइव्हज ऑफ अदर्स’ ही त्यांची दुसरी कादंबरी, ती यंदाच मेमध्ये प्रकाशित झाली. त्यापूर्वी २००८ सालच्या ‘पास्ट कंटिन्युअस’ या कादंबरीला त्याच वर्षीचा व्होडाफोन-क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला. याच कादंबरीची ब्रिटनमधील आवृत्ती २०१० साली, ‘अ लाइफ अपार्ट’ या नावाने निघाली, तिला लंडनच्या ‘द टाइम्स’ने ‘वर्षांतील सर्वोत्तम’ ठरविले आणि गार्डियन, टेलिग्राफ, इंडिपेंडंट, संडे टेलिग्राफ, टाइम्स लिटररी सप्लिमेंट या अन्य ब्रिटिश प्रकाशनांनी तिची निवड ‘वर्षांतील वाचनीय’ पुस्तकांत केली. या ब्रिटिश अवताराला, ब्रिटनच्या रायटर्स गिल्डचा ललितसाहित्य पुरस्कारही मिळाला. शिवाय, डीएससी प्राइझ आणि स्काय आर्ट्स अवॉर्ड या दोन साहित्य-पुरस्कारांच्या अंतिम स्पर्धेपर्यंत तिने मजल मारली. नील मुखर्जी कोलकात्याचे, जन्म १९७०चा. जादवपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतल्यावर ऱ्होड्स शिष्यवृत्ती मिळाल्याने ते १९९२ मध्ये ऑक्सफर्डला गेले, मग पीएच.डी.साठी केंब्रिजला आले आणि अध्यापन तसेच २००१ पासून समीक्षाही करू लागले. कोलकाता शहरातूनच त्यांच्या दोन्ही कादंबऱ्यांतील मुख्य पात्रे येतात. पहिल्या कादंबरीतील समलिंगी ऋत्विक ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी येतो आणि तिथे तरी आपल्याला केवळ लैंगिक पर्यायनिवडीबद्दल आपल्याला कुणी हटकणार नाही म्हणून सुखाने राहता येईल, ही त्याची अपेक्षा फोल ठरते. दुसरी कादंबरी तर कोलकात्याच्याच एकत्र कुटुंबात- घोष यांच्या तिमजली घरात प्रामुख्याने घडते. या घराण्यातील पिढय़ा तपशिलाने- पण ऱ्हासाच्या करडय़ा रंगांतच रंगवताना मुखर्जी यांनी, घोष यांचा १९६६ साली नक्षलवादीच झालेला मुलगा सुप्रतीक आणि तिसऱ्या पिढीतला, लहानपणी बावळट आणि मोठेपणी गणिती ठरलेला स्वर्णेदु ऊर्फ सोना अशी टोकाची पात्रे समोर आणली आहेत. पण पहिल्या कादंबरीतील नायकाच्या वैचित्र्यापासून ते दुसऱ्या कादंबरीत मानवी दु:खांच्या विदग्धतेपर्यंतचा प्रवास त्यांनी केल्याची दाद त्यांना सध्या मिळते आहे. लेखकाला अशा चोखंदळ परामर्शाखेरीज, बहुधा ‘बुकर’च हवे असते!