‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर ‘सूर्याची पिल्ले’ हा अग्रलेख (१९ नोव्हेंबर) तसेच सेनाप्रमुखांचे स्वीय सेवक थापा यांचा ‘व्यक्तिवेध’ (२० नोव्हेंबर) देखील वाचला. दिवाळीच्या सुट्टीत मुंबईत आलो असताना, सण साजरा होत असतानाच दुसरीकडे शिवसेनाप्रमुखांच्या अस्थिर आणि चिंताजनक प्रकृतीचे वृत्त टीव्हीद्वारे वेळोवेळी समजत होते. काही अडचणींमुळे मला कलानगर-मातोश्रीपर्यंत जाता आले नाही. मात्र मुंबईत वास्तव्य असताना तरुण वयात मी शिवसेनेचा छोटा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेच्या खूप जवळ गेलो, सेना वृिद्धगत होताना आणि भाजप-सेना युती राज्य करतानाही मी जवळून अनुभवले. पण आज चार दशके कार्यरत असलेली ही संघटना अनिश्चिततेच्या फेऱ्यात सापडलेली पाहताना मला अतीव वेदना होत आहेत. ‘सूर्याची पिल्ले’ या आपल्या मार्मिक अग्रलेखाने सेनेवर आजवर भाबडेपणे प्रेम करणाऱ्या शिवसनिकांना योग्य वेळी जागे करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे, त्याबद्दल मी एक शिवसनिक म्हणून आपणास मनापासून धन्यवाद देतो. सेनाप्रमुख हयात असताना त्यांचा खूप दरारा होता, पण त्यांनी हे जग सोडून जाताच गोंधळाला काही सीमाच राहू नये, याचा खेद माझ्याप्रमाणे अन्य शिवसनिकांना नक्की वाटत असेल यात संदेह नाही.
‘डॉक्टरांच्या निवेदनाची गरजच काय,’ असे विधान मी राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याकडून टीव्हीवरून ऐकले, तेव्हा माझ्याप्रमाणेच अनेक जण अवाकच झाले असतील! असे असताना थापासारख्या सामान्य व अल्पशिक्षित सेवकाचे जबाबदारीने वागणे मनात भरून जाते. गेली  २०-२५ वष्रे बाळासाहेबांच्या अगदी निकट वावरणारा थापा हा खराखुरा शिवसनिक असून तो पूर्वीचा एक मावळा तर नाही ना, असे विचार मनात उमटले म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये!

सूर्यमालेतील ग्रह
‘सूर्याची पिल्ले’ या अग्रलेखात सेनेच्या उत्तराधिकाऱ्यांवर जे आरोप केले आहेत, ते बऱ्याच अंशी एकांगी वाटतात. त्याची दुसरी बाजू काय असू शकेल याचा अंदाज घेण्याकरिता हा पत्रप्रपंच. एक सांगू इच्छितो की, मी शिवसेनेचा अधिकृत सभासदही नाही, पण तरीही वाटले की, याला कदाचित दुसरी बाजू असू शकेल.
जे अटळ आहे ते होणारच, हे स्वत: शिवसेनाप्रमुख ते गर्दीतील सामान्य माणूस या सर्वाना माहीत होते, पण इथे एक लक्षात घेतले पाहिजे की दु:खद घटनेच्यानंतर सामन्यांच्या भावना कशा हाताळल्या जातील, त्यांना कुठे वाट मोकळी करून द्यावी लागेल, या सर्वाचे नियोजन करणे गरजेचे होते आणि ते शिवसेनेने निश्चितच पार पाडले.
शिवसेनाप्रमुख मृत्युशय्येवर कधी गेले, हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तर त्यानंतर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि इतरांनी परिस्थिती कशी सांभाळली हे बघितले पाहिजे. माझ्या मते सेनेच्या कुठच्याही नेत्याने अतिरंजित किंवा बेजबाबदार विधान केलेले नाही. पाडव्याच्या रात्री कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पहाटे दोन वाजता जनतेला आवाहन केले की, ‘शांत राहा आणि प्रार्थना करा. आम्ही आशा अजून सोडली नाही.’ मला वाटत नाही यात काही चूक आहे.
अग्रलेखात असा आरोप आहे की, डॉक्टरांनी वेळोवेळी बुलेटिन काढले असते तर सर्व संभ्रम टळला असता, हे साधे सेना नेत्यांना जमले नाही. मला असे वाटते की जी बाळासाहेबांची परिस्थिती पाडव्याच्या रात्री (किंवा एक-दोन रात्री) आधी होती आणि त्यात वयाचा विचार करता सुधारणा होणे हे वैद्यकीयदृष्टय़ा कठीण होते. थोडक्यात हीच परिस्थिती राहणार असेल आणि बाह्य उपचारांनी हृदयाचे ठोके व श्वासोच्छवास चालू असेल तर डॉक्टर दर तीन-चार तासांनी येऊन काय सांगणे अपेक्षित होते?
मला असे वाटते की सेना नेत्यांनी बाळासाहेबांच्या निव्वळ प्रेमापोटी तहानभूक विसरून जमलेल्या हजारो लोकांना भावना तीव्र होतील असे काही सांगण्यापेक्षा वातावरण शांत राहील असे सांगितले असावे. याला खोटे बोलणे म्हणण्यापेक्षा सुज्ञपणा म्हणावे लागेल आणि त्याबद्दल सेना नेत्यांचे कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या तोंडून एखादे वाक्य जास्त किंवा वास्तवाला अनुसरून नसेलही, पण त्यामुळे जमाव शांत राहिला. मला वाटत नाही की यापकी कुणीही नेता कॅमेऱ्याच्या मोहापायी पुढे येत होता, कारण प्रत्येकाला गाजवायला कुठचे न कुठचे व्यासपीठ आहे. प्लेगच्या साथीसारखे पसरणारे न्यूज चॅनेल्सना आवरले असते तरी लेखात म्हटल्याप्रमाणे ‘संभ्रम’ झाला नसता, कारण ते सेना नेतेच नाही तर अभिनेतेही सोडत नव्हते. तसे बघायला गेले तर यापकी कोणीच अयोग्य बोलत नव्हता. कोणी म्हणत होते की कालच्यापेक्षा आज तब्येत सुधारली आहे, तर कोणी म्हणत होते की व्हेंटिलेटरवर ठेवले नाही. ते खरे असेलही. कुणाचा कमी रक्तदाब २०- ३० ने सुधारला आणि जरी सामान्य पातळीपेक्षा कमीच असला तरी त्याला ‘सुधारणा’ म्हणणे चूक नाही.
हे सर्व का केले असेल? माझ्या मते तीन कारणे आहेत
१)  ऐन दिवाळीत बाळासाहेबांचे निधन झाले असते तर आधीच मंदी आणि महागाईच्या कचाटय़ात सापडलेला उद्योगधंदा ऐन दिवाळीत पूर्ण बंद ठेवावा लागला असता आणि अतोनात नुकसान झाले असते. मराठी लोकांकरिता आयुष्य वेचणाऱ्या या महानेत्यालाही आपल्यामुळे मराठी बांधवांचे नुकसान झालेले आवडले नसते.
२) भाऊबीजेचा दिवस दुपारपासून काळवंडलेलाच होता. भाऊबीज हा दिवाळीतला प्रवासाचा दिवस. जर या दिवशी काही घडले असते आणि नेते मंडळींनी आवाहन करूनही जर रिक्षा, टॅक्सी, बस रेल्वे बंद झाली असती तरी लोकांचे अतोनात हाल झाले असते.
३) दिवाळीनंतरचा शुक्रवार हा सुटीनंतरचा दिवस. मुंबई पूर्ण नाही तरी पाऊण भरली होती. एकदा का ती अटळ असणारी बातमी जाहीर झाली असती तर चाकरमान्यांचे अतोनात हाल होऊ शकले असते. जेव्हा शनिवारी बातमी आली तेव्हा पोलिसांनी कलानगरकडे येणारे रस्ते काही तासांकरिता बंद केले होते. त्यांना कामाच्या दिवशी हे करणे कदाचित अवघड झाले असते, कारण उपनगरात येणारा आणि धारावीमाग्रे सेंट्रल उपनगरात जाणारे रस्ते कलानगरच्या जवळून जातात.
या सर्व कारणामुळे मला असे वाटते की डॉक्टरांनी जे अघटित होते ते शनिवार दुपापर्यंत थोपवून ठेवले त्याबद्दल त्यांचे आणि देवाचे आभारच मानायला हवेत.
 शिवसेनेचा स्वयंप्रकाशी लखलखता सूर्य आज आपल्यात नाही. सूर्यमालेतले ग्रह सूर्याच्या तेजाच्या छायेत असणे हा त्यांचा दोष नसून भाग्यच समजत असावेत. तेव्हा यांना सूर्याची पिल्ले संबोधणे योग्य वाटत नाही. कारण इथे सूर्यही कानेटकरांच्या स्वातंत्र्यसूर्य पंजाबराव भास्कर तथा आबाकाका कोटीभास्करांपेक्षा प्रखर होता. यथावकाश दुसरी बाजू कळल्यास योग्य काय ते कळेल.
-निमिष वा. पाटगावकर , विलेपार्ले (पूर्व)

जो शिरजोर, तो नेता.. धाक कुणाचा ?
मला वाटलं होतं संपलं सारं, परंतु सूर्य अस्ताला गेला आणि कोल्हेकुई सुरू झाली..  एकच वाघ, एकच स्मारक! वारसदार म्हणून मिरवायचंच असेल तर कर्तृत्व दाखवा. स्वार्थासाठी निष्ठा आणि सारासार विवेक गहाण ठेवून लोकांच्या भावनांशी खेळू नका. रेल्वे स्टेशनला नाव द्या, रस्त्याला नाव द्या, पुलाला नाव द्या, सतराशेसाठ स्मारके उभारा आणि सवते सुभे सुरू ठेवा!  जो शिरजोर तो नेता, धाक कोणाचाच नाही.. अंगार हाताळणारं नेतृत्वच राहिलं नाही तर सरभर झालेला अंगार स्वत:च्या राखेखालीच विझून जाईल! गाव तिथे शाखा आणि स्मारक करण्यापेक्षा गाव तिथे समाजसुधार हे एकच ध्येय ठेवा. एकच स्मारक बांधा आणि हेवा वाटावा अशी स्मारकाची आणि राज्यातील जनतेची देखभाल करा. एरवी लोकांसाठी आठवणी पुरेशा आहेत, कुठेतरी नेकीने आपापल्या पोटापाण्याचं  बघा!
– सतीश पाठक, कल्याण</strong>