महाराष्ट्र राज्याच्या महान मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा केली आहे. यापुढे ‘सुकन्या’ योजनेचे नाव बदलून ‘कन्या सोनियाची’ असे केले आहे.
या योजनेअंतर्गत इतर बऱ्याच योजनांचा अंतर्भाव आहे. मुलीचे लग्न झाले की आपोआप, तिच्या नवऱ्याचा अंतर्भाव ‘जावई सोनियाचा’- या  योजनेत केला जाईल. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला ‘जावई सोनियाचा’ला काही कोटींचे बिनव्याजी कर्ज परतफेडीच्या अपेक्षेशिवाय द्यावे लागेल. तसेच, ‘जावई सोनियाचा’ने मागितलेली जमीन बाजारमूल्याच्या एकदशांश किमतीला द्यावी लागेल. अर्थातच, यामुळे बांधकाम व्यावसायिकांना आíथक तोटा होण्याची खात्री आहे. प्रगतशील राज्य असल्याने असे नुकसान होऊन चालणार नाही. त्यामुळे, ‘जावई सोनियाचा’ योजनेअंतर्गत त्यांनी दिलेल्या जमिनीच्या दहा हजार पट जागा त्यांना बाजारमूल्याच्या एकशतांश किमतीला दिली जाईल.
– अनिल पंडित, प्रभादेवी, मुंबई.

सचिन, धोनी वायुसेनेमुळे जमिनीवर येतील?
काही वर्षांपूर्वी क्रिकेटमधील भरीव योगदानाबद्दल वायुसेनेने सचिन तेंडुलकर आमि महेंद्रसिंग धोनीला मानद रँक देऊन सन्मानित केले होते. देशातील युवकांनी वायुसेनेकडे आकर्षित व्हावे, असाच वायुसेनेचा हा सन्मान करण्यामागे उद्देश होता, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दुर्दैवाने तसे काहीच घडले नाही. वायुसेनेतर्फे या दोघांना सुखोई विमानाची सफर घडवून आणली जाणार होती, पण वायुसेनेने ही सफर रद्द करून टाकली. मानदपदाचा सन्मान स्वीकारल्यावर सचिन व धोनी वासुसेनेकडे फिरकलेदेखील नाहीत. त्यातच भरीस भर म्हणून सचिनला आता खासदारकीसुद्धा देण्यात आली आहे. मध्यंतरी सचिनला ‘भारतरत्न’ किताब देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली होती. वर्षभरात जवळपास निम्याहून अधिक काळ क्रिकेट आणि इतर वेळी जाहिरातीत मग्न असलेले हे क्रिकेटपटू (किंवा दुसरा कोणताही खेळाडू) खरंच देशासाठी किती वेळ देऊ शकतील ही शंकाच आहे.
 ‘हे असेच घडत असेल तर मानद रँक देण्यात काय अर्थ आहे?’  या वायुसेनेच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे.
-आनंद नरहर अराणके

पंजाबच्या भावनिक राजकारणामुळेच ‘खलिस्तानी धोका’
‘खलिस्तानी धोका’ (३ ऑक्टो.),आणि ‘खलिस्तानचे भूत’(१२ ऑक्टो.) हे दोन्ही ‘अन्वयार्थ’ वाचले. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ चे नेतृत्व करणारे तत्कालीन लष्करी अधिकारी जनरल ब्रार यांच्यावर खलिस्तान समर्थकांकडून लंडनमध्ये झालेल्या हल्ल्याचा सगळीकडे निषेध होत आहे. याच दहशतवाद्यांनी सुवर्ण मंदिरातील कारवाईचे नेतृत्व केलेल्या माजी लष्कर प्रमुख अरुणकुमार वैद्य यांची १९८६ मध्ये पुण्यात हत्या केली होती. एवढा सगळा इतिहास माहिती असतानादेखील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीतर्फे या दहशतवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवून त्यांचे स्मारक उभारण्याच्या प्रयत्नांबद्दल खंत वाटते. मोठे धाडस दाखवून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी या खलिस्तान दहशतवाद्याचा बीमोड करण्याची पावले उचलली आणि नंतर त्यांना स्वतचा जीव गमावून याची खूप मोठी किंमतही चुकवावी लागली होती. त्यानंतर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी या दहशतवाद्यांच्या कारवायांना लगाम बसला होता. या दहशतवाद्यांना ‘शहीद’ म्हटल्याने २५वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘खलिस्तान चळवळ’ आपलं डोकं वर काढेल अशी शंका नाकारता येत नाही. असं झाल्यास पंजाबमधील लोकांकरिता ती धोक्याची घंटा असेल.
सध्याचे पंजाबमधील सरकार केवळ मतांच्या राजकारणाकरिता असे ‘भावनिक’ राजकारण करीत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून पंजाबमध्ये एकही उद्योगपती गुंतवणूक करण्यास तयार नाही. किंबहुना उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग यांनी उद्योगपतींना गुंतवणुकीकरिता आवाहन करूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जे उद्योग राज्यात होते, आता हळूहळू तेदेखील इतर राज्यांत हलवले जात आहेत. अशा वेळेस पंजाबमधील युवकांना रोजगार कसा मिळेल याची काळजी पंजाब सरकारने केली तर त्यांना सलग दुसऱ्या विधानसभा विजयाची आशा ठेवता येईल. ‘शहिदां’चे राजकारण न करता राज्यात उद्यमशीलता कशी वाढेल याकडे पंजाब सरकारने लक्ष द्यावे. आजच्या तरुण  पिढीला आपण कोणत्या दिशेने नेत आहोत आणि लहान मुलांना शाळेत इतिहासातील पुस्तकांमध्ये ‘हुतात्मा’ या शब्दाची कोणती व्याख्या शिकवणार आहोत याचा पंजाब सरकारने विचार करावा.
– भारती गड्डम, पुणे</p>

‘अविधवा’ शब्द बदला
पितृपक्षामध्ये नवमीश्राद्ध या दिवशी ‘अविधवा नवमी’ असते. म्हणजेच ज्या स्त्रिया पती हयात असताना (म्हणजे, विधवा होण्यापूर्वीच) निधन पावल्या, त्यांचे श्राद्ध. मग त्यासाठी ‘सौभाग्यवती नवमी’ किंवा ‘सवाष्ण नवमी’ असा सरळ शब्द, वा त्याहून एखादा चांगला शब्द का वापरू नये? सर्व पंचांगकर्ते आणि दिनदर्शिकाकर्ते यांना विनंती आहे की, त्यांनी पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला ‘अविधवा’ हा अयोग्य शब्द बदलण्यात पुढाकार घ्यावा व त्याऐवजी योग्य शब्दाचा स्वीकार करावा.
– विकास पाटील, डोंबिवली

देश अविकसित नाही; तर ‘अव्यवस्थापित’
‘अन्यथा’ सदरातील ‘व्यक्ती आणि व्यवस्था’ हा लेख (दि. २९ सप्टें.) आणि लोकमानसमधील ‘यात नेत्यांची काय चूक’ हे नरेंद्र थत्ते यांचे पत्र (दि. ३ ऑक्टो.) वाचले. त्यातील आपले विचार भावलेच तथा सामूहिकपणे आपण काहीच करत नाही आणि समाज म्हणून आपण देवांच्या चांगल्या कृतींचे आणि चांगल्या नेत्यांमागे त्यांचे अनुकरणही करत नाही हे थत्तेंचे विचार मान्य. मात्र प्रजेच्या आचार-विचारांना वळण देण्याचे काम संतांनी व समाज प्रबोधनकारांनी आपल्या आचार-विचारांची प्रत्यक्ष सांगड घालून स्वत:चे उदाहरणाने केले. सामाजिक आचार-विचाराच्या मंथनाने सामाजिक, वैचारिक अभिसरण त्या त्या काळात झाल्याचे आढळते. याबाबत आज मात्र फार मोठी पोकळी जाणवते.
आपण अद्यापही असंघटित, अराष्ट्रीय, चारित्र्यहिन, बेसावध, असाक्षेपी, अकार्यक्षम, वाचावीर, कृतीशून्य एकंदरित सर्वच बाबतीत सर्व आघाडय़ांवर अव्यवस्थापित आहोत की काय? अशी शंका वारंवार मनात डोकावते. या संदर्भातील विश्लेषण जगविख्यात व्यवस्थापन गुरू दिवंगत पीटर ड्रकर यांनी काही वर्षांपूर्वीच करून ठेवले. ड्रकर यांच्१ँ मते ‘जगात अविकसित देश नाहीत तर अव्यवस्थापित देश आहेत’. (देअर आर नो अंडरडेव्हलप्ड कंट्रीज इन द वल्ड बट देअर आर अंडर मॅनेज्ड कंट्रीज).
अविकासाचे कारण अव्यवस्थापन, गैरव्यवस्थापन. यात बदल करणे शक्य आहे. नेतृत्व करणाऱ्या विविध क्षेत्रांतील नेत्यांनी, उद्योजक, संघटक, प्रबोधनकार, संत, शिक्षक तथा इतर सर्व संबंधितांनी मनात आणले व त्याबरहुकूम प्रजेला, प्रजेच्या आचार-विचारांना योग्य वळण दिले तर चांगल्या प्रजानिर्मितीला सुरुवात होईल. चांगली प्रजा चांगला नेता, राजा निवडून देईल. परिणामी व्यवस्था परिवर्तन तर होईलच पण व्यक्तींमध्ये देखील आमूलाग्र परिवर्तन होऊ शकेल.  हा युटोपिया नाही. यथा प्रजा तथा राजा म्हणजे लोकशाही असे म्हणायचे असेल तर प्रजेलाच बदलू या! लोकशाहीपुढे हेच एक मोठे आव्हान आहे. कारण, व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग म्हणजे प्रजा! नेते आणि प्रजा यांनी एकत्रितपणे व्यवस्था परिवर्तन करावयाचे आहे. प्रजेने योग्य उमेदवार निवडून दिल्यास व्यवस्था परिवर्तन शक्य आहे.
योग्य नेते निवडून देण्यासाठी प्रजादेखील त्या लायकीची पाहिजे. अन्यथा, प्लेटोने म्हणून ठेवलेच आहे ‘लोकांना लोकांच्या लायकीचे सरकार मिळते’ (पीपल गेट द गव्हर्मेट अ‍ॅज दे डिझव्‍‌र्ह) मात्र प्रजेला सर्वार्थाने लायक बनविण्याचे काम समाजधुरिणांचे नव्हे तर कुणाचे?
– प्रा. नंदकुमार रासने, अकोले.