‘बंडोबा की थंडोबा?’ या केवळ संपादकीय (२४ जून) शीर्षकातूनच शिवसेनेचे बंडखोर हे स्वत: थंड होणार नसून शिवसेनेस थंड करणार आहेत हा वास्तव अर्थ प्रतिध्वनित झाला आहे हे नक्की! बंडखोरांना हस्ते- परहस्ते पुरेपूर रसद पुरवून आपले ईप्सित साध्य करू पाहणाऱ्या भाजपचे तर, ‘गरज सरो, वैद्य मरो’ आणि ‘वापरा व फेकून द्या’ ही अलीकडील ब्रीदवाक्येच झाली आहेत जणू! चर्चादी  मार्ग सोडून, ‘एक घाव, दोन तुकडे’ करू पाहणारे शिंदे आणि मंडळी यांची चाल सध्या यशस्वी ठरेलही, परंतु मुळात शिवसेना ही भावनेवर चालणारी पक्षसंघटना असल्याने सध्याच्या या क्लेशकारक व धक्कादायक घटनेने सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेच वळणार हे सांगावयास कुणा ज्योतिषाची गरज नाही. या कामी बाळासाहेबांची पुण्याई आणि त्यांजवरील विपुल प्रेम उपयोगी ठरणार आहे. बंडखोरांची तात्पुरती उपयुक्तता व उपद्रवक्षमता लोप पावल्यावर चाणाक्ष भाजप त्यांना बेदखल करणार हे काय सांगावयास हवे? क्षणिक स्वार्थापोटी आपण मराठीच लोक आपल्याच मुळावर उठलोय याचा परप्रांतीयांना झालेला अपूर्व आनंद दिसूच नये, हेही आणखी एक दुर्दैवच नव्हे काय? मराठी जनांस मिळालेला दुहीचा शाप अजून किती काळ पिच्छा पुरवणार कोण जाणे!

– बेंजामिन केदारकर,  विरार

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

बंड हिंदुत्वासाठी, पण अपेक्षित आकडय़ानंतरच

‘या ‘नवहिंदुहितरक्षकास’ हिंदुहिताची इतकीच चाड असती तर शिंदे वा अन्य महोदयांनी गेली अडीच वर्षे मंत्रीपदाचा उपभोग घेतला नसता..’ असे निरीक्षण ‘राजकारणाची ‘बद’सुरत!’ (२३ जून) या अग्रलेखात आहे. जे सरकार काँग्रेस / राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आले आहे, त्या सरकारात ‘निव्वळ भगवा’ असूच शकत नाही हे शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात यायला सत्तेतली अडीच वर्षे लागली काय? हाच त्यांना अभिप्रेत असलेला ‘आनंद दिघे बाणा’ आहे काय? असे प्रश्न अग्रलेखात उपस्थित केले गेले आहेत. याला शिंदे यांचं स्पष्टीकरण हे ‘स्व. आनंद दिघे यांनी सामाजिक स्वरूपाचं कार्य करताना हिंदु-मुस्लीम असा भेद कधी केला नाही’ हे असू शकते व काही अंशी ते खरेही आहे. स्व. आनंद दिघे यांच्याकडे आपली कामे घेऊन मुस्लीम नागरिक रांगेत उभे असल्याचे ठाणेकरांनी पहिले आहे. सर्वच राजकीय नेत्यांना ही ‘धर्मनिरपेक्षता’ वास्तवात दाखवावीच लागते नाहीतर मुस्लीम, बौद्ध, इ. मते मिळतील कशी? यात स्व. आनंद दिघेही पक्षाच्या विचारसरणीच्या विपरीत काही करत होते असेही नाही कारण खुद्द बाळासाहेबांनीच सांगितले होते की त्यांना ‘देशद्रोही’ मुस्लीम नको होते पण ‘सय्यद किरमाणींसाख्या देशाभिमानी मुसलमानांना’ त्यांचा आक्षेप नव्हता. कुठचा मुसलमान देशद्रोही आणि कुठचा कट्टर देशाभिमानी हे कसे ठरवायचे, याबाबतीत काही मार्गदर्शक तत्त्वे शिवसेना, भाजपकडे आहेत वा कसे, याबाबत मात्र खुलासा होणे जरूर आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ‘कंपूचे हिंदुत्वप्रेम हेच मुळी बेगडी आणि कातडीबचाऊ आहे’ असे अग्रलेखात नमूद आहे त्याबाबत इतकेच म्हणता येईल की, शिंदे यांना हिंदुत्वाची कास धरणे हे जास्त महत्त्वाचे वाटण्याचे प्रामुख कारण असेही असू शकते की शिवसेना नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतरही सत्तेत राहून आपल्या महत्त्वाकांक्षा साकार करण्यासाठी आवश्यक असणारा आमदारांचा आकडा आपल्याकडे आहे आणि कधीही सत्तेत येण्यासाठी तयार असणाऱ्या भाजपलाही आमदारांचा हा आकडा प्रत्यक्ष सत्तेत येण्यासाठी महत्त्वाचा आहे याची जाण शिंदेंना नक्कीच असावी. याच्या पुढचा राज्य सरकारचा प्रवास बघण्यासारखा असेल.

– संजय जगताप, ठाणे</p>

हा सत्ताबाजार उद्विग्न करतो..

‘सत्ताकारणाची ‘बद’सुरत!’ आणि ‘संघटना राहिल्याची शिक्षा!’ या दोन्ही अग्रलेखांमध्ये सामन्यजनांच्या मनातील प्रश्न मांडले आहेत. हा सत्तेचा बाजार पाहून आणखी प्रश्न निर्माण होतात. एकनाथ शिंदे जसं म्हणतात की आमचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे मग उद्धवसाहेब यांचे हिंदुत्व कुठले आणि भाजपचे कुठले? अशी हिंदुत्वाची किती आणि कशी दुकाने आहेत? ४० आमदार आज जे बरोबर आहेत त्यांची सगळय़ांची नावे आणि मागची अडीच वर्षांतील कामे लोकांना कळतील काय? हे फुटलेले आमदार शिवसेना सोडून अपक्ष म्हणून निवडून येण्यास लायक आहेत का, तशी त्यांची तयारी आहे का?

अडीच वर्षे आघाडीत घालवली मग आता कशी आठवण झाली की आघाडी अनैसर्गिक आहे? एकनाथ शिंदे यांना महत्त्व दिल्याचे दाखवणे गरजेचे होते असे गृहीत धरले तर बाकी कुठल्या मोठय़ा नेत्याने या भेदभावावरून बंड केले नसते हे कशावरून? बाकी ही सगळी आमदार मंडळी एवढय़ा लांब गुवाहाटीला का आहेत, त्यांना महाराष्ट्रात एवढी भीती आहे तर मग ही सगळी मंडळी उद्या न घाबरता कसे जनतेचे प्रश्न मांडणार?

अर्थात अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी संघटनाप्रमुख हे पद सांभाळताना कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले ही गोष्ट बरोबर आहे. हे सगळे हताशपणे पाहताना पुलंच्या ‘सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा बळी’ या लेखातील वाक्ये आठवली. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘राजकारण न कळणाऱ्या सामान्य जनांनी पुढाऱ्यांचे हास्य आणि नवीन घरोब्यानंतरची आिलगनांची नवी छायाचित्रे पाहायला सिद्ध राहावे. आणि म्हणावे, ‘लोकशाही मरण पावली आहे – लोकशाही चिरायू होवो’’ हे सगळे आजही तंतोतंत लागू पडते.

 – मयूर कोठावळे, मुंबई

आणीबाणीनंतरची निवडणूक गाय वासराबरोबर

आजच्या अग्रलेखात असे म्हटले आहे की आणीबाणीनंतरची निवडणूक इंदिराजींनी हाताचा पंजा या निवडणूक चिन्हावर लढवली. हे विधान तथ्यपूर्ण नाही. निजिलगप्पा काँग्रेसमधून बाहेर पडल्यापासून इंदिरा गांधींच्या काँग्रेसला गाय वासरू हे चिन्ह मिळाले होते. आणीबाणीनंतरची म्हणजे १९७७ मार्चची निवडणूक त्याच चिन्हावर लढवली होती. त्या पराभवानंतर काँग्रेस पुन्हा एकदा फुटली. त्याच वर्षी इंदिराजींच्या काँग्रेसला हात हे चिन्ह मिळाले.

– शुभानन आजगांवकर, ठाणे

पुस्तकाचा उत्कृष्ट संदर्भ..

‘बऱ्याच लटपटींची सर्कस’ या भाषासूत्रमधील भानू काळे यांच्या लेखात (२४ जून) ‘वाघसिंह माझे सखेसोबती’ या दामू धोत्रे यांच्या पुस्तकाचा उल्लेख पाहून सुखद धक्का बसला. जगण्याच्या धकाधकीत विस्मरणात गडप होऊ शकणाऱ्या अशा या चीरकालीन अतिमौल्यवान ऐवजांचे पुन:स्मरण कुठेतरी आजही होते आहे हे पाहून समाधान वाटले. नव्या पिढीच्या दृष्टिपथातही कदाचित न येऊ शकणारी पण जगण्याचे वेगळे भान देऊ शकणारी अशी गोष्ट वाचकांच्या समोर ठेवल्याबद्दल लेखकाचे आभार. वेळात वेळ काढून आवर्जून वाचावे असे हे पुस्तक पालकांनी मुलांच्या हातात ठेवल्यास त्यांची मराठी वाचनाची आवड व जीवनविषयक दृष्टिकोन दोन्ही रुंदावण्यास हमखास मदत होईल असे वाटते.

– प्रवीण नेरुरकर, माहीम, मुंबई

कडव्या हिंदुत्वात महाराष्ट्र धर्माचे काय झाले?

‘धर्मवीर आनंद दिघे यांच्या वाघा’ला त्याच्या अनुयायांना भरोसा देण्यासाठी ‘महाशक्ती’ची गरज भासावी यातच दिघेंच्या शिवसैनिकांचे अध:पतन होय. मागच्यांच्या भरवशावर पुढे जाण्याचे मनसुबे जो मांडतो तो आयुष्यात स्वकष्टाने कधीच कर्तृत्व गाजवू शकत नाही. शिवसेना हा एकत्र कुटुंब पद्धतीने चालणारा पक्ष आहे. या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख होते  बाळासाहेब ठाकरे आणि या कुटुंबाचा धर्म होता ‘महाराष्ट्र धर्म’. मार्मिकच्या अंकावर नेहमी एक घोषवाक्य असते ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा महाराष्ट्र धर्म कोणता ? तर त्यात इतर धर्माचा द्वेष, दुस्वास नाही तर त्यांना बरोबर घेत त्यांच्या बरोबरीने आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा. मध्ये भाजपच्या नादाला लागत पक्षाने अतिरेकी वाटावी, इतपत प्रमाणात हिंदु धर्माची कास धरली. याच अतिरेकाचे एक फळ आता दिसते आहे ते  म्हणजे कुटुंबाप्रति कृतघ्नता.  खरेतर आज गरज आहे ती ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवण्याची. म्लेंछांचे भय आता उरले नाही आता भय आहे ते ईडीचे. अशावेळी खरी गरज आहे ती  नवी गाडी घेतली म्हणून पेढे वाटणाऱ्या नगरसेवकाला कानफटवणाऱ्या धर्मवीराची. ‘महाराष्ट्र धर्म’ तोच वाढवून या साऱ्या लोकसेवकांना भयमुक्त करत कृतज्ञतेने जगायला शिकवेल.

– अ‍ॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी, मुंबई

मराठय़ांनी औरंगजेबाला मराठी बाणा दाखविला

‘राष्ट्रभाव’ सदरातील साठे यांचा लेख (२४ जून ) एकतर्फी आहे.  मुस्लीम राजवटीविरोधात हिंदुंचा अखंड प्रतिकार सुरू होता हे साठे यांचे सांगणे इतिहासाला धरून नाही. मुस्लीम राजवटीत हिंदु त्यांच्या  सेवेत होते. औरंगजेबाला महाराष्ट्रात सत्ता पाहिजे होती, त्याने अनेक लढाया केल्या. मात्र त्या काळात सह्यद्रीच्या जंगलात राहणाऱ्या मराठय़ांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाला मराठी बाणा दाखविला. पण दक्षिणेतील अनेक मुस्लीम सरदार महाराजांबरोबर होते. हे साठे कसे विसरतात? औरंगजेब काय म्हणतो ?  ‘या मराठय़ाने मला हरवले.’ छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण म्हणजे त्यांनी सुरतवर हल्ला केला, मात्र एकाही धर्मस्थळाला हात लावला नाही. शिवाजी महाराजांचे सैन्यप्रमुख इब्राहिम खान होते. त्यांच्या दरबारात पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच प्रतिनिधी होते. हे मराठय़ांचे राज्य  पुढे पेशव्यांनी १८१८ साली इंग्रजांच्या चरणी अर्पण केले. 

– मार्कुस डाबरे, पापडी, वसई