महाराष्ट्रासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे देवेंद्र फडणीस, नरेंद्र मोदी  आणि अमित शहा यांनी देण्याची गरज आहे. ते तिघेही ती देणार नाहीत, पण जनतेची आकलनशक्ती शाबूत आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांनी महाराष्ट्राच्या भाजपच्या चाणक्यला निर्णयप्रक्रियेपासून संपूर्णपणे दूर ठेवले होते. दूरान्वयानेसुद्धा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना सुगावा लागू दिला नाही. हा एकप्रकारे महाराष्ट्राबद्दलचा आकस आहे. देवेंद्र फडणवीस डोईजड होत आहेत असे दिसताच पद्धतशीरपणे त्यांचे पंख कापले. त्याचबरोबर बंडखोर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खच्चीकरण केले.  यापासून महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धडा घेऊन  एकमेकांचे पाय ओढणे बंद करणे गरजेचे आहे. नाही तर भविष्यातही महाराष्ट्राला दिल्ली दूरच राहील.

– डॉ. हिरालाल खैरनार, खारघर (नवी मुंबई)

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar
“शरद पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय केला”; चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा
not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
What DCM Devendra Fadnavis Said About Nana Patole?
नाना पटोलेंच्या कार अपघातावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, “महाराष्ट्राच्या राजकारणात…”
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान

व्यापाऱ्यांनी फौजदाराचा हवालदार केला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने कात्रजचा घाट दाखवून त्यांचा ज्या प्रकारे उपमर्द केला आहे तो प्रकार महाराष्ट्रातीलच काय देशातील कोणालाही रुचलेला नाही. फौजदाराचा हवालदार करून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला त्याची जागा दाखवण्याचा प्रयत्न तीन व्यापारी वृत्तीच्या नेत्यांनी करून दाखवला. केंद्रीय नेतृत्व कोणत्याही पक्षाचे असो ते नेहमी महाराष्ट्राला दुय्यमच  वागणूक देते. सर्व राजकीय पक्षांसहित महाराष्ट्रातील नागरिकांनी उघड त्याचा निषेध केला पाहिजे.          

– यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर (नवी मुंबई)

भाजपकडे दुसऱ्याचा कणा मोडण्याचे यंत्र!

 भाजपच्या दिल्लीतील धुरीणांनी जपून पावले टाकायचे ठरवलेले दिसतेय. कारण तांत्रिकदृष्टय़ा बंडखोर आमदारांची केस संपलेली नाही, तसेच चाळीसपैकी किती गळतील याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत ‘वेट अँड वॉच’ धोरणच योग्य असते. पण काही विपरीत घडू नये म्हणून त्यांना बांधून ठेवणेही आवश्यक होते. यावरून आठवण येते चरणसिंग व चंद्रशेखर यांची. जनता दल फोडण्यासाठी इंदिराजींनी चरणसिंगांना बाहेरून पाठिंबा दिला आणि योग्य वेळी काढून घेतला. तसेच राजीवजींनी चंद्रशेखर यांच्याबाबत केले. दोन्ही वेळा सरकारे पडली. यावेळी मुंबई महापालिकेचे गाजर भाजपला खुणावतेय. वर्षभरात त्या निवडणुका संपेपर्यंत युतीत कुरबुरी चालू झालेल्या असतील. कारण हे राजकारण आहे. त्यामुळे मधुचंद्राचे दिवस जाऊद्यात. अर्थात कणा दाखवणाऱ्याचा कणा मोडण्याचे मशीन भाजपकडे आहे म्हणा.

– सुहास शिवलकर, पुणे

महाराष्ट्रास पाडले, मराठी पडले

‘पाडले कोणास? पडले कोण?’ हा अग्रलेख वाचला. या सर्व घडामोडींनंतर आज महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेण्याची अथवा विरोध करण्याचीही क्षमता कुणातच उरलेली नाही. काँग्रेसच्या काळातही प्रादेशिक नेत्यांचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असे. महत्त्वाचे निर्णय दिल्लीतच ठरत. परंतु तेव्हा निदान दबावगट तयार करून चर्चा, वाटाघाटी करण्याची तरी सोय होती. नंतर फडणवीसांनीही आपली काहीएक निर्णयक्षमता असल्याचे सिद्ध केले होते. आता तर वरून आदेश आल्यास ‘का?’ असेही म्हणणे आजच्या मुख्यमंत्र्यांना अथवा उपमुख्यमंत्र्यांना अशक्यप्राय आहे. राजकारणातील सुंदोपसुंदीची धुंदी चढलेले राजकारणी, प्रसार माध्यमे आणि सामान्य जनताही ‘‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’’ हा मूलमंत्र विसरले. त्यामुळे शेवटी असेच म्हणावे लागेल की, ‘महाराष्ट्रास पाडले, मराठी पडले’.

– डॉ. सुधीर सुरवाडे, पुणे

हुशार पोर सगळय़ांचेच नावडते, तसा प्रकार..

‘पाडले कोणास? पडले कोण?’ या अग्रलेखात भाजपतल्या दिल्लीश्वरांच्या बुरसटलेल्या राजकारणावर केलेला टोकाचा प्रहार आवडला. वर्गातले हुशार पोर सर्वाचे नावडते असते अशातला हा प्रकार झाला. आपले मुख्यमंत्रीपद गेल्याच्या धक्क्यातून भाजप सावरण्याच्या आत फडणवीस सावरले आणि लगेचच विरोधी पक्षनेत्याची वस्त्रे परिधान करून कामाला लागले. अख्खा महाराष्ट्र हे सर्व पाहात होता आणि त्यामुळे फडणवीसांची महाराष्ट्रात ‘लार्जर दॅन लाइफ’ अशी प्रतिमा झाली आणि तीच त्यांना घातक ठरली. पण दिल्लीश्वरांच्या या खेळीमुळे नुकसान झाले ते भाजपचेच. सर्वसामान्यांच्या मनातून उतरला.

– आनंद वेदपाठक, मुलुंड पूर्व (मुंबई)

‘पहाटेच्या उतावळेपणाची’ चूक भोवली

भाजपच्या वरिष्ठांच्या धक्कातंत्राने पक्षाचा आदेश हाच व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असून पक्षशिस्त पाळावीच लागेल हा संदेश देशातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. त्याबरोबरीने शिंदे गटालाही त्याच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. मुंबई आणि इतर स्थानिक निवडणुका, प्रशासनावर आणि विरोधकांवर बारीक नजर आणि भाजपची राजकीय आणि धार्मिक विषयपत्रिका मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राबवणे आणि छुपा पण महत्त्वाचा उद्देश ‘पहाटेच्या उतावळेपणाच्या’ चुकीची बाकी राहिलेली शिक्षा भोगायला लावणे हाही असू शकतो.

– सुधीर गोडबोले, दादर (मुंबई)

तिथे अशोक चव्हाण होतेच की..

‘पाडले कोणास? पडले कोण?’ हे संपादकीय वाचले. समाजमाध्यमांचा सारा वेळ हे या घटनेमुळे फडणवीसांचे कसे प्रतिमाभंजन होत आहे हे दाखवण्यात खर्ची पडत आहे; परंतु वस्तुस्थिती तशी नाहीच. देवेंद्र फडणवीस यांनी भलेही त्याग वगैरे केला नसेल, पण आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग सुलभ केला आहे. आणि मागील सरकारात पूर्वीचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे तुलनेने कनिष्ठ पदावर सामील होतेच की. पक्षनेतृत्वाला पक्षवाढीची काळजी असतेच. तात्कालिक फायदा करून घेऊन पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा पुढच्या वेळी एकटय़ाच्या बळावर सत्ता स्थापन करून पर्यायाने पक्ष मजबूत करा असाच धडा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला असेल.

– समीर ठोले, राजाबाजार, औरंगाबाद</p>

आता इथेही ‘श्रेष्ठींचे आदेश’ सुरू झाले!

‘पाडले कोणास? पडले कोण?’ हे संपादकीय वाचले. आतापर्यंत भाजपमध्ये ‘पक्षश्रेष्ठींकडून आदेश’ येण्याची प्रथा नव्हती, ती पहिल्यांदा बघावयास मिळाली. फडणवीस यांची स्वत: सत्तेबाहेर राहावयाची खेळी दिल्लीश्वर श्रेष्ठींना अजिबात रुचली नाही. एक तर भाजपमध्ये रिमोट कंट्रोलची पद्धत नाही आणि पुढेमागे फडणवीस आपल्यापेक्षा वरचढ झाले तर आपल्याला भारी होईल असे वाटले असावे. उद्या समजा अमित शहांकडे पंतप्रधानपद आले तर नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्यास तयार होतील का? येणाऱ्या काळात राज्यातील जनतेला असे अजून किती धक्के बसणार आहेत कुणास ठाऊक! 

– शुभदा गोवर्धन, ठाणे</p>

मराठी माणूस युद्धात जिंकतो, तहात हरतो..

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वत: किंग मेकर बनून एका दगडात अनेक स्वपक्षीय व विरोधी पक्षी मारले आहेत. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला संपवण्याची सुरुवात देखील या निमित्ताने भाजपने केली आहे. ठाकरे ब्रॅण्ड नेस्तनाबूत करण्यासाठी शिंदेंचा उपयोग होईल, पण अडीच वर्षांनंतर त्यांच्या समर्थक ४० आमदारांसाठी पुढच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वत:च्या जागा सोडणार आहे का?  महाराष्ट्रातील एकमेव प्रादेशिक पक्ष या सत्तेच्या साठमारीत दुबळा झाला हे राज्याचे दुर्दैव.  आमदारांचे संख्याबळ या घडीला तरी सरकार बनवण्यासाठी नक्कीच  महत्त्वाचे आहे, पण सामान्य  शिवसैनिक या सगळय़ामध्ये काय भूमिका घेतो हे पुढील काळात ठाकरे, शिंदे तसेच बंडखोर आमदार या सर्वासाठीच  खूप महत्त्वाचे ठरणार. तूर्तास तरी,  मराठी माणूस युद्धात जिंकला तरी तहात मात्र हरतो हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 – विनय सोरटे, मुलुंड (मुंबई)

हेच भविष्यात भाजपबाबत होणार नाही का?

आजचा अग्रलेख वाचला. हे भाजपसारख्या पक्षाकडून अपेक्षित नव्हते. फडणवीसांना अधिक योग्य प्रकारे, सन्मानाने (आदेशाने नाही) सरकारमध्ये आणणे हे जास्त उचित ठरले असते. केंद्रीय नेतृत्व कितीही शक्तिमान असले तरी आमदार, खासदार वगैरे पातळीवरील लोकांना नीट हाताळले नाही तर काय होते हा धडा गेल्या १० दिवसांतच मिळाला आहे. भाजप केंद्रीय नेतृत्वाने तो घेतला पाहिजे. कडक शिस्त आणि जहाल कार्यकर्ते असूनही आमदार फुटले. हेच भविष्यात  भाजपच्या बाबतीत होऊ शकणार नाही का? दुसरी बाब जाणवली ती म्हणजे काही पक्षांनी प्रथमपासूनच एका विशिष्ट जातीय समाजाला महत्त्व देणे टाळले आहे. त्या समाजाला दूर ठेवण्याची प्रामाणिक भूमिका घेतली आहे. भाजप मात्र आजपर्यंत सर्वजाती समावेशक पक्ष वाटत राहिला. पण गेल्या काही दिवसांतील नियुक्त्या पाहिल्या तर असे वाटू लागले की कठीण प्रसंगात विरोधकांवर मात करताना विशिष्ट समाजाची ‘बुद्धी’ वापरायची, पण सत्तेच्या लाभाची गणिते आली की त्या समाजाला गृहीत धरायचे अशा अप्रामाणिक भूमिकेकडे भाजप सरकू लागला आहे की काय?

– मोहन भारती, ठाणे