हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर

आजच्या तंत्रज्ञानाची पुढची पायरी गाठल्यानंतर जग आमूलाग्र बदलेल; पण त्या जगातील मानवी जीवन कसे असेल?

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

मागील लेखात आपण भविष्यातील विश्व कसे असू शकेल, याबद्दल आढावा घेतला. तिथपासून पुढे उर्वरित काही शक्यतांचा विचार आजच्या लेखात करू या..

(अ) एक मनुष्य – अनेक व्यवसाय, तसेच पर्यायी रोजगार :

– एकच नोकरी किंवा व्यवसाय असे आपले सध्याचे जीवन. पण खरेच असेच चालायला हवे का पुढेही?

– अत्याधुनिक औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण, रोबोटिक ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अत्यंत पुढारलेले यंत्रमानव (रोबोट्स) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होणार.

– मनुष्याला नको वाटणारी कष्टदायक कामे यंत्रमानवाकडून करवून घेतली जातील.

– यंत्रमानव जनसामान्यांच्या आवाक्यात आले, की मग कोण कशाला १०-१२ तास मान मोडून काम करील? पण तेव्हा आपण काय करणार, हा प्रश्न उरतोच!

– त्यावर एक शक्यता म्हणजे, मनुष्य फक्त काही तासच नोकरी-व्यवसाय करणार. उर्वरित वेळ छंद, कला, शिक्षण घेणे-देणे, समाजकार्य, नातेसंबंध जोपासणे-नवे निर्माण करणे, सर्जनशीलता आणि गप्पाटप्पा. आहे ना गंमत?

– मासिक उत्पन्न – खर्च यांचे गणितही पूर्णपणे वेगळे असेल. आणि हो, तेव्हा आजच्या इतके मासिक उत्पन्न असायलाच हवे असेही नसेल.

– प्रवासास लागणारा वेळ हा सध्या आपल्या नोकरी-व्यवसायाच्या निर्णयामधला एक महत्त्वाचा घटक असतो. पण भविष्यात लोक दिवसा अनेक शहरे हिंडून रात्री लांबवर निसर्गरम्य ठिकाणी वास्तव्य करू शकतील. (स्वयंचलित व उडणाऱ्या गाडय़ा, ड्रोन, हायपर-लूपसारखी नावीन्यपूर्ण वाहतूक आदींमुळे)

– मानवजात मुळातच सकारात्मकदृष्टय़ा संधीसाधू, म्हणूनच आजपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या शोधानंतर माणसाचे जीवनमान त्या शोधामुळे निर्माण झालेल्या शक्यतांमुळे पूर्णपणे बदलून गेले आणि पुढेही बदलत राहील.

(आ) कृत्रिम अन्नधान्य, टॅब्लेट फूड, व्हर्टिकल फार्मिग :

– प्रयोगशाळेतील मांस (याविषयी या लेखमालेत आधी पाहिले आहेच) यावर गतीने संशोधन सुरू आहे.

– त्याचबरोबर कृत्रिम अन्नधान्य व टॅब्लेट फूड या संकल्पनाही जोर धरताहेत. मोजून मापून प्रत्येक अन्नघटक गरज असेल तितकाच खाणे, म्हणजे टॅब्लेट फूड ही संकल्पना. खरे तर आपले बहुतांश अन्न चव-रुची भागवण्यासाठी बनवले जाते. परंतु २०५० साली ९.३ अब्ज पोटांची भूक भागविणारे अन्न कदाचित चवीचे व आवडीचे नसेल. तेव्हा अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यास पर्यायी योजना म्हणून आता संशोधन सुरू आहे.

– शेतीला आडवी जमीन लागते. खते, पाणी आणि मशागतही लागते. तसेच प्रकाशसंश्लेषण फक्त सूर्यप्रकाशात होते. पण शेतीचे दुसरे पर्याय असू शकतात का? जपानमध्ये जागा अत्यंत कमी, म्हणून बंद पडलेल्या फॅक्टऱ्या, इमारतींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हर्टिकल फार्मिगचा उदय झाला.

– इथे सूर्यप्रकाशाला पर्याय म्हणून एलईडी बल्ब्स, जे २०-२४ तास सुरू ठेवून भाजीपाला, झाडे अनेक पटींनी जोमात, जोरात आणि लवकर वाढवले जातात. उदा. जर्मनीमधील एका हॉटेलात फक्त २८ दिवसांत व्हर्टिकल फार्मिगद्वारे हॉटेलच्या आतच त्यांना लागणारा सर्व भाजीपाला उगवला जातोय.

– जमिनीला पर्याय म्हणून प्लास्टिक पाइपच्या जाळ्यामध्ये झाडे रोवून त्यात नियंत्रित

खत्युक्त पाणी फिरत राहते. पर्यावरणीय घटक अर्थातच ग्रीन-हाऊसद्वारे नियंत्रित ठेवलेले असतात. त्यात तापमान, कार्बन डायऑक्साइडसारखे वायू गरजेनुसार कमी-जास्त केले जातात.

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे, असली शेती ही आडवी नसून उभी असते; एका इमारतीतील एकावर एक रचलेल्या घरांसारखी. म्हणून

नाव ‘उभी शेती’(व्हर्टिकल फार्मिग)!

– सध्या प्रचंड भांडवली खर्च असल्यामुळे जास्त व्यावसायीकरण झाले नसले, तरी पुढील तीन-चार दशकांत हे अत्यंत उपयुक्त असे संशोधन ठरणार आहे.

(इ) जीनोमिक्स आणि प्रयोगशाळेतील पुनरुत्पादन :

– समजा, तुम्हाला एखादा आनुवंशिक रोग आहे, ज्यावर वैद्यकीय इलाजच नाहीये, कधीही काही तरी दुर्दैवी होऊ शकेल याचीच धास्ती आहे. तो रोग तुमच्या मुलांना होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे आहेत. जनुकीय शास्त्राप्रमाणे पुढील पिढीत रोग संक्रमित होण्याची शक्यता ५० टक्के असते. त्यामुळे अत्याधुनिक जीनोमिक्स तंत्रज्ञान वापरून प्रयोगशाळेत आयव्हीएफ पद्धतीने त्यातील आनुवंशिक रोग न उतरलेली ५० टक्के गुणसूत्रे निवडून त्यांच्यापासून प्रजनन केले तर? तसेच जन्म झालाय आणि आनुवंशिक रोगदेखील आलेत, पण जनुकीय तंत्रज्ञान वापरून ते रोखता आले तर? अगदी पुढे जाऊन, जनुकीय बदल केलेले मानव आपण निर्माण करू शकलो तर?

– जीनोमिक्समधील तंत्रज्ञान इतके पुढारलेय, की जनुकीय बदल केलेले मानव सोडले, तर वरील सर्व गोष्टी आत्ताही शक्य झाल्या आहेत.

(ई) ऐच्छिक मृत्यू संकल्पना :

– रोग, त्यावरील इलाज यांच्याकडून ‘वेलनेस’कडे असणारा एकंदर समाजाचा कल, मशीन लर्निगद्वारे अत्यंत कमी वेळात शोधलेली अद्ययावत नवऔषधे.

– कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले यंत्रमानवीय वैद्यकीय साहाय्यक दिमतीला, त्यात नव्याने येऊ घातलेले अवयवांचे ३-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान आणि ‘ऑर्गन फॅक्टरी’ संकल्पना.

– मग एक काळ असा येईल, अगदी पुढील तीन-चार दशकांत आपल्याला मृत्यूवर विजय प्राप्त करता येईल. (त्याने सामाजिक घडी विस्कटेल हा मुद्दा वेगळा आणि या लेखमालेच्या चच्रेपलीकडचा!) पण फक्त तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास, ऐच्छिक मृत्यू संकल्पना प्रत्यक्षात येणे अशक्य नाही.

(उ) लिव्हिंग डेड :

– आपल्या मेंदूमध्ये आपल्या आयुष्यात घडलेला सूक्ष्मातील सूक्ष्म तपशील साठवलेला असतो. आपल्याला आठवत नाही सगळे, पण मेंदूत असते. एखादी संगणकाची हार्डडिस्क कॉपी करावी, तसे ते सारे कॉपी करता आले तर?

– आपल्या मेंदूमध्ये साधारणपणे ८६ अब्ज मज्जातंतू असतात. मेंदूच्या अत्यंत सूक्ष्म अशा एका कापाला (काही लाख मज्जातंतू असलेला तुकडा) डिजिटली कॉपी करायला सध्याच्या महासंगणकीय शक्तीनुसार दीड वर्षे लागली होती.

– संगणकीय शक्ती भविष्यात आणखी प्रचंड होत जाईल. (कदाचित क्वाण्टम कम्प्युटिंग वापरून.) तेव्हा पूर्ण मानवी मेंदूचे आपण डिजिटल रूपांतर करू शकू. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोटिक तंत्रज्ञान वापरून त्यातून हवी तेवढी, हवी तेव्हा माहिती काढून घेऊ शकू, संवाद करू शकू.

– थोडक्यात, मृत्यूनंतरही जिवंत राहणे (लिव्हिंग डेड), ज्ञानरूपी उरणे वगैरे आता मजेशीर वाटणाऱ्या संकल्पना शक्य होतील!

(ऊ) अंतराळातील वसाहती :

– हे तंत्रज्ञान फार नवखे नसले तरी अंतराळातील वसाहती प्रत्यक्षात येण्यास अडचण आहे. याचे कारण मनुष्याच्या शारीरिक मर्यादा. पण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणारे मनुष्याचे वेगळे ‘अवतार’ जनुकीय बदल करून आपण बनवू शकू.

– हे सगळे कशासाठी? तर, एक दिवस पृथ्वीवरील वातावरण पूर्णपणे बदलले, त्याने विघातक रूप घेतले, तर एक पर्याय म्हणून!

(ए) समांतर सरकार, कायदे संकल्पना :

– गंमत म्हणजे, वरील गोष्टी जेव्हा खरोखर घडतील.. लोकांचे पर्यायी वस्त्या व व्हर्टिकल सिटीमध्ये स्थलांतर, अंतराळातील वसाहती, मृत्यूनंतरही जिवंत राहणे आणि ऐच्छिक मृत्यू, तसेच जीनोमिक्स आणि मानव-यंत्रमानव विश्व.. तेव्हा देश, कायदे, सरकार या बाबींची काय त्रेधातिरपीट उडालेली असेल, नाही का? पण घाबरण्याचे कारण नाही. आपण जेव्हा जंगलातील टोळ्या सोडून गावात वसलो आणि मग राज्य, देश निर्माण झाले; तसेच पुढेही होईल, परिस्थितीनुसार योग्य असे काही तरी. परंतु हे स्थित्यंतर मात्र फार रंजक असेल याबद्दल शंका नसावी!

आजचा प्रश्न : औद्योगिक क्रांतीच्या पाचव्या टप्प्यात (आयआर ५.०) काय घडू शकेल, केव्हा आणि कधी?

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com