पीयूष गोयल (भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री )

डॉ. थानी बिन अहमद (संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) परदेश व्यापार राज्यमंत्री )

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

संयुक्त अरब अमिराती  (यूएई) आणि भारताने नुकतीच ऐतिहासिक व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करून उभय देशांतील आर्थिक सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी वाढत्या संबंधांचा घेतलेला हा संयुक्त आढावा.. 

२०२१कडे आम्ही मागे वळून पाहताना आणि २०२२ मधून भविष्याकडे नजर ठेवून असताना आमचे दोन्ही देश एका ऐतिहासिक वळणावर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. संयुक्त अरब अमिरात आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे आणि त्याने पुढील ५० वर्षांच्या विकासाचा आपला दृष्टिकोन मांडला आहे. दुसरीकडे भारतही आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारत नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आपल्या दीर्घकालीन विकासाच्या प्रवासाचा प्रारंभ करतो आहे आणि आश्वासक वाटचाल करीत पुढे जातो आहे. 

अगदी अलीकडेच, २०१७ मध्ये आमच्या दोन देशांच्या नेत्यांनी आमचे नातेसंबंध एका सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून अधिक जास्त उंचावण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. तेव्हापासून काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आमचे नातेसंबंध अतिशय दृढ झाले आहेत आणि ते एका अतिशय भक्कम आणि बहुआयामी द्विपक्षीय सहकार्यामध्ये परिवर्तित होऊन आमच्या लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण करत आहेत.

अतिशय विशेष असलेले हे संबंध वृिद्धगत होण्याची प्रक्रिया सुरूच असून अतिशय गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जगात, विशेषत: कोविड-१९ महामारीच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता विकसित केली आहे. आमच्या देशांचा संयम आणि चिकाटी, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या मैत्रीची दृढता या विपरीत काळात अधिक प्रकर्षांने दिसून आली आहे. आम्ही सर्व समुदायांसाठी  शांतता, सौहार्द, सहअस्तित्व आणि समृद्धीला चालना देण्यासाठी एकत्रितपणे काम केले आहे. व्यापार, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि पर्यटन यांच्या प्रभावी वापराच्या माध्यमातून आमच्या जनतेची आणि या विशाल विश्वाची प्रगती करण्यावर आमचा भर आहे आणि दृढसंकल्प आहे. याचे उदाहरण म्हणजे संयुक्त अरब अमिरातींनी महामारी असूनही ‘एक्स्पो २०२०’चे केलेले यशस्वी आयोजन आणि यात भारताने  उभारलेल्या प्रेरणादायी पॅव्हिलियनने बजावलेली भूमिका. या पॅव्हिलियनने राष्ट्रीय भावना वाढीला लावली आणि अभ्यागतांना आकर्षित केले. 

आज आमच्यातील धोरणात्मक भागीदारी एका मोठय़ा परिवर्तनाच्या उंबरठय़ावर आहे. कोविडपश्चात कालखंडामध्ये परस्पर सहकार्याने वृद्धी व विकासाच्या शक्यतांची विविध पातळय़ांवर आम्ही चाचपणी करत आहोत. शाश्वत विकास, हवामानविषयक उपाययोजना, नवोन्मेष, डिजिटलायजेशन, नवउद्यम, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्य, फिनटेक आणि कौशल्य विकास या नव्या आणि उदयाला येणाऱ्या क्षेत्रांमध्ये पुन्हा एकदा आमच्या सामाईक दृष्टिकोनामुळे भविष्यानुकूल भागीदारी निर्माण होईल.

निर्माण प्रक्रियेत इतिहास

केवळ पाच महिन्यांपूर्वी आम्ही आशा आणि आशावाद असलेल्या ‘सीईपीए’ किंवा ‘सेपा’ (कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अ‍ॅग्रीमेंट) अर्थात ‘समावेशक आर्थिक भागीदारी करार’, या – व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणूक क्षेत्रामध्ये असंख्य संधी निर्माण करण्याबरोबरच अतिशय खडतर आणि त्याचबरोबर परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेल्या कालखंडात जागतिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी योगदान देणाऱ्या – करारावर चर्चा सुरू करण्याच्या ऐतिहासिक कामासाठी एकत्र आलो.

प्रगतीची आकांक्षा आणि दोन्ही देशांच्या जनतेला विविध लाभ मिळवून देण्याची वचनबद्धता दोन्ही देशांमध्ये आहे. या सामाईक उद्देशामुळे या चर्चेला चालना मिळाली आणि सध्या महामारीमुळे निर्माण झालेली आव्हाने असतानाही अपेक्षेपेक्षा जास्त गतीने ही चर्चा पूर्ण झाली.

या करारावर १८ फेब्रुवारीच्या शुक्रवारी स्वाक्षऱ्या झाल्या आहेत, सहकार्याच्या निर्धारावर मोहोर उमटली आहे आणि हे सहकार्य अमलात येत आहे. भारत आणि यूएई या दोन्ही देशांना एका नव्या उंचीवर नेणाऱ्या समृद्धीच्या आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्याच्या एका नव्या युगासाठी एक व्यासपीठ तयार झाले आहे.

तात्काळ व भविष्यकालीन वृद्धीची दालने..

दोन्ही देशांना यातून तात्काळ मिळणारे फायदे अगदी स्पष्ट आहेत. पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापारात वाढ होऊन ही उलाढाल १०० अब्ज डॉलरवर पोहोचणार आहे. महामारीच्या आधीच्या कालखंडापेक्षा ही वाढ दुप्पट असेल. बाजार अधिक जास्त प्रमाणात खुला झाल्यामुळे त्याचा फायदा निर्यातदार, आयातदार आणि ग्राहक यांच्यासारख्या सर्व हितधारकांना सारख्याच प्रमाणात होणार आहे. अत्यावश्यक, उच्च कौशल्यप्राप्त व्यावसायिकांना जास्त मोकळीक मिळणार आहे आणि आमच्या दोन्ही देशांच्या जनतेला फायदेशीर ठरणारे हजारो नवे रोजगार निर्माण होणार आहेत.

अनेक प्रकारच्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये विशेषत: श्रमिकांवर जास्त आधारित असलेल्या रत्ने आणि आभूषणे, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, पादत्राणे, प्लास्टिक, कृषी उत्पादने, अभियांत्रिकी माल आणि औषधी उत्पादने या क्षेत्रांमध्ये बाजार जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे भारतीय  व्यवसायांना लाभ मिळणार आहे. संयुक्त अरब अमिरातींशी संलग्न असलेल्या प्लास्टिक, रत्ने आणि आभूषणे यांसारख्या भारतातील उद्योगांना कमी उत्पादन खर्चाचा फायदा होणार आहे.  

आमच्या जनतेला अनेक शतकांपासून दोन्ही देशांमध्ये अतिशय सहजतेने ये-जा करता येत आहे. सीईपीएमुळे भारतातील व्यावसायिकांना यूएईमध्ये जास्त प्रमाणात संधी उपलब्ध होतील आणि जागतिक पातळीवर ठसा उमटवता येईल. पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप आणि इतर भागांचे एक धोरणात्मक प्रवेशद्वार असे संयुक्त अरब अमिरातीचे  स्थान आहे. भारताच्या विकासामधून यूएईच्या गुंतवणुकीसाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे त्याचादेखील फायदा दोन्ही देशांना होणार आहे.

अर्थसाहाय्य, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळविषयक सर्व प्रकारच्या भांडवलाचा ओघ दोन्ही दिशांना सुरू ठेवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी एका नव्या आणि अधिक कार्यक्षम चौकटीचा पाया समावेशक आर्थिक भागीदारी कराराने (‘सेपा’ने) रचला आहे. भारताने खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक भांडवली गुंतवणुकीवर भर दिला असल्याचे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही दिसून आलेले आहे.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम आकारमानाच्या उद्योगांनादेखील अगदी सहजतेने जागतिक पातळीपर्यंत पोहोचता येईल. भारत  आणि यूएईमध्ये अतिशय आकर्षक, स्पर्धात्मक आणि परस्परांना पूरक असलेली स्टार्टअप व्यवस्था आहे आणि भारतात बंगळूरु, मुंबई, नवी दिल्ली यांच्यासह विविध राज्ये/ शहरे आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी  आणि दुबई यांसारखी व्यापारी केंद्रे यामधून उद्योजकतेचे सुवर्णयुग उदयाला येत आहे. आमच्या ‘सेपा’ करारामुळे स्टार्टअप्सना नवे ग्राहक, व्यवसायाचे जाळे आणि संधी उपलब्ध होत आहेत आणि आपल्या व्यवसायाचा गतिमान विकास करण्यासाठी एक मजबूत पाया म्हणून सुधारित यंत्रणा उपलब्ध होत आहे.

ऊर्जामय भविष्याची निर्मिती

ऊर्जा क्षेत्रात आम्हा दोन्ही देशांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. स्वच्छ आणि हरित ऊर्जेसाठी आम्ही योग्य वेळी, न्याय्य पद्धतीने आणि योग्य प्रकारच्या ऊर्जा संक्रमणासाठी वचनबद्ध आहोत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात दोन्ही देशांच्या परस्पर गुंतवणुकीमुळे आमचे संबंध वैशिष्टय़पूर्ण आहेत. भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठय़ांमध्ये सहभाग असलेला संयुक्त अरब अमिराती हा एकमेव देश आहे.

आम्ही नवीन प्रकारच्या गतिमान व्यापार आणि गुंतवणूकविषयक धोरणांवर भर देत आहोत. भारताला आपल्या निर्यातीत  २०२२ मध्ये ४०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा आहे. आमचा वाढत असलेला द्विपक्षीय व्यापार, २०३० पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेला दुप्पट करण्याच्या संयुक्त अरब अमिरातीच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

अनेक शतकांपासून भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांची भवितव्ये परस्परांशी जुळलेली आहेत. दोन्ही देशांमध्ये असलेले अतिशय उत्तम प्रकारचे सहकार्य, घनिष्ठ मैत्री, विश्वास आणि उद्यमशील वृत्ती यामुळे आमच्या अर्थव्यवस्थांसाठी, आमच्या उद्योगांसाठी, आमच्या शहरांसाठी आणि आमच्या जनतेसाठी सध्या आणि यापुढील अनेक पिढय़ांमध्ये अमर्याद संधी निर्माण होणार आहेत. आम्ही हाच दृष्टिकोन जपत आहोत.