डॉ. विनय सहस्रबुद्धे ( उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष राज्यसभा सदस्य)

सामान्यांच्या मनाला भिडेल, अशी संवादशैली मोदींना लाभली आहे. त्यामुळेच पंतप्रधानपदाच्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या सर्वच आवाहनांना जनतेचा प्रतिसाद लाभला. नेतृत्वाची प्रचीती देणाऱ्या त्या अनेक उपक्रमांपैकी आठ उपक्रमांचा हा मागोवा..

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 

सामाजिक विकासाला समर्पित अशा विविध योजनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळालेले घवघवीत यश, हे गेल्या आठ वर्षांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ आहे. पण राजकीय वा शासन पातळीवरील कोणतेही यश हे नुसते कागदोपत्री मिळणे पुरेसे नसते. ते लोकांच्या अनुभवाचा आणि जाणिवेचा विषय होणे गरजेचे असते. पंतप्रधान मोदी हे या दोन्ही आघाडय़ांवर यशस्वी झाले आहेत.

या यशामागचे प्रमुख कारण म्हणजे मोदींकडे असलेली उत्तम संवादकौशल्ये! सामान्यातिसामान्य जनांच्या मनाला भिडेल, अशी उल्लेखनीय संवादशैली त्यांना लाभली आहे. आपल्या प्रत्येक कृतीची वेळ, ठिकाण आणि औचित्य ज्या कुशलतेने ते निवडतात त्यातून त्यांच्या विचारशीलतेचे दर्शन घडते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आठव्या वर्धापनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या आठ कल्याणकारी आवाहनांवर दृष्टिक्षेप टाकणे निश्चितच बोधप्रद ठरेल.

स्वच्छ भारत अभियान

आपण ‘स्वच्छ भारत अभियाना’पासून सुरुवात करू या. देशातील ग्रामीण व शहरी भागांना स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय ठेवून आखलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, जुन्या चुकांची पुनरावृत्ती टाळून काही अभिनव प्रयोग अमलात आणण्यात यशस्वी ठरला. ‘जिल्हा’ हे मूलभूत एकक मानून गावागावांत शौचालययुक्त घरांची बांधणी करणे, त्यासाठी थेट निधी उपलब्ध करून देणे, देशव्यापी जनजागृतीची एक व्यापक चळवळ उभी करून विशाल जनसहभाग सुनिश्चित करणे ही या अभियानाची ठळक वैशिष्टय़े होती.

लोकांच्या आचरणात मूलभूत बदल घडवणाऱ्या या चळवळीचे, ‘लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’ या विख्यात संस्थेनेदेखील कौतुक केले होते. ‘मोदींनी देशासमोर स्वच्छतेचा आग्रह नियमितपणे मांडला आणि देशवासीयांना शौचालयांचे (विशेषत: महिलांसाठी असलेले) महत्त्व, विविध पद्धतींनी पटवून दिले. देशाच्या कानाकोपऱ्यांत आपापल्या वातानुकूलित कार्यालयांत बसलेल्या अधिकाऱ्यांना खडबडून जागे करत त्यांना दुर्गम भागांतील खेडय़ापाडय़ांमध्ये पाठवत स्वच्छतेसंबंधी प्रशिक्षणात सहभागी करून घेतले. उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांना परावृत्त करण्यासाठीही अधिकाऱ्यांना अगदी पहाटे चार वाजता कामाला लावणारा कार्यनिष्ठ नेता म्हणजे नरेंद्र मोदी,’ अशा शब्दांत या संस्थेने या योजनेचा गौरव केला. 

खादी खरेदी

सरकारच्या कृतींमधून पोहोचणाऱ्या संदेशांव्यतिरिक्त, पंतप्रधानांचे इतर अनेक संदेशदेखील तितक्याच प्रभावीपणे पोहोचले. मोदींनी आपल्याच देशवासीयांनी तयार केलेल्या खादीचे किमान एक तरी वस्त्र खरेदी करण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला भारतीय जनतेने उदंड प्रतिसाद दिला. खादी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार खादी उत्पादनांच्या संख्येत गेल्या सात वर्षांत तब्बल १७२ टक्के एवढी भरभक्कम वाढ झाली. २०२०-२१च्या तुलनेत २०२१-२२ या वर्षांत खादी उत्पादनांच्या विक्रीत तब्बल २०.५४ टक्के वाढ झाली. यावरून पंतप्रधानांचे आवाहन भारतीय जनमानसात किती प्रभावीपणे पोहोचते व त्याचे अपेक्षित अशा सकारात्मक कृतीत कसे रूपांतर होते, हे दिसून येते.

मोदी आवाहन करतात आणि लोक प्रतिसाद देतात, हा शिरस्ता अगदी लाकडी खेळण्यांबाबत केलेल्या आवाहनालाही लागू झाला. वाराणसीमध्ये खेळणी तयार करणारा एक कलाकार आवर्जून सांगतो की, पंतप्रधानांनी ‘मन की बात’मधून आवाहन केल्यानंतर कलाकारांचे मनोबल तर वाढलेच, शिवाय त्यांच्या खेळण्यांचा खप वाढला, तसेच बॅटरीवर चालणारी खेळणीदेखील भारतात तयार केली जाऊ लागली.

रोखरहित व्यवहार

रोखरहित व्यवहारांबाबतचे त्यांचे आवाहनही असेच गाजले, त्याला देशवासीयांनी जोरदार प्रतिसाद दिला. पंतप्रधानांनी डिजिटल अर्थव्यवस्थेचे महत्त्व ओळखले आणि त्या संदर्भात पावले उचलत लोकांना आवाहन केले. आज प्रतिदिन जवळपास २० हजार कोटी रुपये इतकी ऑनलाइन आर्थिक उलाढाल होते, हे वास्तव आहे. 

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ

मोदींच्या आवाहनातून मूलभूत बदलदेखील घडले आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ मधून जनतेच्या आचरणात आमूलाग्र बदल घडला. उपलब्ध सांख्यिकी माहितीनुसार गेल्या सात वर्षांत स्त्री-पुरुष लिंग समतोलाबद्दल देशव्यापी जनजागृती झाल्याचे ठळकपणे निष्पन्न झाले. गेल्या सहा वर्षांत लिंग गुणोत्तर १६ एककांनी वाढून ९१८चे ९३४ झाले तसेच, मुलींचे माध्यमिक शाळांमधील नोंदणीचे प्रमाण ७७.७५ वरून ८१.३२ वर पोहोचले. याहूनही वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे जन्मदरातील लिंग गुणोत्तरात पिछाडीवर असलेल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. हे जिल्हे म्हणजे महेंद्रगड (हरियाणा- २०१४-१५ मध्ये ७९१ तर २०१९-२० मध्ये ९१९), पटियाला (पंजाब- २०१४-१५ मध्ये ८४७ ते २०१९-२० मध्ये ९३३) आणि मऊ (उत्तर प्रदेश- २०१४-१५ मध्ये ६९४ ते २०१९-२० मध्ये ९५१).

एक भारत – श्रेष्ठ भारत

पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित केंद्र सरकारचे आणखी एक प्रभावी पाऊल म्हणजे ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’! या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून प्राथमित स्तरावर जनसहभाग वाढवण्यासाठी एक आग्रही आवाहन मोदींनी देशवासीयांना केले होते. ते म्हणजे मातृभाषेव्यतिरिक्त एका भारतीय भाषेतील किमान ३०० शब्द शिकण्याचे! पुढे ज्ञान आणि माहितीच्या विकेंद्रीकरणात प्रादेशिक भाषांना कटाक्षाने प्राधान्य दिले गेले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार आज अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना १२ विविध प्रादेशिक भाषांमधून शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे, ती मोदींच्या आवाहनामुळे आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिसादामुळे. आता तर अगदी वैद्यकीय शिक्षणदेखील प्रादेशिक भाषांतून घेता येणार आहे, जे काही वर्षांपूर्वी अशक्य वाटत होते.

आत्मनिर्भर भारत

कोविडसारख्या महाभीषण परिस्थितीतदेखील, संकटाचे रूपांतर संधीत करत, मोदींनी आपल्या खास संवादात्मक शैलीत भारताला ‘आत्मनिर्भर’ करण्याचे आवाहन केले. अतिशय काळजीपूर्वक वापरलेली ‘आत्मनिर्भर’ ही संज्ञा ‘स्वावलंबन’ आणि ‘स्वयंपूर्णता’ या दोहोंच्या संगमापलीकडची आहे. भारताची वैश्विक पटलावरील क्रमवारी बदलण्याच्या कल्पनेतून आखलेल्या या दूरदर्शी योजनेने एकीकडे करोनावरील लशीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर केले तर दुसरीकडे सामरिक शस्त्रास्त्र उत्पादनातही आत्मनिर्भरता आणण्याचे काम आता द्रुतगतीने सुरू आहे. 

सबका प्रयास

शेवटचे आणि महत्त्वाचे आवाहन म्हणजे ‘सबका प्रयास’! राष्ट्रनिर्माण कार्यात खऱ्या अर्थाने प्रत्येकाचा हातभार लागावा यासाठी ‘सब का साथ’ पासून सुरू झालेला आपल्या जन-आवाहनाचा प्रवास ‘सबका विकास’ आणि ‘सबका विश्वास’ या मार्गे ‘सबका प्रयास’ या महत्त्वाच्या टप्प्यावर आणून पोहोचवण्यात मोदींनी लक्षणीय यश संपादित केले. कारण ‘विकास’ आणि ‘विश्वास’ ही नीतीगत तसेच धोरणात्मक आवाहने असून ‘प्रयास’ हे तसे भारतीयांच्या कृतीशी, दैनंदिन व्यवहारांशी निगडित सर्वसमावेशी आवाहन आहे.

जनतेच्या मनावरील अधिराज्य टिकवून ठेवण्याकरिता आठ वर्षे हा बराच मोठा व अवघड कालावधी असतो. मात्र देशहितकारी योजना राबविताना मोदींनी विश्वासाच्या बळावर मिळवलेली संवादात्मक पकड आजही समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्याशी जोडते. मोदींची नानाविध आवाहने ही जनतेच्या आकांक्षांना साद घालणारी होती. त्यांचे प्रामाणिक आणि परिश्रमी नेतृत्व जनमनाला साद घालून गेले. याचाच अर्थ असा की, मोदींच्या लोकप्रियतेमागे कुठलीही जादू नसून निखळ मेहनत हेच त्यांच्या यशाचे गमक आहे, हे निश्चित!