डॉ. यासुकाता फुकाहोरी (जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत)

भारत आणि जपान यांच्यातील संपर्क तसा सहाव्या शतकापासूनचाच, पण या दोघा लोकशाहीवादी देशांचे अधिकृत संबंध १९५२ मध्ये प्रस्थापित झाले, त्यास ७० वर्षे होताना पुढली भागीदारी खुणावते आहे..

२०२२ हे जपान आणि भारताच्या राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष आहे. वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या वर्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येईल. हे सत्तरावे वर्ष भूतकाळातील आठवणी जागवण्यासाठी, वर्तनमानाकरिता सावध राहण्यासाठी आणि भविष्याचा विचार करण्यासाठी उत्तम संधी आहे असे मी मानतो. मला याचा विशेष आनंद आहे की भारताच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि जपान-भारत राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष आपण एकत्र साजरे करू शकणार आहोत. 

जपान आणि भारताच्या औपचारिक संबंधांना १९५२ मध्ये सुरुवात झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर बहुपक्षीय सॅन फ्रान्सिको शांतता करारात सहभागी होण्याऐवजी, ‘जपान आंतरराष्ट्रीय समुदायात परतत असताना त्यात आदर आणि समानता असली पाहिजे,’ अशा विचारातून भारताने जपानशी द्विपक्षीय शांतता करार केला होता. हीच गोष्ट दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीचा पाया ठरली आहे. राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यापूर्वीदेखील व्यवसाय, शिक्षण आणि सांस्कृतिक आदान-प्रदानामुळे दोन्ही देशांतील लोकांमध्ये एकमेकांविषयी घट्ट मैत्रीभाव निर्माण झाला होता. १९५१ मध्ये भारताने आयोजित केलेल्या पहिल्या आशियाई खेळांकरिता जपानच्या खेळाडूंना निमंत्रित केले होते. द्वितीय महायुद्धानंतर जपानचा झेंडा फडकण्याच्या पहिल्या काही घटनांमध्ये या १९५१ च्या ‘एशियाड’चा समावेश होतो. आपल्या देशाच्या पुनर्निर्माणासाठी धडपड करणाऱ्या तेव्हाच्या जपानी जनतेसाठी हा फार मोठा दिलासा होता. ७० वर्षांतील बहुस्तरीय आदान- प्रदानांमुळे,  दोन्ही देशांतील संबंध हे आता विशेष धोरणात्मक आणि जागतिक पातळीवरील भागीदारीचे झाले आहेत. आशिया आणि त्याच्या पलीकडेही इतरत्र शांतता, स्थैर्य आणि विकास या विषयांवर दोन्ही देशांनी केलेल्या प्रयत्नांकरिता एकमेकांचा आत्यंतिक आदर बाळगून, दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करत आले आहेत. मला याचा अभिमान आहे की दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ‘मुक्त आणि खुल्या-प्रशांत महासागर’ (एफओआयपी) आणि इतर जागतिक विषयांसंदर्भात एकत्र काम करण्यासाठी दोन्ही देश नैसर्गिक भागीदार म्हणून काम करत आहोत.

अगदी सहाव्या शतकापासून दोन्ही देशांतील लोकांमध्ये संपर्क आहे. त्या सहाव्या शतकात बौद्ध धर्माचे आगमन आणि स्वागतही जपानमध्ये झाले. सन ७५२ मध्ये बोधिसेना नामक भिक्खूने तोडाय-जी या जपानमधील महत्त्वपूर्ण मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्तीची पूजा केली होती. पुढे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जपानमध्ये मेईजी (राजवटीची) पुनस्र्थापना करताना, उद्योगांच्या आधुनिकीकरणाकरिता जपानला नैसर्गिक साधनसंपत्तीची गरज होती. अनेक जपानी व्यक्तींनी भारतात जाऊन कापूस, लोह यांसारख्या वस्तूंची खरेदी केली.

दोन्ही देशांतील सांस्कृतिक देवाण-घेवाणही उल्लेखनीय आहे. यात नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आणि जपानी तत्त्वज्ञ ओकाकुरा तेनशिन यांच्यात झालेल्या चर्चेचा समावेश होतो. हे दोघेही स्वामी विवेकानंदांमुळे अतिशय प्रभावित झाले होते.

‘शतकीय वाटचालीसाठी भविष्याची बांधणी’ (बिल्डिंग अ फ्यूचर फॉर अवर सेंटेनरी) ही दोन्ही देशांतील ७० व्या वर्षपूर्तीची संकल्पना आहे. हा मंत्र आम्हाला पुढील वर्षभर मार्गदर्शन करत राहणार आहे. यातील संदेश हाच आहे की,आम्ही एकत्रितपणे आमचे भविष्य घडवू आणि शतक महोत्सव आणि त्यापुढेही एकत्रितपणे वाटचाल करू. मला याची पूर्ण खात्री आहे की, भविष्यातदेखील दोन्ही देशांच्या एकत्रित सहकार्यासाठी अनेक संधी उपलब्ध असतील.

प्रथम तर, आशियातील लोकशाहीवादी देश म्हणून जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी एकमेकांसोबत काम करू शकतो. समान मूल्ये आणि परंपरा यांच्या आधारावर आपण राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक बाबींवर एकत्र आहोत. नियमांवर आधारित मुक्त आणि खुल्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या उभारणीसाठी दोन्ही देश सतत प्रयत्नशील आहेत.  सुरक्षेच्या मुद्दय़ावर जसे की सायबर सुरक्षा, अंतराळ, आर्थिक सुरक्षितता यांसारख्या सुरेक्षेच्या अनेक विषयांवर दोन्ही देशांना एकत्रित काम करण्यासाठी मोठय़ा संधी उपलब्ध आहेत.

दुसरे म्हणजे, आर्थिक संबंध आणखी बळकट करण्याची संधी आहे. जपानने भारताला सर्वाधिक अधिकृत विकास सहायता निधी दिला आहे. यातील अगदी आत्ताचे उदाहरण म्हणजे ‘मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रोजेक्ट’. तसेच ‘मुंबई मेट्रो-३’ आणि ‘मुंबई ट्रान्सहार्बर िलक प्रकल्प’ आमचे भक्कम आर्थिक मदत दर्शवतात. जपान हा भारतातील एक मोठा गुंतवणूकदार आहे. इतर अनेक देशांमधील सामाजिक पायाभूत सोयीसुविधा आणि दळणवळण यांसाठी, भारत व जपान या दोन्ही देशांनी परस्परांशी आर्थिक सहकार्याची भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारीमुळे केवळ हिंदू-प्रशांत महासागरच नाही तर जगातल्या आर्थिक ताकदीस बळ मिळण्यास मदत होईल.

तिसरी बाब म्हणजे, दोन्ही देशांच्या संबंधात साहित्य, चित्रपट, संगीत, अ‍ॅनिमे (सचेतपट अर्थात ‘अ‍ॅनिमेशन’ची सुभग जपानी शैली), क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रातील सांस्कृतिक देवाण-घेवाण महत्त्वाची आहे. मला याचा आनंद आहे की भारतात जपानी भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मला खात्री वाटते की दोन्ही देशांतील ही तरुण, प्रज्वलित मने दोन्ही देशांतील आणखी मजबूत होणाऱ्या मैत्रीचा पाया ठरतील.

कोविडचा प्रादुर्भाव असतानाही, दोन्ही देशांतील संबंध आणखी बळकट होताना पाहायला मिळत आहेत. प्रत्यक्ष भेटीगाठी होत नसल्या तरीही त्याचा कोणताही परिणाम दोन्ही देशांतील संबंध कमजोर होण्यात झालेले नाहीत. दोन्ही देशांतील दीर्घकालीन मैत्री दोन्ही देशांचे संबंध दर्शवणारीच आहे. दोन्ही देशांच्या एकत्रित भविष्यकालीन दृष्टिकोनावर कधीही दुष्परिणाम होणार नाही. अगदी महासाथीच्या काळातही आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या संपर्कपद्धती अंगीकारल्या आणि आमच्या सहकार्याला अधिक बळकटी दिली. २०२२ वर्षांसाठी शुभेच्छा देत मी माझे लिहिणे थांबवतो.  मी अपेक्षा करतो की हे वर्ष दोन्ही देशांसाठी, भारतीय आणि जपानी लोकांसाठी संस्मरणीय ठरो.