पी. चिदम्बरम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटचे मैदान म्हणजेच रणांगण मानणारे भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधले क्रीडारसिक या दोन्ही देशांच्या खेळाडूंदरम्यान होणाऱ्या इतर कोणत्याही क्रीडा प्रकारातील सामन्यामध्ये इतके हमरीतुमरीवर येताना दिसत नाहीत. असे का होत असावे?

टी-ट्वेंटी विश्वचषक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया विश्वविजेता ठरला आहे. आपण या सामन्यांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच मागचा रस्ता धरला होता. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान तसेच न्यूझीलंडच्या आक्रमक खेळीचा आपल्याला सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दहा गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने आठ गडी राखून आपल्याला पराभूत केले.

क्रिकेट खेळणाऱ्या इतर कोणत्याही देशासारखाच पाकिस्तान हादेखील आपला प्रतिस्पिर्धी आहे. पण असे असले तरीही भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना होतो तेव्हा तो फक्त क्रिकेटचा सामना नसतो तर दोन कट्टर शत्रूंमधली ती लढाई असते. क्रिकेटसारख्या एका तद्दन खेळाच्या बाबतीत हजारो भारतीय तसेच पाकिस्तानी लोकांचा हा जो काही शत्रुत्वाचा दृष्टिकोन आहे त्यामागे फक्त खेळामधले वैर निश्चितच नाही.

खेळ बदलला आहे

एक काळ असा होता की भारतात क्रिकेट हा प्रामुख्याने शहरी मध्यमवर्गीयांचा खेळ होता. खेळाडूंचे कौतुक केले जात होते, पण त्यांचे देव्हारे माजवले जात नव्हते. खेळाडू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नीट नोकऱ्या करत होते. ते ज्यांच्याशी लग्न करत त्या मुली लग्नानंतर ताबडतोब सेलेब्रिटी बनत नसत. खेळाडूंना मानधन म्हणून थोडेच पैसे मिळत. क्रिकेट खेळून प्रचंड पैसे मिळवले आणि वेगवेगळ्या उत्पादनांची जाहिरात करून त्या मानधनाच्या कित्येक पट पैसे मिळवले असे होत नव्हते. (बापू नाडकर्णी या एके काळच्या एकामागून एक निर्धाव षटके टाकणाऱ्या डावखुऱ्या संथगती गोलंदाजांनी सांगितले होते की मुंबईमधल्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर जाण्यासाठी ते उपनगरातून लोकल ट्रेन पकडत. आणि भारतासाठी कसोटी सामना खेळण्यासाठी त्यांना दर दिवशी ५० रुपये मिळत.)

पण आता हा खेळ ओळखू येण्याच्या पलीकडे बदलला आहे. कित्येक दशके लोकांना पाच दिवसांचे संथ, रटाळ, निकालांची कोणतीही निश्चिती नसलेले कसोटी सामनेच माहीत होते. ओडीआय म्हणजेच वन डे इंटरनॅशनल हे ५० षटकांचे एक दिवसीय सामने सुरू झाल्यानंतर सगळेच चित्र बदलत गेले. त्यात सामना अनिर्णित (ड्रॉॅ) राहण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण ही स्पर्धा निरपवादपणे ‘जेत्या’ची निर्मिती करत होती. सामना बरोबरीत सुटणे हा प्रकार अतिशय दुर्मीळ होता. तसे झालेच तर कुणी तरी एक जण विजयी होईपर्यंत सामना खेळवला जायला लागला. याच क्रिकेट सामन्यांचे टी-ट्वेंटी हे स्वरूप आल्यावर तर क्रिकेट हा खेळ आणखी नाटय़मयरीत्या बदलला. आता या खेळामधला पुढचा बदल काय असेल हे कुणालाच माहीत नाही. पण तो जो काही असेल तो क्रीडाप्रेक्षकांचा उत्साह अधिकाधिक वाढवण्यासाठी असेल यात काहीच शंका नाही. मला विचाराल तर तीन दिवसांचे कसोटी सामने आणि प्रत्येकाच्या ५० षटकांच्या  दोन दोन इनिंग्ज असे स्वरूप असण्याची शक्यता मला तरी वाटते.

आता आणखीही काही नवे देश क्रिकेट खेळायला लागले आहेत आणि कुणाच्याही खिजगणतीत नसलेले लहान लहान संघ एखाद्या दिवशी एखाद्या बलाढय़ संघाला हरवायला लागले आहेत. अफगाणिस्तान हे त्याचे उदाहरण आहे. (विश्वचषकात पाचपैकी दोन सामने जिंकले.) अतिशय आश्चर्यकारक योगायोग म्हणजे टी-ट्वेंटी विश्वचषकात सहभागी होणारे सगळे १२ च्या १२ देश इंग्रजी बोलणारे असले तरीही माझ्या अंदाजानुसार या संघांमधील खेळाडू हिंदी, उर्दू, बंगाली, सिंहला, पर्शियन, पश्तू, आफ्रिकन आणि ओशिवांबू या भाषा बोलतात. कधी तरी हा खेळ जिथे इंग्रजी बोलली जात नाही अशा देशांमध्ये विशेषत युरोप तसेच दक्षिण अमेरिकेत पसरलाच तर तो फुटबॉल किंवा टेनिससारखा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय खेळ होईल.

भावनिक पाया

भारत आणि पाकिस्तान एकमेकांना क्रिकेटच्या मैदानावर जेवढे कट्टर प्रतिस्पर्धी मानतात तेवढे इतर ठिकाणी मानत नाहीत ही जास्त चिंतेची बाब आहे. या दोन्ही देशाच्या खेळाडूंमध्ये खेळल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही क्रीडा प्रकारामध्ये इतका वैरभाव दिसत नाही. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला हरवले. पण त्यामुळे पाकिस्तानी क्रीडा चाहत्यांचा रोष किंवा द्वेष उफाळल्याचे दिसले नाही. उलट झाले असते तरी भारतातही अशीच शांतता असली असती असे मला वाटते.

मग क्रिकेटमध्येच असे काय आहे की एरवी क्रिकेटबद्दल खडान्खडा माहिती असलेल्या भारतीय तसेच पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींच्या भावनांचा उद्रेक होतो? काही लोकांना असे वाटते की दोन्ही देशांमध्ये लढली गेलेली युद्धे, सीमापार दहशतवादी कारवाया आणि दोन्हीकडच्या राजकीय नेत्यांची भाषणबाजी या सगळ्याच्या मुळाशी आहे. पण मग असे असले तरी दोन्ही देशांमधले खेळाडू एकमेकांबरोबर हॉकीचे सामने खेळतात, मुष्टियुद्ध खेळतात, कुस्ती खेळतात. पण या खेळांच्या सामन्यांदरम्यान त्यांच्या चाहत्यांचे जणू काही सैनिकांमध्ये रूपांतर होताना दिसत नाही.

या सगळ्यामध्ये वेदनादायक बाब म्हणजे परस्पर वैरभावाने रानटी वळण घेतले आणि खेळाडूंना व्यक्तिगत पातळीवर लक्ष्य केले गेले. पाकिस्तानने भारताला हरवल्यानंतर मोहम्मद शामीला शिव्या दिल्या गेल्या. ट्रोल केले गेले. शामी हा मुस्लीम आहे हे यामागचे उघड कारण. त्याने ठरवून भारताला हरवले असा ट्रोलर्सनी त्याच्यावर आरोप केला. या आरोपापेक्षा आणखी पोरकट दुसरे काहीही असूच शकत नाही. तो करताना शामीच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाने किती सामने यापूर्वी जिंकले आहेत, हे आरोपकर्ते साफ विसरून गेले. ‘पाकिस्तानचा विजय म्हणजे इस्लामचा विजय’ ही पाकिस्तानी मंत्र्याची टिप्पणीही तितकीच कीव आणणारी होती. वास्तविक शामीप्रमाणेच अनेक मुस्लीम क्रि केटपटूंनी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मोहम्मद अझरुद्दीन, अब्बास अली बेग, सलीम दुरानी, मन्सूर अली खान, नबाब पतौडी अशी किती तरी नावे घेता येतील. यापैकी दोघांनी तर भारतीय संघाच्या कप्तानपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.

विष पसरवू नका

देशाच्या राजकीय अवकाशामध्ये जे विष पसरवले जात आहे तेच क्रिकेटच्या क्रीडागारामध्ये आणि जिथे क्रिकेट बघितले जाते, त्या लिव्हिंग रूममध्येही पसरले आहे, असे मला वाटते. देशातले कित्येक उत्तम लेखक, कवी, संगीतकार, चित्रकार, अभिनेते, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, वकील, खेळाडू, व्यावसायिक तसेच आमदार मुस्लीम आहेत. शामीचे क्रिकेटपटू म्हणून असलेले कौशल्य आणि त्याने आजपर्यंत केलेली कामगिरी यापुढे त्याचा धर्म कोणता हा मुद्दा गौण आहे. शामीला ट्रोल करणाऱ्यांची, शिव्या देणाऱ्यांची कप्तान विराट कोहलीने ताबडतोब ‘कणाहीन’ अशी संभावना हे फार चांगले झाले. विविध क्षेत्रांमधल्या लोकांनीही तेच केले. क्रीडा मंत्र्यांनी मात्र या सगळ्यावर मौन पाळणे पसंत केले ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

भारताच्या कोणाही नागरिकाला (आता या प्रकरणात शामीला) त्याच्या किंवा तिच्या धर्मावरून अपमानित केले जात असेल तेव्हा इतर प्रत्येक नागरिकाला आपलाच अपमान झाला आहे असे वाटले पाहिजे. न्यूझीलंडमध्ये एका गोऱ्या वर्चस्ववादी व्यक्तीने ५१ मुस्लिमांना ठार केले तेव्हा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंदा आर्डर्न यांनी त्यांच्या सगळ्या नागरिकांना तीन साध्यासुध्या शब्दांमध्ये एकत्र बांधले. ते शब्द होते, ‘वुई आर वन.’

भारतात हे तीन शब्द ऐकायची माझी इच्छा आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in  ट्विटर : @Pchidambaram_IN

मराठीतील सर्व समोरच्या बाकावरून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P chidambaram article on controversy during india pakistan cricket match zws
First published on: 16-11-2021 at 00:51 IST