अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी (गीताई अ. १६ - श्लो. ३) अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह । शरीर-श्रम, अस्वाद, सर्वत्र भय वर्जन।। सर्व धर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्श भावना । ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रत निश्चये ।। - विनोबा ‘गांधीजींनी पुष्कळ लिहिले आहे. त्यांत पुष्कळसे मौलिक साहित्यही आहे. तरीपण त्या सर्वाचे सार मंगल प्रभात आहे.’ - विनोबा. ‘हिंदू स्वराज’ ही गांधीजींची मौलिक साहित्यकृती. ‘आत्मकथा’ही आहेच. परंतु त्याहून सरस म्हणता येईल अशी कृती म्हणजे ‘मंगल प्रभात’. जुलै १९३० ते ऑक्टोबर १९३० या काळात मंगळवारच्या प्रार्थनेनंतर गांधीजींनी आश्रमासाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या ११ व्रतांवर स्फुट लिहिले. मंगळवारी सकाळच्या प्रार्थनेनंतर लिहिले म्हणून पुस्तकरुपात ते झाले ‘मंगल प्रभात’. अहिंसा, सत्य, चोरी न करणे, ब्रह्मचर्य पालन ही परंपरेतून आलेली नीतिमूल्ये आहेत. गीतेमधे दैवी संपत्तीच्या अनुषंगाने यापैकी काही गुणांची चर्चा आहे. योगशास्त्रातील यमनियम प्रसिद्ध आहेत. भारतीय परंपरेतील या अन्य नैतिक मूल्यांना गांधीजींनी कालसुसंगत मूल्यांची जोड दिली. सर्व धर्माकडे समभावाने पाहणे, आस्वाद, स्वदेशी आणि स्पर्शास्पर्श भाव सोडणे अशी ही भर दिसते. हे ११ नियम आश्रमवासी व्यक्तींसाठी त्यांनी अनिवार्य केले. त्यांना व्रतांचे रूप दिले. जुन्या आणि नव्या मूल्यांचा हा मेळ व्यवहारात आणला. विनोबांनी या ११ व्रतांना त्यांनी ‘अभंग व्रते’ अशी संज्ञा दिली. या नावातच एक अढळता आहे. विनोबांनी गांधीजींच्या व्रतांना दुहेरी रूप दिले. या व्रतांवर त्यांनी १०८ पद्ये लिहिली. ती लक्षात राहावीत म्हणून दोन छोटे श्लोक लिहिले. त्यांचा प्रार्थनेत समावेश झाला. ‘विन्या म्हणे’ अशी मुद्रा असणारी विनोबांची ‘अभंग व्रते’ ही बहुतेक एकमेव रचना असेल. गांधीजींच्या गद्य शैलीतील आशय कायम राखून ही पद्ये तयार झाली. विनोबांनी या व्रतांवर वेळोवेळी जे मनोगत मांडले त्याचेही संकलन पुस्तक रूपात उपलब्ध आहे. ‘ही एकादश सेवावी’ असे त्याचे नाव आहे. विनोबांच्या खेरीज या व्रतांवर आणखी दोन व्यक्तींची भाष्ये उपलब्ध आहेत. पहिले भाष्य विनोबांचे मधले बंधू बाळकोबा भावे यांचे आहे. तर दुसरे भाष्य ब्रह्मविद्या मंदिर पवनारच्या ज्येष्ठ भगिनी कालिंदीताईंचे आहे. गांधीजी, विनोबा, बाळकोबा आणि कालिंदीताई यांची व्रतांवरील ही भाष्ये वाचकाला खिळवून ठेवतात. हे लिखाण अनुभव आणि आचरण यांचा मेळ असल्याचाही प्रत्यय येतो. चौघाही व्यक्तींचे गीतेचे अध्ययन सखोल आहे. अन्य तिघांप्रमाणे कालिंदीताईंचे गीता भाष्य एकत्रितपणे उपलब्ध नसले तरी त्यांनी गीतेच्या सतराव्या अध्यायावर ‘ऐसी जीवनाची कळा’ ही पुस्तिका लिहिली आहे. गीता प्रवचनांची वर्तमानातील अपरिहार्यता सांगणारे ते लिखाण आहे. ही व्रते आणि साम्ययोग यांचे नाते पुढच्या लेखात.