अब्दुल कादर मुकादम

रात्रीचे दहा वाजून गेले होते. नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यावर वाचत बसलो होतो. तेवढय़ात व्हॉट्स अ‍ॅपवर हुसेन दलवाईंचे निधन झाल्याचा संदेश आला. ही बातमी कधी तरी येणार हे अपेक्षित होते. वयाची शंभरी त्यांनी यंदा गाठली असती. तसा वयाच्या नव्वदीतही त्यांना काही गंभीर आजार नव्हता. पण वयोमानाप्रमाणे काही मर्यादा पडणे आणि त्या वाढत जाणे साहजिक होते. पण कौटुंबिक आणि सामाजिक/ राजकीय क्षेत्रात यशस्वी आणि समृद्ध जीवन जगूनच त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. पण त्यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या जीवनाचा हा शेवटचा क्षण सर्वानाच अस्वस्थ करणारा होता.

Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Jitendra Awhad allegation
अजित पवारांच्या आदेशाने कळव्यातील मैदानाला टाळे लागल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “नको ती दादागिरी…”
Reactions of Political Leaders of Maharashtra in Famous Dialogues in Hindi Cinema
बाइट नव्हे फाइट…

माझा आणि त्यांचा स्नेहबंध जवळजवळ अर्धशतकाचा होता. या प्रदीर्घ स्नेहबंधनातून मला त्यांच्या लोभसवाण्या स्वभावाचा अनेकदा अनुभव आला. राजकारणात राहूनही त्यातल्या छक्क्यापंज्यांना त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर ठेवले. अशा या प्रयत्नातूनच त्यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली होती. त्यामुळेच राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कमी झाली नव्हती.

 त्यांची व माझी पहिली भेट  आजही मला आठवते. १९७२ किंवा ७३ सालातली ही घटना आहे. मरहूम हमीद दलवाईंनी सुरू केलेल्या मुस्लीम समाजातील परिवर्तनवादी चळवळीत मी दाखल झालो होतो. त्यामुळे हमीद यांच्याशी माझ्या भेटीगाठी वाढल्या होत्या. ते मुंबईत असले की ते फोर्टमध्ये येत असत. म्युझियम जवळची डेव्हिड ससून लायब्ररी हे आमचे भेटण्याचे ठिकाण होते. हे वाचनालय म्हणजे साहित्याची आवड असणाऱ्या चुकल्या माकल्या फकिरांची मशीद होती. असेच एके दिवशी आम्ही भेटलो असता हमीदभाई म्हणाले, चला आज आपल्याला हुसेन दलवाईंच्याकडे जायचे आहे. ते इथेच ओव्हल मैदानाजवळ राहतात. त्यांना नाही म्हणण्यासारखे काहीच कारण नव्हते. पण मनावर एक प्रकारचे दडपण आले. ते काँग्रेसचे आमदार. मी तसा हमीदभाईंचा सहकारी म्हणजे पुरोगामीच! तेव्हा आपले स्वागत कसे होईल अशी एक हुरहूर वाटली. त्यांची वैचारिक भूमिका कोणती आहे, हे मला माहीत नव्हते. पण हमीदभाईंनी माझी ओळख करून दिली तेव्हा मोकळय़ा मनाने त्यांनी माझे स्वागत केले. इतकेच नव्हे तर माझे लेख ते अगत्याने वाचतात असेही त्यांनी सांगितले!

पहिल्या भेटीतच त्यांचा आणि माझा सूर झुळला. साहजिकच या काहीशा औपचारिक भेटीचे रूपांतर दीर्घ स्नेहबंधात झाले. कारण ‘राष्ट्र सेवा दला’तले संस्कार हा आमच्या दोघांमधला समान दुवा होता. त्यांची शैक्षणिक अर्हता पाहिली तर ते वकील व्हायला पाहिजे होते. काही काळ त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली केलीदेखील. पण नियतीने त्यांच्या जीवनासाठी वेगळाच मार्ग निश्चित केला होता. सामाजिक जाणीव हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक होता. या जाणिवेतूनच त्यांनी राजकारणाचे क्षेत्र निवडले असावे. काही का असेना; पण जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या या क्षेत्रात ते यशस्वी झाले हे कुणालाही नाकारता येणार नाही. मात्र हे यश मिळविताना ते राजकारणातील अशिष्ट गोष्टींपासून नेहमीच दूर राहिले.

१९६७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर खेड (जि. रत्नागिरी) विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकली. राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतरची ही पहिली निवडणूक! त्यानंतर १९७८ पर्यंत ते आमदार म्हणून निवडून आले. इतकेच नव्हे तर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात ते कायदामंत्रीही झाले. त्यानंतर राज्यसभेवरही दोनदा त्यांची निवड झाली होती.

सामाजिक कार्याविषयी त्यांना उपजतच ओढ होती. त्यामुळेच भारत सेवक समाज, नव कोकण शिक्षण समाज, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा समाजसेवी संस्थांशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्रातील कार्य ज्या बांधिलकीने ते करत असत तीच बांधिलकी त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कार्यातही दिसून येत असे. त्यांच्या मतदार संघाशीही त्यांचा सतत संपर्क असे. त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्यांचा त्यांच्या घरी सतत राबता असे. त्यांच्या दिवाणखान्यात तिन्ही भिंतींना लागून सोफा, खुच्र्या लावलेल्या असत. आणि समोर स्वत: हुसेनभाई बसलेले असत. हे नेहमीचे दृश्य होते. म्हणून मी त्याला ‘दरबार’ म्हणत असे. या ‘दरबारा’त सर्वानाच प्रवेश असे. हुसेन भाईंच्या खुर्चीच्या बाजूलाच अणखी एक खुर्ची असे. समोर बसलेल्या प्रत्येकाला जवळ बोलावून त्यांचे म्हणणे, विनंती किंवा तक्रारी नीट ऐकून घेत असत. हेच त्या दरबारी कामकाजाचे वैशिष्टय़ होते.

मात्र गेल्या काही वर्षांपासून हा दरबार बंद झाला होता. सतत गजबजत असलेल्या या ‘दिवाणे आम’मध्ये एक अनामिक उदासीनता भरून राहिली होती. त्यांनी वयाची ९९ वर्षे गाठली होती. अर्थात नियतीने त्यांना बहाल केलेले आयुष्य ते समर्थपणे व समृद्धीने जगले. ही वास्तूही त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाली होती आणि म्हणूनच ती अदृश्य उसासे टाकत आपली उदासीनता व्यक्त करत आहे असे वाटते.