योगेन्द्र यादव

सर्व शिक्षित भारतीयांना भारतीय म्हणून सन्मानाने जगू देणारे, वैचारिक स्वातंत्र्य देणारे आणि श्रमप्रतिष्ठा, राज्यघटनेतली जगन्मान्य मूल्ये यांचा संस्कार मुरवणारे ‘शिक्षणाचे भारतीयीकरण’ हवेच आहे.. नुसती धर्माभिमानी फोडणी नको!

शिक्षणाचे भारतीयीकरण हवे की नको हा प्रश्न नाहीच. ते करायला हवे, पण कसे करायचे हा खरा प्रश्न आहे. शिक्षणातले मुख्य पदार्थ तेच ठेवून त्याला निव्वळ भारतीयीकरणाची फोडणी द्यायची की भारताच्या गरजा, भारताची संस्कृती आणि परंपरा यांच्यात आधुनिक शिक्षण लोणच्यासारखे मुरू द्यायचे, हे ठरवावे लागेल. ते कसे, याची चर्चा आजच्या लेखात.

या लेखाला निमित्तमात्र ठरणारे प्रसंग बरेच आहेत. त्यांपैकी ताजा म्हणजे, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या एका वक्तव्यामुळे उद्भवलेला वाद. हरिद्वारच्या ‘देव संस्कृती विश्वविद्यालया’मधील ‘दक्षिण आशियाई शांतता व सलोखा संस्थे’च्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भारतीयीकरणाचा विषय काढला. थॉमस बॅिबग्टन मेकॉलेच्या चाकोरीतून शिक्षणाला मुक्त करण्याची भाषा झाली, आपल्या मुळांकडे आपण परत गेल्याखेरीज आपल्याला आपला सांस्कृतिक वारसा किती महान आहे हे कळणारच नसल्याचे सांगून मातृभाषांबद्दल आज आपल्याला ‘कमीपणाची भावना’ वाटते याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला.. आणि मग नायडूच म्हणाले की, याला कुणी ‘भगवेकरण’ म्हणेल, पण ‘भगवा असेल तर काय हरकत?’ झाले! याच विधानाच्या बातम्या होऊन, मेकॉलेने आखलेली चाकोरी मोडण्याचा विषय मागेच पडला.

संवादाविना वाद!

गुजरात सरकारने भगवद्गीता शालेय अभ्यासक्रमात शिकवण्याचा निर्णय हल्लीच घेतला. गीता शिकायची म्हणजे पाठांतर आवश्यक. याच निर्णयाला जोडून गुजरात सरकारने असेही ठरवले आहे की, कोणत्याही माध्यमाच्या शाळांत पहिलीपासून इंग्रजी शिकवायचेच आणि सहावीपासून विज्ञान आणि गणित इंग्रजीतूनच शिकायचे (म्हणजे विज्ञानाची घोकंपट्टी इंग्रजीत करायची). दुसरीकडे, राज्यसभेत भाजप-सदस्य राकेश सिन्हा यांनी हल्लीच, ‘भारतीय ज्ञानपरंपरांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या संस्था प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापण्याचा निर्णय सरकारने घ्यावा’ असे अशासकीय विधेयक मांडले आणि ते चर्चेलाही आले, तेव्हा पुन्हा मेकॉलेचा उद्धार झाला होता. पण आता बहुधा या असल्या बातम्यांची सवय झाली आहे आपल्याला. वास्तविक, सरकारने एकाच धर्माच्या ग्रंथाची सक्ती करण्याचा निर्णय हा राज्यघटनेच्या अनुच्छेद २८ (१) आणि २८ (३) यांच्याशी पूर्णत: विसंगत आहे. भारतीयीकरण आणि ‘भगवेकरण’ यांमधला फरक ओळखूच न आल्याबद्दल, या दोहोंची ओळख असणारे सार्थ टीका करताहेत आणि जिल्ह्याजिल्ह्यांत विशिष्ट संस्था स्थापण्याच्या त्या विधेयकावर प्रश्न विचारले जाताहेत की, ‘आपल्या’ ज्ञानपरंपरा म्हणून कुणाच्या परंपरा जपायच्या? फक्त लिखित परंपराच जपणार असू तर ‘आपल्या’ म्हणजे ब्राह्मणांच्याच, असे गृहीत धरायचे का?

यावर वाद होणे हे चांगले लक्षण म्हणावे, तर वादातून काहीएक संकल्पनांचा संवाद व्हावा, ही अपेक्षा फोलच ठरते. ‘फोडणी’ इथली, ‘फ्यूचर’ कुठे? हे असेच नेहमी होते, कारण सध्या जोरावर असलेल्या रा. स्व. संघ-भाजप यांची शिक्षणाच्या भारतीयीकरणाबद्दलची विधाने. ती अखेर, ‘शिक्षणाला वरून भारतीय दिसणारी फोडणी द्या’ अशाच अर्थाचा आग्रह मांडणारी ठरतात. प्रत्यक्षात आज शिक्षण हवे ते कसे आणि का, याविषयी ठोस कल्पना नसल्यास मग गुरू-शिष्य परंपरा या आता अशक्य असलेल्या पद्धतीचा उल्लेख करायचा, भारतच कसा ‘जगत्गुरू’ वगैरे अवाच्या सवा दावे करायचे हे प्रकार वारंवार होतात. अगदी नव्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणा’मध्येही हे उल्लेख आहेतच. या अशा ‘फोडणी’चा आणखी एक भाग म्हणजे कुठलीशी स्तोत्रे वा अन्य हिंदू धर्मीय ग्रंथ ‘नीतिशिक्षणा’चा भाग म्हणून शिक्षणात आणणे आणि एकीकडे अन्य धर्मामधील नीतिमूल्ये दुर्लक्षित करून, दुसरीकडे धर्मनिरपेक्षता आणि धर्मसंबंधित हक्क यांनाही वादग्रस्त ठरवणे. हे गुजरातने केल्याचे ताज्या उदाहरणातून दिसले. गुजरातमध्ये इंग्रजी माध्यमापुढे सपशेल लोटांगण घालून भगवद्गीतेची सक्ती काय किंवा दिल्ली सरकारने आणलेला ‘देशभक्ती अभ्यासक्रम’ काय, यातून प्रसिद्धीचा सोस जरूर दिसतो. पण शिक्षणपद्धती, शिकवण्याची पद्धत, ज्ञानग्रहणाची रीत यांचा विचार न केल्यामुळे सारेच ‘मूल्यशिक्षण’ घोकंपट्टीपुरते, अमुक मार्कापुरते उरते आणि त्याचे हसेच होत असते.

हा असल्या प्रकारचा ‘शिक्षणविचार’(!) केवळ हास्यास्पदच नव्हे, तर नुकसानकारकही आहे, म्हणून तो संपूर्णपणे टाळलेलाच बरा. ‘आपल्याकडे सारे काही ज्ञान होते’ असा आव आणून ‘अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’, ‘कॉस्मेटिक सर्जरी’ असे शब्द (हटकून इंग्रजीतच) उच्चारले जातात, वाट्टेल ते दावे केले जातात तेव्हा ते भंपक आहेत हे वैज्ञानिकांना माहीत असते. भारतविद्येचे किंवा प्राचीन भारतीय इतिहास, मिथके आणि ग्रंथ यांचे अभ्यासकही इतक्या तोंडाळपणे केलेल्या त्या दाव्यांमुळे हबकून जातात. धर्मनिरपेक्षतावादी कार्यकर्ते विरोधक करत राहतात आणि शिक्षणतज्ज्ञ कसनुसे हसत असतात. सामाजिक न्यायाची चाड असलेल्या सर्व जणांकडे दुर्लक्ष करून, ब्राह्मणी ज्ञानपरंपरेलाच स्थान आणि अन्य ज्ञानपरंपरांचा अनुल्लेख, असा प्रकार सुरू राहतो. अशा वेळी संगणकावरून वा वातानुकूलित वर्गखोल्यांमध्ये ‘ज्ञानदान’ करण्याचा शिक्षणधंदा उघडलेले शिक्षणव्यापारी मात्र प्राप्त परिस्थितीत कोणाचा जोर आहे हे नेमके ओळखून, त्याप्रमाणे जाहिराती करतात- मूळ शिक्षण मात्र, ‘इंडियात काही फ्यूचर नाही’ या पालक-ग्राहकांच्या भ्रमाला गोंजारणारेच असते.

मुरलेले लोणचे, मुरांबासुद्धा..

शिक्षणाच्या भारतीयीकरणाची नवी पद्धत शोधून ती सत्वर अमलात आणल्याखेरीज काही खरे नाही. ‘फोडणी’ नको आहे हे नक्की, कारण फोडणी दिलेला मूळ पदार्थ तसाच असतो. म्हणजे इथे आपल्या उदाहरणात, शिक्षण पाश्चात्त्यच असते. त्याचा मजकूर बदलतच नाही. तो बदलायचा कसा? भले काही संकल्पना पाश्चात्त्य असतील, पण आपणा भारतीयांच्या आजच्या गरजांशी त्यांचा संबंध जोडायला हवा, भारतातल्या विविधांगी ज्ञान-कौशल्य परंपरांना आत्मसात करणारी शिक्षणपद्धती हवी.. ही प्रक्रिया संथ असेल, तिला वेळ लागेल, पण ती टिकाऊ ठरेल हे नक्की. त्यासाठी काय काय करायचे? यादीच करू :

(१) इंग्रजी माध्यमाचा जो काही वरवंटा आपल्या मुलामुलींवर फिरतो आहे तो थांबवून, भाषिक वर्णभेदाला आळा घालण्याची धमक राज्यकर्त्यांनी दाखवणे, हा पहिला उपाय. तो करायलाच हवा कारण शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ आणि बोधमानसशास्त्रज्ञ हे सारे जण कधीपासून सांगताहेत की, मातृभाषेतच शिक्षण घेतल्यास मुलाचा भाषिक विकाससुद्धा (यात इंग्रजी शिकणेही आले) चांगला होतो.

 (२) ‘करण्या’ला शिक्षणात महत्त्व हवे. श्रमप्रतिष्ठा हे मूल्य आजच्या मुलामुलींनी ओळखले पाहिजे हा भाग त्यामागे आहेच, पण कौशल्ये अनेक असतात, ती आत्मसात करण्यासाठी कल आणि मेहनत यांचा संयोग घडवावा लागतो, हे मूल्य प्रस्थापित झाल्याखेरीज ‘अमक्या घरी लिवणं, तमक्या घरी गाणं’ यांसारख्या अखेर ब्राह्मणवादी ठरणाऱ्या ठोकताळय़ांच्या पलीकडे भारतास जाता येणार नाही.

(३) सर्व विषयांचा संबंध भारताशी कसकसा आहे, हे ओळखून तो जोडला पाहिजे, म्हणजे अगदी मूलभूत विज्ञानातील संकल्पनांचासुद्धा भारतीय संदर्भ शोधायला काय हरकत आहे? (अत्युच्च तज्ज्ञपातळीवर हे करणाऱ्या संशोधन संस्था आपल्याकडे १९५० च्या दशकापासून आहेतच, प्रश्न शाळेतही ती मानसिकता रुजवण्याचा आहे) भारत हा पाश्चात्त्य ज्ञानाचे ‘उपकेंद्र’ ठरणाऱ्यांतला देश नाही, हे आपण या अशा प्रयत्नशील कृतीतून दाखवून द्यावे लागेल.

(४) जगातले सारे ज्ञान भारतीय विद्यार्थ्यांनी आकळून घ्यावेच, पण असे हे भारतीय विद्यार्थी भास, शूद्रक, कालिदासासारखे नाटककार, त्यांच्या काळातील वाङ्मयापासून दिसणारे सामाजिक वैविध्य, दागिने घडवण्यापासून युद्धनीतीपर्यंतच्या ज्ञानपरंपरा यांचीही ओळख असलेले असावेत. परंपरेविषयीची जाण एखाद्या धर्मापुरती असून चालत नाही, याचे भान येऊन देशाशी नाते घट्ट व्हावे.

(५) आजच्या आधुनिक भारताची निर्मिती ज्या दीर्घ स्वातंत्र्यलढय़ातून आणि त्याआधीच्या प्रबोधनातून झाली, त्या साऱ्याचे वैचारिक फलित ठरणारी आणि आधुनिक काळात जगन्मान्य अशी नीतिमूल्ये आपणांस देणारी ‘भारतीय राज्यघटना’ कशी आचरणीय आहे, हेही नव्या पिढीला शिक्षणातून उमगावे. ही अखेरची अपेक्षा पूर्ण न झाल्यास भारतीयीकरणही मागेच राहील.

‘सा विद्या या विमुक्तये’ या (विष्णुपुराणातील) वचनाचा अर्थ, ‘शिक्षण तेच, जे स्वातंत्र्य देते’ असा होतो. (कुणी यात आध्यात्मिक अर्थ शोधून, विद्येमुळे मोक्षमुक्ती मिळते म्हणेल! पण प्रपंचात राहून, आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना वैचारिक स्वातंत्र्य शिक्षणाने द्यावे की नाही?)

गांधीजी म्हणत : ‘माझ्या घरावरून हरप्रकारच्या संस्कृतीचे वारे जरूर वाहावेत, अगदी मुक्तपणे वाहावेत, पण मी माझे पाय लटपटू देणार नाही.’ याच वाक्याचा पुढला भाग असा की, ‘मी दुसऱ्याच्या घरात नकोसा पाहुणा किंवा आश्रित किंवा याचक म्हणून जाणार नाही’ – ही विधाने आजच्या शिक्षणपद्धतीला – जी मंडळी ‘इथे फ्यूचर नाही’ म्हणतात, त्यांनीच घेतलेल्या महागडय़ा शिक्षणाला – लावून पाहा. त्या तसल्या शिक्षणावर फोडणी दिल्यासारखे ‘भारतीयीकरण’ हवे आहे का कुणाला? की, ‘नकोसा पाहुणा किंवा आश्रित किंवा याचक’ न ठरता, भारतीय म्हणून सन्मानाने जगू देणारे शिक्षण हवे आहे?

yyopinion@gmail.com