एके काळी मराठीचा मुद्दा हातात घेऊन आपल्या स्वतंत्र राजकारणाची सुरुवात करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेण्याची वेळ का आली? सुरुवातीला धडाक्यात सुरू झालेले मनसेचे इंजिन अजूनही जागेवरच का आहे? पक्षाच्या या स्थितीला नेतृत्वच कसे जबाबदार आहे?

सुनील चाफे

scuffle in JNU
Video: JNU मध्ये पुन्हा राडा; अभाविप व डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, निवडणुकीचं वातावरण तापलं!
pakistan election 2024 imran khan asks imf to conduct poll audit before the loan disbursement
निवडणुकांमध्ये विजयी जागांची पडताळणी करा; कर्जवाटपाआधी इम्रान यांचे नाणेनिधीला पत्राद्वारे आवाहन
Himachal Pradesh Speaker disqualifies 6 Congress MLAs
हिमाचलमध्ये राजकीय उलथापालथ चालूच! काँग्रेसचे ‘ते’ सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; कारण काय?
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?

मनसेची स्थापना होऊन १६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान मनसेचा निवडणुकीतील आलेख बघता पक्षाला लागलेली उतरती कळा प्रकर्षांने समोर येते. मोठा गाजावाजा करत मनसेची स्थापना झाली. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे’, ‘तुमचा मुलगा मनसेत आहे, याचा तुम्हाला अभिमान वाटेल’ या प्रकारची भावनिक साद राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला घातली. मनसे स्थापन होताना विठ्ठलाचा साक्षात्कार न झालेल्या राज ठाकरेंना बडव्यांचा मात्र साक्षात्कार  झाला. त्याचे खोटे भांडवल त्यांना सहानुभूतीच्या लाटेवर स्वार करते झाले. मनसेच्या स्थापनेनंतर २००७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अवघ्या सात जागांवर समाधान मानावे लागले. २००७ सालच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात २००० सालापर्यंतच्या झोपडपट्टय़ा अधिकृत करण्याचे आश्वासन देणारे राज ठाकरे आज मुंबईतील बकाल झोपडपट्टय़ांबाबत बोलत आहेत.

 मनसेला अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने राज ठाकरेंनी २००८ साली आपला मोर्चा परप्रांतीयांकडे वळवला. एका सामाजिक मुद्दय़ाला राजकीय वळण देत आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. परिणामी मनसेला २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते मिळाली. एकदोन अपवाद वगळता मनसेचे सर्व उमेदवार युतीत शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या जागांवर लढले. परप्रांतीयांचा मुद्दा जिवंत ठेवत मनसे २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीला सामोरी गेली आणि पहिल्याच प्रयत्नात मनसेचे १३ आमदार निवडून आले. २००९ साली मतदारसंघ पुनर्रचना आणि भाजपचा मनसेला असलेला छुपा पाठिंबा यामुळे शिवसेना विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावर गेली. मनसे १३ आमदारांना घेऊन रस्त्यावर राडा, परप्रांतीयांना मारहाण, टोलनाके तोडफोड यातच गुंतलेली होती.

मनसेने २०१२ साली भाजपच्या मदतीने नाशिक महानगरपालिकेची सत्ता मिळवली, मात्र ही सत्ता त्यांना २०१७च्या निवडणुकीत टिकवता आली नाही. जनतेला काय हवे आहे, यापेक्षा स्वत:ला काय द्यायचे आहे यालाच मनसेने प्राधान्य दिल्याने नाशिक महापालिकासुद्धा या पक्षाच्या हातून निसटली. २०१२ साली मनसेला मुंबईत २८ जागांवर विजय मिळवता आला, परंतु २०१७ साली ही संख्या सहावर आली. मनसेकडे परप्रांतीयांच्या विरोधात हिंसाचार हाच एककलमी कार्यक्रम असल्याने २०१७ साली मनसेची मुंबई, पुणे, ठाणे महापालिकांत पीछेहाट झाली. इतके असूनही परप्रांतीयांचा प्रश्न अद्याप कायम आहे, त्यामुळे त्याविरोधात केलेला हिंसाचार हा केवळ राजकारणाचाच भाग होता यावर शिक्कामोर्तब होते. आज हिंदुत्वाचा आधार घेणाऱ्या राज यांनी याच परप्रांतीय हिंदुवर गेली १६ वर्षे हल्ले केले आहेत. परप्रांतीयांना उपरे म्हणून हिणवणाऱ्या राज यांनी राजकीय आत्मपरीक्षण केले तर त्यांना ते स्वत:च राजकारणातील उपरे असल्याचा साक्षात्कार होईल.

कधी भाजपला अनुकूल भूमिका तर कधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रचार. यापेक्षा राज यांनी स्वत:च्या पक्षाला धोरण, कार्यक्रम दिले असते, तेवढे श्रम स्वपक्षासाठी घेतले असते, तर मनसेला इतर पक्षांच्या दावणीला बांधण्याची वेळ राज यांच्यावर आलीच नसती. २०११-२०१४ दरम्यान राज ठाकरेंनी मोदींच्या नावाचा वापर करत मनसे वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मतदारांनी झिडकारले. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसेची तीच परिस्थिती कायम राहिली. जनतेने निवडून दिलेल्या मनसेच्या लोकप्रतिनिधींनी मतदारांची उपेक्षा केल्यामुळे मतदारांनी त्यांना नाकारले. २०१४ सालापासून राज ठाकरेंचा भाजपप्रेमाचा बुरखा उतरला आणि मनसेकडून भाजपला लक्ष्य केले जाऊ लागले. राज ठाकरे नाशिक महापालिकेत केलेली कामे आणि ब्लूपिंट्रच्या प्रभावातून बाहेर पडू शकले नाहीत. २०१४ ते २०२२ मनसे राजकीय पक्ष म्हणून निष्क्रियच राहिली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे न करता राज यांनी भाजपविरोधात प्रचार केला. कधी ईव्हीएम, कधी भाजपचे हिंदुत्व, कधी भाजपचे भावनिक राजकारण यावर राज अधूनमधून भूमिका मांडत होते. मनसेकडे जनतेसाठी कुठलाच कार्यक्रम नव्हता. राज ठाकरे आणि मनसे गोंधळलेली, विस्कळीत, धरसोड वृत्तीची असल्याचे मत जनतेत रुजू लागले होते. राज ठाकरे मात्र मतदारांना दूषणे देण्यात मग्न होते. अगदी परवाच्या सभेपर्यंत राज यांच्या तोंडी हीच भाषा होती.

राज ठाकरेंनी जनतेत जाण्याऐवजी पक्षाचा झेंडा बदलणे, पक्षाच्या चिन्हाची दिशा बदलणे, एवढेच केले. मनसेकडून राज ठाकरेंना कधी मराठी हृदयसम्राट, कधी हिंदुहृदयसम्राट तर कधी हिंदुजननायक अशी उपमा देण्याचा प्रयत्न झाला. राज ठाकरेंना स्वत:चे असे ब्रँिडग करायची गरज वाटली कारण त्यांनी लोकांच्या खऱ्या, महत्त्वाच्या प्रश्नांना कधी हात घातलाच नाही.  ठाकरे कुटुंबातील असूनही राज यांनी कर्नाटक सीमाप्रश्नावर केलेले असंवेदनशील वक्तव्य दुर्दैवी आहे. ज्या महाराष्ट्रासाठी प्रबोधनकार लढले, बाळासाहेबांना तुरुंगवास घडला त्याच कुटुंबातील राज मात्र हा विषय संपल्याचे जाहीर विधान करतात. राज यांच्यासाठी तो राजकारणाचा भाग असेल, परंतु सीमाभागातील मराठी भाषकांसाठी तो स्वाभिमानाचा भाग आहे.  वर्षांतून कधी तरी निवडणुका असल्या की राज ठाकरे जागे होतात आणि काही तरी बरळतात, हे राज यांच्याबद्दलचे विधान खरेच आहे. राज यांच्याकडे कुठलेही राजकीय धोरण नाही, त्यांच्या राजकीय भूमिकेत सातत्य नाही आणि याचा दोष मात्र ते मतदारांच्या माथी मारतात. कोणावर आडनावावरून, कोणावर चेहऱ्यावरून, तर कोणावर शरीरयष्टीवरून टीका करण्याचे स्वातंत्र्य राज यांना कोणी दिले? राज असल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेचे स्वातंत्र्य स्वत:हून घेत असतील, तर त्यांनी इतरांनी केलेल्या टीकेचाही स्वीकार करणे शिकायला हवे. राज ठाकरे गेली ३०-३२ वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्यात अपेक्षित प्रगल्भता येताना दिसत नाही. मनसेला स्थापनेपासून आजवर निवडणुकीत उतरती कळा लागल्याचे दिसते. २००९ साली मनसेला ५.७१ टक्के मते होती, ती २०१४ साली ३.६० टक्के, तर २०१९ साली २.२५ टक्के अशी कमी होत गेली.

राजकारणात यश व अपयश दोन्ही पचवता यायला हवे, हे राज यांच्या १६ वर्षांच्या राजकीय जीवनात कधीच दिसले नाही. त्यांच्यातील राजकीय परिपक्वतेचा अभावच प्रकर्षांने समोर आला. इतर पक्षांच्या जिवावर राज एकदा यशस्वी झाले, परंतु राजकारणात सदासर्वकाळ या पद्धतीने यश मिळत नाही. २००५ सालापासून परप्रांतीय विद्यार्थ्यांना, टॅक्सीचालकांना, भाजी-फळविक्रेत्यांना मारहाण हाच एक कार्यक्रम राज यांनी स्वीकारला. नकला, टिंगलटवाळी यावर राजकारणात प्रस्थापित होता येत नाही. त्यामुळेच ज्यांना पूर्वी विरोध केला त्यांनाच जवळ करण्यासाठी हनुमान चालीसाचा आधार घ्यावा लागत आहे. लोकशाहीत राजकीय वारसदार जनताच ठरवत असते. बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार म्हणून जगापुढे येऊ पाहणाऱ्या राज यांना जनतेने नाकारले आहे, हे सत्य राज स्वीकारू शकलेले नाहीत.