|| धनंजय जुन्नरकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबात भाजपच्या प्रचारसभेसाठी जात असता त्यांची वाट अडवली जाणे, यामागे काँग्रेसचे कारस्थान असल्याचा आरोप ‘पहिली बाजू’ या सदरात गेल्याच आठवड्यात प्रकाशित झालेल्या लेखात भाजपतर्फे करण्यात आला होता. ते आरोप खोडून काढण्यासाठी प्रत्युत्तरे देताना प्रत्यारोपही करणारा हा प्रतिलेख…

भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बलुनी जे भाजपचे प्रमुख राष्ट्रीय प्रवक्तेदेखील आहेत, यांचा एक लेख ११ जानेवारीच्या ‘लोकसत्ता’ अंकात, ‘पहिली बाजू’ या सदराखाली प्रकाशित झालेला आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या गाडीचा ताफा अडवला, या घटनेबाबत काँग्रेसवर दोषारोप करणारा हा लेख आहे. लेखाचे शीर्षकही ‘पंजाबातली घटना हे काँग्रेसचेच षड्यंत्र’ असे भाजपच्या याविषयीच्या प्रचाराला साजेसे आहे.

‘खोटे बोल पण रेटून बोल’ या रा. स्व. संघ परिवाराच्या अलिखित घोषवाक्याच्या मुशीतून भाजप कार्यकर्ता घडत असतो. त्यामुळे अनिल बलुनी यांना हे ‘बाळकडू’  मिळाले नाही असे कोणी म्हणू शकणार नाही.  देशातील- राज्यातील प्रमुख प्रसारमाध्यमांना पायाखाली चेचून एकांगी खोटा प्रचार भाजपने चालू केलेला आहे, याचे मात्र वाईट वाटते.

‘पंजाबमध्ये बुधवार, ५ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा अडवला गेला व सुरक्षेसंदर्भात खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला, या साऱ्या प्रकाराला काँग्रेसच जबाबदार आहे…’ अशा बेछूट आरोपाचा डांगोरा भाजप देशभर पिटत आहे. देशातील प्रत्येक वाईट गोष्टीसाठी भाजप पं. जवाहरलाल नेहरूंना जबाबदार ठरवते. महात्मा गांधींना जबाबदार ठरवते. मोदींच्या ताफ्याच्या प्रकरणात भाजपने अजून तरी नेहरू-गांधी यांना जबाबदार धरले नाही, हे देशाचे नशीबच म्हणावे लागेल.

दिल्लीच्या सीमेवर एक वर्षाहून जास्त काळ झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन, त्यांचे झालेले ७०० च्या वर मृत्यू यामुळे आपल्याला पुढील निवडणुका जड जाणार आहेत, हे सतत निवडणुका आणि प्रचाराच्याच तयारीत असलेल्या मोदी यांनी ओळखून शेतकऱ्यांविषयीचे तीन काळे कायदे मागे घेतले.

परंतु हमीभावांना कायदेशीर अधिष्ठान देणे, आंदोलक शेतकऱ्यांवरील खटले मागे घेणे आणि आंदोलनातील ७०० मृतांच्या कुटुंबीयांना मदत देणे- याविषयीच्या मुद्द्यावर अद्याप देशात- पंजाबात निरनिराळ्या ठिकाणी रोज आंदोलने होत आहेत. असो. आता लेखातील आरोपांकडे येऊ.

या लेखात बलुनी म्हणतात, राज्याच्या मुख्य सचिव यांनी ताफ्यात असायला हवे होते. परंतु राज्याच्या मुख्य सचिवांना करोना झाल्याबाबत पंजाब सरकारने पंतप्रधान कार्यालयाला दोन दिवस आधीच लेखी कळवले होते. तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीर्तंसग चन्नी हे मुख्य सचिवांच्या संपर्कात आलेले असल्याने त्यांनीदेखील येऊ नये, असे पंतप्रधान कार्यालयाने कळवले होते.

‘पंतप्रधान कार्यालयाने मुख्यमंत्री चन्नी यांना वारंवार फोन केले व त्यांनी फोन उचलला नाही’  हीदेखील शुद्ध लोणकढीची थाप भाजपने सर्वत्र मारलेली आहे. वास्तविक, असा कोणताही फोन आपल्याला आलेला नाही, असेल तर भाजपने ‘कॉल रेकॉर्ड’ जाहीर करावे असे प्रतिआव्हानदेखील पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीर्तंसग चन्नी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेले आहे.

भाजप हा पंजाबात अकाली दलाच्या आधारानेच राजकारण करतो. पण अकाली दलाने शेतकऱ्यांच्या काळ्या कायद्याच्या मुद्द्यावरून भाजपशी युती संपुष्टात आणल्याने, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व हल्लीच पक्ष सोडलेल्या कॅप्टन अर्मंरदर सिंग यांचे बोट धरून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करत आहे.

७० हजार खुर्च्या मांडलेल्या जाहीर सभेत ७०० खुर्च्यादेखील भाजप आणि अमरिंदर सिंग भरू शकले नाहीत. ‘एसपीजी’चा काही अहवाल असलाच, तर तो या कमी गर्दीबद्दल असावा आणि रिपोर्टमुळे मोदींना घाम फुटला.

इंग्रजीत ‘सेफ पॅसेज’ असा शब्दप्रयोग आहे. सन्मानाने परत जाण्याची पळवाट, असा त्याचा एक अर्थ. पंतप्रधानांना अशी सन्मानाने परतीची पळवाटदेखील नीट मिळवता आली नाही.  आपली अब्रू वाचवायचा प्रयत्न करण्याच्या नादात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षेबाबत देशाची इभ्रत पणाला लावलेली आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी व नरेंद्र मोदी यांच्यात आता सरळ सरळ लढत आहे, असे मोदी यांच्याच उद्गारांवरून दिसून येत आहे. आता आम आदमी पक्षाचे व अकाली दलाचे सत्तेचे स्वप्न चिरडले गेले आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

दहा ते बारा किलोमीटर अंतरदेखील हेलिकॉप्टरने जाणारे पंतप्रधान १८० किलोमीटरचे अंतर रस्त्याने जाण्याचा निर्णय कसा काय घेतात ? हाही संशोधनाचा विषय आहे. याची चौकशी एसपीजी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यामार्फत  होण्याची गरज आहे. त्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही.

त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा असा की, या प्रकरणात एक ते दीड किलोमीटर अंतरावर आंदोलनाला बसलेले शेतकरी हे काही दहशतवादी नव्हते.  मोदीजींनी त्या मोर्चाला सामोरे जाऊन शेतकऱ्यांना धीराचे चार शब्द बोलायचे  होते. त्यात त्यांचे नेतृत्वकौशल्य दिसले असते.

पाकिस्तानात जाण्याचा कोणताही कार्यक्रम ठरलेला नसताना विमान उतरवून, त्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या गळ्यात गळे घालून बिर्याणी खायला त्यांना भीती वाटली नाही व आपल्याच गरीब शेतकऱ्यांना घाबरून परत फिरावे लागले यावर कोण विश्वास ठेवणार?

काँग्रेस पक्षाने दहशतवादाशी जो लढा दिला आहे तो जगाने पाहिला आहे.  देशाचे दोन पंतप्रधान, एक मुख्यमंत्री, माजी मंत्री काँग्रेसने गमावलेले आहेत. त्यामुळे भाजपने कितीही खोट्या प्रचाराचे काहूर माजवले तरी आता कुणी त्यावर विश्वास ठेवणार नाही.

एक किलोमीटरच्या अंतरावरील गरीब शेतकऱ्यांना घाबरून- हजारो कोटींची शस्त्रसुरक्षा असलेले ५६ इंच छातीचा दावा करणारे मोदी घाबरतात व र‘जिंदा लौट के आया’ अशा बाता मारतात, हे पटण्यासारखे नाही.

खोट्या आरोपांनी भाजपने पंजाब तर गमावलेला आहेच. पण उत्तर प्रदेश व इतर राज्यांतदेखील त्यांच्या मंत्र्यांची- आमदारांची दुसऱ्या पक्षात  पळापळी सुरू झालेली आहे. भाजपच्या नेतृत्वाची लक्तरे आता दिसू लागली आहेत. ही हाराकिरी रोखता येईल अशी काही चिन्हे आता दिसत नाहीत.

लेखक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चित्रवाणी वक्ते (टीव्ही पॅनेलिस्ट) आहेत. djunnarkar92@gmail.com