रावसाहेब पुजारी
भारतीय उपखंडातील बहुतांश शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे. अंदाजाप्रमाणे पाऊस न पडणे म्हणजे देशातील बहुसंख्य असलेल्या शेतकरी समाजाच्या जिवाशी खेळ आहे. याचे अनेक घटकांवर दूरगामी आणि विपरीत परिणाम होत असतात. यंदा त्याची प्रचिती अधिक तीव्रतेने समोर आलेली आहे.

भारतीय उपखंडातील बहुतांश शेती ही हवामान खात्याचे पावसाचे अंदाज आणि प्रत्यक्षात होणारा मोसमी पाऊस यावर अवलंबून आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस न पडणे म्हणजे देशातील बहुसंख्य असलेल्या शेतकरी समाजाच्या जिवाशी खेळ आहे. या चुकलेल्या आणि अंदाजपंचे हवामानामुळे अनेक घटकांवर दूरगामी आणि विपरीत परिणाम होत असतात. यंदा त्याची प्रचिती अधिक तीव्रतेने समोर आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळ किनारपट्टी, कोकण आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात ७ जून किंवा त्यापूर्वीच र्नैऋत्य मोसमी पावसाचे हमखास आगमन होते. याबाबतचे अंदाज जाहीर करण्याच्या पद्धती वर्षांनुवर्षे ठरून गेल्या आहेत. गेल्या १०० वर्षांतील पावसाच्या नोंदीवरून हा ठोकताळा तयार झालेला आहे. पावसाला सुरुवात होते, कांही अंशी पेरण्या सुरू होतात. पुढे नक्षत्र बदलते, पाऊस कमी-जास्त होत राहतो. पण पेरण्यांचा हंगाम सुरुवातीच्या पावसामुळे सुरू होतो. पावसाचा ताण निर्माण झाल्यास काही वेळा येणाऱ्या खरिपाच्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. हे चित्र सर्वसाधारणपणे आजवर चालत आलेले आहे. दोन पावसातील अंतर आणि पडणाऱ्या पावसाचे सातत्य यावरही खरीप हंगामाचे भवितव्य आधारलेले असते. यामुळे पावसाच्या अंदाजाला भारतीय शेतीसाठी विशेष महत्त्व आहे. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संस्थासुद्धा पावसाचा अंदाज देतात. त्याचे त्यांनी टप्पे केलेले आहेत. वाऱ्याची दिशा आणि वेग यावर आधारित वेगवेगळे अंदाज ठरविले जातात. ते टप्प्या-टप्प्याने अधिक अचूक केले जातात. तसेच काही भागात घटमांडण्यांतून पावसाचे अंदाज जाहीर केले जातात. तसेच विविध पंचांगातील पाऊस अधिक विश्वासार्ह मानला जातो. ग्रह-ताऱ्याच्या भ्रमणावरून पावसाचे अंदाज व्यक्त केले जातात. याशिवाय प्राणी, पक्षी आणि वृक्षांच्या पाना-फुलांतील बदलावरून, बहरण्यावरूनही पावसाचा अंदाज स्पष्ट केला जातो. या सगळय़ावर शेतकऱ्यांचेच नव्हे,तर अनेक संबंधित घटकांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे पावसाचा अंदाज हा भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. भारतीय हवामान खात्याच्या पावसाचे अंदाज अनुकूल असतील तर आपल्याकडील शेअर बाजार उसळी घेतो. प्रतिकूल स्थिती निर्माण झाल्यास तो कोणत्याही क्षणी कोसळतो. यामध्ये गुंतवणूकदारांचे कोटय़वधीचे नुकसान होते.

पावसाचे अंदाज तीन टप्प्यात जाहीर होतात. र्नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा, त्यातील प्रगती आणि पूर्वापार अनुमान यांचा मेळ घालून हे अंदाज वर्तविले जातात. भारतीय हवामान खात्याचे अंदाज बऱ्याचदा चुकतात. तो कुचेष्ठेचा विषय होतो. तरीही भारतीय शेतकऱ्यांचे या हवामान अंदाजाकडे विशेष लक्ष असते. त्यावर विसंबून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू करतो. बियाणे बाजारातील हालचाली अधिक गतिमान होतात. अनेक उद्योजक हवामानाचा कल लक्षात घेऊन या क्षेत्रातील आपली गुंतवणूक वाढवितात. तसेच राज्यातील आणि राज्याबाहेरील बियाणे डिलर्स आणि गावोगावचे कृषी सेवा केंद्रातील आवक कमी-जास्त होत राहते. हवामान खात्याच्या पहिल्या अंदाजानंतर या हालचालींना सुरुवात होते. म्हणजे पावसाळय़ापूर्वी किमान दोन महिने हे सगळे सुरू होते. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक, सेंद्रिय खताच्या उपलब्धतेची तयारीसुध्दा याचप्रमाणे सुरू राहते. खत कंपन्यांसाठी हा गडबडीचा काळ असतो. गेली काही वर्षांची मागणी, चालू हंगामातील पावसाचे अंदाज आणि पीकनिहाय बाजारभाव यावर यासंबंधितांच्या आकडेवारीला, उत्पादनाला आकार येत राहतो. याबाबतची सज्जता, तयारी कृषी विभागाकडून करून घेतली जाते. खते, बियाणे, इतर निविष्ठा शेतकऱ्यांना कमी पडू नये, यासाठी कृषी विभाग हातघाईवर आलेला असतो. त्याच्या तगद्याने यामध्ये भर पडत असते.

वायदे बाजारातील उलाढालीसुद्धा पावसाच्या या अंदाजावर सुरू असतात. कोणत्या पिकातील उत्पादनाला भविष्यात तेजी-मंदी राहील, याचे अनुमान काढले जाते. यासाठी सगळय़ा पातळीवर जोरदार तयारी, उलाढाल सुरू असते. शेतीमालाच्या आयात-निर्यातीचे ठोकताळेसुद्धा यावरच अवलंबून राहतात. धोरणात्मक क्रम याच पावसाच्या अंदाजावर घेतले जातात. शासनाच्या तयारीचे आकडेवारीनिहाय चित्र यातून तयार होत जाते. त्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण राज्य, विभाग, जिल्हानिहाय सादर केले जातात. बॅंकांच्या शेतीसाठीचा अर्थपुरवठय़ावरसुद्धा या अंदाजाचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवतो.

अतिवृष्टीग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जोरदार तयारी सुरू असते. यासाठी जिल्हा प्रशासनाचा एक विभाग जोरदार तयारी करीत असतो. महापूर आल्यास कोणत्या खबरदारीच्या योजना हाताशी असल्या पाहिजेत, याचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सुरू होते. त्याचे गावनिहाय, तालुकानिहाय नियोजन सुरू होते. ज्या भागात यापूर्वी महापूर येऊन गेला तिथं विशेष यंत्रणा सज्ज केली जाते. यासाठी गावोगावी सभा, बैठका, साधनसामुग्री यांची सज्जता केली जाते. लोकजागृत्तीचे कार्यक्रम पावसापूर्वीच घेतले जातात.

पावसाच्या अंदाजानुसार सगळय़ा गोष्टी घडल्या तरी बियाणे, खतांतील बोगसगिरीचे अनेक नमुने पुढे येतात. त्यावर नियंत्रण, कारवाई, पर्यायी व्यवस्था, दुबार पेरणीचा भुर्दंड अशा नाना भानगडी या केवळ पावसाच्या अंदाजावर सुरू असतात. पण यंदा भारतीय हवामान खात्याच्या अंदाज वर्तवण्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चुकीचे अंदाज, अंदाजपंचे अंदाज अशा नाना भागगडी समोर आल्याने या खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. एक चूक लपविण्यासाठी पुढच्या काही चुका झाल्या आहेत, असा आरोप हवामान खात्यावर घेतला गेला आहे.

त्याहीपेक्षा जे अंदाज व्यक्त झाले, त्यातील सगळे अंदाज सुरुवातीपासून चुकू लागलेले आहेत. हक्काचा जून महिना हा पावसाचा महिना. तो बऱ्यापैकी कोरडा गेला आहे. त्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. केवळ पेरण्या लांबल्या असे नाहीतर त्याचे अनेक परिणाम आता दिसू लागले आहेत. यंदा ७ जूनपूर्वीच पाऊस केरळ किनारपट्टी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात बरसेल, असा अंदाज होता. त्यामुळे पेरणीपूर्वी मशागतीची कामे अगदी वेळेवर पूर्ण झालेली आहेत. खते, बियाण्यांची सज्जता शासकीय आढावा बैठकीसह पूर्ण झालेली आहे. धुळवाफ्यातील पेरण्या झाल्या आहेत. तिथं पिके तरारून उगवून आली आहेत. आता पाऊस नसल्याने ही पिके माना टाकू लागली आहेत. ७ जून मृग नक्षत्राचा पाऊस सुरू होतो. अंदाजानुसार त्याचा पत्ता नाही. त्यानंतरची नक्षत्रेही कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातात बियाणे आहे, पण कोरडय़ा वातावरणात कोणीही पेरणीचे धाडस करत नाही. यामुळे गावात मजुरांना काम नाही आहे. पेरणीच्या बैलांना काम नाही. ग्रामीण भागातील खते, औषधे व बियाण्यांची दुकान ओस पडलेली आहेत. दुकानात बियाणे, खतांचा मोठा स्टॉक असूनही पाऊस नसल्याने या कृषी निविष्ठांना उठाव नाही. पावसाचे अंदाज आणखी चुकत गेल्यास नवीन संकटांची मालिकाच सुरू होईल. दुबार पेरणीचे संकट पुढे येऊ शकते. हा सगळा एका चुकीच्या पावसाच्या अंदाजाने घडविलेला अनर्थ आहे.

नदीकाठच्या गावातील नागरिकांची फार मोठी तारांबळ सुरू झालेली आहे. सरासरीच्या १०६ टक्के पाऊस म्हणजे महापूर नक्की येणार नक्की गृहीत धरून त्यांना नदीकाठापासून दूरवर हालविण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यांनी घरं-दारं, संसारोपयोगी साहित्य, जनावरं घेऊन सुरक्षित निवाऱ्यास हालविण्यास सुरूवात केली आहे. पावसाचे अंदाज चुकल्याने कोणी प्रशासनाला दाद देईनासे झालेले आहे. एकदम पाऊस सुरू झाल्यास काय करायचे, याची चिंता आपत्ती व्यवस्थापन समित्या, अधिकारी आणि संबंधित घटकांना लागून राहिलेली आहे. धरम्णातील पाण्याचे साठे कमी होऊ लागलेले आहेत. अचानक पाऊस झाल्यास धरणे भरून घेता येतील, या अंदाजाने असलेले पाणी यापूर्वीच सोडून दिलेले आहे. त्यामुळे पाऊस केव्हा होईल, याचा अंदाज येत नसल्याने काही ठिकाणी पाणी टंचाई, वीज भारनियमन सुरू झालेले आहे.

जिथं पेरण्या झालेल्या आहेत, तिथंल्या कोरडय़ा वातावरणात जमिनीत गाडलेले बियाणे होले, चिमण्या, कावळे, मोर टोकरून खात आहेत. उगवून आलेले कोवळे कोंब काही पक्ष्यांचे खाद्य झालेले आहे. जमिनीतील गाडलेल्या बियांची, उगवून आलेल्या कोंबांची राखण हा शेतकऱ्यांसाठी नवा उद्योग झालेला आहे. पेरणीबरोबर पाऊस झाल्यास या समस्या राहत नाहीत. मात्र या ठिकाणी पक्ष्यांच्या उपद्रवाने बताल पेरणीचा धोका होतो. तसेच काही ठिकाणी दुबार पेरणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.

भारतीय शेती आजवर जुगार मानलेला आहे. दैवाच्या हवाल्याची शेती हा शिक्का आता बदलत्या काळात तरी पुसला गेला पाहिजे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान खूप विकसित झालेला आहे. जागतिक पातळीवरच्या अनेक संस्थांनी यामध्ये विशेष कामगिरी केलेली आहे. त्यांचे अंदाज बहुतांशी बरोबर येतात. मग भारतीय हवामान खात्याचेच अंदाज का चुकतात? त्याचा मोठा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यावर आधारित अनेक घटकांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. संशोधनातील सातत्याचा अभाव, नवनव्या तंत्रज्ञानाच्या आधारे पाऊसमानाचा वेध घेण्याची क्षमता आता विकसित केली गेली पाहिजे. यासाठी राजकारण्यांच्या हस्तक्षेपासून ते प्रगत तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणाकडे आता विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall forecasting and agriculture weather department monsoon rain kerala coast konkan and maharashtra amy
First published on: 05-07-2022 at 00:13 IST