‘महात्मा’ ठरण्याआधी मोहनदास करमचंद गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या वास्तव्यात झालेल्या तिघा पुत्रांपैकी सर्वात शेवटचे रामदास गांधी (१८९७-१९६९) यांना तीन अपत्ये झाली : थोरली मुलगी सुमित्रा (आता कुलकर्णी), मुलगा कान्हा ऊर्फ कनु आणि मुलगी उषा (आता गोकाणी). यापैकी कान्हा गांधी म्हणजे कनु गांधी. त्यांचे निधन सोमवारी विकल आणि विपन्न अवस्थेत झाले, म्हणून त्यांच्याकडे लक्ष गेले. या निधनवार्तेनंतर ‘कनु गांधी’ या नावाभोवतीचे गूढ उकलणे आणि काही नव्या गूढ-प्रश्नांना सामोरे जाणे हे इतिहासकारांपुढचे आव्हान ठरणार आहे. दांडीयात्रेच्या छायाचित्रात दिसले आणि पुढे स्वत:देखील छायाचित्रकार झाले, ते कनु गांधी हेदेखील गांधीजींच्या तिसऱ्या पिढीतलेच, परंतु चुलत नातू.. त्यांचा जन्म १९१७ आणि मृत्यू १९८६ सालात झाला व भारतच काय, साबरमती आणि राजकोटचे आश्रम सोडून ते कनु गांधी कोठेही वास्तव्यास नव्हते. या चुलत घराण्यातील कनु यांचे तपशील अनेकदा (विकिपीडियावरही) कान्हा ऊर्फ कनु गांधी यांच्याशी जोडले जातात. वास्तविक दोन्ही कनु गांधी वेगवेगळे आहेत, हे ‘महात्मा गांधींचे नातू’ म्हणून लाइक-शेअर- फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात फार कोणी लक्षात घेत नाही. कान्हा ऊर्फ कनु गांधी हे आधी साबरमतीला व स्वातंत्र्यानंतर ‘कस्तुरबा आश्रमा’त राहत होते. रामदास यांच्याकडे कस्तुरबा आश्रमाची जबाबदारी होती. या रामदास यांचे पुत्र कनु गांधी यंत्र-अभियांत्रिकी शिकले. पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजातून १९६१ साली त्यांनी शिक्षण पूर्ण केले हा तपशील दुर्मीळ असला, तरी पुढे ‘अमेरिकेचे भारतातील तत्कालीन (१९६१ ते ६३) राजदूत, अर्थवेत्ते जॉन केनेथ गालब्रेथ यांनी कनु यांना ‘स्वत: निवडून’ अमेरिकेत पाठविले’ हे सर्वज्ञात आहे. अमेरिकेत ‘मसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून कनु यांनी १९६९ मध्ये उच्चशिक्षण पूर्ण केले, आणि नंतर ‘ते नासा (अमेरिकी अंतराळ संस्था) मध्ये संरक्षणशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते’ हाही तपशील सहज उपलब्ध आहे, पण म्हणजे काय करीत होते, त्यांना उच्चपदे मिळाली का, याचा तपशील जवळपास नाहीच. ‘(विमाने व यान यांच्या) पंखांच्या अभियांत्रिकी विभागात ते कार्यरत होते’ एवढीच आणखी माहिती मिळते. कनु यांच्या पत्नी शिवलक्ष्मी, त्याही बोस्टन विद्यापीठातून उच्चशिक्षित (एमबीए) होत्या. या जोडप्यास मूल नव्हते. भारतात परतल्यावर हृदयविकार आणि पक्षाघात यांमुळे कनु विकल झाले, पत्नी शिवलक्ष्मीदेखील वयपरत्वे जवळपास कर्णबधिर होत्या. या जोडप्याचा दूरध्वनी-संवाद पंतप्रधानांशी घडवून आणला गेला, पंतप्रधानांनंी त्यांची काळजी घेण्याचे आश्वासनही दिले. तरीही त्यांना ‘देवळाच्या पैशातून, देवळाच्या दयेवर’ अखेरचा श्वास घ्यावा लागला. कनु हे आर्थिकदृष्टय़ा पुरते विपन्न होण्याची कारणे शोधणे, हेही इतिहास-अभ्यासकांपुढले आव्हान असेल आणि ते कोणी पूर्ण केल्यास गांधींच्या नातवाचाच नव्हे, तर भारतीयांच्या सामाजिक नीतिमत्ता व चारित्र्याचा इतिहासही कदाचित उलगडेल.