‘दोन राजांचे बॅनरयुद्ध’सारख्या बातम्या हल्ली ज्या साताऱ्यातून येतात, त्याच जिल्ह्यात १९४३ ते ४७ ही पाच वर्षे अक्षरश: जीव धोक्यात घालून हौसाताई (हौसाक्का) पाटील ‘प्रति सरकार’च्या चळवळीत सक्रिय सहभागी होत्या. चार वर्षांपूर्वी त्यांची नव्वदी साजरी झाली, त्यानंतर त्यांच्या आठवणींना थोडीफार प्रसिद्धी मिळाली होती इतकेच. त्यानंतर बुधवारी- २३ सप्टेंबरला आली ती हौसाताईंची निधनवार्ता. ‘क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या’ ही त्यांची एक ओळख. ‘माजी (दिवंगत) आमदार भगवानराव पाटील यांच्या पत्नी’ हा आणखी एक परिचय. पण यापेक्षा निराळे त्यांचे कर्तृत्व आणि व्यक्तित्व होते. लहानपणीच आईचे छत्र हरपलेल्या हौसाक्कांना आजीने वाढवले- महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे बाळकडू हौसाक्कांना मिळाले. वडील घरात फार कमी असायचे, कारण बहुतेकदा त्यांना भूमिगत राहावे लागले. पण देशभक्ती आणि ‘गोऱ्या’ सरकारविरुद्ध काम करण्याचा अंगार आजीने फुलवला. १५ वर्षांच्या वयात त्यांचे लग्न ‘गांधी पद्धतीने’- म्हणजे हुंडा/ मानपान/ बडेजाव काहीही न करता वधूवरांनी एकमेकांना हार घालून- पार पडले होते. त्यानंतरच्या काळात, पदरी मूल असतानाही, त्या जाणतेपणी चळवळीत सक्रिय झाल्या. स्त्री म्हणून कमीपणाची वागणूक मिळाल्याचे त्यांना कधी वाटत नसे. उलट, बाई म्हणून आपण निरोप्याची वा हेरगिरीची कामे अधिक बिनबोभाटपणे कशा करायचो, गोव्यातील पोर्तुगीजांच्या कैदेत असलेल्या बाळ जोशींची बहीण म्हणून कसा प्रवेश मिळवला, रेल्वे रूळ उखडण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने कशा गेलो, याच्या आठवणी त्या सांगत. यापैकी एक आठवण भवानीनगर (सांगली) येथील पोलीस ठाण्यातून केलेल्या शस्त्रलुटीची! ‘ही नांदायला जात नाही’ म्हणून हौसाबाईंना पोलीस ठाण्यासमोरच त्यांचा ‘भाऊ’ आणि ‘नवरा’ मारहाण करू लागले. ‘हिच्या डोक्यात दगडच घालतो’ म्हणत एकाने मोठा फत्तर उचलला, तेव्हा या ठाण्यामधील दोन्ही पोलीस धावत बाहेर आले, प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि तोवर शस्त्रलूट फत्ते झाली! ‘महिला सबलीकरण’ वगैरे शब्द माहीत नसूनही, पुढे १९६० सालानंतर गाव-तालुक्यातल्या अनेक महिलांना हौसाक्कांनी बळ दिले. नागनाथ नायकवडी, जी. डी. बापू लाड, शाहीर निकम यांच्यासह राजमती पाटील, लक्ष्मीबाई नायकवडी अशा महिलादेखील तुफान सेनेचे काम करीत होत्या, हे हौसाताई नमूद करत. ‘गोरं घालिवलं अन् काळं आलं, त्यापेक्षा खुर्च्याच जाळाय पाहिजे होत्या’ अशा शब्दांत राजकारणाविषयीची कटुता अलीकडेच त्यांनी व्यक्त केली होती.