केंद्र सरकारने मागील वर्षी केलेली गहू खरेदी ४३३.४४ लाख टन एवढी होती. त्यात प्रचंड घट होऊन यंदा ती फक्त १८७.८६ लाख टनांवर येऊन ठेपली. सामान्यांना स्वस्त धान्य दुकानांत पाच रुपये किलोने दरडोई प्रति महिना पाच किलो गहू देण्यासारख्या लोकप्रिय योजनांमधून सरकारचे प्रतिमा संवर्धन करण्यात धन्यता मानणाऱ्या सरकारला यंदाच एवढी कमी खरेदी का करावी लागली, याची कारणे सरकारी पातळीवरून शोधली जाणे कठीणच. गव्हाच्या सरकारी खरेदीचा यंदाचा हमी भाव क्विंटलला २०१५ रुपये होता. त्याच वेळी जागतिक बाजारातील भाव यापेक्षाही चढे होते. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला आणि मोठय़ा प्रमाणात गव्हाची खरेदी करून ठेवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागेवर पैसे मोजून गहू खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी कमी दरात गहू विकला. सरकारी पातळीवरील गहू खरेदीची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असते. त्यामुळे पैसे कमी मिळाले तरी वेळेवर मिळत असल्याने शेतकरी आपली गरज भागवून घेत राहतो. सरकारी यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याकडे सरकारी लक्ष नसल्याचा फायदा शेवटी व्यापाऱ्यांनाच होतो आणि बाजार चढा असला तरी शेतकऱ्याच्या हाती मात्र चणेफुटाणेच उरतात. यंदाची गव्हाची सरकारी खरेदी दहा वर्षांतील सर्वात नीचांकी आहे. ज्या लोकप्रिय योजनांचा सरकारने मोठा गवगवा केला, त्या योजना गुंडाळल्या जाण्याचा हा संकेत आहे. आता सरकारने गव्हाऐवजी तांदूळ देण्याचे ठरवले आहे. ही तर गरिबांची शुद्ध फसवणूक. मागील वर्षी खरेदी केलेल्या गव्हाचा शिल्लक साठा सुमारे १९० लाख टन आहे. यंदा त्यात १८७ लाख टनांची भर पडली, तरी देशाची वार्षिक गरज त्यामुळे भागण्याची शक्यता नाही. त्यामुळे एक तर स्वस्त धान्य दुकानांतील गव्हाचे दर वाढतील किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून गहू हद्दपार होईल. यंदाचे गहू खरेदीचे सरकारी उद्दिष्ट होते ४४४ लाख टनांचे. त्याच्या निम्म्याहूनही कमी खरेदी जूनअखेर झाली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wheat procurement under msp lowest in last 10 zws
First published on: 06-07-2022 at 03:11 IST