आता परत आनंदवनाकडे वळू या. १९७२ च्या महाराष्ट्रव्यापी दुष्काळाने जशी प्रचंड वाताहत केली तसंच तो बरंच काही शिकवूनही गेला. आम्ही खडबडून जागे झालो. सत्तरच्या दशकात आमच्याकडील नव्या प्रकल्पांची, नव्या उपक्रमांची, रुग्णांची, विद्यार्थ्यांची, प्रशिक्षणार्थ्यांची आणि येणाऱ्या पाहुण्यांचीही संख्या वाढत होती. त्यामुळे धान्याची गरज दिवसेंदिवस वाढत चालली होती. पण विहिरींमधलं पाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी जेमतेम पुरेल अशी परिस्थिती असल्याने शेतीत ते वापरणं अशक्य होतं. पाणीच नाही तर शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं, हा विचार सतत मनाला कुरतडत होता.

शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आनंदवन आणि सोमनाथची जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणायची हा ध्यास आधीपासनं होताच; त्याला या दुष्काळाने ट्रिगर मिळालं. पाण्याची कामं करायची तर श्रमशक्तीला यंत्रशक्तीचीही जोड दिली पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. (आणि यंत्रांची तर आवड होतीच!) रिग्सच्या माध्यमातून ड्रिलिंग करून भूगर्भातून पाणी उपसण्याचं नवं तंत्रज्ञान भारतात येऊ लागलं होतं. या सर्व गोष्टींची माहिती करून देणारा माझा विश्वासू वाटाडय़ा म्हणजे ‘इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट फाइंडर’ नावाचं १९७२ सालीच सुरू झालेलं मासिक. याला ‘उत्पादन क्षेत्राचं बायबल’ असंही संबोधलं जायचं! माझ्या असं लक्षात आलं की, रिग्सची क्षमता पिण्याच्या आणि घरगुती वापराच्या गरजेएवढं पाणी उपसण्याचीच होती. शिवाय ही मशिनरी प्रचंड महागडी होती आणि ती हाताळायला कुशल यंत्रचालक लागत. एवढा पैसा उभा करणं अर्थातच शक्य नसल्याने हा विचार बाजूला पडला. पण दवाखाना आणि इतर कामं सांभाळत मी या विषयाचा अभ्यास चालूच ठेवला. ७२ च्या दुष्काळानंतर ‘पाणलोट क्षेत्रविकास’ हा परवलीचा शब्द माझ्याही कानावर पडला होता. त्या अनुषंगाने मी पडणारा पाऊस आणि त्याव्यतिरिक्त परिसरात वाहून येणारं पाणी अडवणं, साठवणं, जिरवणं याचा अभ्यास सुरू केला. पाणलोट क्षेत्रविकासाच्या बाबतीत देशविदेशात जे जे शास्त्रोक्त प्रयोग झाले त्यांची माहिती घेऊ  लागलो. आनंदवनाचे स्नेही ज्येष्ठ जलसिंचन तज्ज्ञ के. आर. दाते यांचंही याबाबतीत मोलाचं मार्गदर्शन लाभत होतं.

mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
farmers protest
शेतकऱ्यांवर NSA अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर खट्टर सरकारकडून यू-टर्न; नेमके कारण काय?
punjab bjp, farmer protest
तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर पंजाबमध्ये संताप, जनभावना ओळखून भाजपाच्या नेत्यांनी सोडले मौन!
sandeshkhali news
विश्लेषण : संदेशखाली प्रकरण काय आहे? यावरून ममता-भाजप संघर्ष का उडाला?

अशा प्रकारे आधी डोक्यात सगळ्या माहितीची साठवण करून घेतली आणि मग पाण्याची साठवण करण्यासाठी योग्य साइट निवडत आनंदवनात आमचं तलाव खोदणं सुरू झालं. सकाळी पाच वाजल्यापासून कुष्ठमुक्त, अंध, अपंग असे सगळे आनंदवनवासी या कामाला भिडत. सर्वाच्या जिद्दीने पावसाळ्याआधी तलाव खोदून पूर्ण झाला. आधी बहुतेकांना तलाव म्हणजे माझं नवं खूळ वाटत होतं! पण पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या तलावातील सर्वदूर पसरलेलं निळेशार पाणी बघून टीकाकार शांत झाले. या साठलेल्या पाण्यावर आम्हाला रब्बीत काही पिकं आणि भाजीपालाही घेता आला. मग काय, ‘पाणी साठवण्यासाठी वाट्टेल ते’ या ध्यासातून एकापाठोपाठ एक तलाव खोदण्याचं ध्यासपर्वच आनंदवनात सुरू झालं. सोमनाथची कथा निराळी होती. तिथली जमीन आनंदवनाच्या अडीचपट. त्यामुळे तिथली शेतजमीन ओलिताखाली आणण्याचं आव्हानही त्याच पटीत होतं. शंकरभाऊ  आणि त्याच्या कुष्ठमुक्त सहकाऱ्यांनी पहिल्या दहा वर्षांत प्रचंड मेहनत घेत पावसाच्या पाण्यावर धानाची (तांदळाची) विक्रमी पैदावार केली होती. पण खरा प्रश्न पावसाळ्यानंतरचा होता.

शंकरभाऊच्या सोबतीला १९७४ पासून जसा तरुण कुष्ठमुक्त कार्यकर्ता हरी बढे होता, तसाच आता अरुण कदमही होता. अरुण धुळ्याच्या सुखवस्तू कुटुंबातला. १९७२ च्या श्रमसंस्कार छावणीला आपल्या महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आलेला. छावणीनंतर अरुण घरी परतला तो युवकांबद्दल बाबा आमटेंच्या विचारांचे काहूर डोक्यात घेऊन आणि पुढील छावणीला येण्याच्या तयारीनेच. नंतरची दोन र्वष तो छावणीला येत राहिला. बाबांचा एवढा जबरदस्त पगडा त्याच्या मनावर बसला, की अखेर घरच्यांचा विरोध पत्करून १९७५ मध्ये तो सोमनाथला कायमचा स्थायिक झाला. खरं तर कुठे खानदेश आणि कुठे सोमनाथ! पण झोकून देत अरुणने स्वत:ला सोमनाथच्या कामात गाडून घेतलं. अरुण आणि हरीच्या सोबतीला सुरुवातीला काही काळ मुकुंद दीक्षित, शरद कुलकर्णी, दिनेश प्रभू ही तरुण मंडळीसुद्धा होती. शंकरभाऊ  आणि सिंधूमावशीच्या मार्गदर्शनाखाली जंगल स्वच्छ करणे, शेतीला बांध घालणे, विहिरीचे खोदकाम, गायीगुरांची देखभाल, भोजनगृहातील कामे, भाजीपाला लागवड व विक्री इत्यादी कामं सर्वजण मनापासून करत. बाबांचं श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठाचं स्वप्न छोटय़ा स्वरूपात का होईना, साकारत होतं.

१९७६ मध्ये भारतीच्या येण्याने माझा हॉस्पिटलचा भार कमी झाला होता. त्यामुळे माझ्या सोमनाथ वाऱ्या वाढू शकल्या. मी, शंकरभाऊ, अरुण आणि हरीच्या रात्र रात्र चर्चा चालत. जंगलाच्या सान्निध्यात असलेल्या सोमनाथचा अवघड भूगोल हरी आणि अरुणच्या सोबतीने कित्येक वेळा सोमनाथ प्रदक्षिणा करत मी जाणून घेतला. पाणलोटाची कामं नकाशाचे नुसते कागदी घोडे नाचवून करणं शक्य नसतं याची मला जाण होती. या पायपिटीनंतर आमच्या असं लक्षात आलं की, ताडोबा जंगलाकडील सोमनाथच्या पश्चिमेच्या बाजूकडून पुढे खाली प्रकल्प परिसराकडे उतार आहे. त्यामुळे जंगलातील नाल्याचं ओसंडून वाहत जाणारं पाणी बांध टाकून वळवत प्रकल्पात आणता येईल आणि तलावांच्या माध्यमातून त्याचा साठा करता येईल. शिवाय प्रकल्प परिसरात वाहणाऱ्या नाल्यांवरही बांध घालता येतील. लगोलग श्रमशक्तीच्या आधारे तलाव खोदायला सुरुवात झाली. श्रम-संस्कार छावणीतल्या हजारो तरुण-तरुणींचे हातही या कामाला लागले. उतरत्या पातळ्यांवर एकाखाली एक असे सहा तलाव हळूहळू बांधले गेले. त्यामुळे शेतीसाठी जवळजवळ बारमाही पाणी उपलब्ध झालं. ओलिताखालचं क्षेत्र वाढल्याने खरीपाप्रमाणेच रब्बीतही कुष्ठमुक्तांचे हात विक्रमी उत्पन्न घेऊ  लागले. अभ्यासू वृत्तीच्या अरुणने महाराष्ट्रातील शेतीतल्या प्रयोगांना भेटी दिल्या आणि या क्षेत्रातलं नवनवं तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहिला. परिणामी सोमनाथच्या शेतीचं उत्पन्न वाढू लागलं.

आनंदवनात आणि सोमनाथला एकगठ्ठा तलाव खोदले गेले असले तरी श्रमशक्तीच्या जोरावर खोदल्या गेलेल्या तलावांच्या साठवण क्षमतेस अखेर एक विशिष्ट मर्यादा होती. त्यामुळे सोमनाथ आणि आणि आनंदवन दोन्ही ठिकाणच्या तलावांची खोली वाढवणं गरजेचं होतं. तरच दुबार पिकांच्या दृष्टीने अधिक शेतजमीन ओलिताखाली आणता येणं शक्य होतं. अजूनही एक प्रश्न निर्माण झाला होता. विहिरींचं पाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी, तर तलावांमधलं पाणी शेतीसाठी डिझेल पंपांमार्फत उपसलं जायचं. मात्र, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आता तेही अवघड होत चाललं होतं.

बोअरिंगचं तंत्रज्ञान ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला ग्रामीण भारतात बरंच स्थिरस्थावर झालं होतं. पिण्यासाठी आणि घरगुती वापरासोबत कृषीसिंचनासाठीही बोअरवेल्सच्या माध्यमातून पाणी उपसायला सुरुवात झाली होती. अद्यापि आनंदवनात हे तंत्रज्ञान वापरलं गेलं नसलं तरी वेगाने विकसित होत चाललेल्या या क्षेत्रातील घडामोडींविषयी मी माहिती ठेवून होतो. पण भूगर्भातलं पाणी उपसायचं तर त्यासाठी आधी आनंदवनाच्या भूरचनेचा अभ्यास आवश्यक होता. मग दातेकाका, प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनीयर डॉ. सी. एम. पंडित यांसारख्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने, पुस्तकांत या विषयाबद्दल उपलब्ध माहितीच्या आधारे, तसंच मृदा परीक्षणं वगैरे करत मी आनंदवनाच्या भूगर्भाचा अभ्यास सुरू केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की दक्षिणोत्तर पसरलेल्या आयताकृती आकाराच्या आनंदवनाच्या उत्तरेकडील उतरत्या भागात जमिनीखाली पाणी असण्याची दाट शक्यता आहे. आमचे तीन मोठे तलावही याच भागात होते. काहीही करून आता बोअरवेल घ्यायचीच असं मी निश्चित केलं.

अर्थात अडथळ्यांची शर्यत आत्ता तर खरी सुरू झाली होती. एक तर आनंदवन आणि इतर प्रकल्प श्रमशक्तीच्या बळावर उभे राहिले होते. त्यामुळे शेती अवजारांव्यतिरिक्त यंत्रशक्तीची दखल फारशी कुणी घेत नसे. शिवाय, जमिनीखाली पाणीच नाही, नसलेलं पाणी उपसायला यंत्रशक्ती वापरणं म्हणजे पैसा वाया घालवणं, अशी सर्वाचीच ठाम समजूत. त्यात बोअरवेल घेण्यासाठी लागणाऱ्या मशीनची किंमतही थोराड. किंमत ऐकूनच सगळे नाकं मुरडू लागले. एकूणच आनंदवनात या विरोधात वातावरणनिर्मिती झाली आणि माझ्या या प्रयोगाकडे ‘डॉक्टरच्या डोक्यातलं नवं वेड’ म्हणून बघितलं जाऊ  लागलं. पण मी जिद्द (हट्टच म्हणा ना!) सोडली नाही. महत्प्रयासाने थोडय़ाफार पैशांची जमवाजमव करत सौराष्ट्रातनं एक जुनी ‘Calyx Drilling Rig’ मिळवली. खरं तर ही ड्रिल खनिजं आणि तेलाचा शोध घेण्यासाठी होती आणि यातनं ड्रिलिंग खूप स्लो होत असे. पण जमवलेल्या पैशात तेवढंच शक्य असल्याने ‘देखल्या देवा दंडवत’ म्हणत मी ही रिग आनंदवनात आणली. रिग आली तर चालवायला ऑपरेटर मिळेना. त्यामुळे ‘आम्ही तर म्हटलंच होतं, की पैसा वाया जाणार..’ असे सूर बळकटी धरू लागले! अखेर वर्षभर प्रयत्न केल्यावर ऑपरेटरच्या रूपाने अशोक बोलगुंडेवार माझ्या आयुष्यात आला. अशोकला ड्रिलिंग मशीन चालवण्याचा थोडाफार अनुभव होता. मग काय, जनार्दन वगैरे इथल्या काही कुष्ठमुक्तांना मी अशोकच्या दिमतीला दिलं आणि मुक्तिसदन परिसरात साइट निवडून आमचं बोअरिंग काम सुरू झालं. मशीनचा ड्रिलिंगचा वेग खूपच कमी असल्याने पाणी अजून दृष्टिपथात येत नव्हतं. त्यामुळे दिवस जात होते तसा आमचा हा उद्योग चेष्टेचा विषय ठरू लागला. पण त्याकडे लक्ष न देता तहानभूक विसरून दिवस-रात्र आमचं काम चिकाटीने सुरूच होतं. अखेर आमचं वेडं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा तो दिवस उजाडला. सबमर्सिबल पंप जसा पाणी बाहेर फेकू लागला तसं आम्हा सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं! फसफसून बाहेर येणारं पाणी बघून चेष्टेकरीही गप्पगार झाले.

बोअरवेल खोदण्यासाठी लागणारा कालावधी खूप होता. शिवाय मशीन चालवायला लागणारं डिझेल आणि गुंतलेलं मनुष्यबळ बघता याकडे खर्चीक बाब म्हणून पाहिलं जाणं स्वाभाविक होतं. तरी या तंत्रज्ञानाच्या वापराने आज केलेली ही कामं आनंदवनाच्या भविष्याच्या (आणि भवितव्याच्याही) दृष्टीने यशस्वी गुंतवणूक ठरेल याबद्दल मी आश्वस्त होतो. त्यामुळे अशोकच्या साथीने आमची कामं सुरूच राहिली. चुकांतून शिकत आम्ही हळूहळू प्रावीण्य मिळवत गेलो आणि पहिल्या चार वर्षांतच आनंदवनातील बोअरवेल्सनी दुहेरी आकडा गाठला! मग पाण्याची चंगळच झाली. इतकी र्वष शेतात राबणारी हातापायाला बोटं नसलेली आमची सगळी माणसं. पण आता काही न करता नुसतं पॅनलवरचं बटन दाबलं की पाइपमधून पाण्याची मोठ्ठी धार येते हे पाहून ती हरखून जात. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, ते समाधान पाहून मी तंत्रज्ञानाचे मनोमन आभार मानत असे.

अर्थात भूगर्भातून नुसतं पाणी उपसून चालणार नव्हतं. त्याचं पुनर्भरणही तेवढंच गरजेचं होतं. त्यासाठी आवश्यक होतं तलावांचं योग्य खोलीकरण. सोमनाथच्या भूगर्भाची रचना वेगळी असल्याने तिथे खोलवर बोअर करूनही पाणीसाठे सापडले नाहीत. त्यामुळे तिथे तलावांचं जास्तीत जास्त खोलीकरण करून पाण्याची साठवण गरजेची होती. आता हे कसं करायचं, यावर परत आमची गाडी अडली. खोलीकरणासाठी वापरली जाणारी अजस्त्र एक्सकॅव्हेटर्स मी पाहिली होती, ती जवळच्या वेस्टर्न कोलफिल्डच्या खाणींमध्ये. मग विचार केला की बात छेडून तर पाहू- देतात का एखादा एक्सकॅव्हेटर! मग माझे कुष्ठमुक्त सहकारी रमेश कोठारे यांना मी वेस्टर्न कोलफिल्डमध्ये धाडलं. दिलेलं काम यशस्वी करूनच परत येण्यात कोठारेंचा हातखंडा होता. अक्षरश: तसंच झालं. वेस्टर्न कोलफिल्डने महिनाभरासाठी एक एक्सकॅव्हेटर तर दिलाच; त्याला लागणारं डिझेलही देऊ  केलं. यातनं आमच्या छोटय़ाशा ‘आनंदसागर’ तलावाचं खोलीकरण झालं. एक्सकॅव्हेटरचं तेलपाणी करण्याबरोबरच अशोकचं बारीक निरीक्षणही सुरू होतं. एक्सकॅव्हेटरचा ऑपरेटर एकदा सुट्टीवर गेला असताना त्यानं हे धूड चालवून बघितलं. ऑपरेटरने आल्यावर ते बघितलं आणि म्हणाला, ‘तुम तो एक्स्पर्ट हो गये! अब मेरी जरुरत नहीं.’

वेस्टर्न कोलफिल्डचा एक्सकॅव्हेटर काय काय करू शकतो हे मी बघितलं आणि आता आपला आनंदवनाचा एक्सकॅव्हेटर हवा, हे माझ्या मनाने घेतलं. डोनर एजन्सीजशी पत्रव्यवहार सुरू झाला. पण एक्सकॅव्हेटर ही गोष्ट खाणींशिवाय इतर ठिकाणी- आणि तेही एका सामाजिक संस्थेत काय कामाची? लाखांचं डिझेल पिणारं हे धूड तुम्हाला कशाला हवं? अशा त्यांच्या प्रश्नांनी मी भंडावून गेलो. ‘टाटा ट्रस्ट’मध्ये १९९० च्या सुमारास आनंदवन आणि सोमनाथमधील पाणलोट क्षेत्र विकासासंबंधी ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त रुसी लाला यांच्याशी माझी मीटिंग सुरू होती. त्याच सुमारास त्यावेळी ‘टेल्को’ने जपानच्या ‘हिताची’ कंपनीसोबत संयुक्तरीत्या एक्सकॅव्हेटर्स लाँच केले होते. मीटिंगदरम्यान आनंदवनाबद्दलची सगळी माहिती त्यांनी माझ्याकडून ऐकून घेतली आणि मला म्हणाले, ‘‘तू म्हणशील ती मदत आम्ही तुला देऊ .’’ मी म्हटलं, ‘‘आम्हाला तुमचा नवा एक्सकॅव्हेटर हवा!’’ ही अनाकलनीय मागणी ऐकून लाला कोलमडलेच! त्यांना काही उलगडा होईना. जरासे उखडतच ते म्हणाले, ‘‘विकास, ऌं५ी ८४ ॠल्ली ू१ं९८! आनंदवनाला एक्सकॅव्हेटरचा काय उपयोग?’’ मी म्हटलं, ‘‘मागशील ते देईन हे तुम्हीच कबूल केलंय अंकल! हा एक्सकॅव्हेटर स्वयंपाक सोडून सगळं काही करू शकतो!’’ मग मी त्यांना आनंदवन व सोमनाथ ही कशी ३००० लोकसंख्येची २००० एकरांवर वसलेली गावं आहेत, शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्याची साठवण करण्यासाठी, उपसलेल्या पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी तलाव खोल करणं, नवे तलाव खोदणं कसं गरजेचं आहे, वगैरे सांगितलं. लालांनीही नंतर आढेवेढे न घेता बोर्डाची मंजुरी घेत एक छोटा एक्सकॅव्हेटर आणि दोन टिप्पर्स आम्हाला दिले. हा एक्सकॅव्हेटर आनंदवन आणि सोमनाथमधील जलक्रांतीचा जनक ठरला. पुढे जुनी नवी छोटी-मोठी एक्सकॅव्हेटर्स येत गेली, तसे आनंदवन व सोमनाथमधले तलाव खोल होत गेले; नवे खोदले जाऊ  लागले. आजघडीला आनंदवनात दहा, तर सोमनाथमध्ये २७ तलाव आहेत! २००९ मध्ये एल अँड टी फायनान्स कंपनीचे अध्यक्ष यशवंत देवस्थळी यांनी आनंदवन आणि सोमनाथला भेट दिली. त्यांनी संस्थेला वैयक्तिक पातळीवर भरीव योगदान तर दिलंच; शिवाय कंपनीतर्फे एक भलामोठा ‘एल अँड टी कोमात्सू’ एक्सकॅव्हेटरही दिला. या एक्सकॅव्हेटरमुळे आज आम्हाला आनंदवनात पडणाऱ्या पावसाचं ९०% टक्के पाणी अडवण्यात यश आलं आहे.

आमच्या या पाणीप्रवासाचं सगळं चालकत्व अर्थातच अशोकचं. हे यश अशोक आणि त्याने तयार केलेल्या जनार्दन, बंडू, प्रसन्ना या सगळ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. अशोक आनंदवनात आला कधी आणि कायमचा इथला झाला कधी हे कळलंच नाही, इतका तो आनंदवनाशी, इथल्या माणसांशी समरूप झाला. त्याला मी माझ्या स्वप्नांचा ठेकेदार मानतो. पाण्यासाठी वाट्टेल ते करण्याचं माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं अशोकने. या स्वप्नाची क्षितिजं विस्तारणारा अशोकचा प्रवास अजूनही अव्याहतपणे सुरूच आहे.

vikasamte@gmail.com