१९७० नंतरच्या कालखंडात उभे राहिलेले महारोगी सेवा समितीचे नवे प्रकल्प आणि या प्रकल्पांत सुरू झालेले विविध उपक्रमांची माहिती मी आजवर आपल्यासमोर ठेवली. शिवाय, बाबा आमटेंनी राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण आदी मुद्दय़ांवर घेतलेल्या भूमिका, त्यातनं उभ्या राहिलेल्या चळवळी, अभियानं यांचा परामर्षही घेतला. याशिवायही बऱ्याच घटना, प्रसंग, उपक्रम आहेत. संस्थात्मक पातळीवर कामाचा विविध क्षेत्रांतील विस्तार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली त्याची दखल, आजारांची आणि अपघातांची शृंखला, इत्यादींवर आता दृष्टिक्षेप टाकू या.

या कालावधीत आनंदवन, सोमनाथमध्ये नवी कम्युन्स, लोक-बिरादरी प्रकल्पात इस्पितळ, शाळा आणि हॉस्टेल्सच्या इमारती अशी बरीच बांधकामं झाली. सोबत पायाभूत सुविधांचाही विकास झाला. सुरुवातीच्या काळात बांधकामांसाठी ‘स्विस-एड् अ‍ॅब्रॉड’ने, तर औषधांसाठी ‘ऑक्सफॅम’ या संस्थेने बरंच अर्थसाहाय्य लोक-बिरादरीला दिलं. मनोहर व संध्या यम्पलवर, बबन पांचाळ असे नवे पूर्णवेळ कार्यकत्रे लोक-बिरादरी इस्पितळाशी जोडले गेले. ऐंशीच्या दशकापासून लायन्स आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून नागपूर-चंद्रपूरची डॉक्टर मंडळी आमच्याशी जोडली गेली आणि आनंदवन, सोमनाथ, लोक-बिरादरी प्रकल्पांतील आरोग्यसेवेचा परीघ मोठय़ा प्रमाणात विस्तारू लागला. आनंदवनाचे आप्त चंद्रपूरचे डॉ. शरद सालफळे आणि त्यांचे सहकारी डॉ. सोनवलकर, यशवंत कुलकर्णी यांनी आनंदवन आणि सोमनाथमध्ये मोफत शस्त्रक्रिया शिबिरांची सुरुवात केली, तर लोक-बिरादरी प्रकल्पात नागपूरचे डॉ. सुळे, डॉ. गोवर्धन, डॉ. राव, डॉ. जोगळेकर यांनी शिबिरं घेतली. या शिबिरांचा लाभ कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, आदिवासींसोबत समाजातील इतर गरजू घटकांनाही मिळू लागला. घृणेमुळे कुष्ठमुक्तांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यास सरकारी रुग्णालयात अडवणूक करण्यात येत असे वा नकार देण्यात येत असे. नव्वदच्या दशकाच्या शेवटी शेवटी मुंबईच्या सर जे. जे. हॉस्पिटलचे डॉ. तात्याराव लहाने आनंदवनात आले असता मी हे त्यांच्या कानावर घातलं. हे ऐकून संतापलेल्या तात्यांनी ‘या शस्त्रक्रियांची जबाबदारी आजपासून माझी!’ म्हणत विडाच उचलला! मग काय, १९९८ पासून सर जे. जे. हॉस्पिटल, आय-केअर चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि आनंदवनाच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन जनरल हॉस्पिटलमध्ये वार्षिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर सुरू झालं. दरवर्षी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, त्यांचे सर जे. जे. हॉस्पिटलचे सहकारी डॉक्टर, नस्रेस, इतर स्टाफ आणि आय-केअर चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंसेवक अशी मोठ्ठी टीम मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आनंदवनात येत असते. डॉ. लहाने यांच्या नेतृत्वाखाली आनंदवनात आजवर मोतीबिंदूच्या २३,००० यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या शिबिरासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर अवघ्या मध्य भारतातून गोरगरीब रुग्ण आनंदवनात येतात. बाबा आमटे या शिबिराला ‘लहानुबाबाची जत्रा’ म्हणायचे. शस्त्रक्रिया तर मोफत होतातच; शिवाय ती करताना ‘फॅकोइमल्सीफिकेशन’ या अत्याधुनिक तंत्राचा वापर केल्यामुळे आठवडाभरातच रुग्ण घरी परतू शकतात. कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती दूर करण्यासाठीच्या शस्त्रक्रियांचंही मोठं आव्हान होतं. ते पेललं मूळ नागपूरचे आणि नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. आश्विन पावडे, प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. व्हिव्हियन आणि त्यांच्यासोबत असलेले डॉक्टर्स, नस्रेस आणि फिजिओथेरेपिस्टस्च्या टीमने. १९९९ पासून आजपावेतो सुरू असलेल्या वार्षिक सर्जिकल कॅम्प्सचा लाभ कुष्ठरुग्णांसोबतच भाजल्यामुळे त्वचा एकत्र झालेले आसपासच्या गावांतील गरीब रुग्ण, तसेच ओठ फाटलेली लहान मुलं यांनाही होऊ लागला. ज्या क्लिष्ट शस्त्रक्रियांसाठी शहरांत लाख-दोन लाख रुपये खर्च झाले असते (आणि त्यामुळे ती कधीच झाली नसती!) अशा शस्त्रक्रिया इथे पूर्णपणे मोफत होऊ लागल्या. आजवर अशा १२०० पेक्षा अधिक मोफत शस्त्रक्रिया आनंदवनात पार पडल्या आहेत. याशिवाय नागपूरचे राजे संग्रामसिंह भोसले दरवर्षी रोटरी क्लबच्या माध्यमातून सोमनाथमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करत असतात. आनंदवनाने उचललेलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे ‘नवचतन्य कृत्रिम अवयवनिर्मिती केंद्र’! यातही मोठी मदत केली ती डॉ. पावडे यांच्यासोबत येणाऱ्या नस्रेस आणि फिजिओथेरेपिस्टस्नी. त्यांनी लंडनमध्ये ‘Walkathon’ आयोजित करून ५२ लाख रुपये जमा केले. त्या निधीतून ‘Otto-Bock’ या जर्मन कंपनीच्या नागपूरमधील केंद्राशी संलग्न असं केंद्र २००८ साली आनंदवनात उभं राहिलं. नागपूरमधून प्रशिक्षित तंत्रज्ञ दर पंधरवडय़ाला आनंदवनात येतात आणि अपंग व्यक्तींची तपासणी करून, त्यांची मापं घेऊन कृत्रिम अवयव तयार केले जातात. हे केंद्र सरकारने मान्यता दिलेलं आहे, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना इथे मोफत अवयव मिळू शकतात. आनंदवनातल्या कुष्ठरुग्ण आणि अपंगांसाठीच्या कृत्रिम अवयवांचा सर्व खर्च आनंदवन करतंच;  त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या गरीब अन् गरजू अपंगांनाही आनंदवनाने आजवर अवयवांसाठी मोठय़ा प्रमाणावर मदत केली आहे. संस्थेचे हे सर्व आरोग्यविषयक उपक्रम समर्थपणे पार पाडण्यात डॉ. भारती व डॉ. विजय पोळ यांचा मोलाचा वाटा आहे.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
The Prime Minister expressed the possibility of implementation of the code of conduct next month
‘मन की बात’ तीन महिन्यांसाठी स्थगित; पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता पंतप्रधानांकडून व्यक्त
manoj jarange patil and chhagan bhujbal
‘आंदोलन करण्याची गरज नाही’, म्हणणाऱ्या छगन भुजबळांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आम्ही रोज…”

कर्णबधिरत्वामुळे हक्काचं कुठलंही व्यासपीठ नसलेल्या मुलामुलींसाठी १९८३ साली आनंदवनात निवासी शाळा सुरू झाली आणि शिक्षण क्षेत्रातील एक नवा आयाम आनंदवनाच्या कार्याला जोडला गेला. नेदरलँडस्च्या ‘नेदरलँड कमिटी फॉर किंडर पोस्टल्स’ या संस्थेतर्फे मिळालेल्या अर्थसाहाय्यातून विद्यालयाची इमारत उभी राहिली. सुरुवातीची काही वर्ष आमच्या आनंद अंध विद्यालयाचा मुख्याध्यापक सुधाकर कडू यानेच आनंद कर्णबधिर विद्यालयाची जबाबदारी सांभाळली. आनंदवनातल्या सगळ्या औद्योगिक प्रवृत्ती एका छताखाली आणण्याची माझी कल्पना ‘आयडीबीआय’चे तत्कालीन कार्यकारी संचालक सॅम पालिया यांनी उचलून धरली. त्यांनी १९८४ मध्ये ‘आयडीबीआय’च्या माध्यमातून दिलेल्या २४ लक्ष रुपयांच्या मदतीतून आनंदवनातील औद्योगिक वसाहत उभी राहिली. इकडे लोक-बिरादरी आश्रमशाळेला १९८६ पासून शासकीय मान्यता मिळाली आणि नंतर प्रत्येक वर्षी पुढच्या तुकडय़ांना मान्यता मिळत गेली. ‘अ‍ॅक्शन-एड’ या संस्थेने आश्रमशाळेच्या सुरुवातीच्या काळात मोठी मदत केली. १९९५ पासून आम्ही आनंदवन आणि सोमनाथमध्ये आसपासच्या ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘युवाग्राम’ हा निवासी व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम सुरू केला. आजवर युवाग्राममार्फत अशा पाच-सातशेजणांनी सुधारित शेती, डेअरी, मेटल फॅब्रिकेशन, हातमाग, यंत्रमाग, इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग, डी. टी. पी., ऑफसेट पिंट्रिंग, ऑटोमोबाइल रिपेअर, इत्यादीचं प्रशिक्षण घेतलं. यातले बहुतेक जण प्रशिक्षण संपवून बाहेर व्यवसाय करू लागले, तर काही इथेच स्थिरावले.

१५ जानेवारी १९८१ या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले असताना बाबांना ट्रकने धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेल्या बाबांना तसंच सोडून ड्रायव्हर ट्रक घेऊन पळून गेला. हे दृश्य मागनं फिरायला येणाऱ्या श्रीधर सिरपूरकर आणि काही मित्रांनी पाहिलं. त्यांनी त्वरित आनंदवनात वर्दी देऊन वाहन मागवलं आणि बाबांना आनंदवनात आणलं. बऱ्याच वेळाने बाबा शुद्धीवर आले. लोक-बिरादरी प्रकल्पावर गेलेली इंदू रात्री परतली. दुसऱ्या दिवशी बाबांना नागपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवलं. उपचारांती दोन आठवडय़ांनी बाबा आनंदवनात परतले. (वरोऱ्याच्या सिरपूरकर कुटुंबाचा आमटे कुटुंबाशी असलेला स्नेह आमच्या जन्माआधीपासूनचा. श्रीधर सिरपूरकर यांचे धाकटे बंधू अ‍ॅड. विकास सिरपूरकर मला मोठय़ा भावाप्रमाणे. त्याला बाबा-इंदू, आम्ही सगळेच ‘बल्ल्या’ म्हणत असू. त्यामुळे अ‍ॅड. विकास सिरपूरकर पुढे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले तरी आमच्यासाठी मात्र तो बल्ल्याच राहिला!) त्यानंतर अपघातांची शृंखला सुरू झाली ती अजूनही कायम आहे. भारत सरकारने कुष्ठरोग निर्मूलन उच्चाधिकार समितीवर माझी नेमणूक केली होती. १९८१ च्याच ऑगस्टमध्ये त्या समितीची बैठक आटोपून मी मद्रासवरून तामिळनाडू एक्स्प्रेसने परतत असताना अपघात झाला आणि १४ डबे घसरले. त्यात १५ जणांचा दुर्दैवी अंत झाला. मी कसा काय बचावलो, काय माहिती! पुढे १९८८ साली इंदू आमच्या बसने लोक-बिरादरी प्रकल्पावरून आनंदवनात परतत असताना बसला रात्री चंद्रपूरपुढे मोठा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून ती बचावली. पण तिच्या पायाला मेजर फ्रॅक्चर झालं. १९९० च्या दशकात बाबा-इंदू मध्य प्रदेशात नर्मदाकिनारी मुक्कामी होते. मी त्यांना भेटायला जात असताना माझी अ‍ॅम्ब्युलन्स खड्डय़ात पलटी झाली. त्यातही मी बचावलो. या सर्व कठीण प्रसंगांत रस्त्यातल्या देवदूतांनी वेळोवेळी जी मदत केली त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

बाबा आमटेंचे सगळे आजारही त्यांच्या स्वभावाप्रमाणेच एळफएटए आणि वठवरवअछ स्वरूपाचे असत. अस डोकेदुखीमुळे त्यांना ‘ब्रेन टय़ुमर’ आहे की काय, याच्या तपासण्या सुरू होत्या. पण सुदैवाने तसं काही आढळलं नाही. पूर्वायुष्यातील ढोरमेहनतीमुळे बाबांना झालेला मानेचा आणि पाठीच्या कण्याचा स्पाँडिलायसिस खड्डय़ांनी भरलेल्या रस्त्यांवर सतत ट्रक-जीपचे ड्रायव्हिंग केल्याने सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला फारच बळावला होता. शस्त्रक्रियेवाचून पर्याय नव्हता आणि ती फक्त लंडनलाच होऊ शकणार होती. मुंबईचे बाबांचे मित्र विख्यात न्यूरोसर्जन डॉ. गिंडे यांनी मोठय़ा मिनतवारीने बाबांना शस्त्रक्रियेसाठी परदेशवारीस तयार केले. मग घाईगडबडीत बाबांचा पासपोर्ट-व्हिसा काढला गेला. गरम कपडे नसल्याने विश्राम बेडेकरांनी बाबांना आपला कोट दिला, बॅगा दिल्या आणि बाबा लंडनला दाखल झाले. तपासणीदरम्यान हॉस्पिटल स्टाफच्या निष्काळजीपणामुळे बाबांना ऊ८ी ची अ‍ॅलर्जी झाली आणि ते खूप सीरिअस झाले. त्यामुळे इंदूने तातडीने लंडनला जावे असे ठरले. पण तिचा पासपोर्ट नव्हता आणि तिकिटासाठी पैसेही नव्हते. मग आनंदवनाचे आप्त मुंबईचे मधुभाई पंडित यांनी ‘बाबा आमटे स्वास्थ्य निधी’ उभा करायचं ठरवलं. मधुभाईंनी १९६८ पासून स्वत:ला आनंदवनाच्या कार्यात तन-मन-धनाने पूर्णवेळ झोकून दिलं होतं. पंतप्रधान इंदिरा गांधी, संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त आप्पासाहेब पंत यांच्यासह अनेक सुहृदांनी या निधीसाठी योगदान दिलं. यदुनाथ थत्तेंनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं. त्याला समाजातल्या सर्व स्तरांतल्या लोकांनी प्रतिसाद देत मदत पोचती केली. अशा प्रकारे एक लाख साठ हजार रुपयांचा ‘बाबा आमटे स्वास्थ्य निधी’ गोळा झाला. पासपोर्ट-व्हिसाचे सोपस्कार पार पाडत इंदू कशीबशी लंडनला पोहोचली. अखेर ती अतिशय अवघड शस्त्रक्रिया डॉ. गिंडे यांचे गुरू डॉ. वॉल्श यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. बाबांच्या कार्याबद्दल जेव्हा त्यांना कळलं, त्यांनी आणि अ‍ॅनस्थेटिस्टनेसुद्धा पैसे घेतले नाहीत. काउंट ऑर्थर तार्नोवास्की आणि आप्पासाहेब पंत यांच्यामुळे इंदू-बाबांची पहिली आणि शेवटची परदेशवारी सुखावह झाली. पुढे ‘बाबा आमटे स्वास्थ्य निधी’ची सगळी रक्कम संस्थेत जमा करण्यात आली. यातनं गरजू, दुर्लक्षित पीडितांच्या विशेष शस्त्रक्रियांचा खर्च भागवला गेला. या शस्त्रक्रियेनंतर बाबांना मानेचा आणि कंबरेचा पट्टा ही दोन आभूषणं कायमची चिकटली आणि त्यांच्या ड्रायव्हिंगवर बंदी घालण्यात आली. पण स्वभावधर्मानुसार बाबांनी त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा जीप ड्रायव्हिंग सुरू केलंच. परिणामी पुढे पाठीचे मणके एवढे खराब झाले, की १९७९ मध्ये मुंबईला आनंदवनाचे आप्त प्रसिद्ध अस्थिशल्यविशारद डॉ. अरविंद बावडेकर यांनी बाबांवर आणखी एक शस्त्रक्रिया करत खराब झालेले चार मणके काढून टाकले. त्यानंतर पडून राहणं किंवा उभं राहणं हे दोनच पर्याय त्यांना उपलब्ध होते. पुढील आयुष्यात त्यांना कधीच बसता आलं नाही. पण बाबांचं अफाट बोलणं-चालणं थांबलं नाही. आणि त्यांचा प्रवासही! दरम्यानच्या काळात बाबांना हृदयरोगाचंही दुखणं चिकटलं. नर्मदा आंदोलनाच्या काळात १९९२ साली बाबांवर इंदोरच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आणि हृदयाचे ठोके नियमित करणारं पेसमेकर बसवण्यात आलं. पण त्यानंतरही नर्मदा आंदोलनातील मोर्चामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. नर्मदेचा मुक्काम संपवून बाबा आणि इंदू २००० मध्ये आनंदवनात परतले तेव्हा बाबांना वयाच्या ८६ व्या वर्षी पाकिस्तानात शांतीयात्रा काढायचे वेध लागले होते. सर्व तयारीही झाली होती. पण कुठलीही सुरक्षा घेणार नाही, ही बाबांची मागणी अमान्य करत पाकिस्तान सरकारने त्यांना व्हिसा नाकारला. त्यानंतर बाबा जरासे का होईना स्थिरावले. अर्थात त्यांचा आनंदवन-सोमनाथ-लोकबिरादरी असा प्रकल्पांतर्गत प्रवास सुरूच होता. बाबांना त्यांच्या नव्वदीत ब्लड कॅन्सरने गाठलं. बाबांच्या सगळ्या दुखण्यांमध्ये इंदूने स्वत:ची दुखणी बाजूला सारत धीराची साथ दिली.

बाबांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी, सन्मानांनी, उपाध्यांनी गौरवलं गेलं. आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, रेमन मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार, नागपूर विद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांची डी. लिट्., महाराष्ट्रभूषण, इत्यादी. पण काही पुरस्कार आमच्यासाठी फार वेगळे आहेत. त्यातला पहिला म्हणजे बाबांना १९८३ साली मिळालेला ‘Damian-Dutton Award- कुष्ठकार्यातला जागतिक पातळीवरील सर्वोच्च बहुमान. हा पुरस्कार मिळालेले बाबा आमटे हे पहिले ‘Non-Medico’ भारतीय होते. मानवी हक्क क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी १९८८ मध्ये ‘United Nations Prize in the Field of Human Rights’ प्राप्त झालेलेही बाबा आमटे हे आजवरचे एकमेव भारतीय व्यक्ती आहेत. तिसरा पुरस्कार म्हणजे जगातील सर्वाधिक धनराशी असलेलं ‘Templeton Prizel’! ‘आध्यात्मिक सत्याचे मर्म’ शोधणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार बाबांना ‘अन्न हे आजचं अध्यात्म आहे,’ या भूमिकेतून कुष्ठक्षेत्रात मानदंड प्रस्थापित केल्याबद्दल दिला गेला, हे विशेष. २००६ साली टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांच्यातर्फे बाबांना डी. लिट्. प्रदान करण्यात आली. या डी. लिट्.चं वैशिष्टय़ हे, की डॉ. जमशेद भाभा आणि जेआरडी टाटांनंतर ती थेट बाबांनाच प्रदान करण्यात आली; अधेमधे कुणीच नाही! बाबांना आणखीही बरेच पुरस्कार मिळाले. त्यांचं बाबांना कधीच अप्रूप नव्हतं. ‘आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार’, ‘डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ हे दोन पुरस्कार सोडले तर बाबा कधी पुरस्कार स्वीकारायला गेले नव्हते. मिळालेल्या सर्व पुरस्कारांची राशी त्यांनी संस्थेतच जमा केली.

या प्रवासात खरं तर अजून अनेक गोष्टी आहेत, प्रसंग आहेत, घटना आहेत. पण सगळं एकत्र गुंफणं फार अवघड आहे. शिवाय आता लेखमालेचाही थांबा जवळ आलाय. बघू या पुढील गुंफण कशी जमते..

विकास आमटे – vikasamte@gmail.com