विनोबाजींच्या हस्ते आनंदवनाचं उद्घाटन  झाल्यानंतर बाबा आमटेंच्या सहा कुष्ठरोगी सोबत्यांचा मुक्काम बांधून झालेल्या पहिल्या झोपडीत हलला. तोपर्यंत ही मंडळी वरोऱ्याला आमच्या मित्रवस्तीतील घरातच मुक्कामी होती. मग आमच्यासाठी पुढची झोपडी बांधण्याचं काम हाती घेतलं गेलं. ती बांधून पूर्ण होईपर्यंत बाबा आणि इंदू मला आणि प्रकाशला सोबत घेऊन वरोऱ्यातल्या आमच्या घरापासून पायपीट करत रोज आनंदवनात येत असत. हळूहळू दुसरी झोपडी उभी राहिली व आम्ही सारे आनंदवनात मुक्कामाला गेलो.

बांबूचं तरट, गावरान गोल कौलं आणि गवताच्या साहाय्याने उभ्या झालेल्या आमच्या या झोपडय़ा यथातथाच होत्या. निसर्गलहरींपासून त्यांचं आणि पर्यायाने आमचं संरक्षण म्हणजे जिकिरीचंच काम होतं. पावसाळ्यात तर पुरती भंबेरी उडत असे. छतांतून पाणी गळायचं. जोराने वारा-वादळ आलं की छप्पर उडून जायचं. शिवाय वाघ, बिबटे, रानडुकरं, कोल्हे, लांडगे, अजगर, साप, विंचू, इंगळ्या, घोरपडी वगैरेंची सोबत होतीच. राखणीसाठी बाबांनी चार गावठी कुत्री पाळली होती. ती एक-एक करत वाघाच्या भक्ष्यस्थानी पडली. वाघाने एका कुत्र्याला तर चक्क इंदूच्या खाटेखालून उचललं होतं! (आमचं सहजीवन त्याला मान्य होतं, म्हणून कदाचित त्याने आम्हा कुणावर हल्ला केला नसणार!) वाघ पाण्यासाठी घराजवळ येऊ  नये म्हणून इंदू रोज संध्याकाळी विहिरीजवळ एका मोठय़ा लोखंडी घमेल्यात पाणी भरून ठेवत असे. इंदू म्हणायची, ‘‘आनंदवन म्हणजे साप, विंचू, इंगळ्या यांचे आगारच. ते आमच्यासाठी रोजचेच पाहुणे! खरं तर इथे पाहुणे आम्हीच होतो, कारण ते इथले आद्य रहिवासी होते आणि आम्ही त्यांच्या हक्काच्या राहत्या जागेवर आक्रमण केलं होतं. झोपडीत एकदा मी टोपली उचलली तर आत भलामोठ्ठा नाग. मला तो दैत्यासारखा भासला! पण कदाचित त्याला माझ्यात त्याच्यापेक्षा मोठय़ा दैत्याचा भास झाला म्हणून की काय तो सरपटत निघूनही गेला.’’

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा

तरीही या सर्वामध्ये उंदीर हा प्राणी आमच्यासाठी सर्वाधिक घातक होता. कारण कुष्ठरोगी झोपलेले असताना त्यांच्या स्पर्शसंवेदना नसलेल्या हातापायांना ते चावे घेऊन कुरतडत असत. सुरुवातीच्या या दिवसांतली एक घटना इंदू सांगायची.. ‘‘भल्या पहाटे एक कुष्ठरोगी जोरजोरात ओरडत आला. त्याच्या उजव्या हाताची मनगटापासून कोपरापर्यंतची कातडी आणि स्नायू उंदरांनी चावे घेऊन कुरतडून टाकले होते. स्पर्शसंवेदना नसल्याने हे सगळं तो झोपलेला असताना त्याच्या नकळत झालं होतं! मी स्वत:ला सावरत त्याच्या जखमेला मलमपट्टी केली आणि पुढील उपचारांसाठी त्याला वरोऱ्याच्या दवाखान्यात पाठवण्याची व्यवस्था केली. या घटनेनंतर आम्ही कुष्ठरोग्यांच्या बिछान्यांना मच्छरदाण्या लावणं, त्यांच्या स्पर्शसंवेदना नसलेल्या जागी बँडेजपट्टय़ा गुंडाळणं, त्यांना झोपताना पायात बूट घालून झोपायला लावणं वगैरे बऱ्याच गोष्टी करत असू. तरीही उंदरांचं कुष्ठरोग्यांना चावे घेणं सुरूच होतं. शेवटी बाबांनी कुठलं तरी विष आणून सर्वत्र पसरलं. त्याने उंदरांचा उपद्रव थोडा कमी झाला, तरी उंदरांचा कायमचा बंदोबस्त काही झाला नाही.’’

आनंदवनाच्या या सुरुवातीच्या काळात माझं वय होतं चार वर्षांचं आणि प्रकाश तीनचा. मी नेहमी म्हणतो की, आम्ही डोळे उघडले आणि बघितलं ते बाबा, इंदू आणि कुष्ठरोगी बांधवांनाच. हेच सगळे म्हणजे आमचं विश्व होतं. बाकी जगाशी संबंध, संपर्क येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि या सर्वाना आम्ही भावंडांनी पाहिलं ते कायम कार्यरत असलेलं. बाबा आणि इंदू- दोघांचीही अनेक आघाडय़ांवर लढाई सुरू होती. मला त्या दिवसांतलं जेवढं आठवतं आहे त्याप्रमाणे बाबा आणि इंदू अहोरात्र कामात मग्न असत. जंगल साफ करणं, विहिरी खणणं, अधिकाधिक जमीन शेतीयोग्य करणं, झोपडय़ा उभारणं, स्वयंपाकासाठी इंधन गोळा करणं.. अशी अनेक कामं आनंदवनात युद्धस्तरावर सुरू होती. कुष्ठरोगी बांधव बाबांच्या खांद्याला खांदा लावून अखंड झटत होते. आम्ही दोघं भाऊ  काटेरी झुडपं जाळणे, इंधनासाठी शेणाच्या गोवऱ्या व वाळलेल्या काटक्या गोळा करणे, इ. कामं करत थोडाफार हातभार लावत असू.

लाकडं फोडणारा, विहीर खणणारा, गवंडी, शेतकरी, आरोग्यसेवक अशा विविध भूमिका बाबा एकाच वेळी वठवत होते. जसं वरोऱ्याच्या सरकारी इस्पितळाच्या आवारात कुष्ठरोग्यांसाठी बाबांचं एक उपचार केंद्र सुरू होतं, त्याच धर्तीवर वरोऱ्याहून १७ किलोमीटर अंतरावरील भद्रावती या गावी महारोगी सेवा समितीतर्फे उपचार केंद्र सुरूझालं होतं. त्या केंद्राला भेटीचा बाबांचा दिवस ठरला होता. इतर गावांमध्येही अशी उपचार केंद्रे सुरू करण्यासाठी बाबा प्रयत्नशील होते. शिवाय आजूबाजूच्या खेडय़ांमध्ये फिरत बाबांचं कुष्ठरोग्यांवर उपचार करणं चालूच होतं. पहाटे तीनला उठून बाबा तयार होत, दूध घेत आणि जेवणाचा डबा, औषधाची पिशवी व उपचारांचं साहित्य घेऊन त्यांची पायपीट सुरू होत असे, ते थेट दुपारी आनंदवनात परतत. परतल्यानंतर आनंदवनातील निवासी कुष्ठरोगी बांधवांची शुश्रूषा आणि इतर दैनंदिन कामांचा पहाड त्यांच्यापुढे उभा ठाकलेलाच असे. वकिलीच्या दिवसांतला जुना रेमिंग्टन टाईपरायटर बाबांचा खंदा सहकारी होता. त्यामार्फत संस्थेचे हिशेब आणि स्फुरलेल्या नव्या योजनांची आखणी होत असे.

सुरुवातीच्या काळात आनंदवनातील सर्वाच्या स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी एकटय़ा इंदूकडे होती. तिचा दिवसही बाबांप्रमाणे पहाटे तीन वाजताच सुरू होत असे. पहिलं काम म्हणजे बाबांचा जेवणाचा डबा तयार करणं. तो तयार व्हायला थोडा जरी विलंब लागला तरी बाबा जमदग्नीचा अवतार धारण करत. मग ते डबा न घेताच बाहेर पडत आणि दिवसभर उपाशीपोटी काम करत. असं झालं की इंदूही त्या दिवशी जेवण वज्र्य करत असे. बाबांच्या अविश्रांत श्रमांशी आणि अजेय आकांक्षेशी जुळवून घेता घेता तिची दमछाक होत असे. पण त्याबद्दल ती अवाक्षरही काढत नसे. मला आणि प्रकाशला सांभाळत विहिरीतून कै क बादल्या पाणी काढणं, भांडी घासणं, कपडे धुणं, जात्यावर धान्य दळणं अशी शेकडो दैनंदिन कामं तिच्यावर पडत. शिवाय आमच्याकडच्या एकमेव लंगडय़ा गाईच्या जोडीला आता वरोऱ्याच्या स्थानिक गोरक्षण संस्थेकडून दान मिळालेल्या दोन गाई आल्या होत्या. प्रथम बाबा कसंबसं दूध काढत. पण खांद्याच्या दुखण्यामुळे गाईंचं दूध काढणं बाबांना अशक्यप्राय झालं होतं. जिद्दी इंदूने गाईंच्या लाथा खात खात तेही शिकून घेतलं. सुरुवातीला गाई दोहताना तिचे हात आणि खांदे सुजून येत. बादल्या भरलेले दूध गाई लाथेने सांडवत असत. पण हळूहळू या कामात ती तरबेज झाली आणि पुढे पुढे तर नऊ -दहा गाईंचं दोन्ही वेळचं मिळून रोजचं ६०-७० लिटर दूध ती सहज काढू लागली. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पूज्य अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचे बाबा आणि इंदूशी जुने ऋणानुबंध. त्यांची आनंदवनची फेरी ठरलेली असे. स्वयंपाक करण्यापासून जंगलजमीन साफ करण्यापर्यंत प्रत्येक कामात त्यांचा हातभार असे. बाबांबद्दल त्यांना प्रेम होतंच; पण इंदूचं त्यांना विशेष कौतुक. ‘‘साधना द्वापार युगातली गौळण आहे, ती कलियुगी जन्माला आली!’’ असं ते कौतुकाने म्हणत. इंदूचे अविरत कष्ट बघून विनोबाजींनी तिला दिलेल्या ‘आनंदवनाची यशोदा आणि अन्नपूर्णा’ या पदव्या तिच्याकडे होत्याच; त्यांच्या जोडीला आता ‘आनंदवनाची गौळण’ या उपाधीची भर पडली होती.

‘एकत्र जीवन, एकत्र जेवण’ ही आनंदवनाची पहिल्या दिवसापासूनची जीवनपद्धती. सामूहिक श्रम-आचार-विचार-वर्तन ही मूल्यं आमच्यात आणि आनंदवनातल्या प्रत्येकात रुजली ती यातूनच. त्यामुळे आनंदवन हा आश्रम न होता एक कुटुंब म्हणून विस्तारू लागलं. दिवसभराची कामं आटोपली की आम्ही सगळे एकत्र जेवत असू. त्यावेळी ज्या गप्पागोष्टी चालत, त्यात नकारात्मकतेला अजिबात स्थान नसे. कुष्ठपीडितांच्या पूर्वायुष्यात त्यांनी भोगलेल्या दु:खांबद्दल जाणून घेण्याचे बाबा जाणीवपूर्वक टाळत. कुष्ठरुग्णांच्या मनात निर्मितीचा विश्वास जागा करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. जेवणानंतर तुकडोजी महाराजांची भजनं, विनोबाजींच्या गीताईमधील अध्याय, सानेगुरुजींची गाणी, गांधीजींच्या सर्वधर्मीय प्रार्थना होत असत. त्यात सर्वजण समरस होत.

त्या दिवसांत मनोरंजनाची कुठली साधनं आनंदवनात असण्याचा प्रश्नच नव्हता. दिवसभर कामाचे ढीग उपसल्यानंतर थकल्याभागल्या कुष्ठरोगी बांधवांचे मनोरंजन करण्यासाठी एकदा बाबांना विनोद (इंदूच्या शब्दांत सांगायचं तर ‘अघोरी प्रकार’!) करण्याची लहर आली. महारोगी सेवा समितीच्या सभासदांची वरोऱ्यात सभा भरत असे. अशाच एका मीटिंगला बाबा गेले होते. मीटिंग संपून जेवणं उरकायला संध्याकाळचे ७.३० वाजले. बाबा पायी आनंदवनात परत यायला निघाले. काळोख पडला होता. त्या दिवसांत आनंदवनात वीज नव्हती. जंगलातला रस्ता तुडवत अंधारात यावं लागे. रात्रीचे ११ वाजत आले तरी बाबांचा पत्ता नव्हता. इंदूच्या मनात विचारांचं काहूर माजलं.. ‘काय घडलं असेल? नाग तर चावला नसेल ना? की वाघाने हल्ला केला असेल?’ तिच्या जिवाची प्रचंड घालमेल होऊ  लागली. शेवटी पलिते पेटवून इंदू आणि सोबतीला पाच कुष्ठरोगी बांधव असे बाबांच्या शोधार्थ जंगलात निघाले. एकजण माझ्याकडे आणि प्रकाशकडे लक्ष ठेवण्यासाठी मागे थांबला होता. त्या गर्द काळोखात बरीच शोधाशोध केल्यानंतर सुमारे २५-३० मिनिटांनी बाबा एका मातीच्या ढिगाऱ्यावर निपचित पहुडलेले दिसले. शरीराची कसलीच हालचाल नव्हती. सदैव खळाळते चैतन्य असे निस्तब्ध पडलेले पाहून इंदूच्या काळजाचा ठोकाच चुकला. मग तिच्या मनात काय आलं काय माहिती! तिने हिय्या करत बाबांच्या पायाला एक जोरात चिमटा काढला. त्यासरशी बाबांची स्वारी खो-खो हसत उठून बसली! इंदू आणि इतर सर्वजण सर्दच झाले. पुढे बराच वेळ बाबांचा हास्यकल्लोळ सुरूच होता. अर्थात झाल्या प्रकारात मनोरंजन झालं ते फक्त रांगडय़ा स्वभावाच्या बाबांचंच!

एकीकडे संकटं अंगावर घेण्याची हौस असलेले बाबा होते, तर दुसरीकडे त्यांच्या बेभान गतीचक्राशी जुळवून घेत झुंजणारी इंदू. आनंदवनाच्या पहिल्या दीड-दोन वर्षांतले हे दिवस अतिशय संघर्षमय होते. जीवावर बेतणारे कित्येक रोमांचक प्रसंग. जशी आपदांची रोज नित्यनवी आव्हानं होती, तशीच श्वापदांचीही होती! पण कशाचीच तमा न बाळगता काम अखंड सुरू होतं.

बाबा म्हणतात..

‘अंधाराची भीती नव्हती

अंधारात प्रकाश होता

संकटांची धास्ती नव्हती

मनगटात मस्ती होती

एकटा कधीच नव्हतो

माणूसच दैवत होते

वेदना जाणवली नाही

तीच साधना झाली होती

श्रमाने कधी शिणलो नाही

तोच श्रीराम झाला होता..’

vikasamte@gmail.com