|| राम खांडेकर

यशवंतराव आणि वेणूताई हे दोघे ‘एक दुजे के लिए’च बनले असावेत. दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. दोघांना परस्परांच्या स्वभावाचे पूर्ण आकलन झालेले होते.

kolhapur satej patil marathi news,
वीरेंद्र मंडलिक यांनी वयानुसार बोलावे; सतेज पाटील, संजय पवारांचा पलटवार
Sambhaji Bhide Meets Devendra Fadnavis in Sangli
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानात संभाजी भिडेंनी नेमकं काय सांगितलं? चर्चांना उधाण
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

त्यांना परस्परांबद्दल नितांत आदर होता.

जून १९७० च्या शेवटच्या आठवडय़ात यशवंतरावांना पंतप्रधानांचा निरोप आला. वरून दिसायला सरळ; परंतु सर्वसामान्यांना लक्षात येणार नाही इतका मथितार्थ त्यात ठासून भरला होता. निरोप असा होता- ‘मी तुमच्याकडे अर्थखाते सोपवणार आहे. तरीही गृहखात्यातच राहण्याची तुमची इच्छा असेल तर माझी हरकत नाही.’ गृहखाते यशवंतराव सोडणार नाहीत याची इंदिराजींना खात्री होती. म्हणूनच इंदिराजींचे पुढचे वाक्य महत्त्वाचे होते- ‘पण गृहखात्याच्या अधिकार क्षेत्रातील इंटेलिजन्स ब्यूरो आणि सीबीआय हे विभाग आता पंतप्रधान कार्यालयाच्या अधीन राहणार आहेत.’ इंदिराजींची कूटनीती यातून दिसून येते. ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ अशी ही परिस्थिती होती. यशवंतरावांसारखा कुशल प्रशासक व सल्लागार सोडणे हिताचे नाही याची इंदिराजींना पुरेपूर कल्पना होती. शिवाय महाराष्ट्रीय जनतेची नाराजी ओढवून घेणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ अशी परिस्थिती उद्भवली असती. सीबीआय हा किती महत्त्वाचा विभाग आहे याची कल्पना गेल्या ३०-४० वर्षांत सर्वाना आलीच आहे. पंतप्रधानांसाठी तर तो हुकुमाचा एक्काच असतो.

इंदिराजी असे काहीतरी करतील याची यशवंतरावांना खात्री होतीच. राजकारण हे यशवंतरावांचे अविभाज्य अंग असल्यामुळे ते सोडणे शक्यच नव्हते. त्यामुळे यापुढची वाटचाल ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करतच करावी लागेल हे स्पष्ट झाले. अस्वस्थ मन:स्थितीत यशवंतराव कार्यालयातून घरी आले. यशवंतरावांचा चेहरा पाहूनच वेणूताई समजून गेल्या, की आज काहीतरी झाले असावे. थोडय़ा वेळाने यशवंतरावांनी स्वत:च जे घडलंय ते वेणूताईंना सांगितलं. दोन महत्त्वाचे विभाग गेल्यामुळे गृहखात्याला काही महत्त्वच उरले नव्हते. या दोन विभागांमुळेच गृहमंत्र्यांना पंतप्रधानांनंतरचा मान असे. दिल्लीतील राजकारणात एक अलिखित नियम आहे : नाकापेक्षा मोती जड होतो आहे असे दिसताच तो लहान करण्याचा प्रयत्न करायचा. किंवा जास्तच जड होत असेल तर सरळ फेकून द्यायचा. आणि तसे करताना दुसऱ्याच्या मानापमानाचा विचारही करायचा नाही.

यशवंतरावांची संरक्षण व गृहखात्यातील कामगिरी दिल्लीतील राजकारण्यांच्याच नव्हे, तर जनतेच्याही डोळ्यांत भरण्यासारखी झाली होती. संधी मिळाली तर पंतप्रधान होण्याची त्यांची इच्छादेखील इंदिराजींना माहीत होती. म्हणूनच त्या ही चाल खेळल्या होत्या. अर्थात अशा खेळी इंदिराजी तत्पूर्वीही खेळल्या होत्या आणि नंतरही खेळल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा खेळी खेळणे त्यांच्या अंगवळणी पडले असावे. उंदराला खेळवण्यात मांजराला जसा आनंद वाटतो तसा आनंद इंदिराजी घेत असाव्यात.

अखेर अर्थखाते स्वीकारण्याशिवाय यशवंतरावांना पर्याय उरला नव्हता. तरीही वेणूताईंच्या कानावर ही गोष्ट घालून त्यांचे विचार जाणून घेणे गरजेचे होते. यशवंतरावांच्या वैवाहिक जीवनात ती एक प्रथाच झाली होती. यशवंतरावांसारखे सुखी कौटुंबिक जीवन बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांच्या वाटय़ाला येत असावे. विशेषत: मंत्र्यांच्या तर नक्कीच येत नसावे. जवळपास २०-२१ वर्षे मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून वावरलो. या कालखंडात कधीच या दोघांमध्ये अबोला, नाराजीसारखे सर्वसाधारण संसारात घडतात तसे प्रकार कधीही पाहायला मिळाले नाहीत. यशवंतरावांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीत वेणूताईंचा मोठा वाटा होता. अतिशयोक्ती नाही, परंतु ‘यशवंतराव वजा वेणूताई म्हणजे शून्य’ असेच उभयतांचे वर्तन, स्वभाव आणि नाते होते. दिल्लीत राजकारण्यांचा.. खासकरून सत्ताधीशांचा असा संसार मी तरी पाहिलेला नाही. वेणूताईंचे वागणे-बोलणे कर्मयोग्यासारखे होते. त्यांना कसलाही मोह नव्हता.

‘लग्न करीन तर देशभक्ताशीच!’ हे ध्येय बाळगलेल्या वेणूताईंचा २ जून १९४२ रोजी यशवंतरावांशी विवाह झाला. चव्हाण कुटुंबाच्या घराच्या उंबरठय़ावर ठेवलेले माप ओलांडून वेणूताईंनी घरात प्रवेश केला आणि लवकरच त्यात त्या समरसही झाल्या. देशभक्ताचा संसार म्हणजे सुळावरील पोळी हा अनुभव त्यांना दोन-तीन महिन्यांतच आला. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनात यशवंतरावांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यास्तव त्यांना अनेक दिवस तुरुंगात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. वेणूताईंच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते- न होते तोच त्यांचे दोन मोठे दीर गेले. त्यामुळे त्यांच्या पत्नी (वेणूताईंच्या जावा) आणि मुलाबाळांचे संगोपन, पालन-पोषण करण्याची जबाबदारी यशवंतराव-वेणूताईंवर येऊन पडली.

१९४७ साली यशवंतराव पार्लमेंटरी सेक्रेटरी झाल्यामुळे मुंबईला गेले आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी वेणूताईंवर आली. तरुण वयात तुटपुंज्या उत्पन्नात एवढय़ा मोठय़ा कुटुंबाचा संसार वेणूताईंनी हालअपेष्टांची पर्वा न करता सुखाने व आनंदाने करून दाखवला. वेणूताई हे सगळं कशा सांभाळत असतील याची काळजी यशवंतरावांना मुंबईत असे. त्यामुळे अधूनमधून पत्र लिहून ते वेणूताईंना कोणाकडून उधार घ्यायचं, याबाबतच्या सूचना करीत असत. १९५२ साली यशवंतराव मंत्री झाले आणि सर्व पसारा घेऊन वेणूताई मुंबईत आल्या. पुढे चार वर्षांनी यशवंतराव मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकीय वाटचालीने वेग घेतला. त्यामुळे संसारासाठी वेळ द्यायला यशवंतरावांना आता जमणार नाही याची वेणूताईंना जाणीव झाली. त्यामुळे मुंबईत आल्याबरोबर त्यांनी वृद्ध सासूबाईंसह सगळ्या कुटुंबाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. आणि कोणतीही कुरबूर न करता त्यांनी ती यशस्वीरीत्या पारही पाडली. परंतु ही तर सुरुवात होती. त्यांची खरी सत्त्वपरीक्षा १९६२ साली दिल्लीत गेल्यानंतर सुरू झाली.

मराठीतील बहुतांश विनोद पती-पत्नी नात्यावर असतात. यशवंतराव-वेणूताई यांचे वैवाहिक जीवन मात्र यास पूर्णपणे अपवाद होते. याचे कारण दोघांनी आखून घेतलेली लक्ष्मणरेषा! यशवंतरावांच्या सरकारी कामांत, राजकारणात वेणूताई कधी नाक खुपसत नसत. यशवंतरावही वेणूताईंच्या कौटुंबिक व्यापांत अजिबात लक्ष घालत नसत. वेणूताई सर्व काही छान निभावत असल्यामुळे यशवंतरावांना ती चिंता नव्हती. याविषयीची एक आठवण सांगावीशी वाटते. वेणूताई गेल्यानंतर स्वयंपाकी जेव्हा भाजीसाठी पैसे मागत असे तेव्हा यशवंतराव त्याला फक्त १०० रुपये देत. आठ-नऊ माणसांचा सकाळ-संध्याकाळचा स्वयंपाक आणि यशवंतरावांची भाज्यांची आवडनिवड यात १०० रुपयांची भाजी एक-दोन दिवसच पुरत असे. स्वयंपाक्याने मला येऊन हे सांगितलं तेव्हा मी त्याला २००-३०० रुपये दिले आणि सध्या साहेबांना काही बोलू नकोस असे सांगितले.

खरे तर यशवंताराव आणि वेणूताई ‘एक दुजे के लिए’च बनले असावेत. दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. महत्त्वाचे म्हणजे दोघांनाही परस्परांच्या स्वभावाचे पूर्ण आकलन होते आणि त्यानुरूप उभयतांचे वागणे असे. यशवंतरावांकडे येणाऱ्यांच्या भेटीगाठीच्या वेळी वेणूताई कधीही दिवाणखान्यात डोकावत नसत. आपल्या तोळामासा प्रकृतीमुळे यशवंतरावांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या यशवंतरावांबरोबर रशिया सोडून कोणत्याही परदेश दौऱ्यावर गेल्या नाहीत. सायंकाळचा बाजारहाट वगळता त्या फारशा बाहेर पडत नसत. दोघांना परस्परांबद्दल नितांत आदर होता. एकदा सायंकाळी वेणूताई कनॉट प्लेसमधील दुकानात स्वेटर खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे दुकानात खरेदीसाठी येणारी व्यक्ती ही कधीच मध्यमवर्गातली नसते. स्वेटर पाहत असताना त्यांना शेजारी उभी असलेली बाई त्यांच्या हातातल्या मोठय़ा पर्समधून लहान पर्स काढत असल्याचे दिसले. वेणूताई ताबडतोब बाहेर आल्या. काय झाले कोणालाच कळले नाही. त्या घामाने ओल्या झाल्या होत्या. बंगल्यावर परतल्यावर त्यांनी साहेबांना ताबडतोब फोन लावून देण्यास सांगितले. साहेब त्यावेळी दौऱ्यावर होते. साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतरच त्यांनी पाण्याचा घोट घेतला आणि मोकळा श्वास सोडला.

एकदा यशवंतराव कराड-सातारा दौऱ्यावर असताना वेणूताईंच्या काकूंचे निधन झाले. अंत्यविधी झाल्यानंतर त्यांनी वेणूताईंना ही दु:खद वार्ता सांगण्यासाठी टेलिफोन केला. खरं तर दुसऱ्या दिवशीच यशवंतराव दिल्लीला जाणार असल्याने आणि ही बातमी ऐकून वेणूताईंची काय अवस्था होईल याची जाणीव असल्यामुळे बहुतेक नातेवाईकांनी ‘आताच ही बातमी वेणूताईंना सांगू नये,’ असे यशवंतरावांना सुचवले होते. परंतु वेणूताईंचा स्वभाव माहीत असल्याने ही बातमी त्याच दिवशी त्यांना कळवली नसती तर यशवंतरावांना अपराध्यासारखे वाटले असते. नेहमीप्रमाणे मी त्यावेळी दिल्लीत त्यांच्या बंगल्यावरच होतो. यशवंतरावांनी मला ही बातमी सांगून डॉक्टरांना आणि बंगल्यातील चपराशांच्या बायकांना बोलावून घेण्यास सांगितले. अर्धा-पाऊण तासाने त्यांनी पुन्हा फोन केला आणि ते वेणूताईंशी बोलले. त्यांना घडलेली दु:खद घटना सांगितली. अपेक्षेनुसार बातमी ऐकताच त्यांनी हंबरडा फोडला. तो धक्का सहन न होऊन त्यांचा रक्तदाब वाढला. परंतु डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिल्यामुळे तास-दीड तासाने त्यांना थोडे बरे वाटले. दिल्लीला गेल्यानंतर ती बातमी वेणूताईंना सांगितली असती तर काय घडले असते याची पूर्ण कल्पना असल्यामुळेच त्या दिवशी धोका पत्करून ती बातमी कळवणे यशवंतरावांना उचित वाटले होते.

यशवंतराव हे दिल्लीत महाराष्ट्राचे वैभवस्थान होते, तर वेणूताई महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक. त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी घसरला नाही. मंत्र्याची पत्नी कशी असावी, तिचा पेहेराव व वागणूक कशी असावी, याच्या त्या आदर्श होत्या. वेणूताईंचे आदरातिथ्य पाहुण्यांना, नातेवाईकांना आश्चर्यचकित करीत असे. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची सुख-दु:खे त्या आपलीच समजत. महाराष्ट्रातील सर्व सण त्या उत्साहाने साजरे करीत. नरक चतुर्थीला बंगल्यातील सर्वाच्या घरी अगदी साडेसात-आठलाच फराळाचे ताट येत असे. वेणूताईंना मंगळसूत्राखेरीज इतर दागिन्यांची हौस नव्हती.  एकदा मी आणि माझी पत्नी दिल्लीतील करोलबाग भागात गेतिथे लो असताना आमची योगायोगाने तिथे वेणूताईंशी भेट झाली. नोकराला काही सामान आणायला पाठवून त्या गाडीत बसल्या होत्या. गाडीजवळ जाऊन पाच-सात मिनिटे आम्ही त्यांच्याशी बोललो. ‘घरी परत कसे जाणार?,’ असे विचारून नोकर सामान घेऊन आल्यावर त्या निघून गेल्या. आम्ही घरी पोहोचत नाही तोच बंगल्यावरून साहेबांनी बोलावल्याचा फोन आला. खरं तर साहेबांनी नव्हे तर वेणूताईंनीच बोलावलं होतं. दोन-तीन मिनिटं इतर चौकशी केल्यानंतर वेणूताई मूळ मुद्दय़ावर आल्या. म्हणाल्या, ‘सौ. खांडेकरांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं.’ मी त्यांना सांगितलं, कालच ते वाढवलं (तुटलं) असल्याचं बायकोनं सांगितलं. उद्या ते दुरुस्त करून आणीन.’ हे ऐकताच रागाने वेणूताई म्हणाल्या, ‘याचा अर्थ त्या मंगळसूत्राशिवाय रात्र काढणार. तुमच्यात सवाष्ण मंगळसूत्राशिवाय राहिलेली चालते? बरेच सुधारक आहात. दुसरे मंगळसूत्र घेण्याची तुमची ऐपत नाही? तशी गरज वाटली नाही तुम्हाला?’ जवळपास १०-१२ मिनिटं मला काहीएक बोलू न देता वेणूताईंनी सात पिढय़ांना पुरेल इतका माझा उद्धार केला. यशवंतराव हे सगळं ऐकत होते आणि गालातल्या गालात हसत होते. वेणूताई आपल्या कर्मचाऱ्यावर इतक्या रागावलेल्या मीच काय, पण यशवंतरांनीही कधी पाहिलं नसेल. पण मला माहीत होतं- या रागामागे त्यांचा जिव्हाळा आहे. मला तर घामच फुटला होता. बंगल्याच्या ऑफिसमध्ये येऊन मी १०-१५ मिनिटं बसलो. दोन-तीनदा पाणी प्यायलो. थोडं बरं वाटलं तोच आत बोलावल्याचा पुन्हा निरोप आला. खरं तर आता ऐकवण्यासारखं शिल्लक काही उरलं नव्हतं. मी घाबरतच आत गेल्यावर वेणूताईंनी आठ-नऊ इंच लांबीची एक डबी माझ्या हातात दिली आणि हे मंगळसूत्र पत्नीला द्यायला सांगितलं. घरी जाऊन डबी उघडली तर त्यात लांबलचक, पोवळं असलेलं दोन वाटय़ांचं सोन्याचं नवीन मंगळसूत्र होतं. यावरून वेणूताईंमधील स्त्री किती जागरूक आणि कर्तव्यदक्ष होती याची जाणीव झाली.

दिल्लीतील वेणूताईंचे विश्व म्हणजे साहेब आणि ते तिथे नसताना चपराशांच्या बायका एवढंच होतं. साहेबांना हवी असलेली पुस्तकं आणणं, सकाळीच त्यांचे कपडे, ऑफिसची बॅग तयार करून ठेवणं, देशातील वा परदेशातील प्रवासाला ते जायचे असल्यास त्यांच्या बॅगा तयार करणं, त्यात आठवणीनं त्यांची औषध ठेवणं, ही सर्व कामं वेणूताईच करीत. यशवंतरावांच्या प्रवासी बॅगमध्ये महात्मा गांधींचा फोटो कायम असे. यशवंतरावांशिवाय वेणूताई आणि वेणूताईंविना यशवंतराव हा विचारसुद्धा करता येणार नाही. मे १९८३ च्या शेवटच्या आठवडय़ात वेणूताईंनी अंथरुण धरले. रात्री साहेबांना जागावे लागू नये म्हणून त्यांनी मला राहावयास बोलावले होते. मी बारा-एकपर्यंत त्यांना झोप येईतो जागत असे. २ जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. यानिमित्ताने वेणूताईंचे भाऊ-भावजय, पुतणे दिल्लीत आले होते. १ जूनला सकाळी नोकराला बोलावून त्यांनी उद्यासाठी काय काय आणायचे याची यादी आणि पैसे त्याला दिले. चपराशांच्या बायकांना बोलावून त्यांनी करावयाची कामे सांगितली. साधारणत: साडेदहाच्या सुमारास दवाखाना, अ‍ॅम्बुलन्स वगैरे गोष्टी त्यांच्या कानावर येऊ लागल्या. आपल्याला आज दवाखान्यात हलवणार असल्याचं त्यांना जाणवलं. यशवंतरावांना त्यांनी जवळ बोलावून- ‘तुम्ही मला दवाखान्यात ठेवणार आहात का?’ असं विचारलं. ‘घरी उपचार करणं आता शक्य नाही..’ असं यशवंतरावांनी म्हणताच त्या म्हणाल्या, ‘मला हो की नाही, एवढंच सांगा.’ यशवंतरावांनी ‘हो’ म्हणताच काही सेकंदातच सकाळपासून हसत-खेळत, उत्साहात असलेल्या वेणूताई यशवंतरावांच्या अंगावर कोसळल्या आणि त्यांच्या कुशीतच त्यांची प्राणज्योत मालवली. १ जूनला सायंकाळी त्यांचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला. २ जून १९४२ साली सवाष्णीचा साजशृंगार करून वेणूताईंनी चव्हाणांच्या घरात प्रवेश केला होता आणि बरोब्बर २ जून १९८३ रोजी तो उंबरठा ओलांडून त्या दूरच्या प्रवासाला निघून गेल्या. फरक एवढाच होता, की यावेळी प्रथमच यशवंतरावांच्या मागे चालण्याची प्रथा मोडून त्या पुढे आणि यशवंतराव मागे होते.

ram.k.khandekar@gmail.com