स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणामुळे स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाचा स्तर उंचावण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या; परंतु प्रत्यक्षात त्या दृष्टीने प्रयत्न होत नव्हते. त्यामुळे संक्रमण काळाचा उंबरा ओलांडून स्वातंत्र्योत्तर जीवनात प्रवेश करण्याच्या टप्प्यावर संधिकाळाने धूसर वातावरण निर्माण केले. या संधिकाळातच दीपस्तंभाची भूमिका ‘स्त्री’च्या संपादकांनी घेतली.

सा ल १९५० ओलांडले. सर्वच दृष्टीने नवा टप्पा सुरू झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. प्रजासत्ताक राज्यपद्धतीचा स्वीकार झाला. स्त्रियांना घटनात्मक समानता मिळाली. शिक्षण, सेवा, मतदान तसेच निवडणुकीला उभे राहण्याचेही अधिकार मिळाले. वरवर बघता सारे काही छान छानच होते. स्त्रियांचे प्रश्न संपले असं वाटत असताना स्त्रियांच्या जीवनाला नवीन उभारी आपोआप येणार असे वाटण्याची स्थिती मात्र फार काळ राहिली नाही.
कडवट वास्तवाची लख्ख जाणीव लगेचच झाली; विवाहविषयक नवीन कायदे करणाऱ्या ‘हिंदू कोड बिला’ला कडाडून विरोध झाला. एखादी गोष्ट तत्त्वत: मान्य करणे आणि ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवणे यामधील दरी स्पष्ट झाली. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्त्रियांना अपेक्षित उमेदवारी मिळाली नाही. पहिल्या पंचवार्षिक योजनेत स्त्रियांसाठी कोणती विशेष योजना नव्हतीच. बाह्य़ स्तरावरील निराश करणाऱ्या या स्थितीपेक्षा प्रत्यक्ष जीवनाच्या स्तरावरील स्थिती फारशी वेगळी नव्हती. स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढत होते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या प्रमाणात वाढ होत होती. दैनंदिन जीवनाचा स्तर उंचावण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या. परंतु प्रत्यक्षात त्या दृष्टीने प्रयत्न होत नव्हते. त्यामुळे संक्रमणकाळाचा उंबरा ओलांडून स्वातंत्र्योत्तर जीवनात प्रवेश करण्याच्या टप्प्यावर संधिकाळाने धूसर वातावरण निर्माण केले.
परंतु या संधिकाळातच दीपस्तंभाची भूमिका ‘स्त्री’च्या संपादकांनी घेतली. संवादाचा रोख बदलला. संक्रमणकाळातील अन्य मासिकांची असणारी साथही या टप्प्यावर नव्हती. ‘स्त्री’च्या संपादनात दीपस्तंभाची जबाबदारी घ्यायला नवी पिढी पुढे आली. मुकुंदराव किलरेस्कर-शांताबाई किलरेस्कर पती-पत्नी उमेदीने काम करू लागले. लवकरच त्यांच्या जोडीला विद्याताई बाळ आल्या. नवीन पिढीने संवाद सुरू केला तेव्हा सक्षम लेखिकांची फळीच त्यांच्या सोबत होती. मालतीबाई बेडेकर, कृष्णाताई मोरे, इरावती कर्वे, कुसुमावती देशपांडे, डॉ. चंद्रकला बटे, कृष्णा निंबकर, शैला पेंडसे आदी स्त्रियांच्या प्रश्नांवर दुसऱ्या कोणी विचार करण्याची, उपाय सुचविण्याची मानसिक, बौद्धिक गरज स्त्रियांनी केव्हाच संपवली होती. सर्व विषयांवर मौलिक लेखन करण्यास स्त्रिया सक्षम होत्या. एखाद्या विषयावर संवादाचे दीर्घकाळ आदानप्रदान होत असे.
संपादकांसमोर संवादाची दुहेरी जबाबदारी होती. काळाबरोबर पुढे सरकणाऱ्या स्त्री जीवनासाठी निकोप वातावरण निर्माण होण्यासाठी संवादातून वैचारिक अभिसरण घडवायचे होते. त्यासाठी काही बदलांना चालना द्यायची होती. प्रसंगी संपादकीयातून थेट भाष्य करीत ‘काळाचे भान’ जागते ठेवायचे होते. १९७५च्या ‘महिला वर्ष’ पूर्वकाळातील संवादाला म्हणूनच महत्त्व आहे. स्त्रियांचा शैक्षणिक विकास, कार्यक्षमतेत वाढ, नोकरी करणाऱ्या स्त्रियांविषयी बदलती जाणीव, स्त्री-पुरुषांचा समाजातला वावर, स्त्रीच्या सुखाच्या बदलत्या कल्पना, प्रौढ कुमारिकांचा प्रश्न, विवाह समारंभ, वधूवर परीक्षेत अपेक्षित बदल, इत्यादी विषयांवर कधी चर्चा, कधी परिसंवाद, कधी स्पर्धा इत्यादी रूपांनी संवादाचे सत्र अखंड झडत होते.
स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध अजिबातच नव्हता. परंतु एकंदर जीवनाच्या दृष्टीने शिक्षणाचे उद्दिष्ट काय? या विषयी कल्पना तयार होत नव्हत्या. ‘लग्न व संसार’ स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाच्या, मग शिकून करायचे काय? संसार! महाविद्यालयीन शिक्षण स्त्रिया घेत होत्या. परंतु ते शिक्षणसुद्धा लग्न जमेपर्यंतच. मॅट्रिकपर्यंत सर्वसाधारणपणे शिक्षण होत होते. पुढे काय? हाच विषय प्रथम चर्चेसाठी आला. मुली मॅट्रिक झाल्या पुढे काय? मालतीबाई बेडेकरांनी चर्चेचे निष्कर्ष मांडले. ‘सुशिक्षित स्त्रियांचे संसार अपेक्षेप्रमाणे सौख्यपूर्ण होताना दिसत नाहीत. भावी आयुष्यात ठसठस राहू नये म्हणून बुद्धीला प्रगल्भता न आणणे हेच सुखाचे ठरते. तेव्हा मुली मॅट्रिकपर्यंत शिकल्या तेवढे पुरे.’
संपादकांनी मागविलेल्या प्रतिक्रियांमध्ये वाचक भगिनींनी प्रतिवाद करणाऱ्या प्रतिक्रिया पाठविल्या. संवाद घडला. शिक्षणाने स्त्रियांची मानसिकता कशी बदलत होती. याचा प्रत्यय देणाऱ्या प्रातिनिधिक अशा प्रतिक्रिया शीला नेरुरकर, मीनाक्षी साने व्यक्त करतात. शीला नेरुरकरांच्या मते शिक्षणानेच स्त्रियांचा संसार सौंदर्यपूर्ण आधुनिक झाला आहे. शिक्षणानेच त्या विवेकी, प्रगल्भ होतील. पती-पत्नी आपल्या व्यवसायात रमतील. तेवढी वैवाहिक जीवने सुखी होती.’ मीनाक्षी साने यांनी स्त्रियांच्या ठसठसशीचे नेमके कारणच सांगितले. ‘सुशिक्षित स्त्रियांची ठसठस शिक्षणामुळे येत नसून कुटुंबात तिला जे दुय्यम स्थान मिळते व स्वत:च्या विकासाची संधी मिळत नाही त्यामध्ये आहे. स्त्री जीवनाचे प्रश्न सामुदायिक जीवनाशी जोडले आहेत. हे विसरून चालणार नाही.’
बालविवाहाची समस्या नाहीशी होण्यासाठी ‘शारदा कायदा’ (बालविवाह प्रतिबंधक कायदा) झाला. स्त्रियांचे शिक्षण वाढले. त्या नोकरी करू लागल्या. घरात एक कमावता हात आला. परिणामी स्त्रियांचे विवाहाचे वय लांबत जाऊ लागले. प्रौढ कुमारिका दिसू लागल्या. ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ हा प्रश्न खरोखरच कुमारिकांना पडला. प्रौढ कुमारिकांच्या विवाहाच्या आड कोण येते? शिक्षणामुळे होते का? या विषयी साधकबाधक विचार व्हावा म्हणून ‘स्त्री’ने ‘प्रौढ कुमारिकांचा विवाहाचा प्रश्न कसा सुटेल?’ अशा विषयावर परिसंवाद आयोजित केला. अनेक नामवंत स्त्रियांनी, रघुनाथशास्त्री कोगजे आदींनी परिसंवादात आपले विचार व्यक्त केले. ‘शिक्षणाच्या नावाने व्यर्थ हाकाटी नको,’ असे स्पष्ट मत कृष्णाबाई मोरे यांनी दिले. शिक्षित मुलगी संसाराची नीट जोडीदार होऊ शकेल अशी पुरुषांना खात्री वाटत नाही. म्हणून ते कमी शिकलेली मुलगी पसंत करतात. त्याने आपला वरचष्मा राहू शकेल असा भ्रम असतो, असेही कृष्णाबाई म्हणाल्या.
परिसंवादाचा समारोप करताना कुसुमावती देशपांडे यांनी समतोल विचार मांडले. ‘शिक्षण लग्नाच्या आड येत नाही. लग्न शिक्षणाच्या आड येते. शिकलेल्या मुलांच्या जीवनाविषयी अपेक्षा बदलतात ना! मग तशाच शिकलेल्या मुलींच्या बदलणार हे साहजिक आहे. तसेच भाषा, सामाजिक पातळी, राहणी या स्वरूपात जातीचाही विचार येतो. पण हे विचार प्रमाणाबाहेर आड येऊ देऊ नयेत. मुलींना अभ्यास कलाक्षेत्र कोणत्याही योग्य कामाची आवड हवीच. विचारी जीवन-दृष्टी हवी.’
चर्चा किती झाली तरी विकासाच्या दृष्टीने एकदा पुढे पडलेले पाऊल कधी मागे येत नसते. जीवन काळाबरोबर पुढे जात असताना बदलत्या जीवनक्रमाच्या दृष्टीने स्त्रीमध्ये अनुकूल बदल कसे झाले पाहिजेत. ‘स्त्री’ची कार्यक्षमता कशी विकसित केली पाहिजे या दिशेने विचारांची संवादाची दिशाही घेण्याचेही प्रयत्न होतेच. स्त्रियांची नेमकी कुचंबणा का होत आहे या विषयांची जाणीवही संपादक व्यक्त करीत होतेच. स्त्रियांपुढचा प्रश्न सोडविण्यासाठी संपादकांनी विविध बाजूंनी स्त्रियांबरोबर पुरुषांना, समाजालाही विचारप्रवृत्त केले. कारण प्रश्न स्त्रियांबरोबर पुरुषाचा, कुटुंबाचा, समाज व्यवस्थेचाही होताच.
महाराष्ट्रीय महिलांना आजच्या स्त्री जीवनाविषयी काय वाटते? याविषयीची स्त्रियांची मते जाणून घेण्यासाठी प्रश्नावलीच्या आधारे स्त्री मनाचा कानोसा घेतला. ५०० स्त्रियांनी उत्तरे पाठवली. त्या आधारेच लक्षात आले की, नोकरी किंवा कामधंदा करून संसाराला आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या स्त्रियांना अर्थार्जन दिवसेंदिवस आकर्षक वाटत आहे. स्त्रिया सार्वजनिक मनोवृत्तीच्या, निर्भय होत आहेत. वय १८ ते २० स्त्रियांना विवाहासाठी योग्य वय वाटते. स्त्रियांचा नोकरी करण्याकडे कल वाढत आहे. त्यासाठी योग्य मनोभूमिका व्हावी या विचारांनी संपादकांनी ‘आजच्या समाजात स्त्रीची भूमिका कशी आहे? कशी असावी’, ‘स्त्रियांना स्वातंत्र्य हवे म्हणजे नेमके काय हवे?’ इत्यादी विषयांवर वाचकांची मते मागवून प्रसिद्ध केली. मिळवती पत्नी, मुलगी, सून या संदर्भात पुरुषांची मतेही मागवली होती.
१९७० मध्ये ‘स्त्री’ला ४० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने स्त्री-जीवनाचा आढावा घेणारा परिसंवाद आयोजित करून सरोजिनी वैद्य, श्री. ज. जोशी, यदुनाथ थत्ते, प्रभा मराठे, उल्हास लुकतुके इत्यादी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आवर्जून विचार व्यक्त करण्यास सांगितले गेले.
हे सारे होत असताना वर्ष, महिन्यांची पाने उलटत होतीच. जीवन काळाबरोबर पुढे जात विकसित होत होते. स्त्रिया आता विविध क्षेत्रांकडे वळत होत्या. कर्तृत्व सिद्ध करीत होत्या. ‘करिअर’ फक्त पुरुषांपुरते मर्यादित राहिले नाही. काळाबरोबर ‘करिअर वुमन’ पुढे येत होती. पती-पत्नी एकाच क्षेत्रात काम, कार्य करण्याचे योग येऊ लागले. आता ‘जया-अमिताभ’चा अभिमान होणार का? नवीन शंका आली.
संपादकांनी समयसूचकतेने ‘कपिलाषष्ठीचे चार योग’ सदरात एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या पती-पत्नीचे अनुभव प्रसिद्ध केले. देवीसिंह शेखावत, प्रतिभा पाटील, अमर वर्मा-माणिक वर्मा, भा. रा. भागवत- लीलावती भागवत, सुरेश मूळगावकर-सुहासिनी मूळगावकर अशा चार जोडय़ा होत्या.
स्त्रीचं स्त्रीत्व कशात आहे? या विचाराबरोबरच करिअर वुमनला आता पतीने समजावून घ्यायला हवे. या जाणिवेने पुरुषानं याचं भान राखायला हवं, या विषयालाही महत्त्व आले होतेच. डॉ. सरोजिनी वैद्य यांनी म्हटले, ‘स्त्रीच्या विकसित होत आलेल्या व्यक्तिमत्त्वाबरोबर अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. त्यांची कदर करणे म्हणजे स्त्रियांचे लाड करणे नव्हे. तर स्त्री-पुरुष सहजीवन निर्माण होण्यासाठी आणि समाजस्वास्थाची ती गरज आहे. यासाठी घरकामे पुरुषांची नाहीतच ही कल्पना व सेवा आज्ञाधारकपणा वा अपेक्षा आणि पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ ही भावना प्रयत्न करून आचार-विचारांतून पुरुषांनी घालवली पाहिजे,’ अशी सूचनाही बाईंनी केली.
उच्चशिक्षित स्त्रीची काळाबरोबर बदलणारी मानसिकता सहजीवनाच्या कल्पना व विचारच डॉ. सरोजिनी वैद्य यांनी व्यक्त केले. वर्ष होते १९७३. महिला वर्षांच्या आधी दोन वर्षे. नवीन चाहूल लागत होती.. ल्ल
dr.swatikarve@gmail.com