नवपर्वाकडे जाण्यासाठी संपादक लेखांतून, चर्चेतून स्त्रीमनाची मानसिक तयारी करूनच घेत होते. १९५१ पासून काळाच्या पडद्यावर उमटणारी प्रकाशरेषा अधिक प्रकाशित झाली. नवपर्वाची प्रभा फाकण्यास सुरुवात झाली आणि स्त्री जीवनात त्याचे प्रतििबब उमटू लागले.

सुखासीनतेच्या काळातच संघर्षांची आच कमी होते. विचारांची धार बोथट होऊ शकते. कार्य करण्याची ऊर्जा मंदावते. सांघिक कार्याची निकड कमी झाल्याने कदाचित संघटनेची बांधणीसुद्धा सैल होण्याची शक्यता असते. हे पूर्णपणे ठाऊक असल्यानेच संपादकांना स्त्रियांच्या संघटना, चळवळी, परिषदा इत्यादींची ऊर्जा प्रज्वलित ठेवायची होती. वास्तवाचे भान देत स्त्रियांना प्रोत्साहन द्यायचे होते. संधिकाळात स्त्री मनाशी व्यापक स्तरावर संवादाची गरज होती. एकाच वेळी विविध स्वरूपांत साधलेल्या संवादातूनच काळाच्या पडद्यावर एक प्रकाशरेषा उमटत गेली. १९७५ च्या महिला वर्षांच्या परिवर्तन बिंदूपर्यंत.
वास्तवाचे भान देणारे संपादकीयातील थेट भाष्य. सांघिक कार्याला प्रोत्साहन, चर्चा, नवीन, मार्गाचे सूचन, राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील कार्याचे वृत्त स्त्रियांपर्यंत पोचवत काळाचे भान संपादकांनी जागते ठेवले. हिंदू कोड बिलाला होणारा विरोध बघूनच संपादकांनी संघटनेच्या कार्याची गरज स्पष्ट केली. स्त्रियांच्या चळवळींविषयी स्त्रियांचीच मते व दृष्टिकोन स्पष्ट होण्यासाठी जानेवारी ते मार्च १९५१ असा तीन महिने मोठा परिसंवाद ‘स्त्री’मध्ये घेतला गेला. ‘महिला चळवळीचे कार्य आता संपले आहे काय?’ हा परिसंवादाचा विषय होता.
प्रेमा कंटक, उमाताई भट, इंदिरा देवधर, शांता मुखर्जी (भालेराव), मीनाक्षी साने, यमुताई किलरेस्कर, गीता साने आदी १८ स्त्रियांनी विचार व्यक्त केले. महत्त्वाचे म्हणजे ‘स्त्रियांचे प्रश्न आता संपले आहेत. आता संघटना किंवा चळवळ नको’ असा विचार कोणीही व्यक्त केला नाही. उलट संघटनेची आताच गरज आहे. सामान्यांपर्यंत पोचले पाहिजे. फक्त चर्चा नको प्रत्यक्ष कार्य हवे.’
असाच स्त्रियांनी सूर लावला होता. ‘महिला चळवळ जोराने वाढावी ही आजच्या भारतास अत्यंत जरुरीची गोष्ट आहे. मग ती महिला परिषदेत असो की बाहेर असो,’ असे मत ‘उलट संघटना वाढवावयास हवी’ या लेखात शांता मुखर्जी यांनी मांडले. ग्रामीण स्त्रियांच्या जीवनाचा विचार व्हावा म्हणून ‘भारतीय महिला संघ : हिंदुस्थानातील खेडय़ात विकास कार्याचे लोण कसे नेता येईल’- हा डॉ. कृष्णाताई निंबकर यांचा अभ्यासपूर्ण विस्तृत लेख आवर्जून प्रसिद्ध केला. ग्रामीण महिलांचे जीवन-प्रश्न कोणते आहेत, त्यासाठी ग्रामीण महिला संघाची आवश्यकता का आहे, त्यासाठी ग्रामीण स्त्री जागृत होणे का व कसे आवश्यक आहे? नाही तर नुसत्या योजना विफल होतील. त्यासाठी योजनाबद्ध दृष्टिकोन हवा. तरच ग्रामीण स्त्रिया जागृत होऊन योग्य भूमिका पार पाडतील. इत्यादी विचार व उपाय लेखिकेने स्पष्ट केले.
स्त्री संस्था व मंडळांना आलेली मरगळ नाहीशी होण्यासाठी संपादकांनी विषयाला कौशल्याने चालना दिली. ‘करतात तरी काय या स्त्री संस्था?’ हा रमा बखले यांचा परखड लेख प्रसिद्ध केला. आज स्त्री संस्था अनेक आहेत. परंतु ठरावीक साच्याचे कार्यक्रम करतात. खऱ्या प्रश्नांचा विचार करीत नाहीत. कुटुंबनियोजन, छोटी बचत, वनमहोत्सव या योजनांमध्ये संस्थांना काम करता येईल. परंतु स्त्रिया या कामात रस घेत नाहीत. स्त्रियांनी अहंगंडातून बाहेर येणे आवश्यक आहे. कितीतरी उपयोगी कामे करून समाधान मिळवता येईल. अशी नाराजीच रमा बखले यांनी व्यक्त केली.
‘वनिता मंडळे कशी असावीत?’ या विषयावर १९६२ मध्ये दिवाळी अंकात परिसंवाद आयोजित केला. आज ग्रामीण ‘महिला बचत गट’ जोरात आहे. ग्रामीण स्त्रिया संघटित होऊन ‘बचत गटाचे’ काम करीत आहेत. परंतु १९६१ मध्ये ‘पंचायत राज’ चा प्रयोग केला गेला. पंचायत राज्यात स्त्रियांसाठी काही जागाही ठेवल्या. ग्रामीण स्त्रियांनी या संधीचा उपयोग करावा म्हणून संपादकांनी ग्रामीण स्त्रियांना आवाहन केले. ‘‘पंचायत राज्यांत महिलांसाठी खास जागा ठेवल्या आहेत. तेव्हा नुसत्या त्या जागा लढवण्यापुरत्या नव्हे तर ही योजना सफल करण्याच्या दृष्टीने महिलांनी प्रश्नांचा विचार करून आपल्या कुवतीप्रमाणे त्यांस सहकार्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शहरातील सुशिक्षित स्त्रियांनी मार्गदर्शन करावे.’’ भगिनी पुढे सरसावून काम करतील असा विश्वासही संपादकांनी व्यक्त केला. एवढेच नव्हे तर ग्रामीण स्त्री जागृतीचा वेध घेणारे ‘खेडय़ातील महिला मंडळ’ हे अनुताई वाघ यांचे सदरही सुरू केले.
महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने होणाऱ्या चर्चेच्या जोडीने परिषदांचे वृत्तांत, स्त्री संस्थांच्या कार्याला नियमित प्रसिद्धी मिळत होतीच. १९५१ मधे मुंबईत भरलेली गृहिणी परिषद स्त्रियांना विधायक कामाचे नवे मार्ग सुचण्यासाठीच होती. सर्वेक्षणातून माहिती गोळा करून स्त्रियांना मार्गदर्शन करणारे हे अधिवेशन होते. स्त्रियांनी एकी करून संघ स्थापन करावेत. संकोच, भीड सोडून कष्टकरी स्त्रियांप्रमाणे कुटुंबासाठी पैसे मिळवावेत. असा संदेश कृष्णाबाई मोरे यांनी दिला. परिषदेतील विचार सविस्तरपणे वाचकांपर्यंत वृतांतातून पोचविले. तसेच १९६१ मध्ये पुण्यात महराष्ट्रीय स्त्रियांचे संमेलन भरवले होते. परिषदेच्या औपचारिकेऐवजी अनौपचारिक चर्चा करणाऱ्या संमेलनाचे संपादकांनी स्वागत केले. जोडीला युद्धोत्तर काळात जागतिक परिषदांतून स्त्री प्रश्नांचा विचार कसा होत आहे. किती परिषदा त्यासाठी भरल्या. याविषयी सविस्तर माहिती रमा बखले देत होत्याच, ‘आंतरराष्ट्रीय स्त्री संस्था’ लेखातून. स्त्रियांना भारतीय स्तरावर स्त्री-जीवनाचा परिचय व्हावा या हेतूने संपादकांनी या काळात बंगाल, राजस्थान, आसाम, केरळ, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतील स्त्री-जीवनाचे सर्वागीण दर्शन घडविणारे विशेषांक प्रसिद्ध केले.
ही संवाद प्रक्रिया घडत असताना काळही वेगाने पुढे सरकत होता. बाह्य़ वातावरणातील पर्यावरण बदलत होते. विशेषत: १९६५ नंतर सामाजिक दृष्टीने अनेक परिवर्तनवादी चळवळींचे वारे वाहू लागले. दलित पँथरची चळवळ तर जोरात होतीच. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, डॉ. कुमार सप्तर्षी यांची ‘युक्रांद’ (युवक क्रांती दल), छात्र वाहिनी इत्यादी चळवळींतून काम करणारी तरुण पिढी युयुत्सु वृत्तीने भारावलेली होती. असमाधानाची तप्तता वातावरणात होती. या वातावरणात स्त्री विश्वातही कोंडी झाली होती. एकीकडे खुणावणारे कर्तृत्वासाठी व्यापक क्षितिज होते. त्याच वेळी प्रत्यक्ष जीवन संकुचित विचारांचे होते. दोन्हीतील तफावत विसंगती स्त्रियांना बोचत, अस्वस्थ करीत होती. वातावरणातील कोंडी आणि स्त्रीमनाची अस्वस्थता ओळखून संपादक त्या दिशेने संवाद करणाऱ्या कल्पनांचे नियोजन करीत होतेच. १९७४ वर्ष उजाडले. संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ चे वर्ष महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले.
१७ ऑक्टोबर १९७३ रोजी महाराष्ट्रात स्त्रियांनी महागाईविरोधी आंदोलनात १०० ठिकाणी ‘लाटणं मोर्चा’ काढला होता. स्त्रियांनी लढाऊ वृत्ती, संघभावना सिद्ध केली होती. स्त्री मनातील ती धग कायम राहण्याच्या दृष्टीने संपादकांनी संवाद सुरू केला. ‘अपत्य हा प्रश्न कोणाचा?’, ‘स्त्रिया घरकामाचे जोखड केव्हा झुगारणार?’, ‘विवाहसंस्था समाजाला पोषक की हानीकारक’, ‘बाल संगोपनात बाबांचा वाटा किती?’, इत्यादी विषयांवर परिसंवाद आयोजित केले. प्रसिद्ध फ्रेंच स्त्रीवादी लेखिका सिमॉन दि बोव्हा यांच्या ‘सेकंड सेक्स’ आणि ‘नेचर ऑफ दि सेकंड सेक्स’ या पुस्तकाचा शांताबाई किलरेस्कर यांनी केलेला सारानुवाद क्रमश: प्रसिद्ध केला. १९७५ मध्ये ‘स्त्रीशक्तीचे आवाहन’ आणि ‘स्त्रीमुक्ती विमोचनाची विचारधारा’ हे दोन परिसंवाद घेतले.
नवपर्वाकडे जाण्यासाठी संपादक स्त्रीमनाची मानसिक तयारी करूनच घेत होते. १९५१ पासून काळाच्या पडद्यावर उमटणारी प्रकाशरेषा अधिक प्रकाशित झाली. नवपर्वाची प्रभा फाकण्यास सुरुवात झाली.
डॉ. स्वाती कर्वे – dr.swatikarve@gmail.com