नव्या विषाणूची अंतर्गत रचना नुकतीच पाहिली गेली आहे. त्यात जुन्या एच ५ एन १ विषाणूच्या तुलनेने अनेक रचनात्मक फरक (म्युटेशन्स) दिसून आले आहेत. या फरकामुळे त्याची मानवी संसर्गक्षमता वाढती आहे. २००३ साली आलेल्या आणि २०१३ साली आलेल्या विषाणूंच्या रचनांची तुलना करून ते कसे उत्क्रांत होत आहेत आणि नव्या साथीची शक्यता निर्माण करत आहेत याबद्दल ‘सेल’या विख्यात विज्ञाननियतकालिकात दोन शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत.

बर्ड फ्लू हा इन्फ्ल्युएंझा ए विषाणूचा प्रकार. नावाप्रमाणे तो फक्त पक्ष्यांनाच होतो. पण आता माणसाच्या जीवनशैलीतील बदलामुळे तो गेल्या काही वर्षांत जगातील काही देशात, विशेषत: आशियातील देशात ठाण मांडून बसला आहे. चीन हा त्यामधील मोठय़ा लोकसंख्येचा खंडप्राय देश. २००३ साली आलेल्या एच ५ एन १ या बर्ड फ्लूच्या विषाणूने या देशात थैमान घातले होते. लाखो कोंबडय़ांची त्यावेळेस कत्तल करण्यात आली होती. चीनबरोबरच इजिप्त, इंडोनेशिया, थायलँड आणि व्हिएटनाममध्येही बर्ड फ्लू पसरला होता. विषाणूच्या संसर्गामुळे साठ टक्के रुग्ण दगावले होते इतका तो प्राणघातक होता.
यावर्षी मात्र केवळ चीनमध्ये एच ७ एन ९ या बर्ड फ्लूच्या नव्या विषाणूने बस्तान मांडायला सुरुवात केली. एप्रिलअखेर तो चीनच्या पूर्व भागातून हळूहळू साऱ्या देशात पसरला. मधल्या काळात अधिकृतरीत्या सव्वाशे रुग्ण या फ्लूने संसर्ग पावले आणि सव्वीस रुग्ण दगावले. मे महिन्याच्या सुरुवाती सुरुवातीला फ्लूचा मानवी संसर्ग दिसेनासा झाला आणि शासकीय यंत्रणाही त्यामुळे निश्चिंत झाली. मानवी संसर्ग संपल्यानंतरही या नव्या फ्लूने काही अवघड प्रश्न निर्माण केले आहेत. मुख्य म्हणजे विषाणूचा मागोवा घेणे त्याच्या वेगळ्या वैशिष्टय़ामुळे कठीण होते आणि संसर्ग गेल्याचा पुरावा देणे त्याहून कठीण होते. विषाणू जरी चीनच्या सीमा ओलांडून जवळच्या देशात गेला नसला तरी २००३ साली आलेल्या बर्ड फ्लूच्या साथीत ज्या देशांना संसर्गाची झळ पोचली असे हाँगकाँग, व्हिएटनाम, इंडोनेशिया हे देश नवा विषाणू आपल्या हद्दीत प्रवेश करू नये म्हणून विशेष काळजी घेताना दिसत आहेत.
मानवी संसर्ग होणाऱ्या विषाणूचा जसा रुग्णारुग्णातील मागोवा घेऊन प्रसार पहाता येतो तसा प्रकार या विषाणू संसर्गात नाही. त्यामुळे चीनच्या मध्यावर असलेल्या शांघाय प्रांतातून तो थेट राजधानी बीजिंगमध्ये कसा पोचला याचा पुरावा मिळाला नाही. थोडक्यात संसर्गाच्या ठाम दिशा नव्हत्या. संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या वयाबद्दलही निश्चित निरीक्षणे नाहीत. तो लहान मुलात आणि मध्यम तसेच वयस्क लोकांतही आढळतो आहे. काही रुग्णांच्या बाबतीत ते विषाणुजन्य पक्ष्याच्या किंवा रुग्णाच्या संसर्गात नसताना तो झाला आहे. त्यामुळे पक्ष्याहून इतर प्राणी संसर्गास कारणीभूत आहेत का, असाही प्रश्न केला जात होता.
एच ७ एन ९ बर्ड फ्लूची मोठी डोकेदुखीची गोष्ट म्हणजे त्या विषाणूचा संसर्ग झालेले पक्षी लक्षणे दाखवत नव्हते किंवा बळीही पडत नव्हते! ही बाब वैज्ञानिकांना गोंधळात टाकणारी होती. त्यामुळे बाधीत झालेले पक्षी शोधणे आणि त्यांना वेगळे करणे कठीण होत होते. बीजिंग आणि हेनान प्रांतात तो असाच फैलावला होता. आधीच्या एच ५ एन १ बर्ड फ्लूच्या साथीत पक्ष्यात फ्लूची बाधा झालेली कळायची आणि सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना तसा इशारा देणे सोपे जायचे. पण या नव्या फ्लूच्या बाबतीत विषाणूचा गनिमी कावा आहे. अशा पक्ष्यापासून मानवी संसर्ग दिसल्यानंतर उलटय़ा बाजूने पक्ष्यांचा मागोवा घ्यावा लागला आहे.
पाश्चात्त्य देशाच्या वैज्ञानिकांनी आणि नियतकालिकांनी चीनच्या बर्ड फ्लूची गंभीर दखल घेतली आहे. नव्या विषाणूच्या लक्षणाबद्दल ‘नेचर’ या प्रसिद्ध विज्ञानपत्रिकेत डेक्लान बटलर या वार्ताहराने विशेष वार्तापत्र प्रकाशित केले आहे. व्हिएटनाममधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन केंद्राचे जेरेमी फरार यांनी नव्या विषाणू संसर्गाच्या पद्धतीकडे सतत लक्ष ठेवायची गरज असल्याचे निवेदन दिले आहे. त्यांनी हा विषाणू संसर्ग काही लहान मुलांत लक्षणाविना असल्याचे दाखवून हा न बाधणारा संसर्ग खरा धोक्याचा इशारा आहे असे म्हटले आहे. कारण हाच संसर्ग मानवी शरीराच्या खुब्या जाणून अधिक प्रस्थापित होण्याचा धोका त्यात आहे. तसेच प्रथमच बर्ड फ्लूच्या विषाणूचा संसर्ग थेट पक्ष्यांपासून होत असल्यामुळे त्यापासून काळजी करण्याचे कारण असल्याचे बोस्टॉन येथील हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील विषाणुतज्ज्ञ मार्क लिपसिच यांना वाटते.
नव्या विषाणूची अंतर्गत रचना नुकतीच पाहिली गेली आहे. त्यात जुन्या एच ५ एन १ विषाणूच्या तुलनेने अनेक रचनात्मक फरक (म्युटेशन्स) दिसून आले आहेत. या फरकामुळे त्याची मानवी संसर्गक्षमता वाढती आहे. २००३ साली आलेल्या आणि २०१३ साली आलेल्या विषाणूंच्या रचनांची तुलना करून ते कसे उत्क्रांत होत आहेत आणि नव्या साथीची शक्यता निर्माण करत आहेत याबद्दल ‘सेल’या विख्यात विज्ञाननियतकालिकात दोन शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. या संशोधनाचे प्रमुख संशोधक आहेत राम शशिशेखरन. त्यांच्या मते एच ७ एन ९ या नव्या विषाणूतील केवळ एका अ‍ॅमिनो आम्लातील बदलामुळे तो लक्षणीयरीत्या मानवी संसर्ग वाढवू शकतो. बर्ड फ्लूच्या संसर्गाचा आपल्याला धोका म्हणजे त्याविरुद्धची प्रतिकारशक्ती मुळात विकसित झालेली नसते. त्यामुळे तो जास्त धोकादायक ठरू शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात चीनमधील बदकात हे विषाणू घर करून असल्याचे दिसले आहे. म्हणजे विषाणू दबा धरून आहे.
नव्या विषाणूच्या संसर्गाबद्दलचे बारकावे पाहून झाल्यानंतरही हा विषाणू व त्याची साथ का आली यामागील कारणात चीनमधील हवेच्या प्रदूषणाची गंभीर परिस्थिती हेही एक कारण आहे. ब्रिटनमधून चीनमध्ये स्थायिक झालेल्या झांग झिक्युआन या चिनी गृहिणीचे उदाहरण बोलके आहे. हिवाळ्यात तिला आपल्या मुलाला घरातही मास्क लावून ठेवावा लागतो. मोकळ्या हवेत खेळण्याची गोष्ट दूरच. हिवाळ्यात शिफारस केलेल्या प्रदूषण पातळीहून चाळीसपट अधिक बिजिंगसारख्या राजधानीच्या शहराचे प्रदूषण असते. अशा परिस्थितीत श्रीमंत घरातील मुलांसाठी मोठे ‘डोम’ तयार करून त्यात शुद्ध हवा खेळती ठेवून खेळण्याची हौस भागवली जाते, देशाच्या आर्थिक प्रगतीपुढे सारे काही तुच्छ मानले जाते. बर्ड फ्लूच्या नव्या साथीला चीनमधील ताजा माल (शाकाहारी + मांसाहारी) विकणारी ‘वेट मार्केट्स’ जबाबदार असल्याचे चिनी शासनाने कबूल केले आहे. चिनी माणसाला ताजी कोंबडी घरी नेणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे ती कापाकाप आणि होणारी अस्वच्छता ही अंगवळणी पडलेली असते. मारल्या जाणाऱ्या कोंबडय़ा जशा दाटीवाटीने जाळ्यात बंदिस्त असतात तसे कोंबडय़ा विकणाऱ्यांची मुलेबाळे त्या जाळ्यावर सुखेनैव झोपलेली आढळतात. स्वाभाविकच पक्ष्याची व मानवाची इतकी घसट कुठलाही संसर्ग सहज पसरवू शककतो. २००३ च्या बर्ड फ्लूच्या साथीनंतर चीनने वरील मार्केटसंबंधात स्वच्छतेचे र्निबध घातले होते. पण नंतर ते कागदावरच राहिले.
कोंबडय़ाच्या निर्यातीत अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक लागतो. मोठे परकी चलन देणारा हा व्यवसाय आहे. यातल्या व्यावसायिकांना शिस्त लावणे कठीण जात आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार बर्ड फ्लूचा नवा विषाणू पक्ष्यांना मारत नाही त्यामुळे व्यापारी संतुष्ट आहेत. तर विषाणूचा मानवा मानवात संसर्ग होत नाही म्हणून चिनी शासन आणि जागतिक आरोग्य संघटना निष्क्रिय आहेत. पुढच्या हिवाळ्यात बर्ड फ्लूची साथ येऊ नये व आहे त्या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय इच्छाशक्ती नाही. ती काळजी निसर्गावरच सोपवलेली दिसते. आगामी काळात बर्ड फ्लूचा वारसा चीन तसाच पुढे चालवणार अशी चिन्हे आहेत.