संगणक आणि आता दिवसेंदिवस स्मार्ट बनत संगणकाच्या साऱ्या गरजा भागविणाऱ्या मोबाइल वापरकर्त्यांना अ‍ॅपल, गुगल, याहू, हय़ूलेट पॅकार्ड व इंटरनेट लिलाव कंपनी इबे आदी नावे सुपरिचित असतात. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत श्रेष्ठ तंत्रज्ञ, संगणक बुद्धिवंत असणाऱ्या या संस्थांतील उच्चपदस्थांनी पालक म्हणून आपल्या मुलांबाबत घेतलेली एक भूमिका अंजन घालणारी आहे. त्यांनी आपल्या मुलांना अशा प्राथमिक व माध्यमिक शाळांत घातले, की जिथे योग्य वयाशिवाय संगणक, लॅपटॉप, मोबाइल, स्मार्टफोन ही आधुनिक आयुधेच दिली जात नाहीत. प्रगतीच्या शिखरांवर असलेल्या या तंत्रप्रसारक राष्ट्रामध्ये स्मार्ट गॅझेट्स भविष्यात घडवू शकणाऱ्या स्मार्ट समस्यांबाबत जाग निर्माण होत आहे, आपण मात्र अ‍ॅण्ड्राइड हाताळणाऱ्या चार वर्षांच्या मुला/मुलीच्या कौतुकात पिढीच्या अभिमन्यूकरणात गढलो आहोत याची कल्पनाही आपल्याला नाही..
काळ बदललाय. हाताशी डेस्कटॉप, लॅपटॉप, पामटॉप, मोबाइल, स्मार्टफोन असे माहिती तंत्रज्ञानाचे सगळे आविष्कार आज्ञाधारकासारखे हात जोडून उभे आहेत. इंटरनेट सेवा स्वस्ताळल्यात. मोबाइल कॉलदरही खूप कमी झाले. संगणक किंवा मोबाइलमुळे अनेकांना दारिद्रय़ातून बाहेर पडता आले, नव्या माहितीची पालवी सतत फुटतच राहिली. या तंत्रविकासाच्या एका निश्चित टप्प्यानंतर मात्र सर्वच गॅझेट्सचे कुटुंबीकरण झाले. शाळकरी आणि आता ‘बाळ’करी मुले स्मार्ट फोनच्या अ‍ॅण्ड्रॉइड जाळ्यात लीलया वावरताना आपल्याला मूठभर मांस वाढविणारे कौतुक वाटते, पण या स्मार्ट गॅझेट्सचे गंभीर परिणाम आज विविध राष्ट्रांमध्ये दिसायला लागल्यानंतर त्यावर तोडगा काढण्याची तयारी सुरू झाली आहे.फेसबुक, ट्विटर, गुगल, व्हॉट्स अपच्या, यू टय़ूब यांसारखे अनेक मंच या नवपिढीच्या अभिमन्यूंना उपलब्ध झाले आहेत. या अभिमन्यूंना तंत्रज्ञानाचा हा चक्रव्यूह माहीत झाला, पण त्यातून बाहेर पडण्याची क्षमता त्यांच्यात नाही. अंथरुणात पडेपर्यंत स्मार्टफोनशी खेळणारी मुले पाहिली, की खरेच त्यांची ती गरज आहे का, असा प्रश्न पडतो.  सिलिकॉन व्हॅलीत उच्चपदावर काम करणाऱ्या अ‍ॅपल, गुगल, याहू, हय़ूलेट पॅकार्डमधील कर्मचाऱ्यांनी संगणक वा स्मार्ट आयुधे नसलेल्या शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठविणे पसंत केले. त्यामुळे त्यांच्या विकासामध्ये अडथळे आले नाहीत. या शाळांमध्ये त्याऐवजी कागद, पेन, सुईदोरा, आकार देता येईल असे मातीचे गोळे व इतर नाना प्रकारची खेळणी होती. अमेरिकेसारख्या प्रगत देशात खरं तर चुटकी वाजवताच या शाळांना संगणक, स्मार्टफोन देता आले असते. अनेक धोरणकर्त्यांनी त्या वेळी वॉल्डार्फ स्कूल ऑफ द पेनिनसुला या संस्थेच्या १६० शाळांनी घेतलेल्या या निर्णयाला नाकं मुरडली, पण आयटी कंपन्यांत काम करणारे आई-वडील शाळेत संगणक नको यावर ठाम राहिले.
जगात काय?
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील एक चित्र आपल्याला दिसते तसेच महासत्ता बनू घातलेल्या चीनमध्ये संगणक आणि स्मार्टफोन अति वापरणाऱ्या शाळकरी मुलांची समस्या भीषण बनली आहे. मुलांना संगणकापासून लांब ठेवण्यासाठी, त्यांचे संगणक व्यसन घालविण्यासाठी ‘व्यसनमुक्ती कॅम्प’ तयार केले जात आहेत. जपान आणि दक्षिण कोरीयामध्ये शाळकरी अभ्यास हादेखील लष्करी शिस्तीइतका कठीण करण्यात आला आहे. त्यांच्या स्पर्धात्मक वातावरणालाही स्मार्ट फोन आणि संगणकाची बाधा झालेली आहे. मुलांच्या मनघडणीच्या काळात या आयुधांपासून त्यांना लांब ठेवण्यासाठी शाळा तसेच कुटुंबपातळीवर प्रयत्न होत आहेत.
‘स्मार्ट’ समस्या
*झोप कमी होणे
*चिडचिडेपणा येणे
*बोधनक्षमता कमी होणे
*भावनांवर ताबा ठेवता न येणे.
*एकटेपणाला सामोरे जाण्याची क्षमता गमावणे.
*मुलांची भाषाक्षमता कमी होणे. सामाजिक कौशल्ये शिकण्याची संधी जाणे.
*मेंदूचा विकास नीट न होणे.
*सर्जनशीलतेला वाव नसणे.
*सायबर बुिलगसारख्या घातक खोडय़ा वाढणे.
*स्मरणशक्तीवर परिणाम व्हिडिओ गेमिंगमुळे मुलांना झोपेत भास होतात
मुलांमध्ये सोशल नेटवìकगचा वापर
फेसबुक ७० टक्के
स्काइप ४४ टक्के
ट्विटर २७ टक्के
भारतात काय?
एसी नेल्सन कंपनीनं २०१२ मध्ये भारतात केलेल्या पाहणीनुसार आपल्याकडे ४ कोटी लोक स्मार्टफोन वापरतात. त्यातील निम्म्याहून अधिक २५ वयोगटाच्या आतील मुले आहेत. मॅकअफी या संगणक सुरक्षा संस्थेने केलेल्या पाहणीनुसार कोलकाता शहरात इंटरनेट वापरामुळे मुलांमध्ये धोकादायक वर्तन दिसले. आठ ते बारा वयोगटातील मुलांसाठी मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद यांसारख्या शहरांत धोक्याच्या घंटा वाजत आहेत, पण त्यांचे मंद सूर तंत्रज्ञानाच्या गलबलाटात विरून गेले आहेत. फेसबुक वापरासाठी वय तेरा र्वष पूर्ण असावे लागते, पण या वयोगटातील ७० टक्के म्हणजे चारपकी तीन मुले फेसबुक वापरतात, असे त्यांनीच कबूल केले आहे. देशात सत्तर टक्के मुले फेसबुक वापरतात. त्यात कोलकात्याचे प्रमाण साठ टक्के आहे. देशात ७० टक्के मुले गृहपाठ संगणकावर करतात, पण कोलकात्यात हे प्रमाण ७२ टक्के आहे. देशात ८८ टक् के मुलं फेसबुकवर छायाचित्रं शेअर करतात, पण कोलकात्यात हे प्रमाण ९२ टक्के आहे. इंटरनेटवर ३६ टक्के मुले परिचय नसलेल्या व्यक्तींशी चॅटिंग करतात. विशेष म्हणजे सत्तर टक्के पालकांनीच मुलांना फेसबुकचा मार्ग दाखवला आहे. इंटरनेटवर रात्री आठनंतर चॅटिंग करणारी मुले ४५ टक्के आहेत, तर ४२ टक्के मुले मोबाइलवरील इंटरनेटचा वापर करतात. ९१ टक्के मुलं टॅब्लेटवर गेम खेळतात, ६३ टक्के मुलं मोबाइलवर चॅटिंग करतात, तर ६८ टक्के  मुलं स्मार्टफोनवर इंटरनेट वापरतात. ही सगळी आकडेवारी परदेशातील नाही, तर आपल्याच देशातील आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाची ही आयुधं वापरताना जरा या वळणावर विसावून थोडा विचार करायला हरकत नाही. त्यासाठी पालकांची मुलांशी गट्टी जमायला हवी, त्यांच्यासाठी वेळ काढायला हवा. डिजिटल युगातील शिष्टाचार आपण पाळले तरच मुलेही पाळणार आहेत, कारण ती अनुकरणप्रिय असतात.
गरज की चैन ?
शाळेत संगणक ठेवला व शिक्षक नसतील तर.. शिक्षणाचे मूळ तत्त्वच मुलांना समाजशील, विचारप्रवण बनवणे हे आहे. संगणक, स्मार्टफोन अगदी लहान वयात मुलांना दिले, तर त्यांचा कुठलाही विकास शक्य नसतो. अनेकांना असे वाटेल, की सिनिक मानसिकता आहे ही. मुलांना संगणक, स्मार्टफोन द्यायचा नाही म्हणजे काय त्यांना जगाच्या मागे ठेवायचे. इथे एवढेच सांगायचेय, की त्यांना ते जरूर द्या, पण योग्य वेळी द्या. आजचे फेसबुक, व्हॉट्स अप मुलांना समाजकौशल्ये शिकविण्यात कमी पडत आहेत. माहिती तंत्रज्ञान म्हणजे कल्पवृक्ष असता, तर आपल्याला समाजात इतक्या समस्या आज दिसल्या नसत्या. अनेक जण प्रतिष्ठा म्हणून मुलांना स्मार्टफोन घेऊन देतात, पण फोन स्मार्ट असला तरी मुले स्मार्ट होत नाहीत. ती कोमेजून जातात, त्यांचे भावविश्व आभासी होते, त्यांना जीवनाचा जिवंत रसास्वाद घेता येत नाही, त्यांचे जग काही इंचांच्या पडद्यावर सीमित होते. मग या सिलिकॉन व्हॅलीतील आईबाबांनी त्यांच्या मुलांना आधुनिक गॅझेट  देण्यास नकार का दिला असावा, याचे उत्तर  सापडते. घरोघरी नाही, तर निदान आपल्याच घरात ज्ञानेश्वर जन्मावेत, असा विचार त्यांनी कदाचित केला असेल, कारण माहिती तंत्रज्ञानाच्या मर्यादा त्यांना चांगल्या ठाऊक आहेत. संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन ही सगळी माहितीचा तिळगूळ वाटणारी साधने आहेत. ज्ञान मिळवण्यासाठी ती पूरक आहेत, पण परिपूर्ण नाहीत, हे या आयटी कंपन्यांच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या तंत्रज्ञांना माहीत असल्यानेच त्यांनी जाणूनबुजून मुलांना काही काळ तरी या आधुनिक आयुधांपासून दूर ठेवले असेल. स्मार्टफोन, संगणक आणखी इतर अनेक गॅजेट्स मुलांनी वापरावीत, पण लहान वयात नव्हे.
अध्यापन हा मानवी अनुभव आहे. साक्षरता, अंकगणिताचे ज्ञान, विश्लेषणाची सवय यात तंत्रज्ञान हा अडथळा आहे.
प्रा. पॉल थॉमस, फर्मन विद्यापीठ
 
पेन व कागद घेऊन शिकायला मला आवडतं, कारण आपली प्रगती संगणकावर पाहता येत नाही. आधी आपलं अक्षर खराब होतं व नंतर ते कसं वळणदार होत गेलं, हा फरक  वह्य़ा वापरल्या तरच कळतो. वीज गेली किंवा संगणकावर पाणी पडलं तर  सगळं संपलं.
गुगलच्या अधिकाऱ्याचा मुलगा फिन हेलिग

स्मार्टफोनचा वापर हा मुलांना धोकादायक असतो. बोबडे बोल बोलण्याच्या वयात त्यांना स्मार्टफोन दिला तर त्यांना बोलणे, ऐकणे, शब्दसंपत्ती वाढवणे जमणार नाही. त्यांच्यातील सर्जनशीलता संपेल. त्यांना तुम्ही स्मार्टफोन देऊन संकुचित करीत आहात.
मानसोपचारतज्ज्ञ हेल साल्झ

एकमेकांशी संपर्क हा मानवी पातळीवर असला पाहिजे. शिक्षकांचा मुलांशी संपर्क हा त्याचाच भाग आहे. तंत्रज्ञान वापरणे हे टूथपेस्ट वापरण्याइतके सोपे असते, ते तंत्रज्ञान बनवताना आम्ही मेंदूला फारसे काम ठेवलेले नसते.
मायक्रोसॉफ्टचे माजी अधिकारी

मुले अगदी लहान वयात ऑनलाईन होत आहेत याचे कारण आता इंटरनेट स्मार्टफोनवर, मोबाईलवर उपलब्ध आहे. वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत त्यांच्यात या साधनांची व इंटरनेटची तांत्रिक गुंतागुंत व इतर बाबी हाताळण्याची क्षमता नसते.
झिरो टू एट- यंग चिल्ड्रेन अँड देअर इंरटनेट यूज या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा अहवाल