शिवडी खाजणाला रोहित पक्षी भेट देतात, ही आपल्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. तेथीली खाजणाचे जर आपण योग्य त्या रीतीने रक्षण केले, तर आपण शिवडीला नक्कीच रामसार स्थळाचा दर्जा देऊ शकतो. माझ्या एका मित्राने मला अनपेक्षित फोन केला. म्हणाला : ‘‘मी आयआयटीच्या मेन गेट वरून फोन करीत आहे. मला माझ्या मुलांना फुलपाखरे दाखवायची आहेत. पण गेटवर मला आत सोडत नाहीत.’’ मी सिक्युरिटी ऑफिसरला बोललो व मित्राला व मुलांना आत सोडण्याची विनंती केली. पुन्हा एकदा माझ्यासमोर तसाच प्रसंग आला. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी विचारत होते : ‘मला माझ्या पतवंडांना चिमणी व पोपट दाखवायचे आहेत. कुठे आहेत ते पक्षी मुंबईत? माझ्या खिडकीतल्या आकाशातून तर ते गायब झाले आहेत!’ शहरीकरणाच्या विस्मयकारक रेटय़ात फुलपाखरे, चिमण्या व पोपट हद्दपार केले जात आहेत याकडे कुणाचे लक्ष आहे का? आपले परदेशी पाहुणे शिवडी ही परळ बेटाच्या (सात बेटांपैकी एक. ज्याने मुंबई शहर बनले आहे.) पूर्वेकडील किनाऱ्यावर बसलेली ६ बोटीवाडी आहे. शिवडी खाजण सुमारे पाच एकर क्षेत्रफळ जागेत आहे आणि त्याभोवती एक जुने बंदर, जहाज फोडण्याचे यार्ड, दोन तेल शुद्धीकरण कारखाने, खत निर्मितीचा कारखाना आणि एक मोठी झोपडपट्टी आहे. भरती-ओहोटीचा प्रवाह आणि आजूबाजूच्या पाणथळमुळे शिवडी आंतरवेलीय खाजणाला पोषक घटक प्राप्त होतात. त्यामुळे इथे संपन्न अशी वनस्पती आणि प्राणी जातीचा समूह आहे. सागरी जैविक विविधतेमध्ये पादकप्लवक, प्राणीप्लवक, सागरी एनीलीड, मदस्नेल, बारनॉकल्स, मासे, खेकडे, कोळंबी, पक्षी आणि शिकारी प्राण्यांचा समावेश असतो. शिवडीमध्ये हिवाळ्यात प्रचंड मोठय़ा संख्येने सायबेरियन फ्लेिमगो (रोहित पक्षी) येतात हे तर सर्वज्ञात आहे. सुमारे २०,००० फ्लेमिंगो पक्षी आणि १५० इतर जातीचे स्थलांतर करणारे पक्षी शिवडीत मुंबईतल्या हिवाळ्यात भेट देतात. सागरी निसर्गव्यवस्थेतील गुंतागुंत सागरी जैविक विविधता ही अन्नसाखळीतील निरनिराळ्या घटकांचा परस्पर सुदृढ नातेसंबंधांवर अवलंबून असते. गेल्या पन्नास वर्षांत जैवविविधतेवर आणि त्या अनुषंगाने एकंदरच सागराच्या निसर्ग व्यवस्थेवर खूप संशोधन झाले आहे. आता लक्षात आले आहे की समुद्राच्या किनाऱ्यालगतचा भाग , आद्र्रभूमी (wetlands) व दलदलीचा प्रदेश (marshes) मुख्यत्वे उपजाऊ भाग आहे. सागरी निसर्गप्रणालीमध्ये प्लवक जीवांपासून ते मोठे सस्तन प्राणी निवास करतात. ही निसर्गप्रणाली आपल्याला मोठय़ा प्रमाणात अन्न आणि उत्पन्न देते हे सर्वज्ञात आहे. या शिवाय इथे खारफुटी वनस्पती आणि सी ग्रासेस हे जैवविविधतेचे घटक आहेत. याशिवाय किनाऱ्यावरील वनस्पती समुद्र किनाऱ्याचे रक्षण करतात. सदर प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कारखान्यांमधून उत्सर्जित होणारा घनकचरा व मल:निस्सारणमधील विषारी रसायनांची मात्रा सीमित करण्यासाठी भारत सरकार कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणीही करत आहे. तसेच याकरिता इतर खासगी संस्था, शिक्षण संस्था व स्वयंसेवी संस्था देखील प्रयत्न करीत आहेत. परंतु कारखान्यांमधून उत्सर्जित द्रव्यांची मात्रा जास्त असल्याने केवळ काही संस्था करत असलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत. याकरिता सर्व नागरिकांनी आणि सरकारने प्रदूषणाबाबत सदैव जागरूक राहणे आवश्यक आहे. तसेच सर्व कारखानदारांनी विषारी उत्सर्जित घनकचरा व मल:निस्सारणासाठी योग्य ती शुद्धीकरण प्रक्रिया करणे आवश्यक आहे. बेसुमार मासेमारी, मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणामुळे सागरी जैविक विविधतेला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. २६ जुलै २००५ ला मुंबईला ढगफुटी झाली आणि त्याच वेळी भरतीची वेळ जुळून आल्यामुळे महापूर आला. ते आपण अजूनही विसरलेलो नाही. त्यानंतर केलेल्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा निष्कर्ष होता की खारफुटी नष्ट केल्यामुळे पाणी फार आतपर्यंत घुसू शकले. मला काय त्याचे? विषारी मूलद्रव्याने वर सांगितल्याप्रमाणे गाळामधून व पाण्यामधून निरनिराळ्या समुद्री वनस्पती व जीवजंतूंमध्ये एकवटतात. त्या प्रक्रियेला जैविक एकत्रीकरण (Bio-concentration) म्हणतात. निरनिराळ्या समुद्री जीव-जंतू, कीटक, मासे व इतर जैवसाखळीतील घटक वेगवेगळ्या विषारी प्रदूषणाबरोबर आपापल्या परीने मुकाबला करतात. त्यांच्या पेशींमध्ये कमी-अधिक प्रमाणात ही प्रदूषके दीर्घ सहवासातून भिनत राहतात. ही प्रक्रिया अपरिवर्तनीय असते. एकदा समुद्र जीवांमध्ये प्रदूषण भिनले की ते कुठल्याच मार्गाने सहजासहजी त्यांच्या शरीरातून बाहेर काढता येत नाही. बरे या सर्व विनाषाकडे कानाडोळाही करता येणार नाही. कारण बरेचसे समुद्री जीव हे माणसाचे अन्न आहे. उदाहरणार्थ मासे, खेकडे, झिंगे, शेवंड, शिंपले, इ. आपल्याला या प्रदूषणाकडे दोन पद्धतीने पाहावे लागेल. एक तर जेव्हा प्रदूषणाची पातळी खूप खालची आहे. मात्र ते वर्षांनुवर्षे सातत्याने होत आहे ती परिस्थिती. अशा वेळी ज्या जीव-जंतूंना हालचाल करता येते. ते प्रदूषित पाण्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. याउलट, दुसऱ्या प्रकारातील जीव - जे हालचाल करू शकत नाहीत - प्रदूषणाच्या सततच्या माऱ्यातही जगण्याची धडपड चालू ठेवतात. स्वत:त बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र बऱ्याच वेळा त्यांच्यावर जैविक बदल, व्यंग व नष्ट होण्याचे अरिष्ट येते. शहरी व कारखान्याच्या प्रदूषणामुळे तसेच आधुनिक शेतीत वापरली जाणारी विषारी रसायने व खते यांच्यामुळे जी काही जैवहानी झाली आहे, त्याची गणना नाही! वर वर्णन केलेले दोन परिणाम शेवटी एकाच गुंतागुंतीच्या अन्न-साखळीचे घटक आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे. प्रदूषित पाण्यात जगण्याचा प्रयत्न करणारे, न हालचाल करू शकणारे जीव कधी ना कधी अखेरीस वरच्या पातळीवरच्या सागरी जीवांच्या भक्ष्यस्थानी पडतात व वरची साखळीही अप्रत्यक्षपणे प्रदूषण घशाखाली लोटते! या अन्नसाखळीतला शेवटा घटक बऱ्याच वेळा मनुष्यप्राणी असतो. अशा रीतीने आपण बेफिकिरीपणे समुद्रात विसर्जित केलेले प्रदूषण आपल्यावरच पलटवार करते. हे सर्व समजावून घेतल्यावर ‘मला काय त्याचे?’ असे म्हणता येईल का? एके काळी शिवडीमध्ये जहाज तोडण्याचे आणि त्यातील जुन्या वस्तूंना सेकंडहँड बाजारपेठेत विकण्याचा उद्योग अनेक वर्ष दारूखाना विभागात चालत होता. त्यातून होणाऱ्या प्रदूषणाची कल्पना आल्यानंतर गेली काही वर्ष मात्र हा व्यवसाय रितसर बंद करण्यात आला आहे. तरीही त्याचे परिणाम अजूनही दिसतात. नेमके याच गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी माझे विद्याथ्र्यी शिवडी खाजणातील सेडिमेंट (sediment), अलगी (alegae), खेकडे, मासे आणि पक्षी या पाच मुख्य घटकांचा अभ्यास करत आहेत. रामसार कन्व्हेन्शन कन्व्हेन्शन ऑन वेटलॅन्ड्स ज्याला रामसर कन्व्हेन्शन असे म्हटले जाते. हे आद्र्रभूमीचे संरक्षण करण्यासाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय साधन आहे. रामसर कन्व्हेन्शन इराण येथील रामसर इथे १९७१ मध्ये स्वाक्षरीत करण्यात आले आहे. युनेस्को (UNESCO) ही मुख्य संस्था आहे. जी आर्द्रभूमी आणि त्यातील साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी योग्य अशी चौकट उपलब्ध करून देते. रामसर स्थळांमध्ये आद्र्रभूमी, सरोवर, नदी, स्वाम्पस (swamps), मार्शेस (marshes), खाजण, इश्चुरीज (estuanes) टाईडल फॅल्टम (tidal flatsखारफुटी, कोरल रिफ्स (coral reefs) याचा समावेश असतो. या कन्व्हेन्शनचे सेक्रेटरियट (secretariat) स्वित्झर्लण्ड (switzerland)ि येथे स्थापित आहे. संपूर्ण जगात सुमारे १९७० रामसर स्थळे आहेत. यामध्ये बांगलादेशातील सुंदरबन्स, कॅनडातील डेल्टा मार्श, इजिप्तमधील बुरुलस सरोवर इत्यादी यांचा समावेश आहे. भारतात एकूण १९ रामसर स्थळे आहेत. यामध्ये केरळ येथील अष्टभूमी आद्र्रभूमी, ओरिसातील चिलिका सरोवर, राजस्थान येथील किओलादीओ नॅशनल पार्क इत्यादी यांचा समावेश आहे. रामसर स्थळांमुळे जैविक विविधतेचे रक्षण, इकोटुरिझम, परिस्थितीक व्यवस्थेला फायदे तसेच रोजगार निर्मितीचे पर्याय उपलब्ध होतात. शिवडी खाजणाला रोहित पक्षी भेट देतात, ही आपल्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. शिवरी खाजणाचे जर आपण योग्य त्या रीतीने रक्षण केले, तर आपण शिवडी खाजणाला नक्कीच रामसार स्थळाचा दर्जा देऊ शकतो. तसे प्रयत्नही झाले आहेत, असे ऐकतो. ‘अतिथी देवो भव!’ आपण म्हणतो खरे पण त्यांची सोय व्हावी व त्यांनी सुखरूप परतावे यासाठी प्रयत्न केले आहेत का? लेखक आयआयटी-मुंबई येथील ‘पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रा’त प्राध्यापक असून या लेखातील मते वैयक्तिक आहेत. ईमेल : asolekar@gmail.com